अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५
क्रमशः पुढे चालू....
सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या घरी हलवले. राजकुमारी अंबाला हिला राजगादी देण्याचे ठरले. अंबालाने महालात प्रवेश केला. सर्व कारभार न्यायदंडाधिकाऱ्याकडे देवून महारुद्र प्रधान वाड्यात गेला होता. नगर दंड अधिकाऱ्याने सर्व राज्यव्यवस्था अंबालेच्या हाती सोपवली होती. सदर दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. सर्वत्र आनंदी आनंद होता. गुढ्या तोरणे सजली होती. गुप्त हेरांनी बातमी आणून दिली होती. त्यावरून ते पत्र प्रधान वेददत्त यांचे नव्हते हे सिद्ध झाले. तसेच त्यांची हत्या करणारा तो हत्यारा अपरांत देशातील राजाने पाठवल्याचे सिद्ध झाले. अंबेला आपण प्रधान वेददत्त यांच्याशी चुकीचे वागलो असे वाटत होते. तिने क्षमादान पत्र पाठवून प्रधान कुटुंबीयांना अभयदान दिले होते.
अंबाला महालात मंत्र्यांना सर्व कामकाज नेमून देऊन ती आराम करण्यास जात असताना एक शिपाई निरोप घेऊन आला. सदर सैनिकाच्या हाती एक पत्र होते. ते मिळताच तिने ते वाचण्यास सुरू केले. त्यात लिहिले होते.
प्रधान वेददत्त व भिल्लम यांचा पुत्र महारुद्र यांचा राजकुमारी यांना नमस्कार आपण मोठ्या मनाने आम्हास माफ केले. त्याबाबत आभारी आहोत. सदर राज्यव्यवस्था आपल्या हाती सोपवून आम्ही सर्व प्रधान कुटुंबीय इथून प्रस्थान करत आहोत. तरी आपणास प्रधानाच्या महालाचे सर्व दस्त ऐवज व इतर धन ठेवून आम्ही जात आहोत. तरी आपण सदर राज्यपदी योग्य प्रधान निवडावा व कारभार पहावा.
आपला सेवक
महारुद्र
ते पत्र वाचताच अंबालेस दुःख झाले. तिच्याजवळ त्रिशला आली. तिने तो मजकूर पाहिला. ती आंबालेस म्हणाली, “आंबाले तुजसाठी या विरक्त पुरुषा इतका योग्य वर मिळणार नाही. त्याच्या मनात आले असते तर तो राज्यावर आपला हक्क दाखवू शकला असता. तसेच अनेक सैन्य त्यास अंकित आहेत. तरी देखील त्याच्या या त्यागी वृत्तीने दाखवून दिले की तोच योग्य वर आहे. व आपण शिव मंदिरात त्यास दिलेले वचन पूर्ण करायला हवे. तू जर त्याला थांबवले नाहीस तर महादेव तुला क्षमा करणार नाहीत.”
अंबाला चटकन राजमहालातून बाहेर पडली. तिने एक अश्व स्वार महारुद्र ज्या वाटेने नगराबाहेर गेला त्या दिशेला पाठवला. व ती देखील काही अश्वस्वार घेऊन निघाली.
राज्य मार्गावर एका वळणावर महारुद्रास व त्याच्या बरोबर चाललेल्या त्याच्या कुटुंबास त्या अश्वस्वाराने गाठले. व राजकुमारी अंबाला आपणास भेटण्यासाठी येत आहे. असे त्याने सांगितले.
महारुद्राच्या मनात विचारांचे काहूर माजले. थोड्याच वेळात अंबाला तिथे दाखल झाली. अश्वावरून उतरून ती त्याच्या समोर आली. राज पेहराव्यात ती खूप सुंदर दिसत होती. पण तिच्याकडे पाहणे चुकीचे असल्याने महारुद्राने मान खाली घातली. ज्याच्या मागे अनेक ललना लागलेल्या असताना तो तिच्यापुढे नतमस्तक पाहून अंबालेस राग आला. ती त्यास म्हणाली,
“ आपण आम्हास असे न भेटता जाणे योग्य नव्हे.”
महारुद्र, “ पण मी आपणास पत्र पाठवले होते.”
अंबाला, “ असे न भेटता जाऊन आपण एक गुन्हा केला आहे. व यासाठी आपणास शिक्षा देण्यात येत आहे.”
महारुद्र, “ कोणती शिक्षा.”
अंबाला, “ आपणास विवाह करावा लागेल.”
महारुद्र, “ कोणाशी?”
अंबाला, “ माझ्याशी.”
तिचे ते शब्द ऐकताच तो
महारुद्र, “ नाही मी फक्त कृष्णवर्णी इंद्रावतीशिवय कोणाशीही विवाह करणार नाही.”
अंबाला, ( हसत) “ मी आहे तुमची इंद्रावती. जिच्यासाठी तूम्ही तो पण जिंकलात. या राजकुमारीला आपल्या जीवनात थोडीशी जागा मिळेल का?”
तिच्या तोंडून ते वाक्य एकताच त्यास राहवले नाही. तो तिच्याकडे वर तोंड करून पाहू लागला. त्याने आपले हात तिच्या हाती दीले. ती त्यास सर्व कुटुंबासमवेत महादेव मंदिरात घेऊन गेली. तिथे त्रिशला हजर होती. तिने ठरल्या प्रमाणे सर्व तयारी केली होती. त्या ठिकाणी अंबाला व महारुद्र यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
तदनंतर महारुद्र राजा व अंबाला महाराणी झाली. व ते दोघे सुखात आपला राजपाट सांभाळू लागले. पुढे त्याने आपला मित्र विरभद्र याच्याशी त्रिशलेचा विवाह करून दिला. व शत्रू देश अपरांत राज्यावर हल्ला करून त्याने ते राज्य जिंकून घेतले. व तेथे आपला मित्र वीरभद्रची राजा म्हणून निवड केली. व त्या प्रदेशावर वीरभद्र व त्रिशला सुखाने राज्य करू लागली.
अशा प्रकारे कुंतल देशाच्या या कन्या सुखाने राजपाट सांभाळू लागल्या.
समाप्त
















