Friday, April 21, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४३

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४३



क्रमशः पुढे चालू.......

 तो वेगाने महालात आला. त्याने तिथे आल्यावर सर्व पाहणी केली. महाराज मृत झाल्याचे कळले. त्यास वाईट वाटत होते. त्याने शिपायांना शोध घेण्यास सांगितले. व शत्रू कोठून आला याचा अंदाज बांधून तो अश्वदल घेऊन बाहेर पडला. व वेगाने अश्वदलाची दिशा बदलून तलावाकडे तो निघाला. व काही सैन्य अरण्याकडील गुप्त भूयाराकडे त्याने पाठवले. व तो वेगाने तलावाजवळ आला.

 तिथे आल्यावर त्याने तेथील पहार्यावरील सैन्य पाहिले. ते बेशुद्ध होते. त्याने त्यातील एका सैन्याला लागलेला तिर त्याने उपसला व पाहिला. त्याने तो दिवटीच्या उजेडात न्याहाळला. तेव्हा त्याच्या लक्षात आले. की आश्रमावरील हल्ला करणाऱ्या त्या दोन घोषाधारी आक्रमक वीरांगनांकडे असेच शर होते. त्याने आपल्या सैन्याना सावध होण्यास सांगितले. व तो आपला मित्र वीरभद्राजवळ आला. त्याने पाहिले की तो मुर्च्छीत पडला आहे. त्याने ओळखले की हा हल्ला करणाऱ्या त्या दोन महिलाच असणार. पण त्या असे का करत असाव्यात याबाबत त्याच्या मनात गूढ वाढले होते. व राजमहालावरील त्यांच्या अशा प्रकारच्या हल्ल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

इतक्यात एक शिपाई सांगत आला. की तलावाच्या पलीकडे कोण तरी बाहेर पोहून पडत आहे. तेव्हा महारुद्राने आदेश दिला. व अश्वदलातील जवान तिकडे निघाले. त्या दोघी तोपर्यंत पाण्याबाहेर आल्या होत्या. त्या आता खूप थकल्या होत्या. दुपारचा खाल्लेला ताकयुक्त पाणीभात केव्हाच जिरला होता. तरी देखील त्यांना लढावे लागणार होते. अश्वदलातील सैन्य येताना पाहून त्रिशला व अंबाला दोघीही आपल्या भात्यातील तिरांनी वेध घेऊ लागल्या. दिवटीच्या उजेडात त्यांनी सैन्य टिपण्यास सुरुवात केली. पण त्यांचे शर लागूनही ते पुढे येत होते. कारण ते विशेष चिलखती अश्वदल होते. तेव्हा अंबा म्हणाली, “ कंठ”

त्रिशलाने शर कंठ धरून नेम सोडले. व ते सैन्य पटापट खाली पडू लागले.

अश्वदल नायकाने ते हेरले. व दोनच दिवट्या ठेवून ‘अधोमुख' असे उच्चार त्याने केला. सर्व सैन्य खालच्या दिशेला आपल्या माना झुकवून वेगाने येऊ लागले. त्या दोघींनी त्यांची सूचना ऐकली होती. त्या वेगाने तलावा जवळील झाडीत घुसल्या. आता अंधारात त्यांना शोधणे कठीण होते. त्या वनाच्छादित भागात गर्द झाडे आता त्या दोघींच्या साहाय्यास आली होती. अंधाराचा फायदा घेऊन त्या एक एक सैन्य कापू लागल्या. महारुद्र त्या किती वीर आहेत हे जाणून होता. त्याने लगेच आदेश दिला व राखीव सैन्य तुकडी बोलावली. तुकडी हजर झाली. व वेगाने झाडीत घुसू लागली. त्या दोघींनी आता लढत राहण्यापेक्षा निसटून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या तुकडीने त्या विभागास घेरले होते. महारुद्र देखील तिथे आला

त्रिशला ही तिरंदाजित हुशार होती. तिला अंबाले प्रमाणे तलवार बाजी जमत नव्हती. अंबाला अष्टपैलू होती. त्रिशलेने पाहता पाहता झाडीतून लपत छपत तिन चार शिपाई टिपले. पण तीच्या भात्यातील शर संपले होते. तिने तो चाप व भाता तिथेच फेकला. व तेथील मृत शिपायाची तलवार तिने उचलली व ती वाटेत येईल त्यास हातघाई करत चालली. इतक्यात एका राखीव दलातील शिपायाच्या हातास तिचा धनु लागला. त्याने तो उचलून तेथील मृत शिपायाला लागलेला शर काढला. व नेम धरून शर सोडला. तो शर त्रिशलेच्या दंडाजवळील खुबनीत लागला. ती कोसळली. ती खूप थकली होती. आता लढणे कठीण झाले. अंबाला तिच्या जवळ आली. व तिला चलण्यास विनवू लागली.

तेव्हा त्रिशला म्हणाली, “माझी साथ, फक्त इथवर व माझा बदला ही पूर्ण झाला आहे. तेव्हा तू निघ. नाहीतर माझ्यासोबत तू ही मरशील.”

अंबाला, “ जीवनाच्या या रणांगणात मी तुला सोडून जाणार नाही. मरण आले तरी चालेल.”

त्रिशला, “ मुर्खासारखे बोलू नकोस. तुला शपथ आहे माझी. तू निघ. माझी साथ इथवरच.”

त्रिशला विणवत होती. शेवटी अंबाला वेगाने समोरील शिपायांना मारत पुढे गेली. व एका वळणावर बाहेर पडली. तिथे एका अश्वदलातील विरास खाली पडून ती घोड्यावर स्वार झाली. व वेगाने नाहीशी झाली. बाकीच्या अश्वदलातील सैन्याने तिला पकडणेचा प्रयत्न केला. पण ते पकडू शकले नाहीत.

इकडे त्रिशलेस कैद करण्यात आले. महारुद्राने तिला कारागृहात पाठवले.

इकडे अश्वस्वार जे  अंबालेच्या मागे गेले होते. ते महारुद्राजवळ आले. व त्यांनी त्यास सांगितले. की तो घोशाधारी  शत्रू हातून निसटला.

महारुद्र त्याचा शोध घेण्यास सांगून  महालात आला. महालात शोक चालू होता. तिथे आल्यावर तो चिडला.  व त्या कारागृहात कैद केलेल्या बुरखाधारी ललनेस ठार मारण्यास निघाला.  तेव्हा मंत्री महोदयांनी त्यास अडवले. व ही वेळ हा विचार करण्याची नसून विचारपूर्वक त्या महिलेच्या साहाय्याने महाराजांच्या हत्यारांपर्यंत पोहोचता येईल. त्याने मग महाराजांचा अग्नी संस्कार केला.

दुसऱ्या दिवशी त्रिशलेस जाग आली. तिला जाग आल्याचे पाहताच शिपाई निरोप घेऊन गेला. महारुद्र तिला पाहणेस आला. बंधिखाण्याचे दरवाजे जोरात आपटत तो तिच्या समोर आला. विस्कटलेल्या अवस्थेतील आपले केस सावरत ती त्यास बघून हसत. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला या गोष्टीचा जराही पश्चाताप वाटत नव्हता. तिने आपले केस बाजूला सारले. महारुद्र तिला पाहताच

महारुद्र, “कोन त्रिशला तू हे काय केलेस. व या मागे तुझा हेतू काय?”

त्रिशला, “ मी माझा बदला घेतलाय.”

महारुद्र, “ कसला बदला महाराज वेददत्त यांसारख्या प्रजेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस मारून तू कठोर गुन्हा केला आहेस. व तुझा दुसरा साथीदार कोण होता? व इंद्रावती कुठे आहे.”

त्रिशला, “ तू लावलेल्या अग्नीकांडात ती नष्ट झाली.”

महारुद्र, “ काय मी लावलेलं अग्निकांड, छे हे माझ्यावर चुकीचे आरोप करतेस. माझं इंद्रावतीवर प्रेम होत. अन् जर का मला तिला मारायची असती तर तिच्यासाठी एवढा उपद्व्याप मी केलाच नसता. तसे पाहता आमचे प्रेम तुलाच पसंत नव्हते.”

त्रिशला, “ मी काही मूर्ख नाही. संपूर्ण  पारधी वस्तीत आमच्याच सदनास आग लागली. कारण तुझ्या या राजे जिवनात अंबा आडवी आली होती. व आमच्या शरीराची राख होण्याआधी तू बोहल्यावर चढत आहेस. हा पुरावा काय कमी आहे. व मी महाराज वेददत्त यांना नाही तर प्रधान वेददत्त यांना शासन केले आहे. व मला या करणीचा जराही पश्चाताप होत नाही.”

महारुद्र, “ हे तू खोटं बोलतेस.  सांग इंद्रावतीचे काय केलेस तु? त्या अग्नितून तू वाचलीस मग इंद्रावती कुठे आहे?”

त्रिशला, “ मला मरण आले तरी चालेल. पण मी मात्र सांगणार नाही.”

महारुद्र तुरुंग अधिकाऱ्यास तिच्यावर कठोर उपाय करून तिच्या साथीदाराची नावे वदवून घेण्यास सांगतो. तसेच इंद्रावतीचा पत्ता देखील काढण्यास सांगतो. व तेथून निघतो. जाताना त्याच्या मनात विचारांचे  काहूर माजू लागले. अनेक प्रश्न त्याच्या मनात उठू लागले. राहून राहून त्यास वाटत होते की इंद्रावती जिवंत आहे. व या त्रिशलेने तिचे काही बरेवाईट केले असणार.

त्याने त्रिशलेवर तेथील तुरुंग अधिकाऱ्यास सांगून अनन्वित अत्याचार केले. खूप त्रास सहन करूनही त्रिशलेने ब्र शब्द ही काढला नाही.

इकडे महालात महाराणी श्यामलतेशी महारुद्राने चर्चा केली. तेव्हा त्यास एवढेच समजले की त्रिशला ही एक दासी कन्या आहे. व तिथे महालात राजकुमारी अंबालाच्या सेवेत होती.

 तेव्हा महारुद्राने कृष्णरुपी इंद्रावतीची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की अशी कोणतीही कृष्णकुमारी दासी व अन्य नोकर नव्हती.

त्याच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याने कसून चौकशी केली. पण काही कळले नाही. शेवटी तिला न्यायदंडाधिकार्यांपुढे सादर करण्यात आले. साक्षी पुरावे तपासले. असता. महाराजांवर एका मृत सैन्याने हल्ला केला होता. व तो यांचाच साथीदार ठरवणेत आले. व तिला मृत्यदंडाची शिक्षा देण्यात आली. ती ही भर चौकात ज्यामुळे दुसरे कोणीही पुन्हा राजवाड्यातील व्यक्तींवर हल्ला करताना कचरेल यासाठी राजधानीतील भर चौकातील शेजारी असणाऱ्या प्रांगणात फाल्गुन वद्य अमावशेच्या आधी दोन दिवसापूर्वीच्या दिवशी तिला मृत्यदंड देण्याचे ठरले. व त्याची तयारी सुरू केली.

….. ..... ….. …..


क्रमशः पुढे.....


No comments:

Post a Comment

This is not government websites only private , here deta is a calect to gather our saround see and hearing deta so you check to government websites and agree whit it.

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...