Sunday, April 23, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५



क्रमशः पुढे चालू....

सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या घरी हलवले. राजकुमारी अंबाला हिला राजगादी देण्याचे ठरले. अंबालाने महालात प्रवेश केला. सर्व कारभार न्यायदंडाधिकाऱ्याकडे देवून महारुद्र प्रधान वाड्यात गेला होता. नगर दंड अधिकाऱ्याने सर्व राज्यव्यवस्था अंबालेच्या हाती सोपवली होती. सदर दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. सर्वत्र आनंदी आनंद होता. गुढ्या तोरणे सजली होती. गुप्त हेरांनी बातमी आणून दिली होती. त्यावरून ते पत्र प्रधान वेददत्त यांचे नव्हते हे सिद्ध झाले. तसेच त्यांची हत्या करणारा तो हत्यारा अपरांत देशातील राजाने पाठवल्याचे सिद्ध झाले. अंबेला आपण प्रधान वेददत्त यांच्याशी चुकीचे वागलो असे वाटत होते. तिने क्षमादान पत्र पाठवून प्रधान कुटुंबीयांना अभयदान दिले होते.

अंबाला महालात मंत्र्यांना सर्व कामकाज नेमून देऊन ती आराम करण्यास जात असताना एक शिपाई निरोप घेऊन आला. सदर सैनिकाच्या हाती एक पत्र होते. ते मिळताच तिने ते वाचण्यास सुरू केले. त्यात लिहिले होते.

प्रधान वेददत्त व भिल्लम यांचा पुत्र महारुद्र यांचा राजकुमारी यांना नमस्कार आपण मोठ्या मनाने आम्हास माफ केले. त्याबाबत आभारी आहोत. सदर राज्यव्यवस्था आपल्या हाती सोपवून आम्ही सर्व प्रधान कुटुंबीय इथून प्रस्थान करत आहोत. तरी आपणास प्रधानाच्या महालाचे सर्व दस्त ऐवज व इतर धन ठेवून आम्ही जात आहोत. तरी आपण सदर राज्यपदी योग्य प्रधान निवडावा व कारभार पहावा.

आपला सेवक

महारुद्र

ते पत्र वाचताच अंबालेस दुःख झाले. तिच्याजवळ त्रिशला आली. तिने तो मजकूर पाहिला. ती आंबालेस म्हणाली, “आंबाले तुजसाठी या विरक्त पुरुषा इतका योग्य वर मिळणार नाही. त्याच्या मनात आले असते तर तो राज्यावर आपला हक्क दाखवू शकला असता. तसेच अनेक सैन्य त्यास अंकित आहेत. तरी देखील त्याच्या या त्यागी वृत्तीने दाखवून दिले की तोच योग्य वर आहे. व आपण शिव मंदिरात त्यास दिलेले वचन पूर्ण करायला हवे. तू जर त्याला थांबवले नाहीस तर महादेव तुला क्षमा करणार नाहीत.”

अंबाला चटकन राजमहालातून बाहेर पडली. तिने एक अश्व स्वार महारुद्र ज्या वाटेने नगराबाहेर गेला त्या दिशेला पाठवला. व ती देखील काही अश्वस्वार घेऊन निघाली.

राज्य मार्गावर एका वळणावर महारुद्रास व त्याच्या बरोबर चाललेल्या त्याच्या कुटुंबास त्या अश्वस्वाराने गाठले. व राजकुमारी अंबाला आपणास भेटण्यासाठी येत आहे. असे त्याने सांगितले.

महारुद्राच्या मनात विचारांचे काहूर माजले. थोड्याच वेळात अंबाला तिथे दाखल झाली. अश्वावरून उतरून ती त्याच्या समोर आली. राज पेहराव्यात ती खूप सुंदर दिसत होती. पण तिच्याकडे पाहणे चुकीचे असल्याने महारुद्राने मान खाली घातली. ज्याच्या मागे अनेक ललना लागलेल्या असताना तो तिच्यापुढे नतमस्तक पाहून अंबालेस राग आला. ती त्यास म्हणाली,

“ आपण आम्हास असे न भेटता जाणे योग्य नव्हे.”

महारुद्र, “ पण मी आपणास पत्र पाठवले होते.”

अंबाला, “ असे न भेटता जाऊन आपण एक गुन्हा केला आहे. व यासाठी आपणास शिक्षा देण्यात येत आहे.”

महारुद्र, “ कोणती शिक्षा.”

अंबाला, “ आपणास विवाह करावा लागेल.”

महारुद्र, “ कोणाशी?”

अंबाला, “ माझ्याशी.”

तिचे ते शब्द ऐकताच तो

महारुद्र,  “ नाही मी फक्त कृष्णवर्णी इंद्रावतीशिवय कोणाशीही विवाह करणार नाही.”

अंबाला, ( हसत) “ मी आहे तुमची इंद्रावती. जिच्यासाठी तूम्ही  तो पण जिंकलात. या राजकुमारीला आपल्या जीवनात थोडीशी जागा मिळेल का?”

तिच्या तोंडून ते वाक्य एकताच त्यास राहवले नाही. तो तिच्याकडे वर तोंड करून पाहू लागला. त्याने आपले हात तिच्या हाती दीले. ती त्यास सर्व कुटुंबासमवेत महादेव मंदिरात घेऊन गेली. तिथे त्रिशला हजर होती. तिने ठरल्या प्रमाणे सर्व तयारी केली होती. त्या ठिकाणी अंबाला व महारुद्र यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

तदनंतर महारुद्र राजा व अंबाला महाराणी झाली. व ते दोघे सुखात आपला राजपाट सांभाळू लागले. पुढे त्याने आपला मित्र विरभद्र याच्याशी त्रिशलेचा विवाह करून दिला. व शत्रू  देश अपरांत राज्यावर हल्ला करून त्याने ते राज्य जिंकून घेतले. व तेथे आपला मित्र वीरभद्रची राजा म्हणून निवड केली. व त्या प्रदेशावर वीरभद्र व त्रिशला सुखाने राज्य करू लागली.

अशा प्रकारे कुंतल देशाच्या या कन्या सुखाने राजपाट सांभाळू लागल्या.

समाप्त


Saturday, April 22, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४४





क्रमशः पुढे चालू.......

अश्वावर स्वार होऊन निघून आलेल्या अंबालेस अन्न गोड लागेना झाले होते. ती कोणत्याही नगरात राहण्यापेक्षा अरण्यात राहू लागली. पण ज्या त्रिशलेस ती मागे टाकून आली होती. तिच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली होती. अरण्यात राहून तेथील नदीवर अंघोळ केल्यामुळे तिची काजळी धुवून जाऊ लागली. तिच्या मनात त्रिशलेस सोडवण्याची उत्कट भावना जागृत होत होती.

पण आता तिला सोडवणे कठीण झाले होते. आता ती पुन्हा गौरवर्णीय दिसू लागली होती. जंगलात राहून त्रासलेली अंबाला नगराजवळील ग्रामी आली. असता तिला समजले की त्रिशलेस सुळावर चढवले जाणार आहे. पण तिला दिलेली शिक्षा अन्याय कारक होती. कारण राज्यात कोणत्याही स्त्रीस सुळावर चढवले जात नव्हते. व त्रिशलेस सुळावर चढवले जाणार असल्याचे समजल्या पासून ती बेचैन झाली. तिने जवळून जाणाऱ्या एका वाटसरू कडून माहिती मिळवली. व तेथून जाताना एका घरामागील सुकत घातलेली एका नारीची वस्त्रे तिने उचलली. व ती अरण्यात गेली. आता तिची तिला लाज वाटू लागली. कारण स्वतःच्या बदल्यासाठी तिने त्रिशलेस मृत्यच्या जबड्यात टाकले होते. आपले काहीही होवो. आपण त्रिशलेस या मृत्यूच्या सापळ्यातून वाचवायचे तिने ठरवले.

तो काळा दिवस उजाडला. दोन दिवसांनी फाल्गुन अमावस्या होती. अंबाला एका वृक्षाच्या ढोलीत विसावली होती. अचानक तिला एक काळसर्प चावत आहे. व एक काळसर रंगाचा पुरुष तिच्या रक्षणार्थ भाला घेऊन उभा आहे. असे स्वप्न पडले. तिला जाग आली. तिने पहिले सर्वत्र उजेड पडला आहे. पुर्व क्षितिजावर रविराज उगवला आहे. ती तेथून खाली उतरली. व नदीवर आली. तिने तिथे स्नान केले. व स्नान करतेवेळी तिला नदीपालिकडे एक शिव मंदिर दिसले. सदर मंदिर जुन्या काळातील एका राजवटीत बांधले गेले होते. प्रांगणातील नंदीवरून तिने ते शिव मंदिर असल्याचे ओळखले. प्रभातीची वेळ असल्याने कोणी तिथे नव्हते. ती तिथे गेली. मंदिरात अनेक कोळीस्टके होती. तिने बाजूच्या झुडपातील डहाळ्या काढल्या. व संपूर्ण मंदिर झाडून काढले. व स्वच्छ केले.

त्यानंतर तिने आपल्या अंगावरील वस्त्र ओले करून नंदी व शिव पिंडीस पाणी घातले. नंतर तेथील जवळील रानातील फुले फळे व बिल्वपत्रे तिने वाहिली. व नमस्कार केला. व त्रिशलेच्या सुटकेविषयी तिने प्रतिज्ञा केली. व साकडे घातले. व पुन्हा अरण्यात आली. व आपला पेहराव बदलला. व आपली तलवार तिने एका बांबूच्या काठीत लपवली. व एका वृध्द म्हातारीचा पेहराव करून ती राजधानी नगराच्या दिशेने निघाली.

नगरात आल्यावर ती वृध्द म्हातारी प्रमाणे काठी टेकत चौकशी करत ती त्या वधस्थंभ असणाऱ्या नगरातील मध्य चौकात असणाऱ्या प्रांगणाकडे निघाली. शिपाई त्रिशलेस ढकलत ढकलत त्या ठिकाणाला घेऊन चालले होते. वाटेत नगरातील व राज्यातील अनेक लोकांची गर्दी झाली होती. तिला अनेक लोक दगड मारत होते. व राज्यद्रोही देखील म्हणत होते. अंबाला गर्दीतून वाट काढत तिकडे निघाली. लोकांचे कडे तोडत ती पुढे जाताना एक स्त्री तिला म्हणाली, “ अहो आजीबाई, तिथे काही अन्न वाटणार नाहीत. एवढ्या गडबडीने निघालाय.”

वृध्द वेशातील अंबाला, “तेच पाहायला जातेय मुली मी, की ती धाडशी कुंतल कन्या कोण आहे ते.”

ती सरळ त्या निर्माण केलेल्या वधस्तंभाजवळ असणाऱ्या गराड्यात आली. तिथे त्रिशलेस बांधले होते. तिच्या शरीरावर चाबकाचे वळ होते. अंगावरील कपडे फाटलेली होती. तिच्या भोवती शिपायांचा पहारा होता. जवळच असणाऱ्या उंच असनावर महारुद्र, राजमाता श्यमलाता व दरबारातील मंत्री अन् राज्य न्यायदंड अधिकारी विराजमान झाले होते.

अंबाला सैन्याचा गराडा न्याहाळत आत शिरण्यासाठी पाहू लागली. व एके ठिकाणी असणाऱ्या बांबूच्या पोकळ खिंडारातून ती आत शिरली. तिथे आल्यावर सैनिकांनी तिला हटकले. तेव्हा तिने त्या पहारेकरू सैन्यास ढकलले. व ती आत शिरली. व त्रिशलेजवळ जाऊन तिने तिला मिठी मारली. ते पाहताच त्रिशला तिला म्हणाली, “आंबे कशाला आलीस इथे, जा निघून.”

तेवढ्यात जवळचे सैनिक धावले. व तिला पकडण्यास धजावले. आंबालेने लगेच आपल्या हातातील काठीत लपलेली तलवार उपसत त्या सैनिकास म्हणाली, “थांबा तिथे नाहीतर एकेकास यमसदनी धाडेन.”

तिचा तो कठोर आवाज ऐकताच सैन्य थबकले. व तिच्या हातातील तलवारीला पाहू लागले. ती त्याना परिचयाची वाटली. इतक्यात महारुद्र आपल्या सिंहासनावरून उठत “ कोण आहेस तू. व या राजद्रोही स्त्रीचा व तुझा संबंध काय?”

वृध्द वेशातील अंबाला त्यास म्हणाली, “ त्रिशला राजद्रोही नाही. व तिने नाही मारले प्रधान वेददत्त यांना, ते दुसऱ्या शत्रूकडून मारले गेले. व राजद्रोहाचे म्हणत असाल तर प्रधान वेददत्त हे राज्याचे खरे द्रोही आहेत. त्याचा हा घ्या पुरावा.”

श्यामलता, “ पण तू कोण आहेस. व तुझा या राजघराण्याशी संबंध काय? व एखाद्या जबाबदार व्यक्तीवर तू जे आरोप करत आहेस. त्यास शिक्षा देण्याचा अधिकार तुला कोणी दिला.”

अंबाला, “ राजमाता मला ओळखले नाही का? मी आहे अंबाला, राजकुमारी अंबाला, महाराज जयवर्धन व महाराणी अरूणावती यांची कन्या.”

ती आपला वृध्द स्त्री पेहराव टाकून ती उभा राहिली. तिने आपला डोक्याचा टोप काढून टाकला.

अंबाला असे म्हणताच जो तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तिच्या हातात राज तलवार चमकत होती.

महारुद्र तिच्याकडे पाहू लागला. ती सूर्याच्या तेजाने तळपत होती. तिचे लांबसडक काळेभोर केस उन्हात चमकत होते. व ती एखाद्या सुंदर देवतेप्रमाणे दिसत होती. तिला पाहताच त्या कृष्णकुमारी इंद्रावतीची आठवण झाली. तो तिच्याकडे पहातच राहिला.

महारुद्र, “ आपण स्वतःस राजकुमारी म्हणता याचा काही पुरावा.”

अंबाला, ( हसत)“ पुरावा हा घ्या. ही माझी कुलदेवता शिव शंकराचे प्रतीक असणारी साखळी. व माझी ही राज्यतलवार. व ती राज्य न्यायदंड अधिकाऱ्यांना प्रधान वेददत्त यांचे ते पत्र देते.

त्यामुळे तिथे असणारी सर्व रयत अंबालेस पाठिंबा देते. व त्रिशलेस सोडण्यास सांगू लागतात. एकच गलका होतो. शिपाई ही अंबालेस ओळखतात व तिला न्याय मिळाला पाहिजे. ती राज्याची खरी वारस आहे. हे बोलू लागतात. तेव्हा पुरावे तपासून राज्य न्याय दंडाधिकारी सर्वतोपरी निर्णय महारुद्र वर सोपवतात.

महारुद्र, “ सर्व पुरावे पाहून व तेथील जनमत पाहून निर्णय जाहीर करतो.

“ सदर घटने नुसार आपणास झालेले कष्ट व आपणावर आलेली संकटे पाहता, तसेच इतर सादर पुरावे पाहता आपण या राज्याच्या खऱ्या वारस आहात. त्यामुळे एका राज्यपद अधिकारी व्यक्तीस शासन करणेचा मज अधिकार नाही. इथून पुढील निर्णय राज्याचे वारस या नात्याने आपण घ्याल. मी व माझे कुटुंब तुम्हास झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. व सदर राज्य पदावरील माझा हक्क मी सोडत आहे. तसेच मी व माझे कुटुंबीय हे राज्य सोडून जात आहोत. यासाठी मला एक सप्ताहाची मुदत मिळावी. व जर आपणास वाटले की प्रधानाच्या गुन्ह्याची शिक्षा मज द्यावी तर ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”

असे बोलून आपला निर्णय देवून तो निघून गेला. महाराणी श्यामलता दुःखी होऊन निघून गेल्या. महारुद्राच्या या न्यायीवृत्तीने लोक प्रभावीत झालीत. व त्याचा जयजयकार करू लागली.

….. ….. ….. …… …..

क्रमशः पुढे.....

Friday, April 21, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४३

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४३



क्रमशः पुढे चालू.......

 तो वेगाने महालात आला. त्याने तिथे आल्यावर सर्व पाहणी केली. महाराज मृत झाल्याचे कळले. त्यास वाईट वाटत होते. त्याने शिपायांना शोध घेण्यास सांगितले. व शत्रू कोठून आला याचा अंदाज बांधून तो अश्वदल घेऊन बाहेर पडला. व वेगाने अश्वदलाची दिशा बदलून तलावाकडे तो निघाला. व काही सैन्य अरण्याकडील गुप्त भूयाराकडे त्याने पाठवले. व तो वेगाने तलावाजवळ आला.

 तिथे आल्यावर त्याने तेथील पहार्यावरील सैन्य पाहिले. ते बेशुद्ध होते. त्याने त्यातील एका सैन्याला लागलेला तिर त्याने उपसला व पाहिला. त्याने तो दिवटीच्या उजेडात न्याहाळला. तेव्हा त्याच्या लक्षात आले. की आश्रमावरील हल्ला करणाऱ्या त्या दोन घोषाधारी आक्रमक वीरांगनांकडे असेच शर होते. त्याने आपल्या सैन्याना सावध होण्यास सांगितले. व तो आपला मित्र वीरभद्राजवळ आला. त्याने पाहिले की तो मुर्च्छीत पडला आहे. त्याने ओळखले की हा हल्ला करणाऱ्या त्या दोन महिलाच असणार. पण त्या असे का करत असाव्यात याबाबत त्याच्या मनात गूढ वाढले होते. व राजमहालावरील त्यांच्या अशा प्रकारच्या हल्ल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

इतक्यात एक शिपाई सांगत आला. की तलावाच्या पलीकडे कोण तरी बाहेर पोहून पडत आहे. तेव्हा महारुद्राने आदेश दिला. व अश्वदलातील जवान तिकडे निघाले. त्या दोघी तोपर्यंत पाण्याबाहेर आल्या होत्या. त्या आता खूप थकल्या होत्या. दुपारचा खाल्लेला ताकयुक्त पाणीभात केव्हाच जिरला होता. तरी देखील त्यांना लढावे लागणार होते. अश्वदलातील सैन्य येताना पाहून त्रिशला व अंबाला दोघीही आपल्या भात्यातील तिरांनी वेध घेऊ लागल्या. दिवटीच्या उजेडात त्यांनी सैन्य टिपण्यास सुरुवात केली. पण त्यांचे शर लागूनही ते पुढे येत होते. कारण ते विशेष चिलखती अश्वदल होते. तेव्हा अंबा म्हणाली, “ कंठ”

त्रिशलाने शर कंठ धरून नेम सोडले. व ते सैन्य पटापट खाली पडू लागले.

अश्वदल नायकाने ते हेरले. व दोनच दिवट्या ठेवून ‘अधोमुख' असे उच्चार त्याने केला. सर्व सैन्य खालच्या दिशेला आपल्या माना झुकवून वेगाने येऊ लागले. त्या दोघींनी त्यांची सूचना ऐकली होती. त्या वेगाने तलावा जवळील झाडीत घुसल्या. आता अंधारात त्यांना शोधणे कठीण होते. त्या वनाच्छादित भागात गर्द झाडे आता त्या दोघींच्या साहाय्यास आली होती. अंधाराचा फायदा घेऊन त्या एक एक सैन्य कापू लागल्या. महारुद्र त्या किती वीर आहेत हे जाणून होता. त्याने लगेच आदेश दिला व राखीव सैन्य तुकडी बोलावली. तुकडी हजर झाली. व वेगाने झाडीत घुसू लागली. त्या दोघींनी आता लढत राहण्यापेक्षा निसटून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या तुकडीने त्या विभागास घेरले होते. महारुद्र देखील तिथे आला

त्रिशला ही तिरंदाजित हुशार होती. तिला अंबाले प्रमाणे तलवार बाजी जमत नव्हती. अंबाला अष्टपैलू होती. त्रिशलेने पाहता पाहता झाडीतून लपत छपत तिन चार शिपाई टिपले. पण तीच्या भात्यातील शर संपले होते. तिने तो चाप व भाता तिथेच फेकला. व तेथील मृत शिपायाची तलवार तिने उचलली व ती वाटेत येईल त्यास हातघाई करत चालली. इतक्यात एका राखीव दलातील शिपायाच्या हातास तिचा धनु लागला. त्याने तो उचलून तेथील मृत शिपायाला लागलेला शर काढला. व नेम धरून शर सोडला. तो शर त्रिशलेच्या दंडाजवळील खुबनीत लागला. ती कोसळली. ती खूप थकली होती. आता लढणे कठीण झाले. अंबाला तिच्या जवळ आली. व तिला चलण्यास विनवू लागली.

तेव्हा त्रिशला म्हणाली, “माझी साथ, फक्त इथवर व माझा बदला ही पूर्ण झाला आहे. तेव्हा तू निघ. नाहीतर माझ्यासोबत तू ही मरशील.”

अंबाला, “ जीवनाच्या या रणांगणात मी तुला सोडून जाणार नाही. मरण आले तरी चालेल.”

त्रिशला, “ मुर्खासारखे बोलू नकोस. तुला शपथ आहे माझी. तू निघ. माझी साथ इथवरच.”

त्रिशला विणवत होती. शेवटी अंबाला वेगाने समोरील शिपायांना मारत पुढे गेली. व एका वळणावर बाहेर पडली. तिथे एका अश्वदलातील विरास खाली पडून ती घोड्यावर स्वार झाली. व वेगाने नाहीशी झाली. बाकीच्या अश्वदलातील सैन्याने तिला पकडणेचा प्रयत्न केला. पण ते पकडू शकले नाहीत.

इकडे त्रिशलेस कैद करण्यात आले. महारुद्राने तिला कारागृहात पाठवले.

इकडे अश्वस्वार जे  अंबालेच्या मागे गेले होते. ते महारुद्राजवळ आले. व त्यांनी त्यास सांगितले. की तो घोशाधारी  शत्रू हातून निसटला.

महारुद्र त्याचा शोध घेण्यास सांगून  महालात आला. महालात शोक चालू होता. तिथे आल्यावर तो चिडला.  व त्या कारागृहात कैद केलेल्या बुरखाधारी ललनेस ठार मारण्यास निघाला.  तेव्हा मंत्री महोदयांनी त्यास अडवले. व ही वेळ हा विचार करण्याची नसून विचारपूर्वक त्या महिलेच्या साहाय्याने महाराजांच्या हत्यारांपर्यंत पोहोचता येईल. त्याने मग महाराजांचा अग्नी संस्कार केला.

दुसऱ्या दिवशी त्रिशलेस जाग आली. तिला जाग आल्याचे पाहताच शिपाई निरोप घेऊन गेला. महारुद्र तिला पाहणेस आला. बंधिखाण्याचे दरवाजे जोरात आपटत तो तिच्या समोर आला. विस्कटलेल्या अवस्थेतील आपले केस सावरत ती त्यास बघून हसत. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला या गोष्टीचा जराही पश्चाताप वाटत नव्हता. तिने आपले केस बाजूला सारले. महारुद्र तिला पाहताच

महारुद्र, “कोन त्रिशला तू हे काय केलेस. व या मागे तुझा हेतू काय?”

त्रिशला, “ मी माझा बदला घेतलाय.”

महारुद्र, “ कसला बदला महाराज वेददत्त यांसारख्या प्रजेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस मारून तू कठोर गुन्हा केला आहेस. व तुझा दुसरा साथीदार कोण होता? व इंद्रावती कुठे आहे.”

त्रिशला, “ तू लावलेल्या अग्नीकांडात ती नष्ट झाली.”

महारुद्र, “ काय मी लावलेलं अग्निकांड, छे हे माझ्यावर चुकीचे आरोप करतेस. माझं इंद्रावतीवर प्रेम होत. अन् जर का मला तिला मारायची असती तर तिच्यासाठी एवढा उपद्व्याप मी केलाच नसता. तसे पाहता आमचे प्रेम तुलाच पसंत नव्हते.”

त्रिशला, “ मी काही मूर्ख नाही. संपूर्ण  पारधी वस्तीत आमच्याच सदनास आग लागली. कारण तुझ्या या राजे जिवनात अंबा आडवी आली होती. व आमच्या शरीराची राख होण्याआधी तू बोहल्यावर चढत आहेस. हा पुरावा काय कमी आहे. व मी महाराज वेददत्त यांना नाही तर प्रधान वेददत्त यांना शासन केले आहे. व मला या करणीचा जराही पश्चाताप होत नाही.”

महारुद्र, “ हे तू खोटं बोलतेस.  सांग इंद्रावतीचे काय केलेस तु? त्या अग्नितून तू वाचलीस मग इंद्रावती कुठे आहे?”

त्रिशला, “ मला मरण आले तरी चालेल. पण मी मात्र सांगणार नाही.”

महारुद्र तुरुंग अधिकाऱ्यास तिच्यावर कठोर उपाय करून तिच्या साथीदाराची नावे वदवून घेण्यास सांगतो. तसेच इंद्रावतीचा पत्ता देखील काढण्यास सांगतो. व तेथून निघतो. जाताना त्याच्या मनात विचारांचे  काहूर माजू लागले. अनेक प्रश्न त्याच्या मनात उठू लागले. राहून राहून त्यास वाटत होते की इंद्रावती जिवंत आहे. व या त्रिशलेने तिचे काही बरेवाईट केले असणार.

त्याने त्रिशलेवर तेथील तुरुंग अधिकाऱ्यास सांगून अनन्वित अत्याचार केले. खूप त्रास सहन करूनही त्रिशलेने ब्र शब्द ही काढला नाही.

इकडे महालात महाराणी श्यामलतेशी महारुद्राने चर्चा केली. तेव्हा त्यास एवढेच समजले की त्रिशला ही एक दासी कन्या आहे. व तिथे महालात राजकुमारी अंबालाच्या सेवेत होती.

 तेव्हा महारुद्राने कृष्णरुपी इंद्रावतीची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की अशी कोणतीही कृष्णकुमारी दासी व अन्य नोकर नव्हती.

त्याच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याने कसून चौकशी केली. पण काही कळले नाही. शेवटी तिला न्यायदंडाधिकार्यांपुढे सादर करण्यात आले. साक्षी पुरावे तपासले. असता. महाराजांवर एका मृत सैन्याने हल्ला केला होता. व तो यांचाच साथीदार ठरवणेत आले. व तिला मृत्यदंडाची शिक्षा देण्यात आली. ती ही भर चौकात ज्यामुळे दुसरे कोणीही पुन्हा राजवाड्यातील व्यक्तींवर हल्ला करताना कचरेल यासाठी राजधानीतील भर चौकातील शेजारी असणाऱ्या प्रांगणात फाल्गुन वद्य अमावशेच्या आधी दोन दिवसापूर्वीच्या दिवशी तिला मृत्यदंड देण्याचे ठरले. व त्याची तयारी सुरू केली.

….. ..... ….. …..


क्रमशः पुढे.....


Wednesday, April 19, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४२

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४२



क्रमशः पुढे चालू......

रात्रीच्या अंधारातून वाट काढत त्या भुयारात शिरल्या. कोणत्या ठिकाणी दिवट्या असतात याचा त्यांना अंदाज होता. त्यांनी त्या जागा चाचपल्या. तेव्हा त्यांना ती जागा सापडली. त्यांनी तेथील दिवळीतील तेल घालून ती दिवटी पेटवली. व त्या निघाल्या. त्या माग काढत महालाजवळ आल्या. पायऱ्या चढूण त्या वर गेल्या. त्या पायऱ्या ओळखीच्या होत्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या चडून त्या राजप्रासादाजवळील त्या गुप्त दरवाजा जवळ आल्या मासोळी विरुद्ध दिशेने होती. पण मासोळीच्या विरुध्द बाजूला एक चक्र होते. ते त्या दोघींनी फिरवण्यास सुरवात केली. खूप दिवस दरवाजा उघडला न गेल्यामुळे तो उघडणे अवघड होते. पण खूप प्रयत्न करून शेवटी त्या दोघींनी तो उघडला. त्या खोलीत आल्या. व तेथून जवळील अंबालाच्या स्नानगृहातून आत आल्या. तिथे आल्यावर ते रांजण त्यांना दिसले. ज्या स्नानगृहात अंबाला स्नान करत होती. तेथून त्या पुढे दालनात आल्या. जिथे अंबाला निद्रा घेत असे. त्यांनी पाहिले तिथे कोणतरी झोपले होते. अंबालेने दिवटीच्या उजेडात पाहिले ती उत्तर नगर नायकाची मुलगी होती. तिला खूप राग आला. व ती तिला मारणार इतक्यात त्रिशलेने अंबालास मागे खेचले. व आपल्या जवळील शिशितील औषध रुमालात घेऊन त्या मुलीस बेशुद्ध केले. तेथून त्या पुढे सरकल्या. तो महाल त्यांच्या परिचयाचा होता. वाटेतील शिपायांना बेशुद्ध करत मारत त्या दोघी प्रधानाच्या दालनात आल्या. तिथे वेददत्त झोपले होते. शेजारी शामलता ही होत्या. त्रिशलाने दासींना व इतर सैन्यांना बेशुद्ध केले. तसेच महाराणी श्यामलता यांना ही बेशुद्ध केले. व त्या दोघी झोपलेल्या महाराज वेददत्त यांजवळ आल्या. व त्यांना जागे केले. त्यांनी जागे झाल्यावर पाहिले की त्यासमोर दोन कृष्ण पोशाख घातलेल्या तरुण युवती होत्या तयांच्या हाती तलवारी होत्या. 

त्यांना पाहताच महाराज वेद दत्त, “ कोण आहात, व असे माझ्या कक्षात येऊन माझ्यावर हल्ला करण्याचे धाडस करून तुम्ही जिवंत सुटाल असे वाटते.”

अंबाला , आपली तलवार दाखवत, “ओळखते का ही तलवार तुम्हाला? यमसदनी पाठवणेसाठी आलोय आम्ही. तुमचा साक्षात काळ बनून महाराज वेददत्त.”

महाराज वेददत्त, “ पण मी तुमच्या वर कोणता असा अन्याय केलाय ते सांगा.”

अंबाला, “ संपूर्ण राज्य घशात घातले. अन् वरती मानभावी बोलणे करता शोभत नाही आपल्याला, स्वतःच्या राजाशी असा दगा फटका करून निर्दोष असल्याचा आव आणू नका.”

महाराज वेददत्त, “ पण मी हे राज्य माझ्या मनगटाच्या व हिंमतीच्या बळावर घेतलेय. तुमचा यासी संबंध काय?”

अंबाला व त्रिशला तोंडावरील घोषा काढतात.

त्रिशला, “ पहा या चेहऱ्यांना ओळखता का? ओळखत नसाल तर ओळख करून देते. मी आहे दासी देवकीची सुता त्रिशला, व ही आहे कृष्णरुपधारी अंबाला, राजकुमारी अंबाला.”

अंबाला हे नाव ऐकताच वेददत्त आश्चर्याने

“ तू जिवंत आहेस, खूप बरे वाटले. पण तू तर त्या हल्यात मरण पावली होतीस ना. मग ती प्रेते कुणाची?”

अंबाला, “ तुम्ही आम्हाला मारण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. पण परमेश्वराला ते मान्य नव्हते. महादेव कृपेमुळे मी वाचले. पण तुमच्या दगाबाजीमुळे महाराणी अरुणावतींना प्राण गमवावा लागला.”

महाराज वेददत्त, “ पण या घटनेशी माझा तिळमात्र संबंध नव्हता. मी तेव्हा उत्तर स्वारीवर होतो.”

अंबाला, “ हो तुम्ही उत्तर स्वारीवर होताच पण त्याच दरम्यान आचार्य वृषभ व दक्षिण नगर नायकाशी संधान साधून होतात. व तुमच्या सांगण्याने त्यांनी राजधानी नगरावर हल्ला चढवला. व त्यावेळी नगराचे रक्षण करताना महाराणी अरूणावतीना वीरमरण आले. पण तुमचाच डाव नगर नायकाने उलटवला. व तुम्हास राजा मानण्यास नकार दिला. तेव्हा आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर हल्ला चढवून शक्तिहीन करून आपला स्वार्थ साधलात. व राजे झालात.”

महाराज वेददत्त, “ पुराव्या अभावी फक्त आपला क्रोधाग्नी शमविण्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोप करीत आहात. तू म्हणत असशील तर आताच या घटकेला मी या राजेपदाचा राजीनामा देतो.”

अंबाला, “ ज्या राज्याने माझे माता पिता हिरावून घेतले. ते राज्य माझ्या काय कामाचे. व पुरावा म्हणत असाल तर तो मी बरोबर आणलाय. वाच त्रिशले ते पत्र जे प्रधान वेददत्त यांनी दक्षिणनगर नायकास लिहिले होते.

त्रिशलाने ते पत्र काढले. व ती वाचू लागली

महाशय,

दक्षिणनगर नायकास आपला मित्र वेददत्त यांचा नमस्कार असो. महाराज जयवर्धन हे कर्काच्या नांगीत व मगरीच्या तिड्यात सापडल्यासारखे झाले आहेत. उत्तर सीमेवर होणारे हल्ले परतवण्यासाठी मी महाराज जयवर्धन यांसमवेत जात असून सदर राजधानी नगराचा ताबा तुम्ही घ्यावा. व यासाठी आपले आप्त आचार्य वृषभ यांची मदत घ्या. बाकीचे नंतर पाहू.”

                         आपला मित्र प्रधान

वेद दत्त.

वेददत्त यांनी ते मोहोर बंद पत्र पाहिले. तेव्हा ते म्हणाले हे पत्र मी दिलेले नाही.

अंबाला , “ शिक्का तर आपलाच आहे.”

महाराज वेददत्त, “ तरी ही हे पत्र माझे नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या शेजे शेजारी असणारी तलवार घेण्याचा प्रयत्न केला. तोच अंबालेने त्यांच्या हातावरवारर केला. इतक्यात त्रिशलाने ती तलवार दूर केली. व त्यांना म्हणाली, “महाराज वेद दत्त मी दासी देवकी ची सुता. जिच्यावर आपण अनन्वित अत्याचार महालात करत होतात. ते मी पाहिलेत. त्याच काय.”

महाराज वेददत्त, “ तुझ्या मातेने जे काही मज दीले ते काही उपकार नाही केले. ती एक दासी होती. जी आपल्या मुलीला घेऊन दारोदार भिक मागत होती. मी तिला आश्रय दिला. दोन वेळचे अन्न दिले. तुला राजमहालात ठेवली. व तिने मला जे दिले ते स्वइच्छेने या उपकाराची परतफेड होती.”

इतक्यात एक तीर वेगाने आला व त्याने महाराज वेद दत्त यांच्या कंठाचा वेध घेतला.

अंबालेने त्रिशलेस इशारा केला. त्रिशलेने वेगाने हालचाल केली व कमरेची धारदार भाल्यासारखी निप घेऊन तिने ती अचूक फेकली. ती त्या मारेकऱ्यास लागली. तो जागीच ठार झाला. त्या दोघी वेददत्त यांजवल गेल्या. पण ते मृत झाले होते. इतक्यात महालातील सैन्य सावध झाले. ते वेद दत्त यांच्या दालनात आले. त्यांनी महाराजांना मृत पाहिले. व त्यांनी शिबंदीचा पहारा कडक केला. एकच दंगा झाला. त्या दोघी सावध होऊन पुन्हा माघारी निघाल्या. व गुप्त मार्गात शिरल्या. त्यांचा मागोवा घेत काही सैन्य त्या गुप्त मार्गात शिरले. इकडे एक घोडेस्वार वेगाने महादेव नगराकडे महारुद्राला संदेश देण्यास गेला. संदेश मिळताच तो वेगाने महलाकडे निघाला. वाटेत विचार करता त्याच्या लक्षात आले की महालाचा पहारा कडक असताना मारेकरी कुठून गेले.

क्रमशः पुढे....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४१



क्रमशः पुढे चालू.....

 अंबाला, “ मरण आले तरी बेहत्तर पण या सर्व आपल्या वाताहतीस जबाबदार असलेल्या व्यक्तीस आपण धडा शिकवायचाच. आपण शिकलेली सर्व विद्या पणाला लावायची. काही दिवसातच महाशिवरात्र येत आहे. सदर काळात महाशिवरात्रीचा उत्सव राजधानी जवळील नगरात असतो. तेव्हा खूप गर्दी होते. या गर्दीचा फायदा घ्यायचा. तेव्हा त्या वेशांतर करून कधी भिकारी कधी वृद्ध असे रूप पालटून त्या तेथून वावरू लागल्या. सदर नगराचा काना कोपरा माहीत असल्याने त्या काळजी पूर्वक वावरू लागल्या. पहाता पहाता महाशिवरात्र जवळ आली. महादेव नगरात व्यापारी देवड्या सजू लागल्या. मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. होती. त्या ठिकाणी अनेक प्रांतातील यात्रेकरू उतरू लागले होते.

अंबाला एका भिकारनीचे रुप घेऊन तिथे वावरत होती. त्यामुळे सैनिक तिला हटकत नव्हते. मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांकडून तिची उपेक्षा होत असे. सर्व लोक हिन वागणूक देत लाथाडत. तर काही भिक्षा देत असत. ज्या नगरात तिच्या समोर अनेकजन नतमस्तक उभे असत. तिथे तिची चाललेली उपेक्षा पाहून त्रिशलेस वाईट वाटत होते तिच्या अंतरात वेदना होत होत्या. या ग्रहदशेबद्दल तिने शिवशंकरास अनेक दूषणे दिली. ज्या शिवलिंगाची त्या प्राणपणे पूजा करत होत्या. तोच त्यांची परीक्षा पहात होता. पण त्याने दिलेल्या या वेदना आठवत त्या पेठेच्या एका बाजूस आडोशाला आल्या. तेथील एका बोळात त्या उभा राहून भिक्षेत मिळालेला पाणीभात खाऊ लागल्या. अंबालेच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला आपली माता अरूणावतीची खूप आठवण येत होती. इतक्यात त्यांना नगर दवंडी ऐकू आली. त्या दोघी काळजीपूर्वक ऐकू लागल्या.

दवंडी वरून नगरातील भव्य अशा मार्गपथावरून महाराज वेददत्त यांचा पुत्र महारुद्र शिवदर्शनास येत आहे, हे समजले. प्रचंड अशा सैन्याच्या बंदोबस्तात हत्तीवरून राजनैवेद्य आणण्यात येत होता. अंबालेस त्यास पाहण्याचा मोह आवरत नव्हता. ती त्या भव्य मार्गावर एका कोपऱ्यात उभे राहून त्यास पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण तितक्यात तेथे उभारलेल्या माणसाने तिला ढकलले. ती जवळील गटारात पडली. त्यातील एक तिला कृष्ण वर्णी दरिद्री अराजना (राक्षसिन) म्हणाला. तिच्या मनात आले की क्षणाचाही वेळ न घालवता त्याचे मुंडके छाटावे. पण तिने आपला राग नियंत्रित केला. व ती त्रिशले जवळ आली. त्रिशलेन तिची व्यथा जाणली. व तिने आपल्या खांद्यावर पाय देण्यास सांगितले. तशी ती तेथील कथड्यावर एक व त्रिशलेच्या खांद्यावर दुसरा पाय देऊन उभा राहिली. आता अंबाला तिच्या खांद्यावर उभा राहिल्याने तिला नगर रस्त्यावरून चाललेली मिरवणूक दिसू लागली. तिने पाहिले महारुद्र हा रथामध्ये बसला होता. तो शांत होता. पण त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी होती. ती आनंदाने त्याच्या जवळ बसली होती. ते दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले. व हृदयात तीव्र वेदना निर्माण झाली. व ती खाली उतरली. तिचा पडलेला चेहर पाहून त्रिशलेन त्याचे कारण विचारले. तेव्हा ती शांत बसली. तिचे पाणावलेले डोळे पाहून त्रिशला धीर देत म्हणाली, “ हे बघ मी तुझी व्यथा जाणते तू महारुद्रास पाहून हिरमुसली आहेस.त्याच्या बरोबर दुसरी युवती होती का?”

असा प्रश्न विचारताच अंबाला हो म्हणाली.

तेव्हा त्रिशला तिला म्हणाली, “ हे बघ विस्मरण मानवास दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यामुळेच मानव जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगू शकतो. अन्यथा तो दुखात बुडाला असता. महारुद्र तसा पाहता चांगल्या स्वभावाचा आहे. त्याचे स्नेहबंध जर का इश्वराने जर त्या कन्येशी बांधले असतील तर आपण कशाला दुःखी व्हावे. वास्तव जीवन जगतेवेळी असे अनेक दुर्धर प्रसंग घडत असतात. त्यास विसर व आपल्या पुढील संग्रामाच्या तयारीस लाग. मला एवढेच वाटते.” अंबाला शांतपणे ऐकून घेत होती.

दुसऱ्या दिवशी यक्षिणीगाण असल्याने राज्यातील तसेच इतर भागातील अनेक यक्षिणी तिथे हजर झाल्या होत्या. महाराज वेददत्त यांनी देवाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी मंदिर खुले झाले होते. पहाता पहाता यात्रा भरून गेली होती. यात्रेच्या धामधुमीत संध्याकाळ केव्हा झाली हे समजलेच नाही. त्या दोघी काही आहार विकत घेऊन संध्या समयी तेथून बाहेर पडल्या. व त्यांनी नदी पार केली. व त्या अरण्यात आल्या. तिथे त्यांनी येथे येण्यापूर्वीच आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. तिथे आल्यावर त्यांनी थोडा आहार केला. तदनंतर त्यांनी आपला पेहराव बदलला. शस्त्र सज्ज होऊन त्या पुढे राजधानी नगराकडे चालल्या. रात्रीच्या अंधारात चमकणारी चंद्रकोरीचा प्रकाश व झुडपात काजवे तेवढं चमकत होते त्यांच्या अंधूक उजेडात त्या शिवशंकराचे नाव घेत त्या निघाल्या. अरण्य वाटेने त्या राजधानी नगराजवळ आल्या. तेथील महालात जाणाऱ्या गुप्त मार्गा पैकी अरण्य मार्ग बंद केला होता. व आता राजधानी नगरा जवळील तलावातील मार्ग तेवढा शिल्लक होता. त्या तिथे पोहोचल्या. तिथे पहारा कमी होता. उत्सव असल्याने सर्व सैन्य तिकडे गुंतले होते. त्यामुळे इकडे सुरक्षा कमी होती. त्यांनी आपल्या शरांना बेशुद्ध करणारी औषधी लावली. व त्या एका एका शिपायाचा वेध घेत त्या पुढे निघाल्या. त्यांनी पहार्याचे सर्व शिपाई बेशुद्ध केले. व त्या तलावात शिरणार इतक्यात वीरभद्र तिथे आला. तो तेथील प्रभाग अधिकारी होता. त्यावर सूरक्षेची जबाबदारी होती. तो शूर व ताकदवर होता. त्या दोघींनी त्यावर ही शर चालवले. त्याने त्यांचे ते शर निष्प्रभ केले. तेव्हा त्रिशलेन इशारा केला. अंबाला आपली तलवार उपसून त्यासमोर चालून गेली. आता त्याच्याशी हातघाई करावी लागणार होती. तो शूर होता पण त्याचा सामना आता आंबेशी होता. अंबा पुढे तलवार उपसून धजावली व लढू लागली. तिचे लढाई कौशल्य पाहून तो चकित झाला.

त्याने ओळखले की ती एक स्त्री आहे. तिचा आत्मविश्वास तोडण्यासाठी तो म्हणाला, “ तू एक स्त्री माझ्यासमोर एका तांब्याच्या शिक्क्याप्रमाणे आहेस. मी आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचा खात्मा करून राजधानी जिंकलेला वीर. तू तर एक नार शस्त्र टाक व शरण ये तुला राणी सारखी ठेविन.”

तेव्हा अंबालेने आपल्या तलवारीने त्यावर हल्ला चढवला. तिची ती राज तलवार अंधारात देखील चमकत होती. अत्यंत वेगाने ती हलत होती. तिचा प्रतिकार करताना त्याची दमछाक होत होती. तिचे लढणे पाहून तो खूपच भारावला. इतक्यात त्रिशलेन आपल्या भात्यातील एक शर काढला व अचूक वेध घेतला. त्याच्या पाठीत तो शर लागला. तो मुर्छीत होऊन पडला. अंबाला त्रिशलेजवळ आली. व तिला म्हणाली, “ त्यास ठार मारलेस.”

त्रिशला, “ नाही उगाच निर्दोष माणसाची हत्या नको. म्हणून फक्त त्याला बेशुद्ध केलं. व त्या दोघी तलावात उतरल्या. व त्या गुप्त वाटेने महलाकडे निघाल्या.

क्रमशः पुढे......


Sunday, April 16, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

क्रमशः पुढे चालू.....


महारुद्र हा राजकुमार आहे ही बातमी संपूर्ण राज्यभर पसरली. तशी ती पारधी वस्तीवर देखील येऊन थडकली. ही बातमी कळताच त्रिशला व आंबालेस म्हणावा तितका आनंद झाला नाही.

इकडे महारुद्र राजकुमार आहे, हे सिद्ध झाल्याने त्यास राज्यकारभारात लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे तो अंबालेस भेटू शकत नव्हता. त्याची अस्वस्थता महाराज वेददत्त यांनी ओळखली. व त्याबाबत दासांकडून जाणून घेतले. तेव्हा तो एका पारधी कुमरिकेच्या प्रेमात पडल्याचे समजले. त्यांनी गुप्त हेरांना तिच्याबाबत माहिती काढण्यास सांगितले. ते कामाला लागले. पारधी वस्तीत फिरून जाणून घेऊ लागले.

ते पारधी वस्तीत फिरत असताना आंबालेस व त्रिशलेस त्यांचे वागणे खटकले. त्या दोघींनी ओळखले की त्यांच्यावर कोणतरी पाळत ठेवत आहे. व ही पुढील धोक्याची चाहूल आहे. त्या मुद्दाम त्या हेरांपुढे गप्पा मारत असत. येत्या काही दिवसात इंद्रावती महाराणी होणार आहे. असे थट्टेने बोलत.

हेरांनी त्यांचे बोलणे ऐकले व महाराज वेददत्त यांच्या कानावर ही बातमी घातली.

महाराज वेददत्त यांना वाटत होते की महारुद्राने एका राज घराण्यातील कन्येशी विवाह करावा. यासाठी त्या पारधी कन्येस ठार मारले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासू तरबेज खाजगी अंगरक्षकास पाठवले.

हेरांची टेहळणी थांबल्याचे दिसताच त्या दोघींनी जाणले की लवकर एखादे संकट येणार आहे. व त्यांनी सुरक्षेसाठी महदव्वेस तिच्या बहिणीच्या घरी पोहचते केले. व आपली शस्त्रे त्यांनी रात्रीच्या समयी घरी आणून ठेवली. व त्या दोघी रात्रीच्या वेळी फेराफेराने पाळत ठेवू लागल्या. गस्त घालू लागल्या. अचानक त्यांना एका रात्री काही संशयास्पद हालचाल घराबाहेर दिसली. गुप्त शिपाई वेशांतर करून अंबालेस मारण्यास आले होते. दार वाजले. अंबालेने त्रिशलेस जागे केले. व त्या शस्त्र घेऊन स्वसंरक्षणास सिद्ध झाल्या.

अंबालेन आपली मोठी तलवार काढली. त्यांनी घरातील तेवणारा दीप विझवला. दार उघडून कोणतरी आत आले. हे लक्षात घेऊन अंबाला कुडाच्या दरवाजामागे लपली. व तो इसम आत येण्याची वाट पाहू लागली. तो धूर्त माणूस आत यायला मागील दरवाजा ही वाजू लागला. त्याला बांधलेले काथ्याचे दोर कापले जाऊ लागले. इतक्यात छतावर काहीतरी हालचाल व आवाज जाणवू लागला. त्या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी लपल्या. व अंधारात स्वत:ला अन् एकमेकींना ओळखण्यासाठी त्यांनी खड्यांची काकनं घातली. त्या दोघी सावध झाल्या. अंबालेने पुढील दरवाजातून येणाऱ्याचे पाय कलम केले. व नंतर त्रिशलेन दुसऱ्याचे सिताफिणे मुंडके कलम केले. तसेच वरुन छतावरून येणार्यास देखील त्यांनी यमसदनी धाडले. बाहेरील राहिलेल्या दोघांच्या लक्षात आले. की आतमध्ये आपले साथीदार मारले जात आहेत. तेव्हा त्यांनी पेटते गोळे छतावर टाकले. व बाहेरून दारे व कुडास आग लावली. व वस्तीवरील लोक सावध होण्याआधी, ते पाळले.

त्या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. छतावर गवात असल्याने अग्नीने जोर धरला. पहाता पहाता अग्नी वेगाने पसरू लागली. चपळाईने आपली शस्त्रे व मोहरांची थैली घेऊन त्या दोघी मागील बाजूस आल्या. व तेथील कुड कापून त्या बाहेर पडल्या. व अंधाराचा फायदा घेऊन त्या पाहता पाहता अरण्यात घुसल्या. अंधार वाटेने त्या अरण्य वाटेला लागल्या. आता त्या दोघींच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते. ‘की हे कोणी केले असेल?’

इकडे अग्निचा चटचट आवाज होऊ लागला. त्यामुळे आजूबाजूचे पारधी जागे झाले. पण त्यांना ती आग विझवणे शक्य नव्हते. शेवटी त्यांनी ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच ती इकडे तिकडे पसरणार नाही याची काळजी घेतली. त्या अग्नीने त्यांचे राहण्याचे ठिकाण भस्मसात झाले दुसऱ्या दिवशी राखेत काही अस्थी सापडल्या. त्या पारध्याने एका कलशात गोळा केल्या. सर्वांना दुःख झाले. हेरांनी ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचवली. महारुद्रास ही बातमी समजताच तो फार दुःखी झाला. तो लगेच तिथे आला. व त्याने त्या झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पण काही केल्या आगीचे कारण समजले नाही. त्याला खूप वाईट वाटले. इंद्रावतीने आपणास फसवले असे तो म्हणून तो स्वतः ला संपवणेस निघाला. मात्र महाराज वेददत्त व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्यास समजावले. काही काळ निघून गेला. आता महारुद्र हळूहळू सावरू लागला. महाराज वेददत्त यांनी याच घटनेचा फायदा घ्यायचे ठरवले. महाराजांनी त्यास राज्याच्या कामकाजात गुंतवले. व त्यांनी त्याच्या लग्नाची बोलणी उत्तर विभाग नगर नायकाच्या मुलीशी करण्याचे ठरविले. व तशी बोलणी चालवली. महारुद्राने यास विरोध केला. परंतु त्यांनी बोलणी चालवली.

….. …… ……. …… ……

अग्नी कांडातून बाहेर आल्यावर त्या दोघी महदव्वेस ठेवलेल्या तिच्या बहिणीकडे आल्या. पुढे सुरक्षेच कारण सांगून त्या तिला घेऊन तिच्या दूरच्या भावाच्या घरी अपरान्त देशी निघाल्या. महदव्वच्या बहिनिस त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. कारण कोणतरी चौकशी करत तिच्याकडे येईल व महदव्वेला तिच्या भावाकडे अपरान्त देशी सोडण्यास त्या निघाल्या. वाटेला महदव्वा अनेक प्रश्न विचारू लागली. तेव्हा त्यांनी दुषलेचे महाराज जयवर्धन यांच्या घराण्याशी राज्यपातळीवर असणाऱ्या जवळीकीमुळे आपल्याला हे कष्ट उपसावे लागत आहेत. व त्या खडतर प्रवास करून महदव्वेस तिच्या भावाकडे सुरक्षित ठेवून त्या परतल्या.

आता त्या दोघींपुढे सर्वात मोठे आव्हान होते ते पार करण्यासाठी त्या निकराच्या तयारीने निघाल्या. अरण्यात राहून त्यांना तेथील प्राण्यांचा चांगलाच अभ्यास झाला होता. मिळेल त्या ठिकाणी विसावा घेत त्या पुन्हा सह्याद्रीपार करून कुंतल प्रदेशात आल्या. अरण्यातून चालून थकल्यावर त्या एका विशाल शिळेवर विसावल्या. वाटेत एका धर्मशाळेत त्रिशलेला मिळालेल्या माहितीनुसार त्याआधारे त्रिशलेस आंबालेस दिवचण्याची संधी मिळाली. ती म्हणाली, “ काय अंबाला, तुझा जीवनसाथी दुसऱ्या कन्येशी विवाह बंधनात बंधिस्त होण्यास निघाला आहे. काय तुझ्यासाठी लावलेला पण जिंकतोय बघ. तू मृत झाल्याची वार्ता समजताच थोडे दिवस दुःखाचे नाटक करून लगेच बोहल्यावर चढतोय म्हणे, व उत्तर नायकाच्या मुलीशी विवाह करतोय.”

अंबाला, “ करेना, नाहीतर तुला तो माझ्या जीवनात नकोच होता.”

त्रिशला, “ नाहीतर मलाच म्हणत होतीस ना, की त्याचे तुझ्यावर प्रेम आहे. मग दुसऱ्या दिवशीच का नाही त्याने आत्मदहन केले. प्रेम, प्रीत या गोष्टी फक्त दंतकथेत शोभून दिसतात. वास्तव जीवनात पुरुषांना स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे. एखादे वस्त्र वापरा व फेकून द्या. नाहीतर दासी बनून त्यांची सेवा करत राहावी लागते. माझ्या मातेवरील अत्याचार याचेच द्योतक आहे.”

अंबाला, “ तुझ्या अंतर्मनात पुरुषांविषयी द्वेष भरून राहिला आहे. पण तू हे विसरतेस की पुरुषांच्या सहवासात स्त्री चारित्र्याचे रक्षण होते.”

त्रिशला, “ माझ्या पित्याने केले ना माझ्या मातेचे शीलरक्षण व पुढे दिले या जगाच्या समुद्रात ढकलून. प्रधानाच्या घरचे दास्यत्व पत्करून अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. तुझ्या कारणे मी सुरक्षित राहिले नाहीतर माझी ही वाताहत झाली असती. परमेश्वर जाने आपली ही व्यथा, पण पुढील वाटचाल आपली अत्यंत बिकट आहे. कारण आपल्यावर हल्ला करणारा शत्रू काही साधा सुधा नाही. तो ताकदवान आहे. त्यास नष्ट करणे सोपे नाही.”

क्रमशः पुढे....

Thursday, April 13, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३९

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३९



क्रमशः पुढे चालू.....

तो जखमी पायाने त्यांच्यापुढे आला. त्याने पाहिले अंबाला त्याच्या समोर शांतपणे अश्रूपूर्ण नजरेने उभा होती. तिची ती आत्मीयता पाहून तो त्याच्या पायातील वेदना विसरला. त्याच्या मनात तिचे स्थान दृढ झाले. त्याचा तो लंगडत्याला पाय पाहून आंबलेचे हृदय जागृत झाले. त्या ह्रुदयात एक प्रेमभाव निर्माण झाला. महारुद्र त्याच्या मित्रांबरोबर महादेव मंदिरात गेला. तेथे त्याने शिवपूजा केली. खूप दिवसांनी तेथे पूजा झाली होती. कारण ते मंदिर गावापासून खूप लांब होते. अंबाला त्रिशलेस म्हणाली की तिने निश्चय केला आहे. की ती महारुद्रासवे लग्न करणार आहे. कारण तिच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारा फक्त तोच असेल. व प्रतिकूल वेळी रक्षण ही तोच करेल. ती मंदिरात आली. तिने महारुद्राच्या पायावर डोके ठेवले. व त्याने तिला जिंकले आहे. हे सांगितले. व त्या दोघांनी लग्नाचा निश्चय केला.

त्रिशलेन ही त्यास सांगितले. की ती त्याचा इंद्रावतीशी विवाह लावून देईल. मात्र सहा महिन्यानंतर. व त्या दोघी तिथून निघून गेल्या. महारुद्र अंबालेस जिंकल्याच्या आनंदाने प्रफुल्लित झाला. तो आता नेहमी तिला भेटायला येऊ लागला. पण अंबाला व त्रिशला त्यास कोणतीही माहीती लागू देत नसत. याबाबत त्रिशला ने वचन घेतले होते. हा बदला यशस्वी झाल्यावर अंबाला लग्न करणार होती. अंबाला त्याकडून राज्यातील हालहवाला जाणून घेत असे. पण तो ही सर्व सांगत असे. तसे पाहता त्या दोघींना राजवाडा व राजधानी नगराची खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्या ही जास्त विचारत नसत. व आपला शेवटचा शत्रू हा महालात आहे व त्याचा आपल्याला बंदोबस्त करून बदला घ्यायचा आहे यासाठी त्या योजना आखू लागल्या. व तयारीला लागल्या.

….. ….. ….. ….. …..

महाराज वेददत्त यांनी आपल्या राज्याची व्यवस्था नीट लावली होती. तरी देखील त्यांनी हेर व्यवस्था नीट केली. व ते हेरांद्वारे बारीक सारीक राज्यातील हालहवाला जाणून घेऊ लागले. ते आपल्या राज्यातील निरनिराळ्या अधिकारी व सैन्यातील अधिकारी यांची ही बित्तंम बातमी ते काढू लागले. त्यांनी महारुद्राची देखील माहिती काढली. त्यामध्ये त्याचेचे प्रेम प्रकरण देखील समजले. एखादा वीर आपल्याला घातक ठरू नये यासाठी ते काळजी घेत. त्याप्रमाणे गुप्त हेरांनी टेहळणी करून सर्व माहिती काढून घेतली. तेव्हा त्यांना महारुद्राच्या पालकांकडून व इतर लोकांकडून समजले की महारुद्र हा भिल्लम व सिंगणेचा पुत्र नसून तो त्याना अरण्यात सापडला होता. तेव्हा महाराज वेददत्त यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. व त्यांनी महारुद्राविषयी जास्त जाणून घ्यायला सुरवात केली.

यासाठी महारुद्राला राज्याच्या उत्तर विभागाची पाहणी करण्यास पाठवले. व महाराज वेददत्त व शामलता स्वतः भेटण्यास भिल्लम व सिंघणा यांच्याकडे गेलीत. तेव्हा त्यांनी महारुद्रास नेमलेल्या नगराची व्यवस्था पाहिली. तेव्हा त्यांना तेथील वैशिष्ट्यपूर्ण नगराची केलेली रचना तसेच तेथील साफसफाई. नगर तट्टावरील कडक पहारा. इतकेच नाही तर नगर सैन्य सराव स्थळं. व इतर व्यवस्था त्यांना अत्यंत आवडली. तेथील कारभार पाहून प्रसन्न मुद्रेने ती दोघे महारुद्राच्या निवास स्थानी गेली. भिल्लम व सिंगणाने यथोचित पाहुणचार केला. तसेच त्यांनी आस्थेने त्यांची चौकशी केली. व हळुवारपणे महारुद्राची माहिती काढली. तेव्हा शेवटी भिल्लम व सिंघणेने सर्व माहिती सांगीतली.

व त्याच्या अंगावरील त्यावेळीची वस्त्रे व ती सोन्याची चैन दाखवली. ती पाहताच महाराणी श्यामलता आनंदित झाली. कारण त्याकडून हरवलेला लहानपणीचा त्यांचा पुत्र रत्नाकर हाच महारुद्र होता. त्यानी खूपवेळ वार्तालाप केला. व शेवटी त्यांनी सिंघणा व भिल्लम यास वचन दिले. की महारुद्र हा त्यांचाच पुत्र राहील. त्यांचेच नाव धारण करेल. व ज्या भिल्ल समाजाने त्यास आपले केले. त्यांचा उद्धार करेल. व आमच्या माघारी या राज्याचा राजा बनेल. असे वचन देवून महाराज व महाराणी राजधानीत आल्या. तिथे आल्यावर त्यांनी दुत पाठवून महारुद्र व त्याच्या सैन्य तुकडीस राजधानीत बोलावून घेतले. राजधानीत आल्यावर फुलांची उधळण व कस्तुरी शिंपून त्याचे स्वागत केले. राजमहालात आल्यावर त्यास उंच आसनावर बसवले. व त्यास सर्व इतिहास सांगितला. व तो आपला वारस असल्याचे सांगितले. त्याचे पिता भिल्लम व माता सिंघणा ही तिथे होती. तो मात्र आपण भिल्लम व सिंघणेचा पुत्र आहोत हेच मानत होता. त्यांच्यापासून दूर रहाणार नाही. शेवटी सर्वांनी त्याची समजूत घातली. तसेच भिल्लम व सिंघणा ही त्यासोबत कायम राहणार असे वचन घेतल्यावर तो शेवटी राजमहालात राहण्यास तयार झाला.

क्रमशः पुढे....

Monday, April 10, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८




क्रमशः पुढे चालू.........

महारुद्र, “ मी इतरांचा विचार करत नाही. तुला प्रथम पहिल्यापासून माझ्या अंतर हृदयातून एक अनामिक ओढ निर्माण होते. तुला पहात रहावेसे वाटते. तू जरी कृष्णवर्णी असलीस तरी इतर सुंदर ललना मला तुजसमोर तूच्छ वाटतात. मी तुला कधीही अंतर देणार नाही. वाटत असेल तर तू परीक्षा घे.”

अंबाला, “ मी व आपली परीक्षा , मला वाटते की आपणासारखे पुरुष स्त्रियांना दासिसारखे समजतात. सुरवातीला प्रेम पाशात गुरफटतात. व नंतर मन उबगले की एखादे जीर्ण वस्त्र फेकावे तसे फेकून देतात.”

महारुद्रास ते बोलणे सहन होईना तिचा एकेक शब्द त्याची परीक्षा घेऊ इच्छित होता. कोणतीही परीक्षा असो, मी ती पार करून तुला जिंकेन. पण मी ती परीक्षा जिंकल्यावर तुला मात्र माझ्याशी विवाह करावा लागेल.”

अंबाला, “ ठीक आहे. मी तुझ्यापुढे पाच प्रण ठेवते. ते जिंक व माझ्याशी विवाह करून घेऊन जा. तुला कोणीही अडवणार नाहीत.”

महारुद्र, “ तसे मला अडवणे कोणालाही शक्य नाही. तुझ्या या वस्तीतील नायकासमवेत सारे माझ्या आज्ञेत आहेत.”

अंबाला, “ ते दास असतील, पण माझे माझ्या शरीरावर राज्य आहे. ते मी क्षणात भस्म करून टाकीन.”

तिचे ते बोलणे ऐकून तो परीक्षा देण्यास तयार झाला. पण त्यानेही आपल्या व्यवहारास पुरावा हवा आहे, असे सांगितले

तेव्हा त्रिशलेचे नाव घेतले. की ती याची साक्षीदार असेल.असे सांगितले. तेव्हा त्याने त्याचबरोबर माझेही दोन साथीदार असतील. तेव्हा त्या दोघांनी ठरवले, “ठीक आहे. उद्यापासून या परीक्षेत तू उतर व मला जींक व घेऊन जा. व ती तेथून पाण्याने भरलेली कळशी घेऊन गेली.

….. …..

दुसऱ्या दिवशी ती त्रिशला व सिपनेस घेऊन नदीतीरावर आली. महारुद्र आपल्या दोन साथीदारांना घेऊन तिथे आला. पण तत्पूर्वी तो महादेवाचे दर्शन घेऊन आला. त्या दिवशी अंबाला त्यास घेऊन केळीच्या रानात गेली. कुंतल प्रदेशात असणाऱ्या या रानकेळी या दिवसात कमी पाणीपुरवठा झाल्याने मरत असतात. या दिवसात चैत्र मास असल्याने सुर्य आग ओकत असतो. त्या बनात ती त्याला घेऊन आली. व आपल्या हातातील धारदार शस्त्र देत ती म्हणाली, “या बनात असणाऱ्या पाच रान केळी तू अशा वेधायच्या की त्याचा कापलेला भाग तसाच स्थिर राहिला पाहिजे. व त्या केळीही सुकणार नाहीत.”

महारुद्र, “ विचार करत तो त्या बनातील केळी न्याहाळू लागला. तेव्हा त्यास आठवले की लहानपणी आपण सवंगड्यांशी खेळताना बांबू बेटाचा मधील भाग तसाच ठेवत असत. ज्याने तो बांबू सुकत नसे.थोड्या तंतूवर जिवंत राहत असे. त्याचप्रमाणे त्याने तिच्यासमोर केळींचा छेद धारदार शस्त्राने घेतला. व तिच्या डोळ्यादेखत पाच केळी तिला न कळता छेदल्या. त्याची ही अप्रतिम कला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. परंतु अंबाला म्हणाली, “चार दिवसांनी कळेल. कोण जिंकले.”

ती सर्व तेथून निघाली चौथ्या दिवशी महारुद्र पहाटे तिथे गेला व त्याने मधले तंतू कापून काढले. ते ही बुंधा न हलता.तोपर्यंत त्या केळी सुकलेल्या नव्हत्या.

नंतर अंबालेसवे त्या बागेचे निरीक्षण केले असता. पूर्ण छेद व केळी हिरव्यागार होत्या. अशा पद्धतीने त्याने प्रथम पण जिंकला.

दुसऱ्या दिवशी तिने दुसरा प्रण त्यापुढे ठेवला. त्यानुसार तिने त्याच्या हाती एक मडके दिले व अरण्यात मध्यभागी असणाऱ्या एका वृक्षावरील पोळ्यातील मध काढायला सांगितला. त्याप्रमाणे त्याने योजना तयार केली. व संध्याकाळी तो त्या वृक्षाजवळ आला. अन् त्याने अरण्यातील पालापाचोळा गोळा केला. व तो पेटवला त्यामधे काही ओला पाला घालून त्याने धूर तयार केला. व एक विशिष्ट प्रकारचे तेल अंगास लावल्याने त्यास त्या पोळ्यातील मध काढणे सोपे झाले. त्याने ते सहज काम केले. कारण तो आपल्या पित्याकडून म्हणजेच भिल्लमाकडून ते शिकला होता. त्याने दुसरा प्रण ही पूर्ण केला. त्यानंतर तिने त्याला एका आम्रवृक्षावरील एक अतिशय उंचावर असणारा कैऱ्यांचा घोस एका बाणात वेधण्यासाठी सांगितला. त्यानंतर त्याला तिने नऊ दुर्मिळ धान्याची नावे सांगितली. ज्याचे बियाणे मिळणे मुश्किल होते. ते आणावयास सांगितले. ते त्याने एका आठवड्याची मुदत घेऊन गोळा केले. व तिच्यासमोर सादर केले. आता शेवटचा पण होता. अंबाला त्याच्या प्रेमात पडलीय. हे त्रिशलेस जाणवले. व ती एकदम सोपे प्रण घालत आहे हे तिला जाणवले. व तिने स्वतः शेवटचा प्रण घालायचे ठरवले. तो प्रत्येक प्रण सोडवत होता. तिच्या प्रत्येक परीक्षेत तो उत्तीर्ण होत होता. त्याच्या या वीरश्रीमुळे अंबाला त्याकडे आकर्षित होत होती व त्याच्या प्रेमात पडली होती. पण यात धोका आहे हे त्रिशला जाणत होती.

अंबा प्रेमाचे नाटक करायचे सोडून त्यात गुंतेल व आपल्या मातेप्रमाने धोका खाईल असे तीस वाटत होते. म्हणून तिने तिसरा प्रण स्वतः सांगायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी महारुद्र नदी किनारी आला. अंबाला व त्रिशला देखील तिथे आल्या होत्या. अंबाला बोलण्या आधी त्रिशला म्हणाली, “ तू आतापर्यंत अनेक प्रण जिंकलेस. या पारधी वस्तीच्या पलीकडे एक दुसरी नदी आहे. तिच्या डोहाच्या पलीकडे एक बेलाच झाड आहे. त्याचे बेलपत्रे तू नदीतून पार जाऊनन आणण्याचे व व पारधी वस्ती सीमेवर असणाऱ्या महादेव मंदिरातील पिंडीस वहायचे. व शिवपूजा करायची.”

तिचे हे वाक्य ऐकताच महारुद्राचा सहकारी मित्र त्यास म्हणाला, “ हे काय करतोस मित्रा, एका कृष्णकुमारीसाठी अनमोल जीव धोक्यात घालतोयस. ती नदी सुसरीनी भरलेली आहे. तिथे जाणे म्हणजे मृत्यूच. तुला हीच्यापेक्षा सुंदर मुली मिळतील. अनेक वेड्यापिशा असताना तू कशाला धोका पत्करतोस.”

तेव्हा त्याने अंबालेकडे पाहत हसतच, “तयार आहे.” असे सांगितले. अंबेस काही सुचेनासे झाले. ती म्हणाली, “ नको तो प्रण.बास ती परीक्षा, जो जीव धोक्यात घालेल.”

लगेच त्रिशलेन अंबास खेचले. व व गप्प बसणेस सांगितले.

महारुद्र मात्र त्रिशलेस म्हणाला, “ जर मी हा प्रण जिंकला तर तू याच घडीला माझे व इंद्रावतीचे लग्न लावून देशील.”

त्रिशला, “ मी तुझे व इंद्रावतीचे लग्न लावून देईन, पण सध्या नाही. सध्या तिचा दुर्धर काळ चालू आहे. आज पासून सहा मास झाल्यावर वृंदा एकादशी नंतर तुझ्या गळ्यात इंद्रावती वरमाला घालेल. ही काळ्या दगडावरील रेघ समज”

असे वचन मिळताच तो दुग्ध पाणी असणाऱ्या नदीकाठी त्यांसमवेत आला. त्या सर्वांना सुरक्षित स्थळी उभा करून एक धारदार शस्त्र घेऊन तो नदीत उतरला. व वेगाने पलीकडे गेला. दुपारचा प्रहर असल्याने नदीपात्रातील सुसरी सुस्तावलेल्या होत्या. त्याने पलीकडे जाऊन बिल्वपत्रे तोडली. व एका पिशवीत घेऊन ती कमरेला बांधली. व त्याने पुन्हा अंदाज घेत पाण्यात उडी मारली. आवाजाने मगरी व सुसरी सावध झाल्या. व त्याकडे झेपावल्या. तो वेगाने पलीकडे निघाला. मगरींनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सिताफिने निसटला. व पोहत जाऊन त्याने झेपावून पलीकडील वृक्षाची डहाळी पकडली. मगरीने त्याचा पाय धरला. त्याने एका हाताने डहाळी व दुसऱ्या हाताने त्या शस्त्राने मगरीवर वार केला. मगर जखमी झाली व तिने पाय सोडताच तो वेगाने वृक्षावर चढला. व सुरक्षित अलीकडे उतरला. व त्यांच्या जवळ आला.

क्रमशः पुढे....

Saturday, April 8, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३७

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३७



क्रमशः पुढे चालू.....

अंबाला, “ इथून पुढील लढा माझा मी एकटीने लढायचा ठरवल आहे. माझ्या या लढ्यात तू विनाकारण भरडली जात आहेस.”

त्रिशला, “ नाही मी यात भरडली जात नाहीये. अन् हा लढा फक्त तुझा नाहीये माझा पण आहे. माझी माता देखील या हल्यात मारली गेली आहे. व जीवनाच्या या दुर्धर काळात मी तुला सोडून जाणार नाही.आपले नाते फक्त मैत्रीचे नाही. तर ते अतूट स्नेहबंधनाने बांधले गेलं आहे.”

अंबाला, “ पण इथून पुढील संकटात तुझा जीव ही जाईल.”

त्रिशला, “ त्याची पर्वा नाही संघर्ष करायचा तर दोघींनी व यश मिळवायचं तर ते ही दोघींनी.”

अंबाला, “ पण यापुढे आपली योजना काय असेल. ती कशी अखायची याचा विचार करतेय.”

त्रिशला, “ त्यासाठी परमेश्वराने आपल्याकडे अमोघ अशी देणगी दिली आहे.”

अंबाला, “ ती कोणती?”

त्रिशला, “ आपले लावण्य, तुला कृष्णवर्णी केली असली तरी तुझे सौंदर्य त्यातूनही उमलते व त्यावर भाळून महारुद्रासारखा भिल्ल कुमार तुझ्या प्रेमात पडू पाहतोय,”

अंबाला, (आश्चर्याने)“पण तो साधा माझ्याजवळ जरी फिरकला तरी तुझी आग होताना मी पाहिलीय.”

त्रिशला, “ होय , ते खर आहे. पण आज तो नगरनायक आहे. व त्यामुळे तो आपल्या शेवटच्या चरणाची पायरी होऊ शकतो.”

अंबाला, “ पण त्याचा असा वापर करणे मला तरी योग्य वाटत नाही. व तसे पाहता तो मला आता जवळपास देखील फिरकू देणार नाही. कारण मी ऐकलंय त्याला अनेक युवतींनी मागणी घातली आहे. व त्या सुंदर ललना सोडून तो कशाला या कृष्णवर्णीय मुलीमागे लागेल. छे छे.”

 त्रिशला, “तू पुरुषांना ओळखत नाहीस. त्याने इतके वेळा तुझ्याभोवती एखाद्या फुलपाखरासारख्या घिरट्या घातल्या आहेत. पण जराही तुला धक्का लावला नाही. तसेच जर त्याच्या मनात आले असते. तर तो तुला उचलून घेऊन जाऊ शकला असता. त्याला तुझ्या ह्रद्यावरी स्वामित्व मिळवायचे आहे. यालाच प्रेम म्हणतात.”

अंबाला, “ पण मी माझ्या स्वार्थासाठी त्याचा वापर करणे पाप आहे. व त्यास जर मी कोण आहे हे कळले तर त्यास धक्काच बसेल. व एखादा पर पुरुष माझ्या जीवनात मी परीक्षा घेऊनच घेईन.”

त्रिशला, “ पण आपणास बदला घ्यायचा आहे. आपला शेवटचा शत्रू महालात आहे समजलं काय? तू त्याची परीक्षा घे. पण जास्त तानू नकोस. कारण जास्त ताणले की तुटते.”

अंबालाने तिच्या म्हणन्याकडे दुर्लक्ष केले. व ती आपल्या कामात राहिली.

 एकदा ती नेहमीप्रमाणे नदीला पाणी भरण्यासाठी निघाली असता तिला समोरून एक घोडेस्वार येताना दिसला. त्याने अंगावर उंची वस्त्रे घातलेली होती. तिने दुरूनच पाहून उगाच संकट नको म्हणून खाल मान घालून ती निघाली. थोड्याच वेळात तो घोडेस्वार तिच्याजवळ आला. घोड्यावरील स्वार खाली उतरला व त्याने तिच्याजवळ जात हटकले. तेव्हा तिने वर तोंड करून पाहिले. व न पहिल्यासारखे करून ती पुढे जाणार इतक्यात त्याने तिची वाट अडवली. व तिचा हात धरला.

तसे तिने त्याकडे पाहिले. तिने ओळखले की तो महारुद्र आहे ते. त्याने आपल्या बरोबर आणलेली सुवर्णमाला तिच्यासमोर धरली. ती त्याकडे पाहून हसली. व तेथून नदीकडे धावत गेली. ती हसल्याचे पाहून तो खुश झाला. व तिच्यामागे गेला. ते नदीच्या काठी गेले. नदीचे पाणी खळाळत वाहत होते. अनेक झाडांच्या निसर्गरम्य अशा सानिध्यात नदीच्या वाहत्या पाण्यात प्रतिबिंब न्याहाळत उभा असणारी विशाल झाडे. व थोड्याच अंतरावर असणारे वेताचे बेट ज्याचे प्रतिबिंब नदीच्या संत वाहत्या पाण्यात पडले होते. अंबालाने त्या पाण्यात आपले हातपाय धुतले व नदीच्या शीतल जलाने आपली मातीची कळशी धुवून स्वच्छ पाण्याने भरली. अनेक पाखरे तिच्या जवळील पाण्यात तृष्णा भागवून शेजारील वेताच्या बेटात उडून गेली. अंबाने भरलेली घागर काठी ठेवली. व ती पाण्याबाहेर आली. आतापर्यंत शांत निरीक्षण करणारा महारुद्र तिला म्हणाला, “ मला तहान लागली आहे. पाणी मिळेल का?”

अंबाला, “ जवळच इतकी सुरेख नदी वाहत आहे. आपण तिजकडे मागावे.”

महारूद्र, “ पण आपल्या हातच्या पाण्यात एक मधुर चव आहे असे आम्ही ऐकलयं. तेव्हा…”

अंबाला, “ मी काही मधमाशी नाही, जी मकरंदाचे मधात रूपांतर करणारी. जिच्या हातात चव असायला. एक साधारण पारधीकन्या आहे.”

असे बोलत तिने त्याकडे पाहिले त्याचा पेहराव पाहून तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. त्याला पाहताच कोणीही त्याच्या प्रेमात पडावे. पण हा या कृष्णवर्णीय कन्येत काय पाहतोय. याची परीक्षा घेतलीच पाहिजे. असे तिने मनात योजले.

ती त्यास चेष्टेने म्हणाली, “ नमस्कार महोदय, आपण आता राजाश्रय धारीत एक अधिकारी आहात. व मी अतिसामान्य पारधी कन्या, आपण असे अलंकार विभूषित आहात. व आपणास दिलेले हे ऐश्वर्य, सौंदर्य पाहता आपणास अनेक सुंदर मुली चालून येत असतील. तेव्हा आपण त्याना वरायचे सोडून माझ्या सारख्या कृष्णवर्णीय रुपी ललनेत असे काय पाहता, मी आपल्या राजपदास शोभेल आशी नाहीये. की आपली दासी ही सुंदर असेल. तेव्हा मजसोबत कोणी पाहिले तर आपणास कोणतरी हसेल. आपण माझ्यात एवढे काय पाहिले? याविषयी आपले प्रयोजन काय ते सांगावे.”

महारुद्रास तिचे बोलणे झोंबले. तो तिच्याकडे पाहत.

क्रमशः पुढे........


Friday, April 7, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३६

 अंबाला एका राजकुमारीची

 प्रेमकथा भाग ३६

क्रमशः पुढे चालू......




नगरनायक मृत पावल्याने तेथील प्रदेशात अराजकता निर्माण झाली. या घटनेचा फायदा उचलण्याचे महाराज वेददत्त यांनी ठरवले. व त्यांनी महारुद्रच्या अखत्यारीत सैन्यदल देऊन त्यास राजधानी व दक्षिण प्रांती असणारी शत्रू सैन्याच्या ताब्यातील नगरे जिंकण्यास पाठवले. महारुद्राने एकामागून एक नगरे जिंकण्यास सुरवात केली. नियोजनबद्धरित्या त्यांनी दक्षिण प्रांतातील उठाव मोडून काढण्यास सुरुवात केली. दक्षिण भागातील एक एक नगर जिंकत त्याने अपरान्त राजाचे सैन्य मागे पिटाळले. त्या सैन्यानी शेवटी राजधानी नगराचा ताबा घेतला. व ते प्रतिकार करू लागले. तेव्हा नगराची संपूर्ण नाकेबंदी महारुद्राने केली. त्यामुळे ते सैन्य नगरात कोंडले गेले. पण नगरतट्टाची शिबंदी फोडता येईना. तेव्हा त्याने व्युव्हरचना तयार केली. चांगले चांगले तिरंदाज घेऊन त्याने दक्षिन बाजूने नगरावर हल्ला चढवला. त्यासाठी त्याने सराईत पारधी नवयुवकांची योजना केली. पारधी लोक नेमबाजीत पटाईत होते. त्यात काही भिल्लकुमार ही होते. त्यांनी दक्षिण दरवाजा उघडणेसाठी तेथील बाह्य पहारा मोडून दरवाजावर रानातून गोळा करून आणलेली लाख ओतली. व त्यावर अग्निबाणांचा वर्षाव केला. लाख कडाडून पेटली. व त्या दरवाजास आग लागली. पण आचार्य वृषभ यांच्या शिष्यांनी ती विझवली. व दरवाजाची शिबंदी फोडू दिली नाही. शेवटी महारुद्राने अरण्यातील विशाल वृक्षाचा बुंधा आणून दरवाजा धडकी देवून मोडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा कठीण होता. शेवटी कमी पहारा बाजूने एक तुकडी घेऊन महारुद्राने चाल केली.

तिरंदाजांची मदत घेत त्यांनी पुढे एका बाजूने तटावर चढून प्रवेश केला. व दरवाजा उघडला. बाकीचे सैन्य आत घुसले. जोरदारपणे रणकंदन झाले. व महारुद्राने राजधानी जिंकून घेतली.

महाराज वेददत्त व महाराणी शामलता तिथे नंतर आल्या. व राजधानी ताब्यात घेतल्यामुळे त्याना खूप आनंद झाला. वेददत्त व शामलता या महालात आल्या. महारुद्राची दक्षिण प्रांतनायक पदी नेमणूक केली. व ते राज्यपाट सांभाळ करू लागले. पण वेददत्त यांना दुसऱ्या काळजीने ग्रासले. कारण एक मुलगा मरण पावला. तर दुसरा मतिमंद व राजकुमारी अंबालाचे देखील काय झाले हे ठावूक नाही. अशा अवस्थेत या राज्याचे पुढे काय होणार ही काळजी त्यांना लागली.

...... ....... ........

महारुद्राच्या पराक्रमाने त्यास दक्षिण नगर प्रदेशाचा कारभार मिळाला होता. त्यामुळे सर्व भिल्लांची ताकद त्या प्रदेशात वाढली होती. त्याने भिल्ल व पारधी वस्त्या सुधारणेस सुरुवात केली होती. तो आता आपल्या मातापित्याबरोबर दक्षिण भागातील नगरात असणाऱ्या भव्य प्रासादात राहू लागला. व आपल्या प्रामाणिक सहकाऱ्यांना आपल्या विभागातील ग्रामांचा प्रमुख नेमले. तो नगरात जरी राहत आसला तरी त्याचे मन अस्वस्थ होते. कारण त्यास त्या कृष्ण कुमारीचे वेड लागले होते. त्यास अनेक सुंदर युवतींनी लग्नाची मागणी घातली होती. तो दिसायला देखणा असल्याने त्याच्या मागे अनेक तरुण युवती लागल्या होत्या. पण त्यांमध्ये त्यास सौंदर्य दिसत नव्हते. त्याच्या नजरेसमोर फक्त ती पारधी युवती तरळत होती. त्याने तिला मागणी घालण्याचे ठरवले.

इकडे अंबाला व त्रिशला नेहमीप्रमाणे रानात कंदमुळे गोळा करत होती. खूप कष्ट केल्यावर थकून त्या दोघी एका उंच शिळेवर बसल्या होत्या. महारुद्र नगरनायक झाल्याची वार्ता त्यांना समजली होती. त्या दोघी थोडा वेळ त्या जंगलातील शिळेवर विसावल्या होत्या. त्यात त्रिशला आंबालेस म्हणाली, “ अंबा महालात राजवैभवात लोळणारी तू व तुझ्यासमोर तेथील मऊशार मखमली अशा पसरलेल्या पायघड्या निघून जाऊन, आपल्या नशिबाशी देवाने असा खेळ केला, की आपली सर्व सुख हिरावून घेतली. किती काळ हा आपला वनवास. ज्या मुलिसमोर नतमस्तक होणारे शिपाई कुठे? व ह्या पारधी वस्तीतल्या व इतर हिंस्र नजरा कुठे? त्यांच्याशी सामना करता आपल्याला सुळावरील पोळी घेण्यासारखा अनुभव येत आहे.”

अंबाला, “ होय, पण या निसर्ग रम्य अशा महालात जगण्याची सवय झाली आहे. फक्त काही कष्ट उपसावे लागत आहेत, पण मी आता ठरवल आहे.”

त्रिशला, “ काय ठरवल आहेस?.”

क्रमशः पुढे....


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३५

 अंबाला एका राजकुमारीची    प्रेमकथा भाग ३५

क्रमशः पुढे चालू......



पार केल्यावर त्या लपत छपत नगराधिकाऱ्याच्या प्रासादाकडे सरकल्या. सर्व प्रासादातील व्यवहार आटोपले होते. नगरनायक झोपी गेले होते. पहारा कमी होता. काही ठिकाणी दिवट्या फक्त तेवत होत्या. अंधारातून त्या दोघी मागील बाजूपासून नगरनायक झोपलेल्या ठिकाणी त्या आल्या. तिथे पहारा देत असलेल्या सैनिकास त्यांनी सावध होऊ न देता ठार केले. त्याचे मुंडके कापून त्यांनी नाल्यात फेकले.

तेथील वृक्षाच्या साहाय्याने गच्चीत त्या उतरल्या. मागील बाजूच्या स्नानगृहातून त्या प्रासादात घुसल्या. व वाटेत येणाऱ्या सर्व खोल्या न्याहाळत चालल्या. प्रत्येक वाटेतील शिपाई सावध न होऊ देता मारत त्या पुढे नगरनायकाच्या मुलाच्या खोलीत गेल्या.तो सावध होऊन प्रतिकार करणार इतक्यात त्यास बेशुद्ध त्यांनी केले. शेवटी त्या दोघी नगरनायकाच्या कक्षात आल्या. त्यांच्या पत्नीस जी पलंगावर झोपली होती तिला बेशुद्ध केले. व नगरनायकास सावध करून त्यांनी उठवले. ती त्यास मारणार इतक्यात तो ओरडला, “ नको नको, मला मारू नका. तुम्हाला हवे तेवढे मी धन देतो. पण मला मारू नका.”

तेवढ्यात अंबालाने त्याच्या पुढे आपली तलवार धरली. ती राजेशाही तलवार पाहताच तो म्हणाला, “महाराज मला माफ करा . मी तुमचा गुन्हेगार आहे. पण मी तर हे तुमच्या पत्राच्या सांगण्याने केले. तेव्हा चुकीस क्षमा असावी. व मज जीवनदान द्यावे.”

त्याचे बरळने ऐकूण अंबालाने त्याच्या कंठावर तलवार ठेवून त्यास विचारले. की त्याने महाराज जयवर्धन यांचा विश्वासघात का केला.

तेव्हा नगरनायक थरथरत, “ पण आपण कोण आहात?”

अंबाला, “ मी महाराज जयवर्धन यांची विश्वासू सहकारी आहे. तू जर सत्य सांगितले तर आपल्यावर कृपा घडेल.”

तो बोलू लागला. त्याच्या बोलण्यातून गुप्त रहस्य उलगडत होते. त्याने एक मोहोर उमटवलेल एक राजपत्र दाखवले. ते तिने ताब्यात घेतले. व नगरनायकाचा तत्काळ शिरच्छेद केला. व त्या दालनातून त्या बाहेर पडल्या. तोपर्यंत प्रसादात कल्लोळ माजला होता. सैन्य सावध झाले होते. त्या दोघी वाटेत येणाऱ्या प्रत्येकास यमसदनी धाडत गच्चीत पोहोचल्या. तेथील वृक्षावरून खाली उतरल्या. व नाल्याकडे सरकल्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नाल्यात घुसल्या. व पोहत पोहत नाल्याच्या खालील बाजूस गेल्या. तेथील आडव्या वृक्षाच्या खोडास पकडुन बाहेर पडल्या. व अंधाऱ्या रात्री नगराबाहेर पडून घनदाट अरण्यात शिरल्या. आता त्यांचे नाल्यातून पोहल्याने सर्व अंग भिजले होते. तेथून त्या आपल्या वस्तीच्या दिशेने अरण्यवाटेने त्या निघाल्या. अंधार्या रात्री काजवी पिशवीच्या प्रकाशात त्या वेगाने निघाल्या. अरण्य मार्ग आता त्यांना बरेच माहीत झाले होते. अरण्य भरपूर चालून त्या पुढे आल्या होत्या. पहाट होऊ लागली होती. या सर्व मोहिमेत अंगाला चांगलेच ओरखडे पडले होते. त्या अरण्य वाटेने नदीतीरी आल्या. व त्यांनी पाहिले नदीस चांगलाच पूर आला होता. त्यांनी पूर्वी प्रमाणे नदी पार केली. व अरण्यात पुन्हा जाऊन आपली वस्त्रे बदलून त्या आपली शिरस्त्राने घेऊन आपल्या वस्तीवर परत आल्या.

…. …… …… ….. ……….

इकडे नगरनायकाचे मुंडके एका बाजूस पडले होते. त्याच्या प्रेतावर त्याची पत्नी शोक करत होती. सैनिक हत्यारांचा शोध घेत होते. पण त्या दिवशी सर्वत्र मुसळधार पाऊस व सर्वत्र आलेले नदी नाल्यांना पाणी व चिखलयुक्त परिसर, तसेच पावसाळी वातावरण व भयंकर अंधारी रात्र हत्यारांना पकडण्यास अडचण निर्माण करत होती. सगळीकडे अफवा पसरत होत्या. काही म्हणत होते महाराज वेद्दत्तांचे हे काम आहे. तर काही आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचे हे काम असणार. राज्यपदावरील हक्कावरून हत्या झाली असावी. असे बोलत होते. कारण हल्लेखोरांनी कोणतेही धागेदोरे मागे ठेवले नव्हते. त्यांच्याशी लढताना जायबंदी झालेल्या शिपायांना त्यांच्या घोषाधारी पोषाखामुळे त्यांचे चेहरे पाहता आले नाहीत. नगरच्या बाजूला असणाऱ्या लांब लांब वस्त्या व गर्द झाडी यामुळे चौकशी कशी करायची. त्यात नगरातील विरुद्ध असणाऱ्या सर्वांना आधीच तुरुंगात घातले होते. तरी त्यांवर संशय खाणार कसे. शेवटी शांत बसून मार्ग पाहणे चालू झाले.

इकडे अंबाला व त्रिशलाने आपल्या गुप्त ठिकाणी येऊन त्यांनी आपली वस्त्रे बदलून त्या पुन्हा वस्तीवर नजर चुकवून घरात शिरल्या. महदव्वा अजून उठली नव्हती. सिपना सोबत असलेने ती लवकर उठून आपल्या घरी जेवण तयार करणेसाठी गेली होती. महदव्वा गाढ झोपली होती. तिची गुंगी उतरली नव्हती. त्या आपापल्या कामाला लागल्या. त्रिशलेन चूल पेटवली व तिच्यावर घरातील एका रांजनात ठेवलेले सडलेले तांदूळ शिजत टाकले व थंडावलेले अंग त्या शेकत बसल्या. भिजल्याने खूप थंड वाजत होती. तसेच रानातून जाताना अनेक काटेकुटे लागले होते. ते काढत शेकत त्या बसल्या. महदव्वेस जाग आली होती. ती त्यांच्या जवळ आली. तिने अंबालेच्या शरीरावर हात फिरवला व ओरखडे कशाने पडले हे विचारले.

तेव्हा अंबाला म्हणाली, “ काल मासे पकडताना एक वेतकाठी लागून पडले. इतक्यात तिथे सिपना आली. ऐव्हाना तिला त्याविषयी बरीच माहिती झाली होती. पण ती कोणाशी काही सांगत नव्हती. ती महदव्वेस काही जेवण घेऊन आली होती. त्या दोघींना पाहून केव्हा अआलात हे बोलणार इतक्यात त्रिशलाने तीस इशारा केला. तेव्हा तिने आपले बोलणे बदलले.

सीपना, आंबालेकडे पाहत, “काही म्हणेनास वर्षाऋतू मध्ये तुझा काळा रंग उतरतो. व तुझी कांती उजळू लागते बघ.”

तिने असे म्हणताच महदव्वा म्हणाली, “ गप्प सिपने तुझी दृष्ट लागेल तिला.”

तेव्हा अंबेकडे त्रिशलेच लक्ष गेलं. व तिच्या लक्षात आले की अंबालेची काजळी उतरत आहे. तेव्हा तिने लगेच रात्री एकांतात तिला पुन्हा काजळी लावली. व ती पुन्हा कृष्ण वर्णी दिसू लागली.

…. ….. ……. ….. …… …..

क्रमशः पुढे......

Wednesday, April 5, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३४



क्रमशः पुढे चालू.....

घरी आल्यावर त्रिशलेन पाहिलं की अंबेच्या हाती जखम आहे. तिने त्याविषयी विचारणा केली. तेव्हा शेजारील सिपना ही तिच्यासोबत होती. तिने सर्व हकीकत सांगितली.

अंबेशी ती बोलू लागली. थोड्या वेळाने सीपना निघून गेली. महदव्वा पण झोपली होती. आंबेस शांत पाहून त्रिशलेन विचारलं तेव्हा ती बोलू लागली.

त्रिशला, “ अशी मुखस्तंभ का आहेस.”

अंबाला, “ मी त्या तरुणास पाहिले. आज अगदी जवळून,”

त्रिशला, “ त्यात काय विशेष.”

अंबाला, “ आपणास वाटतो तितका तो शांत नाही. त्याच्या अंगावर मी काही व्रण पाहिले. जे तलवारी व भाल्याच्या वारांचे होते.”

त्रिशला, “ त्यात काय एवढं, असेल एखाद्या मोहिमेवर तो.”

अंबाला, “ आज काल जर एखादा संघर्ष झाला असेल. तो फक्त आचार्य वृषभ यांच्या आश्रमातील. मला वाटते. तो त्या मोहिमेत सामील असेल.”

त्रिशला, “ त्याने आपल्याला पाहिले नाही ना. मग सोड.”

अंबाला, “ पण माझी साखळी हरवली त्याचे काय?”

त्रिशला, “ हे बघ ते विसर कारण शिव ही कोणाचीही देवता आहे. मग कोण ओळखेल. व इथे कोणी इतका श्रीमंत नाही. जो सुवर्ण साखळी घालेल. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. इथे चौकशी होणार नाही. व हा विचार करण्यापेक्षा आपण पुढील योजना तडीस नेली पाहिजे. कारण आपणास पुढे नगर नायकाचा बदला घ्यायचा आहे.”

 नगर नायकाचा काटा काढण्यासाठी त्या योजना आखणी करू लागल्या. त्यासाठी नगरनायकाचा वाडा व तेथील पहारा पाहाणीसाठी व काही खरेदीसाठी त्यांनी नगरात जायचे ठरवले . घरातील पाणी पिण्यासाठी एक मोठाला माठ हवा होता. तसेच काही जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी त्या पेठेत गेल्या.

पेठेत आल्यावर त्या प्रत्येक देवडी न्याहाळत निघाल्या. तेथून पुढे काही अंतरावरच नगर नायकाचा वाडा होता. तांबड्या मातीने सारवलेल्या घरांच्या रांगेतून त्या पुढे निघाल्या. खरेदी विक्रीचा वार असल्याने पेठेत गर्दी होती. जागोजागी पहारा होता. कारण सदर पेठ ही नगर नायकाच्या ताब्यात होती. व राजधानी सुध्दा. व आचार्य वृषभ यांच्या हत्येमुळे नगरनायक सावध झाला होता. व त्याने पहारा वाढवला होता. नगर नायकाने अपरांत राज्यातून एक सैन्य तुकडी ही मागवली होती. व त्यामुळे एका लष्करी छावणीचे रुप तिजवर आले होते. नगर मोठे होते. पण झाडीमुळे तिथे अलिप्तता तिथे होती. पुढील कडक पहाऱ्यामुळे तिथे जाणे अवघड होते. मात्र मागील बाजूस झाडी होती. त्यातील एक वृक्ष हा त्या महालाच्या गच्चीस लागून होता. तेथे मागील बाजूस एक नाला होता. व त्या परिसरात विषारी सर्पांचा वावर होता. त्यामुळे कोणीही तिकडील बाजूस जात नसे. वाड्याची पाहणी करून त्या पुन्हा पेठेत घुसल्या. व तेथे त्यांनी अफू व काही चामडे एका व्यापाऱ्याला कडून खरेदी केले. तसेच शिवनावळीचे साहित्य ही त्यांनी एका ठिकाणाहून घेतले. व कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी केला. त्यात सर्व आवश्यक साहित्य खरेदी करुन भरले. व त्या परतल्या.

वस्तीवर येण्यापूर्वी त्यांनी ते चामडे व शिवणावळीचे साहित्य बाहेर अरण्यात लपवले. व माठ अन् जीवनावश्यक साहित्य घेऊन त्या वस्तीवर परतल्या. व काही ना काही कारणास्तव त्या तिथे जात. व त्या चामड्यापासून त्यांनी सुंदर असे गुडघ्यापर्यंत पाय सुरक्षित ठेवणारी व हस्त सुरक्षा आवरणे बनवली.

जी अत्यंत जाड होती. त्या रोज रानात जात पण महदव्वा मात्र त्यांना काही बोलत नसे. कारण त्याच तिला सांभाळत होत्या. ती त्यांच्या धाडसाचे कौतुक करीत असे.

त्या दोघी नगरनायकाचा काटा काढण्यासाठी योजना आखनिस लागल्या. योग्य संधीची वाट पाहू लागल्या.

कुंतल प्रदेशात वर्षाराणीचे आगमन दरवर्षी होत असते. तिच्या मध्यावधी काळात पुनर्वसु नक्षत्रात तर जास्तच जोर येत असे. शेतकी कामात अनेक लोक गुंतत असत व रप रप बडवणाऱ्या पर्जण्याच्या दिवसात राज्य नगरातील पहारा कमी होत असे. याच संधीचा फायदा करून घेण्याचे अंबालाने ठरवले. व ती त्रिशलेसवे तयारीला लागली. नगरात जाणारी एक वाट ही नदीच्या मार्गे जात होती. उगम प्रदेशात नदीच्या ती असल्याने ती लांघणे तसे अवघड नव्हते. मात्र तिथे पाण्याचा वेग अती तीव्र असे. दक्षिण कुंतल हे पर्जन्याचे आगर होते. या प्रदेशात वेत बेटे पुष्कळ होती. ती नदी तीरावर अशी वाढली होती की एकप्रकारे वक्र कमानीचे प्रवेशद्वारच बनवत. या दिवसात तांदूळ व नागली यासारखी पिके इथे जास्त घेत असल्याने त्यांची लागन लवकर होई. व लोक घरात राहणेच पसंत करत असत. याच वेळेचा फायदा घ्यायचे अंबाला व त्रिशलेन ठरवले. योजने नुसार त्यांनी एक दिवस निवडला. त्या दिवशी पावसाने अधिकच जोर धरला होता. नदीतील मच्छीचे कालवण त्रिशलेने बनवले. महदव्वेस जेवण वाढले. त्या ही जेवल्या. नंतर त्यांनी एक तांबूल महादव्वेला खायला दिला. त्यामध्ये त्रिशलेन अफू घातली होती. तिच्या गुंगिने ती वृद्धा निद्रिस्त झाली. तिला घराच्या आतील भागात झोपवून शेजारील सीपनेस लक्ष देण्यास सांगून त्या दोघी बाहेर निघाल्या. बाहेर पाऊस पडत असल्याने जाणे अशक्यच एखादा मुसळ आयनात कोसळावा तशा वेगाने कोसळत होता. त्या दोघींनी वेताच्या बारीक कांबट्यांपासून बनवलेले शिरस्त्राण धारण केले होते. त्यांनी ते आपल्या डोक्यावर परिधान केले होते.

त्या वस्तीवरुन निघाल्या. वर्षा ऋतू त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. त्या जवळील अरण्यात गेल्या. तिथे त्यांनी गुप्तरित्या लपवलेली शस्त्रे व आपली चामडी वस्त्रे त्यांनी जिथे ठेवली होती ती घेतली. तेथील एका कपारीत असणाऱ्या गुहेत त्यांनी पेहराव बदलला. व वरती आपला गुप्त पोशाख घातला. थोड भिजल्याने चामड्यास उग्र वास येत होता. पण आता त्या चांगल्याच सरावलेल्या होत्या. पेहराव केल्यानंतर त्या अरण्य वाटेने नगराकडे चालू लागल्या. पुढे नदीकाठी आल्या. नदीला भरपूर पाणी आले होते. नदितिराने त्या उगम बाजूस असणाऱ्या वेत वनात आल्या. तिथेही भरपूर पाणी होते. त्या नदी तुंबात शिरून वेत बेटाजवळ आल्या. आपली शिरस्त्राने बाजूला ठेवली. व डोक्याला दुसरे वस्त्र बांधले. व आपली शस्त्र नीट बांधून त्या बेटावर चढून त्या शेंड्याकडे सरकल्या. नदीच्या पलीकडे असणारी बेटे सुध्दा वाकल्याने त्यांची गुंफण झाली होती. अलीकडील बेटातून वर चढून पलीकडील बेटावर जाऊन त्या नदीपार गेल्या. नदीपार गेल्यावर त्या नगराकडे सरकल्या. तिथे पोहोचेपर्यंत त्याना संध्याकाळ झाली. तिथे गेल्यावर त्यांनी एका जागी आडोसा शोधून आपल्या कडील बंद पिशवीतील सुखामेवा खाल्ला. व पुढे नगराकडे गेल्या. नगर वेशीवर पहारा सौम्य होता. त्यांनी दुसरीकडून नगरात प्रवेश केला. आता रात्र चांगलीच झाली होती. नगर नायकाच्या महाला मागे नाल्यास लागून असलेल्या किर्र झाडीत त्या गेल्या. झाडीच्या गच्च पणामुळे पावसाचा शिडकावा जाणवत नव्हता. तेथे अल्प फलोपहार घेऊन त्या अंधार वाटेने नाल्यात उतरल्या. नाल्यास पाणी आल्याने तेथील सर्प दुसरीकडे गेले होते. व सुरक्षित पेहराव केल्याने त्यांना घाबरण्याची गरज नव्हती. नाला पार करण्यासाठी सुरक्षित जागा त्यांनी हेरली. एका वृक्षाच्या साहाय्याने त्यांनी तो पार केला. 

क्रमशः पुढे.....

Friday, March 31, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३३

 अंबाला एका राजकुमारीची प्रेमकथा भाग ३३


क्रमशः पुढे चालू.....

विश्रांती घेताना महारुद्र त्या शरांचे निरीक्षण करू लागला. तेव्हा त्याला साखळीची आठवण झाली. त्याने ती आपल्या कमरे भोवतालच्या पिशवीत ठेवलेली होती. ती त्याने काढली व तो ती बारकाईने निरीक्षण करू लागला. तेव्हा त्या साखळीवर कोरलेली देवता त्याने पहिली. ती शिवाची मूर्ती दिसत होती. व ती एक सुवर्ण साखळी होती. त्या साखळीची जडण घडण ही पारध्यांच्या गळ्यातील साखळी सारखी होती. पण ती सुवर्ण साखळी होती. व या प्रदेशात इतका कोणीही पारधी श्रीमंत नव्हता. की जो सुवर्ण साखळी तयार करेल. पण ती एका पारधी स्त्रीची होती हे मात्र पक्के होते. त्यानंतर तो त्या शरांना न्याहाळू लागला. त्यातील एक शर जो आश्रमातील खांबनिस लागला होता. तो त्याने घेतला. ज्याने संधान झाले नव्हते. त्याने तो तेथील एका लोटक्यात पाणी घेऊन बुडवला. तर पाण्यावर एक तवंग निर्माण झाला. ते पाणी त्याने बाजूला नेवून ठेवले. एक पक्षी आला व त्याने ते पाणी प्राशन केले. तो थोड्या अवधीत मरून गेला. त्यावरून ते विषारी शर आहेत हे त्याने जाणले. त्याचे निरीक्षण करतेवेळी त्याला जाणवले की वेतापासून बनलेल्या त्या शराची टोके अत्यंत टोकदार होती. व त्याची रचना अत्यंत निमुळती अशी होती. मागील बाजूस पिसे व मध्यभागी अत्यंत तासिव तो शर होता.

महारुद्रला त्या शराचे निरीक्षण करता त्यास त्या पारधी युवतीची आठवण झाली. त्या दोघीही शूर आहेत. व त्याला त्रिशलाने मारलेल्या शरांची आठवण झाली. त्यानंतर त्यास अंबाला आठवली. व तिच्या आठवणी जाग्या झाल्या. व तिला भेटण्याची तीव्र जाणीव त्याला झाली. व त्याने प्रातदिनी तिला भेटायला जाण्याचा निश्चय केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो प्रथम आपल्या वस्तीवर गेला. त्याने आपल्या माता पित्याची भेट घेतली. व तो अन्न सेवन करुन तेथून नदीच्या वाटेला लागला. नदीवर आल्यावर त्याने पाहिले तिथे कोणी नव्हते. नदीच्या पुढील भागात उन्हाळी पाण्याची गरज भागवणे साठी पारधी व भिल्लानी बंधारा घातला होता. त्याने नदीत पाणी तुंबले होते. त्याने आपले धारदार शस्त्र कमरेस बांधले. व आपला धनुष्य व बाण पाठीस बांधून त्याने पाण्यात उडी टाकली. व नदीपार करून तो पारधी वस्तीच्या हद्दीत आला. व वस्तीच्या वाटेला लागला. त्याला आता बऱ्याच पारधी लोकांची ओळख झाली होती. तो हर तऱ्हेने अनेक जणांना मदत करत असल्याने त्याला लोक अदबीने बोलत असत. अनेक भिल्ल व पारधी युवती त्याच्याशी सख्य करण्यासाठी प्रयत्न करत असत. अनेक भिल्ल कुमारींनी त्यास लग्नाची मागणी घातली होती.

पण त्याची नजर त्या पारधी कुमारिकेवर आली होती. वाटेने जाताना त्याला अनेक मुलींचा कालवा ऐकू आला. त्याने पाहिले वाटेच्या बाजूच्या रानात एक भला मोठा आम्रवृक्ष होता. त्याला आंबे लगडलेले होते. त्याखाली मुली गलका करून होत्या. वरून एक युवती त्यांकडे आंबे टाकत होती. महारुद्राला वाटले. की आपणही त्यांना आंबे काढून द्यावे त्याने नेम धरून काही आंबे पाडले. अचानक पडणाऱ्या आंब्याना त्या मुली गोळा करण्यासाठी खाली वाकल्या. वृक्षावर बसलेली युवती ते आंबे तोडायचे सोडून बाण कुठून येतं आहेत हे न्याहाळू लागली. पण गर्दपानांतून ते दिसेनात. अचानक एक शर एक घोस तोडण्यासाठी महारुद्राने मारला. पण अचानक वारा जोरात वाहू लागला. व त्याने बाणाची दिशा बदलली व तो थेट त्या युवतीच्या उजव्या दंडात लागला. तिचा तोल गेला ती फांदीस लोंबकळली व तिने शेजारील वेलींच्या जाळीत उडी घेतली. मुलींनी एकच गलका केला. व त्यांनी तरुणीला बाजूला आणले.

महारुद्राने ओळखले की आपला शर कुणाला तरी लागला आहे. तो लगेच तिथे गेला. व त्याने त्या मुलींना बाजूला सारले व तो त्या मुलीजवळ गेला. तिला पाहताच त्याला धक्का बसला. ती अंबाला होती. तो चटकन तिच्या जवळ गेला

तिच्या दंडाजवळ लागलेला शर त्याने काढला. रक्त ओघळू लागले. त्याने क्षणाचा विलंब न करता आपल्या शरीरावरील वस्त्र फाडले. व ते तिच्या जखमेवर बांधू लागला. सर्व मुली त्याला दूषणे देवू लागल्या. काहींनी त्याच्या पाठीत आंबे मारले. थोड्या वेळाने त्या शांत झाल्या. त्याचे ध्यान त्या मुलींकडे नव्हते. त्याने जवळील झाडाची काही औषधी पाने तोडली. . व ती हातावर चोळून तिच्या जखमेवर लावली. व त्यावर वस्त्र बांधले. रक्त वाहायचे थांबले. इतक्यात काही मुली जवळील पानाचा द्रोण करून पाणी घेऊन आल्या. पाणी शिंपडले न तिला शुद्ध येऊ लागली. महारुद्राच्या डोळ्यातून पाणी पडू लागले. अंबालेस शुद्ध यावी म्हणून ते प्रयत्न करू लागले. शेवटी तिला शुद्ध आली. तिने पाहिले. की आपण एका पुरुषाच्या मांडीवर विसावलो आहोत. ती चटकन उठली. व तिने त्याकडे पाहिले. महारुद्र तिच्यासमोर शांतपणे बसलेला व त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू सर्व काही सांगत होते. ती त्याच्याकडे पाहून हसू लागली. अचानक तिचे लक्ष त्याच्या दंडावरील जखमांकडे गेले. त्यावरून तिने लगेच हेरले की हा त्या दिवशी रात्री त्या आश्रमावर हल्ला करणाऱ्यात होता. तिने त्याला पूर्ण न्याहाळले. त्याचे ते पिळदार दंड एखाद्या बळकट पैलवाणास लाजवेल असे होते. पण तिने त्याला अगतिकच पाहिले होते. ती चटकन उठली. व तेथील मुलांसमवेत चालू लागली. तिच्या हातातील त्या जखमेतून तीव्र वेदना उमटत होत्या. ती निघालेली पाहता तो चटकन तिच्या जवळ आला. व म्हणाला, “मला माफ कर. मी आंबे पाडून देण्याच्या हेतूने शर चालवला होता.”

अंबाला, “ ते मी जाणते. तुम्ही माझ्याबरोबर नेहमी शरणागत असल्यासारखे का येत असता. तसे येत जाऊ नका.”

असे बोलून ती तेथून निघून गेली.

…..

क्रमशः पुढे......

Wednesday, March 29, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३२

 अंबाला एका राजकुमारी ची 

प्रेमकथा भाग ३२



क्रमशः पुढे चालू......

त्या तिथून निघाल्यावर अर्ध्या वाटेवर आल्या. तेव्हा आंबलेच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली दुश्यलेने साखळी होती ती आता आपल्या गळ्यात नाही. तेव्हा त्या पुन्हा माघारी तिथे गेल्या. तेव्हा महारुद्राचे साथीदार तिथे सर्व आश्रमातील साहित्य आपल्या ताब्यात घेत होते. अंबाला लपत छपत आचार्यांशी झटापट झालेल्या ठिकाणी आली. तिथे तिने शोध घेतला. पण ती साखळी तिला सापडली नाही

त्यामुळे कोणाला कळायच्या आत त्यांनी तेथून जायचे ठरवले. व त्या निघाल्या. तेथून थेट त्या आपली वस्त्रे लपवलेल्या ठिकाणी गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी पोशाख बदलला व पुढे जिथे तलवार लपवली होती तिथे परत आल्या. तिथे अंबालेन आपली वस्त्रे व शस्त्रे लपवली. व त्या महदव्वेस पाठवून दिलेल्या गावी गेल्या. तिथे एक दोन वस्ती टाकून त्या पुन्हा आपल्या राहत्या ग्रामी परतल्या.

वाटेत येताना त्यांना एका वाटसरूकडून आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर झालेल्या हल्ल्याची बातमी समजली. पण त्यावर जास्त भाष्य न करता त्या आपल्या पारधी वस्तीवर निघून आल्या.

जिथे तिथे आचार्य वृषभ यांच्या आश्रमावरील हल्याची चर्चा सुरू होती.

जो तो म्हणे की आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर हल्ला करून महाराज वेददत्त यांनी राजधानी वरील हल्ल्याचा बदला घेतला. त्या तिघी आपल्या पारधी वस्तीतील घरी आल्या. व घरात महदव्वेला सोडून रानात अन्न गोळा करण्यास गेल्या. रानात गेल्यावर त्यांनी महदव्वेस आणायला जाताना जी शस्त्रे व वस्त्रे अरण्यातील ढोलीत ठेवली होती. ती जाऊन घेऊन त्या आल्या. व ती आपल्या वस्ती बाहेरील अरण्यात एक विशाल वृक्ष शोधून त्याच्या ढोलीत ठेवली. त्यातील फक्त धनुष्य त्यांनी घेतला व त्या पुन्हा रानातून निघाल्या. अरण्यातील एक वेत तोडून अंबा व त्रिशलाने पुन्हा त्याचे शर बनवले. व त्यांच्या साहाय्याने अनेक फळे त्यांनी काढली. तसेच इतर रानमेवा देखील गोळा केला. व त्या घरी परतल्या.

…. ….. ….. …… …… …… ……

इकडे आचार्य वृषभांना ठार मारल्यावर महारुद्राने आपल्या साथीदारांना अन्य कोणी जिवंत आहे का ते पाहण्यास सांगितले. व काहीना मारलेले शर पुन्हा काढून घेण्यास सांगितले.

त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या साथीदारांनी ते शर काढून घेतले व महारुद्रच्या पुढ्यात आणले. त्याने त्यातील निराळे शर काढले. ज्यांची घडण निराळी होती. जे त्या कृष्णवस्त्र धारण केलेल्या त्रिशलाने मारले होते. तो आचार्य यांना लागलेला शर त्याने उपसला. तेव्हा त्यास आचार्य वृषभ यांच्या मृत देहाजवळ पडलेली साखळी सापडली. ती त्या वीरांगनेची असल्याची जाणीव त्यास झाली. त्याने ती कोणी पहायच्या आत लपवली. व सर्व पुरावे नष्ट करून तो व त्याचे साथीदार तिथून आपल्या जखमी साथीदारांना घेऊन आपल्या सुरक्षित अरण्यातील युद्ध सराव तळावर आलीत. तेथे त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी जातिनिशी महाराज वेददत्त गुप्तरित्या तिथे आले. त्यांना गुप्त हेरांच्याकरवी आचार्य यांच्या आश्रमावरील हल्ल्याची बातमी समजली होती. त्यांनी त्या ठिकाणी येऊन महारुद्राचे कौतुक केले. व त्यास दक्षिण कुंतल प्रदेशाचा नगर नायक नेमण्याचे ठरवले. त्यासाठी राजधानी शत्रूकडून जिंकून घ्यायची व दक्षिण नगर नायकास हरवून तो प्रदेश जिंकण्याची जबाबदारी महारुद्रावर सोपवली.

…… ……. …… …… …….

क्रमशः पुढे.......

अंबाला भाग ३१

 अंबाला भाग ३१



क्रमशः पुढे चालू.....

ते पंधरा सोळाजन होते. त्यातील चार पाच जण आचार्य वृषभ यांच्या कुटीत शिरले. व त्यांनी आचार्य समजून वार केला. त्यात त्यांची पत्नी जखमी झाली. ती ओरडत उठली. त्यामुळे झोपलेल्या आचार्यांना जाग आली. ते सावध झाले. व त्यांनी तलवार उपसली. व त्या तोंड रुमालाने झाकलेल्या. महारुद्रच्या साथीदारांनी ते दोन हात करू लागले. या सर्व हातघाईत आचार्यांच्या बाजूच्या दालनातील शिष्य जागे झाले. व त्यांना त्यांच्यावरील संकटाची चाहूल लागली. व ते ही शत्र घेऊन बाहेर पडले. तोपर्यंत आचार्यांनी त्यांच्याशी संघर्ष करत त्यांना कुटीबाहेर आणले. कुटी मध्य अंगणात आता चांगलीच हातघाई चालू झाली. त्यातून महारुद्राच्या साथीदारांनी त्यातील काही शिष्य आपल्या बाणांच्या साहाय्याने टिपले. त्यांची हातघाई पाहून त्रिशला आंबेस म्हणाली, “चल माघारी.”

तेव्हा अंबा म्हणाली, “आता चालून आलेली ही संधी पुन्हा मिळनार नाही. शत्रूचा शत्रू आपला मित्र. व मला वाटते इथे आपली जास्त गरज आहे. कारण या सराईत आचार्य शिष्यांशी सामना करणे अवघड आहे. व हे योध्दे जास्त वेळ टिक मारणार नाहीत.

त्या दोघींना तो महारुद्र व त्याचे साथीदार आहेत हे माहीत नव्हते. कारण त्या सर्वांनी तोंडावर रुमाल बांधले होते. ते अत्यंत त्वेषाने लढत होते. महारुद्र तर जीवाचे रान करून त्यांच्याशी मुकाबला करत होता. त्याचे हातघाई केलेले साथीदार जखमी होत होते. थकत होते. एकटा महारुद्र किती वेळ त्यासमोर टिकेल. महारुद्रचे जखमी साथीदार मागे हटत होते. तसेच त्यांची आयुधे ही कमकुवत होती. सराईत युद्ध करणाऱ्या आचार्यांच्या शिष्यांपुढे त्यांचा निभाव लागणे कठीण होते. भाले व वेतकाठीने किती वेळ ते लढणार. तरी देखील ते प्रतिकार करत होते.

 महारुद्राच्या साथीदारांनी मारलेले बाण अचार्यांचे शिष्य चुकवत पुढे सरकत होते.

लढता लढता आचार्य वृषभ महारुद्राला म्हणाले, “ कोण आहेस तू? इथे येण्याचे प्रयोजन सांग.”

महारुद्र, “ मी तुमचा काळ आहे. बदला घेण्यासाठी आलोय.”

आचार्य वृषभ, “ तुला माझी ताकद माहीत आहे का? महाराज जयवर्धनांच्या सैन्याचा जिथे निभाव लागला नाही तिथे तू किती वेळ टिकशील. शरण ये.”

महारुद्र, “ महराज जयवर्धनांचे सैन्य. म्हणजे मी नव्हे. ज्यांचा तू विश्वासघात केलास. तुझ्या बऱ्याच दुष्ट शिष्यांना मी यमसदनी धाडले. आता तुला फक्त त्यांच्याकडे पाठवायचे आहे.”

आचार्य वृषभ, “ तू व तुझे साथीदार माझ्यापुढे जास्तवेळ टिकणार नाहीत.”

महारुद्र हरतर्हेने त्यांच्याशी मुकाबला करत होता. पण थोड्याच वेळात त्याची तलवार तुटली. व आचार्य वृषभ त्यास मारणार इतक्यात अंबलाने इशारा केला. त्रिशलाने एक बाण सोडला. तो आचार्यांच्या हातावर लागला. त्यांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा त्यांना घोषाधारी तोंड बंधिस्त असे कृष्णवर्णी पेहराव केलेले दोन योद्धे दिसले.

इतक्यात बाण सोडत त्रिशलेने आचार्यांचे अनेक शिष्य टिपले. तिचे अचूक शर संधान पाहून आचार्य चिडले. इतक्यात अंबालाने आपली तलवार काढली. व चपळता दाखवून आचार्य वृषभ यांच्या एका शिष्यास ठार करून त्याचे मुंडके छाटले. ते एखाद्या चेंडू सारखे आचार्यांच्या पायात पडले. इतक्यात महारुद्र वेगाने बाजूला झाला. व त्या घोषाधारी वीर योद्ध्यांकडे पाहू लागला.

अचार्य, “ ए नेभळट विरा असे बेसावध विरांना मारताना तुला लाज वाटत नाही. असे मागून वार तरस करतात शूरवीर नाही.”

अंबाला, “ मला नेभळट व तरस म्हणणारे तुम्ही कुठल्या अंगाने सिंह शोभता. ज्यावेळी तुम्ही महाराज जयवर्धन यांच्या माघारी नगरावर हल्ला केला. व राजमाता अरूणावती यांचा घात केला त्यावरून तर तुम्ही लबाड लांडग्या सारे आहात. हे सिद्धच केलाय.”

आचार्य, “ तुझा व त्याचा काय संबंध.”

अंबाला, “ संबंध माझी तलवारच सांगेल.”

आचार्य, “आवाजावरून तर तू एक स्त्री वाटतेस.”

अंबाला, “ माझ्या आवाजावर व शरीरावर जाऊ नका. मी पण पहातेच तुम्ही किती शूर आहात ते. वाचवा स्वतला.”

असे म्हणत ती आचार्य वृषभ यांच्या अंगावर धाऊन गेली. व त्यांच्याशी लढायला लागली. आत्यंतिक विजेच्या वेगाने तिचे अंग हलत होते. आचार्यांचे उरलेले शिष्य टिपत ती लढत होती. त्रिशाला ने एक हुकमी स्त्री शर काढला. जो अत्यंत घातक होता. व तिने अचार्यांवर नेम धरला. अंबाला आचार्यांच्या शिष्यांना यमसदनी धाडून अचार्यांशी दोन हात करू लागली. तिची हालचाल पाहून ती एक वीरांगना आहे हे आचार्यांनी ओळखले. महारुद्र ते दृश्य पाहून स्तंभित झाला. ज्या अचार्यांशी लढताना तो व त्याचे सहकारी यांची दमछाक झाली होती. तिथे त्यांना कृष्णवर्णीय नाजूक देहाची वीरांगना असलेली मूर्ती तलवारबाजित मात देत होती. थोड्या वेळाने त्रिशलाने इशारा केला. तिचा इशारा समजला त्यानुसार अंबाला खाली झुकली. व वेगाने त्रिशलाने सोडलेल्या बाणाने आचार्यांचे हृदय छेदले. आचार्य खाली कोसळले.

इतके अचूक संधान महारुद्राने दुसऱ्यांदा पाहिले होते. एक त्रिशला व आता ही नेमबाज. आचार्यांचे काम फत्ते झाल्यावर त्रिशलेने इशरा केला. तसे चपळाईने अंबाला तिच्याजवळ गेली. व त्या तिथून निघाल्या.

त्यांना जाताना पाहून महारुद्र, “थांबा , आपला परिचय तरी करून द्या.”

घोषाधारी अंबाला, “ तू आमच्या विषयी जास्त जाणून घेऊ नकोस त्यापेक्षा तुझ्या जखमी साथीदारांना वाचव.”

असे बोलून त्या जवळील झाडीत गुप्त झाल्या.

क्रमशः पुढे.......


अंबाला भाग ३०

 अंबाला भाग ३०



क्रमशः पुढे चालू......

वेताच्या काढलेल्या काठ्या बांधताना आंबेच्या हाताचे बोट चुकून टोकास लागले. व तिच्या बोटाला छोटीशी इजा झाली. तिच्या तोंडातून माते असे स्वर निघाले. व तिला राजमातेची आठवण झाली. व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते रक्ताळलेले बोट तिने तोंडात घातले. ते पाहून महारुद्र पुढे झाला. त्याने तिथे जवळपास रान औषधी शोधली व चटकन तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटावर बांधली. ती चटकन बाजूस झाली. व उभा राहिली. त्याने ते वेत वेळूने घट्ट बांधले. अंबालाने चटकन तो डोईवर घेतला. व ती चालू लागली. तो तिच्याकडे पाहत राहिला. पाठमोऱ्या तिच्या देहातील लावण्य भर उन्हात ही लकाकत होते. ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्याकडे पहातच राहिला. ती दिसेनाशी झाल्यावर तो मागे वळला. त्याने त्या बेटातील काही काठ्या काढल्या. व तो ही आपल्या वस्तीकडे निघाला. वस्तीवर आल्यावर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक धनुष्य व शर तयार केले. व त्या शरांच्या टोकाला त्यांनी विष लावले. व ते गट्टे गुप्त जागी अरण्यात लपवले.

इकडे अंबाला त्या काठ्या घेऊन येऊन तिने घरात बसून तिने अनेक शर तयार केले. व त्याच्या तोंडाला विषारी औषधी लावली. वृध्द महदव्वेस आपल्या बहिणीला भेटायची इच्छा झाली. त्यामुळे त्रिशला तिला सोडण्यासाठी गेली होती. ती तिला सोडून परत आली.

महदव्वा नसल्याचा फायदा अंबेने घ्यायचे ठरवले. आपल्या मातेस ठार मारून आपल्याला परागंदा करणाऱ्यास शिक्षा करण्याचे तिने ठरवले. तिने जवळील पेठेतून त्रिशलेस काही वस्त्रे आणावयास सांगितले. त्याप्रमाणे त्रिशलेने जवळील पेठेत जाऊन काही कृष्णवर्णीय वस्त्रे विकत आणली. व त्या दोघींनी आचार्य वृषभाच्या आश्रमावर हल्ला करण्याचा निश्चय केला. त्याची योजना त्या आखू लागल्या. व त्यांनी योजना आखली.

काही दिवसांनी महदव्वेस परत बहिणीकडून आणण्याचे कारण ग्रामनायकास सांगून त्या तेथून बाहेर पडल्या.

ग्रामातून बाहेर पडल्यावर त्या गावाबाहेरील अरण्यात गेल्या. जिथे त्यांनी गुप्त जागी उंच वृक्षाच्या ढोलीत आपली शस्त्र लपवून ठेवली होती. तिथे गेल्यावर त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली शस्त्रे तिने काढली. ज्यामध्ये अंबालेची धारदार तलवार होती. जी तिला तिच्या लहानपणी तिच्या मातेने दिली होती. ती न्याहाळताना तिला आठवले की याच तलवारीच्या बळावर तिने अपरांत देशी त्रिशलाची छेड काढणाऱ्या त्या युवकांचे काम तमाम केले होते. तिने तिची धार पाहिली. व त्या अरण्य वाटेने आचार्य वृषभ यांच्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. आता अरण्य म्हणजे त्यांना त्यांचे अंगणच वाटत होते. त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली वस्त्रे गुप्त जागी लपवली. व त्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. अनेक अरण्यातील ओढे नाले व नदी पार करत त्या परिसरात पोहोचेपर्यंत त्यांना सांज झाली. तिथे जाताना वाटेतील रानफळे व औषधी ज्या त्यांनी जाताना तोडून घेतल्या होत्या. तसेच पन्हाळीचे पाणी जे आपल्या कातडी पिशवीत भरले होते. ते त्यांनी एका उंच वृक्षाखाली बसून निवांत फळे खाल्ली व पाणी पिले. व अंधार होण्याची त्या वाट पाहू लागल्या.

महारुद्र देखील आपल्या सहकाऱ्यांन समवेत आचार्यांवर सुड उगवण्यासाठी निघाला. त्याने आश्रमाच्या उत्तर बाजूने हल्ला करावयाचे ठरवले. त्या बाजूच्या अरण्यात येऊन तो ही रात्र होण्याची वाट पाहत आपल्या साथीदारांसमवेत तिथे दबा धरून बसला. अमावस होऊन गेली होती. थोड्याच वेळात रात्र झाली. त्यामुळे किट्ट काळोख होता. आचार्यांना माहीत होते. की प्रधान वेददत्त आपल्या विरुद्ध कार्यवाही थेट करू शकत नाहीत. व छुपा हल्ला करण्याचे धाडस कोणी करेल. हा त्यांचा भ्रम थोड्याच वेळात दिर होणार होता.

आचार्यांच्या आश्रमात सर्व शिष्य आपला दिनक्रम आटोपून झोपी गेले होते. तसेच मध्यभागी असणाऱ्या आचार्य वृषभ यांच्या कुटिभोवती असणाऱ्या कुटीत राजधानीवर हल्ला करणारे शिष्य धुंद होऊन पडले होते. भोजन झाले होते. व ते विश्रांती घेत झोपी गेले.

रात्रीचा मध्य प्रहर येताच त्या दोघी आश्रमाच्या दक्षिण पूर्व भागाकडून आश्रमाच्या विभागात आल्या. तिथे गोशाळा होती. गाई रवंथ करत होत्या. तेथून त्या लपत छपत तिथून पुढे निघाल्या. त्या बाजूस सहसा कोणी नसे. तिथून शिरकाव करून त्यांनी तिथे असणाऱ्या दोघांना यमसदनी सावध न होऊ देता धाडले. व मागील स्नान गृहाकडून त्या पुढे सरकल्या.

इकडे महारुद्र आपल्या साथीदारांच्या मदतीने पुढील बाजूने आश्रमात आला. आश्रमाच्या प्रवेश दारावरील देवडीत असणाऱ्या दोघांना त्याने संपवले. व आश्रमातील असणारी एक एक कुटी गाठत तेथील दुष्ट शिष्यांना यमसदनी धाडत त्या पुढे निघाल्या. त्रिशला व अंबाला मागील बाजूने शिष्य विश्रांती घेत असलेल्या दालनात आल्या. तिथे आचार्य यांचे शिष्य एका ओळीने झोपले होते. त्यातील बरेचसे चेहरे तेथील छोट्याशा दिव्यांच्या प्रकाशात दिसत होते. जे आंबेने ओळखले. अंबेच्या डोळ्यात निखारे उमटले. डोळ्यासमोर नगरावरील हल्ल्याचा प्रसंग उभा राहिला. नगर तट्टावर शर सोडणारे बरेचजण त्यात होते. जे आंबेने आपल्या मातेच्या निगराणीत पाहिले होते. तिने त्रिशलेस इशारा केला. तिने एक छोटे शस्त्र काढले. ज्यात अनेक सुया सारखी अस्त्रे होती. व तिने अंदाज घेत एका एका स अचूक नेम धरून मारले. ज्याने ते जागीच गतप्राण झाले. तेथून त्या बाहेर पडल्या पुढे एकामागून एक आश्रमाच्या कुटी दालनातील शिष्य टिपत त्या एका ठिकाणी आल्या. त्या दालनातील शिष्यांची शिकार करून बाहेर पडणार इतक्यात त्याना बाहेर हालचाल जाणवली. . त्यांनी कुटी दालनातील गवाक्षातून पाहिले की काही गुप्त पेहराव केलेल्या व्यक्ती शस्त्रे घेऊन आचार्य वृषभ यांच्या कुटिकडे जात आहेत. ते त्रिशलेने पाहिले. तिने अंबालेस संकेत दिला. तिने पाहिले. आता आपली योजना फसते की काय असे वाटले.

क्रमशः पुढे.....


Friday, March 24, 2023

अंबाला भाग २९

 अंबाला भाग २९



क्रमशः पुढे चालू....


महाराज जयवर्धन हे प्रचंड सैन्यानिशी गंगेश व राजा नागदूर्ग वर चालून गेले. तेथे अश्मक खोऱ्यात त्यांचे शत्रू सैन्याशी प्रचंड असे युद्ध झाले. त्यामध्ये नागदूर्गचा पराभव होत असताना नगरावरील हल्ल्याची व महाराणीच्या मृत्यूची बातमी समजली. त्यामुळे महाराजांचे मनोधैर्य खचले. याचा फायदा शत्रू नागदुर्गने घेतला. व बेसावध असताना रात्री तळावर हल्ला केला. यामध्ये महाराज जयवर्धन मारले गेले. त्यामुळे सैन्यात खळबळ माजली. व सैन्याने पलायन केले. याच दरम्यान प्रधान वेददत्त यांनी अश्मक खोऱ्यात गंगेश राजाशी युद्ध करून त्याचा पराभव केला. व ते पुढे महाराजांना मदत करण्यास गेले असता. त्यांना महाराज व महाराणी यांच्या हत्येची बातमी समजली. तेव्हा न डगमगत त्यांनी तेथेच आपल्याला राजा घोषित केले. व आपल्या सैन्याना घेऊन नागदुर्ग वर चालून गेले. तिथे त्यांनी अचानक हल्ला करून नागदुर्गचा पराभव केला. व त्यास ठार मारले. व त्याचे मुंडके कापून उत्तर प्रांतातून मिरवले. व शत्रूवर जरब बसवली. त्यामुळे उत्तर कुंतल प्रदेशाची हद्द सुरक्षित झाली. तरी देखील मध्य कुंतल प्रदेशातील मध्य भागातील राजधानी नगरावर शत्रूच्या सैन्याचा ताबा होता. तेव्हा त्यांनी तो घेण्यापूर्वी अश्मक खोरे व उत्तर कुंतल प्रदेशात नवीन युवक अधिकारी नेमला. व युद्धात सापडलेला शत्रूचा खजिना त्यांनी त्या प्रांताची व्यवस्था लावण्यासाठी खर्च केला. व तेथील नगर तात्पुरती राजधानी नेमून तिथे नवीन मंत्री मंडळ नेमले. व सैन्यानं घेऊन राजधानी व दक्षिण कुंतल प्रदेशाचा भाग जो घनदाट अरण्य असलेला होता. तो अपरांत राज्याचे सैन्य व आचार्य वृषभ यांच्या शिष्यांच्या ताब्यात होता. त्यांनी राजधानी व परिसरातील महाराजांशी एकनिष्ठ रयतेस त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच तेथील नगर नायक ही त्यांचा नातलग असल्याने तेथील सैन्य त्यांना मदत करत होते. व तो भाग निबीड असल्याने सैन्य हालचाल करणे सुलभ नव्हते . व आचार्य वृषभ यांचे शिष्य अत्यंत घातकी सेनानी होते. त्यांच्याशी संघर्ष करणे अवघड होते. 

आचार्य वृषभ यांचे शिष्य हे चांगलेच हुशार होते. व वेगवेगळ्या कलात चांगलेच निपून होते. व आपल्या सैन्याची तिथे ते डाळ शिजू देणार नाहीत. व तिथे कार्यवाही करणे अवघड असल्याने इथे शक्तीपेक्षा युकतीचा वापर करायचे ठरवले. यासाठी काटक अशा लोकांची अवश्यकता होती. वेददत्त यांनी मंत्री व गुप्तहेरांशी सल्लामसलत केली. तेव्हा हेर खात्यातील प्रमुख सिद्ध नागार्जुन याने याकामी भिल्ल व पारध्यांची मदत घ्यायचे सुचवले. कारण सदर जातीचे लोक हे काटक व तिरंदाजीसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांची मदत घेऊन आचार्य वृषभ यांचा आश्रम नष्ट करावा. व अपरांत प्रांतातून येणारी रसद तोडावी. व मग राजधानीची नाकेबंदी करावी. व हल्ला करून जिंकावे असे सुचवले. तेव्हा महाराजांनी सल्लामसलत करून हेरांना आदेश दिला. हेर कामाला लागले. हेरांच्या प्रमुखाने जातीनिशी भिल्ल व पारधी वस्तीवर जाऊन त्याने गुप्त गाठीभेटी घेतल्या. त्यांना महाराज जयवर्धन यांनी केलेल्या उपकाराची व दिलेल्या आश्रयाची जाणीव करून दिली. अनेक भिल्ल व पारधी यासाठी तयार झाले. पण आचार्य वृषभ व त्यांच्या शिष्यांशी लढणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी योग्य नियोजन हवे होते. यासाठी एक सभा घेतली गेली. अनेक भिल्ल व पारधी सभेला हजर होते तेव्हा महारुद्राने जबाबदारी घ्यायचे ठरवले. त्याने अनेक भिल्ल व पारधी तरुणांना एकत्र जमवले. व त्यांचे संघ तयार करून त्यांना दूर अरण्यात नेऊन त्याकडून युद्ध सराव करून घेतला. तसेच शस्त्रज्ञान ही दिले. व अनेक शूरवीर असे सैनिक त्याने तयार केले. व तो आचार्य वृषभ यांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी योजना आखू लागला. त्यांचे हे कौशल्य हेरांनी हेरले. व तो किती हुशार व वीर आहे हे महाराज वेद्दत्त यांना सांगितले. व त्यास सैन्य दलात घ्यावे हे सुचवले. तेव्हा महाराज वेददत्त यांनी त्याने जर ही आखलेली मोहीम यशस्वी केली. तर त्यास सैन्य दलात दाखल करण्यात येईल असे सांगितले. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची इच्छा आता पूर्ण होणार या विचाराने महारुद्र हा वेगवेगळ्या योजना योजू लागला. त्याने गुप्तहेराद्वारे आश्रमाची सर्व खडानखडा माहिती काढली.तो देखील तिथे राहिल्या मुळे त्यास ही थोडीफार माहिती त्या आश्रमाची होती. आश्रम ताब्यात घेऊन तेथील शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी महारुद्रने तयारी केली. त्यासाठी योजना आखली. काही निवडक तिरंदाज व हातघाईचे लढवय्ये त्याने घेतले. ते लढाईत तरबेज व सरावलेले होते.

त्याने यासाठी काही पारध्यांना विषारी सर्प गोळा करून त्यापासून विष काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही पारर्ध्यांनी विष काढून कुणालाही कळू न देता आणले. नेमबाजा जवळील धनुष्य व शर जुने झाले होते. त्यांना नवीन धनु व शर बनवण्यासाठी वेत हवे होते. महारुद्र राहत असलेल्या वस्तीशेजारी असणाऱ्या नदीकिनारी उत्कृष्ट वेताची बेटे होती. तेथून वेत आणून त्यापासून धनुष्य बनवायचे ठरले. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो नदीपार गेला. तेथून त्याने काही बांबू तोडले व आपल्या सहकाऱ्यांना ते बांधून दिले ते घेऊन ते निघाले. त्यांच्या डोक्यावर ओझी देताना महारुद्राला नदीच्या वरील भागातून कोणतरी वेत तोडत असलेला आवाज आला. तो आपल्या सहकाऱ्यांना पुढे पाठवून आवाजाच्या दिशेने निघाला. नदीपात्रातील पाषाण खळगे व पाण्याच्या डोहातून तो पुढे सरकला. थोडे अंतर चालून गेल्यावर त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा त्याला तिथे अंबाला दिसली. ती त्या वेताच्या बेटा मधील काही वेत तोडत होती. तिला अशा भरदुपारी वेताच्या काठ्या काढताना पाहून तो अचंबित झाला. तो हळुवार तिच्या मागे जाऊन उभा राहिला. व ती तेव्हा काठ्या तोडण्यात गुंग होती. तिच्या लक्षात देखील आले नाही की आपल्या मागे महारुद्र उभा आहे ते. तिला ऐकू जाईल अशा प्रकारे तोंडातून आवाज काढला. त्याच्या तोंडातून निघणाऱ्या त्या आवाजाने आंबेचे मन विचलित झाले. ती सावध झाली. आवाजाचा अंदाज घेत तिने कमरेच्या शस्त्रास हात घालून वार करण्यासाठी ती मागे फिरली. व त्यावर वार करणार इतक्यात तो मागे सरला. व तिच्याही लक्षात आले. व ती थांबली.

ती त्याच्याकडे पाहू लागली. तो अत्यंत देखणा होता. त्याचे देखणे पिळदार शरीर अत्यंत प्रेरक होते. तो ही तिच्याकडे पाहू लागला. त्या कृष्णकांती देहातील चाफेकळी नाकाचा व माश्यासारख्या डोळ्यांचा व एका वीरांगनेस शोभेल असा तिचा बांधा अत्यंत लालित्याने भरलेला होता. क्षणभर तो तिच्याकडे पहातच राहिला. तिला पाहून त्याचे हृदय धडधडू लागले. एक प्रणय वेदना जागृत झाली. त्याने स्मितहास्य केले. व तो म्हणाला, “ माझे प्राण घेणार आहेस का? तुझी ती इच्छा असेल तर घे. नाहीतर तूच हे दिले आहेस.”

अंबाला आपले शस्त्र कमरेला लावत, दुसऱ्या हातातील वेत तोडण्याचे शस्त्र खाली करत त्यास म्हणाली, “ या वेळी तू इथे काय करत आहेस. व असे अचानक पाठीमागून येण्याचे प्रयोजन काय?”

अंबाला ही प्रथमच त्याच्या समोर बोलत होती. तिचे बोलणे अत्यंत शुद्ध होते. तिचा आवाज सुमधुर वाटला. तो तिला म्हणाला, “ तू ज्या हेतूने इथे आली आहेस त्याच कामासाठी मी इथे आलो आहे. मलाही काही वेत हवेत.”

अंबाला, “ मला तुझे वागणे संशयास्पद वाटते.”

महारुद्र, “ मी काही आपला पाठलाग करत इथे आलो नाही. तसेच तुला कोणताही त्रास देण्याच्या हेतूने इथे आलो नाही. आज तुला मी प्रथम बोलताना पाहिलेय तू खूप लाघवी आहेस. आपली मैत्री होऊ शकते का?”

त्याचे बोलणे ऐकून ती त्यास म्हणाली, “ या पूर्वी तुम्हाला याचे उत्तर मिळाले आहे. माझ्या सखिने दिलेय ते.”

महारुद्र, “ ते आपले उत्तर नव्हते. त्या दुसऱ्या कुमरिकेने दिले होते. आपल्या डोळ्यात तर वेगळेच दिसत आहे. तसेच त्या आपल्या अंगरक्षक दिसत नाहीत.”

अंबाला, “ मला अंगरक्षकाची गरज नाही. मी स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते.”

असे बोलून तिने जवळील एक वेल तोडला व त्याच्या साहाय्याने ती तोडलेले वेत बांधू लागली.

महारुद्र, “ मी आपणास मदत करू का?”

अंबाला, “ त्याची काही आवश्यकता नाही.”

क्रमशः पुढे......


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...