अंबाला भाग १८
क्रमशः पुढे चालू.....
त्याने त्यांकडे पाहिले. व तो त्यांस म्हणाला, “ शांततेनं पाहा की उगाच कशाला बोलत बसलाय.”
त्याचे हे बोलणे ऐकून त्या दोघींनी त्याकडे कठोर नयन कटाक्ष टाकला. त्याने त्या दोघींकडे पाहिले. तो घाबरला. कारण कोणत्याही स्त्रीने त्याकडे अशा नजरेने पाहिले नव्हते. तो घाबरलेला पाहून अंबालेस व त्रिशलेस हसू आले. त्याची ती अवस्था पाहून अंबाला हसू लागली. तिचे हसताना त्या काळ्या रंगात ही सौंदर्य खुलून दिसत होते. महारुद्राने अनेक स्त्रिया पहिल्या होत्या. पण त्या रात्री तेथे असणाऱ्या दिवटीच्या प्रकाशात खुलणारे ते सौंदर्य हे काही निराळेच होते. आपण तिच्यापेक्षा रंगात उजळ असलो तरी ती एक सुंदरतेची मूर्तीच आहे असे त्यास जाणवत होते. तिला सारखे पहात रहावे अशी अभिलाषा त्याच्या मनात जागृत झाली. व तो तेथून मागील बाजूस जाऊन बसला. व तीस न्याहाळू लागला. तिच्याकडे पाहण्यासाठी एक अदृश्य शक्ती त्यास खेचत होती. नृत्य पहात पहात तो तीस पहात होता.
आपणास एक अपरिचित दृष्टी न्याहाळत आहे हे अंबालेस जाणवले. पण तिला आता तिथे शांत राहावे लागणार होते. त्रिशलेच्या नजरेत महारुद्र अंबालास न्याहाळत आहे हे लक्षात आले. ग्रहणात जसे एक ग्रह दुसऱ्याच्या आड यावा. तसे त्रिशला त्या दोघांमध्ये उभा राहिली. महारुद्रला जाणवले की त्या दोघींनी त्यास पाहताना पाहिले आहे. त्याने आपली नजर नृत्य पहाण्याकडे वळवली. पण तो अधून मधून पाहत असे. थोड्या वेळाने त्रिशला अंबालेस खूणवून चलनेस सांगू लागली. अंबाला व त्रिशला तेथून उठल्या. व निघाल्या. थोड्याच समयात त्या गर्दीत दिसेनास्या झाल्या. थोड्याच वेळात त्या तेथून लपत छपत राजमहालाकडे जाणाऱ्या त्या गुप्त मार्गाकडे रवाना झाल्या. काही वेळातच त्या अरण्यातील गुप्त मार्गाजवळ आल्या
व त्या दोघींनी भुयारात प्रवेश केला. त्यांनी दिवटी लावली. व त्या महलाकडे गेल्या. व पुन्हा महालात येऊन त्यांनी मार्ग बंद केला. महालात आल्यावर राजकुमारीने सौंदर्य प्रसाधने लावून स्नान केले. व त्या दोघी झोपी गेल्या.
इकडे महारुद्राची नजर त्या अनोळखी मुलीला शोधत राहिली. पाहता पाहता रात्र सरली. नृत्याचा कार्यक्रम सरला. व दुसऱ्या दिवशी उत्सवाचा समारोप झाला. सर्व यात्रेकरू आपापल्या ग्रामी निघाले. भिल्लम व त्याचे सहकारी ग्रामस्थ आपल्या ग्रामी जाण्यासाठी सामानाची आवराआवर करू लागले. महारुद्र मात्र ती कृष्ण कांती असणारी कन्या कुठे दिसते का ते पाहू लागला. पण ती त्यास दृष्टीस पडली नाही.
सर्व भिल्लांसमवेत आता भिल्लम आपल्या प्रदेशाकडे मार्गस्थ झाला. वाटेतील तटिनीवर स्नान करून ते पुढे निघाले. मजल दर मजल करत ते अप्रांत देशाच्या बाजूने आपल्या देशी जाणार होते. कारण त्या कारणे त्याना नावीन्यपूर्ण निसर्ग पहावयास मिळणार होता. अनेक जंगले , नद्या पार करत ते पुढे मार्गस्थ झाली. वाटेत सुरक्षित ठिकाणी विश्रांती करत ती मार्गक्रमण करू लागली. काही अंतर गेल्यावर मध्य कुंतल प्रदेशातून जाताना त्याना एका वाटसरूची किंकाळी ऐकू आली. तसे सर्व दचकले. त्यांनी पाहिले एक व्याघ्र एका भगवी वस्त्रे घातलेल्या एका वाटसरूवर एक व्याघ्र हल्ला करत आहे. त्याने त्याच्या पायाचा लचका तोडला आहे. व तो एका झाडावर जखमी अवस्थेत चढलेला होता. व तो व्याघ्र त्यास त्या वृक्षाखाली थांबून पकडण्यासाठी प्रयत्न करत होता.
महारुद्राने क्षणाचा विलंब न करता आपल्या पाठीवरील भात्यातील एक शर काढला. व अचूक नेम धरून शर सोडला. वायु वेगाने तो शर निघाला. पाहता पाहता तो शर त्या व्याघ्रास लागला. व तो तिथे बेशुद्ध पडला. ते सर्व तिथे गेले. तो साधू खाली उतरला. त्याच्या पायातून रक्त ओघळत होते. त्यास सर्वांनी सावरले. थोडे पाणी दिले. तदनंतर भिल्लमाने आपल्या जवळील औषधी त्याच्या जखमेवर लावली. नंतर त्यास ते धीर देवू लागले. या सर्व घटनेत तो इतका घाबरला की त्याने आपल्या चिवरात लघुशंका केली. त्यास आधार देत त्यांनी उठवले. ती सर्वजण त्यास घेऊन बाजूस चालत चालत गेलीत. त्यास आधार देत ते पुढे निघाले. काही अंतर चालल्या नंतर एका ग्रामाची हद्द लागली. काही घरे दिसू लागली. सुरक्षित अरण्य त्यांनी पार केले होते. ते ग्राम एका वेतांच्या बेटांनी वेढलेले होते. वाटेत एका वळणावर तेथील एका विहिरी शेजारील एका आम्रवृक्षाखाली ती विसावलीत. थोडा वेळ विसावा घेतल्याने त्यास बरे वाटू लागले. भिल्लानीं वाटेत गोळा केलेली फळे त्यांनी तेथे बसून खाल्ली.
भिल्लमाने त्याला विचारले, “महाशय नमस्कार आपण कोण आहात व त्या निबीड अरण्यात कशासाठी गेला होतात.”
साधू, “ मी अपरांत देशाचा रहिवासी असून मी बुद्ध धर्म प्रसारक आहे. आमच्या पंथाचे असंख्य अनुयायी असून बोधिसत्व विचारांचा प्रसार करणे हे आमचे कार्य आहे. मी हल्ली या धर्मात नवीनच रुजू झाल्याने मला शस्त्र विद्येचे ज्ञान नाही. म्हणून मी त्या व्याघ्र हल्यापासून आपले संरक्षण करू शकलो नाही. मी यामध्ये नवीनच असल्याने कुंतल आपरांत राज्य सीमेवर असणाऱ्या मठात शस्त्र व शास्त्र विद्या घेण्यासाठी तिकडे जात असता. हा विदारक प्रसंग मजवर घडला.”
तेव्हा भिल्लम म्हणाला, “ पण आपण साधू पुरुष असताना आपणास शस्त्र विद्येची आवश्यकता का असते.”
साधू, “ आताच आपण पाहिलेल्या घटनेनुसार मजवर व्याघ्र हल्ला झाला. अशा प्रकारे आम्ही साधू धर्म प्रचारात वेगवेगळ्या प्रांती चारिका करत जात असतो. वाटेत अनेक ठिकाणी वाटमाऱ्या होत असतात. त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपणास ही विद्या शिकविली जाते. यामध्ये आपण प्रतिस्पर्धी योध्यास कोणतीही इजा न करता त्याची शुद्धा हरपवणे इतकेच कौशल्य शिकवले जाते. तसेच अती हिंस्र जीव जेव्हा अस्तीत्व हिरावून घेऊ लागल्यास त्यास नष्ट कसे करावे हे देखील शिकवले जाते. या कौशल्याने आम्ही हिंसा न करता आपल्याला पुढील मार्गी जाणे सुकर होते. मघाशी त्या व्याघ्रास मला बेशुद्ध करावयाचे होते. पण त्याचा तो अचानक हल्ला त्यामुळे सावध होण्यास वेळच मिळाला नाही.
क्रमशः पुढे.......
