Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०. Show all posts

Sunday, April 16, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४०

क्रमशः पुढे चालू.....


महारुद्र हा राजकुमार आहे ही बातमी संपूर्ण राज्यभर पसरली. तशी ती पारधी वस्तीवर देखील येऊन थडकली. ही बातमी कळताच त्रिशला व आंबालेस म्हणावा तितका आनंद झाला नाही.

इकडे महारुद्र राजकुमार आहे, हे सिद्ध झाल्याने त्यास राज्यकारभारात लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे तो अंबालेस भेटू शकत नव्हता. त्याची अस्वस्थता महाराज वेददत्त यांनी ओळखली. व त्याबाबत दासांकडून जाणून घेतले. तेव्हा तो एका पारधी कुमरिकेच्या प्रेमात पडल्याचे समजले. त्यांनी गुप्त हेरांना तिच्याबाबत माहिती काढण्यास सांगितले. ते कामाला लागले. पारधी वस्तीत फिरून जाणून घेऊ लागले.

ते पारधी वस्तीत फिरत असताना आंबालेस व त्रिशलेस त्यांचे वागणे खटकले. त्या दोघींनी ओळखले की त्यांच्यावर कोणतरी पाळत ठेवत आहे. व ही पुढील धोक्याची चाहूल आहे. त्या मुद्दाम त्या हेरांपुढे गप्पा मारत असत. येत्या काही दिवसात इंद्रावती महाराणी होणार आहे. असे थट्टेने बोलत.

हेरांनी त्यांचे बोलणे ऐकले व महाराज वेददत्त यांच्या कानावर ही बातमी घातली.

महाराज वेददत्त यांना वाटत होते की महारुद्राने एका राज घराण्यातील कन्येशी विवाह करावा. यासाठी त्या पारधी कन्येस ठार मारले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासू तरबेज खाजगी अंगरक्षकास पाठवले.

हेरांची टेहळणी थांबल्याचे दिसताच त्या दोघींनी जाणले की लवकर एखादे संकट येणार आहे. व त्यांनी सुरक्षेसाठी महदव्वेस तिच्या बहिणीच्या घरी पोहचते केले. व आपली शस्त्रे त्यांनी रात्रीच्या समयी घरी आणून ठेवली. व त्या दोघी रात्रीच्या वेळी फेराफेराने पाळत ठेवू लागल्या. गस्त घालू लागल्या. अचानक त्यांना एका रात्री काही संशयास्पद हालचाल घराबाहेर दिसली. गुप्त शिपाई वेशांतर करून अंबालेस मारण्यास आले होते. दार वाजले. अंबालेने त्रिशलेस जागे केले. व त्या शस्त्र घेऊन स्वसंरक्षणास सिद्ध झाल्या.

अंबालेन आपली मोठी तलवार काढली. त्यांनी घरातील तेवणारा दीप विझवला. दार उघडून कोणतरी आत आले. हे लक्षात घेऊन अंबाला कुडाच्या दरवाजामागे लपली. व तो इसम आत येण्याची वाट पाहू लागली. तो धूर्त माणूस आत यायला मागील दरवाजा ही वाजू लागला. त्याला बांधलेले काथ्याचे दोर कापले जाऊ लागले. इतक्यात छतावर काहीतरी हालचाल व आवाज जाणवू लागला. त्या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी लपल्या. व अंधारात स्वत:ला अन् एकमेकींना ओळखण्यासाठी त्यांनी खड्यांची काकनं घातली. त्या दोघी सावध झाल्या. अंबालेने पुढील दरवाजातून येणाऱ्याचे पाय कलम केले. व नंतर त्रिशलेन दुसऱ्याचे सिताफिणे मुंडके कलम केले. तसेच वरुन छतावरून येणार्यास देखील त्यांनी यमसदनी धाडले. बाहेरील राहिलेल्या दोघांच्या लक्षात आले. की आतमध्ये आपले साथीदार मारले जात आहेत. तेव्हा त्यांनी पेटते गोळे छतावर टाकले. व बाहेरून दारे व कुडास आग लावली. व वस्तीवरील लोक सावध होण्याआधी, ते पाळले.

त्या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. छतावर गवात असल्याने अग्नीने जोर धरला. पहाता पहाता अग्नी वेगाने पसरू लागली. चपळाईने आपली शस्त्रे व मोहरांची थैली घेऊन त्या दोघी मागील बाजूस आल्या. व तेथील कुड कापून त्या बाहेर पडल्या. व अंधाराचा फायदा घेऊन त्या पाहता पाहता अरण्यात घुसल्या. अंधार वाटेने त्या अरण्य वाटेला लागल्या. आता त्या दोघींच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते. ‘की हे कोणी केले असेल?’

इकडे अग्निचा चटचट आवाज होऊ लागला. त्यामुळे आजूबाजूचे पारधी जागे झाले. पण त्यांना ती आग विझवणे शक्य नव्हते. शेवटी त्यांनी ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच ती इकडे तिकडे पसरणार नाही याची काळजी घेतली. त्या अग्नीने त्यांचे राहण्याचे ठिकाण भस्मसात झाले दुसऱ्या दिवशी राखेत काही अस्थी सापडल्या. त्या पारध्याने एका कलशात गोळा केल्या. सर्वांना दुःख झाले. हेरांनी ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचवली. महारुद्रास ही बातमी समजताच तो फार दुःखी झाला. तो लगेच तिथे आला. व त्याने त्या झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पण काही केल्या आगीचे कारण समजले नाही. त्याला खूप वाईट वाटले. इंद्रावतीने आपणास फसवले असे तो म्हणून तो स्वतः ला संपवणेस निघाला. मात्र महाराज वेददत्त व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्यास समजावले. काही काळ निघून गेला. आता महारुद्र हळूहळू सावरू लागला. महाराज वेददत्त यांनी याच घटनेचा फायदा घ्यायचे ठरवले. महाराजांनी त्यास राज्याच्या कामकाजात गुंतवले. व त्यांनी त्याच्या लग्नाची बोलणी उत्तर विभाग नगर नायकाच्या मुलीशी करण्याचे ठरविले. व तशी बोलणी चालवली. महारुद्राने यास विरोध केला. परंतु त्यांनी बोलणी चालवली.

….. …… ……. …… ……

अग्नी कांडातून बाहेर आल्यावर त्या दोघी महदव्वेस ठेवलेल्या तिच्या बहिणीकडे आल्या. पुढे सुरक्षेच कारण सांगून त्या तिला घेऊन तिच्या दूरच्या भावाच्या घरी अपरान्त देशी निघाल्या. महदव्वच्या बहिनिस त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. कारण कोणतरी चौकशी करत तिच्याकडे येईल व महदव्वेला तिच्या भावाकडे अपरान्त देशी सोडण्यास त्या निघाल्या. वाटेला महदव्वा अनेक प्रश्न विचारू लागली. तेव्हा त्यांनी दुषलेचे महाराज जयवर्धन यांच्या घराण्याशी राज्यपातळीवर असणाऱ्या जवळीकीमुळे आपल्याला हे कष्ट उपसावे लागत आहेत. व त्या खडतर प्रवास करून महदव्वेस तिच्या भावाकडे सुरक्षित ठेवून त्या परतल्या.

आता त्या दोघींपुढे सर्वात मोठे आव्हान होते ते पार करण्यासाठी त्या निकराच्या तयारीने निघाल्या. अरण्यात राहून त्यांना तेथील प्राण्यांचा चांगलाच अभ्यास झाला होता. मिळेल त्या ठिकाणी विसावा घेत त्या पुन्हा सह्याद्रीपार करून कुंतल प्रदेशात आल्या. अरण्यातून चालून थकल्यावर त्या एका विशाल शिळेवर विसावल्या. वाटेत एका धर्मशाळेत त्रिशलेला मिळालेल्या माहितीनुसार त्याआधारे त्रिशलेस आंबालेस दिवचण्याची संधी मिळाली. ती म्हणाली, “ काय अंबाला, तुझा जीवनसाथी दुसऱ्या कन्येशी विवाह बंधनात बंधिस्त होण्यास निघाला आहे. काय तुझ्यासाठी लावलेला पण जिंकतोय बघ. तू मृत झाल्याची वार्ता समजताच थोडे दिवस दुःखाचे नाटक करून लगेच बोहल्यावर चढतोय म्हणे, व उत्तर नायकाच्या मुलीशी विवाह करतोय.”

अंबाला, “ करेना, नाहीतर तुला तो माझ्या जीवनात नकोच होता.”

त्रिशला, “ नाहीतर मलाच म्हणत होतीस ना, की त्याचे तुझ्यावर प्रेम आहे. मग दुसऱ्या दिवशीच का नाही त्याने आत्मदहन केले. प्रेम, प्रीत या गोष्टी फक्त दंतकथेत शोभून दिसतात. वास्तव जीवनात पुरुषांना स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे. एखादे वस्त्र वापरा व फेकून द्या. नाहीतर दासी बनून त्यांची सेवा करत राहावी लागते. माझ्या मातेवरील अत्याचार याचेच द्योतक आहे.”

अंबाला, “ तुझ्या अंतर्मनात पुरुषांविषयी द्वेष भरून राहिला आहे. पण तू हे विसरतेस की पुरुषांच्या सहवासात स्त्री चारित्र्याचे रक्षण होते.”

त्रिशला, “ माझ्या पित्याने केले ना माझ्या मातेचे शीलरक्षण व पुढे दिले या जगाच्या समुद्रात ढकलून. प्रधानाच्या घरचे दास्यत्व पत्करून अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. तुझ्या कारणे मी सुरक्षित राहिले नाहीतर माझी ही वाताहत झाली असती. परमेश्वर जाने आपली ही व्यथा, पण पुढील वाटचाल आपली अत्यंत बिकट आहे. कारण आपल्यावर हल्ला करणारा शत्रू काही साधा सुधा नाही. तो ताकदवान आहे. त्यास नष्ट करणे सोपे नाही.”

क्रमशः पुढे....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...