अंबाला एका राजकुमारीची प्रेमकथा भाग २
क्रमशः पुढे चालू...
महाराणी, “ सेवक आपण आजूबाजूच्या अरण्यातून लाकडे गोळा करावीत व रात्रभर अग्नीची व्यवस्था करा. ज्याने अंधाऱ्या रात्री हिंस्र श्वापदे इकडे आजूबाजूला फिरणार नाहीत.”
सेवक, “ या कामासाठी थोड्याच वेळपूर्वी दोन सेवकांना लावले आहे. त्यांनी भरपूर लाकडे गोळा केली आहेत. ज्यामुळे रात्रभर अग्नी प्रज्वलित करता येईल.” थोड्याच वेळात सर्व सेवक व सैनिक आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडतात. सुर्य अस्ताला गेला. सुंदर वाटणारे ते अरण्य रात्रीच्या अंधारात भयावह वाटू लागले होते. रातकिड्यांची किरकिर अत्यंतिक कान किट्ट करीत होती. थोड्या प्रहराने सर्वांचे भोजन झाले. व महाराणी व प्रधानपत्नी विश्रांती घ्यायला बंदिस्त रथात गेल्या. व छोट्या प्रधानपुत्राची जबाबदारी त्यांनी दासीवर सोपवण्यात आली. सैनिक पाळीपाळीने पहारा देवू लागले.
बघता बघता रात्र सरली. अग्नीच्या प्रकाशाने रानटी श्वापदे तळाभोवती फिरकली नाहीत. पहाटेच्या पक्षी कुंजनाने दुश्यला दासी उठली. तिने सैनिकांच्या मदतीने सकाळच्या भोजनाची व्यवस्था तिने केली. थोड्याच वेळात प्रभात झाली. काळोख्या रजणीचे अंथरूण दूर झाले. अरुणोदय झाला. महाराणींना जाग आली. त्यांनी रथाची कवाडे उगडून त्यांनी सूर्य नारायणाचे दर्शन घेतले. व दासीला हाक मारली. दासी दुश्यला हजर झाली.
दुश्यला, “ नमस्कार महाराणी काय सेवा करू.”
महाराणी, “ मी व प्रधानपत्नि स्नान करण्यासाठी नदीकिनारी जात आहोत. तेथे एका दासीस आमची वस्त्रे घेऊन पाठवावे.”
महाराणी व प्रधानपत्नी स्नान करण्यास नदी किनारी गेल्या. त्या नदीच्या सुंदर अशा पाण्याने त्यांनी मुखमार्जन करून आपली वस्त्रे नदीकिनारी ठेवली. व नदीच्या पाण्यात स्नान करून जलक्रीडा करून त्यांनी सूर्याची वंदना केली. व आपले आवरून त्या दोघी बाहेर आल्या. आपली वस्त्रे बदलून त्या तळावर आल्या. तिथे आल्यावर प्रधानपत्नीनी दासी दुश्यलेस एका दासीस प्रधानपुत्र रत्नाकरास स्नान घालण्यास जायला सांगितले .
दासी दुश्यलेने एका दासीस आदेश दिला. ती दासी प्रधानपुत्रास घेऊन दोन सेवाकास घेऊन स्नान घालायला गेली. तिने सेवकांस थोड्या अंतरावर उभे राहायला सांगितले. व ती नदीच्या पात्रात बालकास स्नान घालण्यास उतरली. ती रत्नाकरास स्नान घालत असताना त्याच वेळी नदीच्या पलीकडे काही अंतरावर एक काही दिवसापूर्वी व्यायलेली एक वाघीण पाणी पीत होती. खूप दिवसापासून ती उपाशी होती. तिला शिकार करता आली नव्हती. तसेच ती खूप रोडावली होती. व अश्या स्थितीत तिचे लक्ष पाण्यात उतरलेल्या दासिकडे गेले. व ती सावज टिपण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरली. भुकेली असलेने झाडीतून लपत छपत तिने अचानक हल्ला चढवला. एका फटक्यात तिने त्या दासीला ठार केले. दासीचा आवाज ऐकूण सेवक धावले. व त्यांनी भाल्याने त्या वाघिणीस जखमी केले. त्यामुळे ती आणखीच क्रोधिस्त झाली. व शेजारी असणाऱ्या बालकास गुंडाळलेल्या वस्त्रासवे घेऊन ती पळाली. पटकन तिने नदी पार केली. व ती निबीड अरण्यात दिसेनाशी झाली.
सेवक तिच्या मागोमाग गेले.
दासीचा आवाज ऐकून महाराणी अरूणावती ओरडल्या, “ सेवक धावा.”
सेवक व सैनिक नदीच्या दिशेने धावले. तिथे त्यांनी पाहिले दासी तिथे मृत पडली होती. व दोन सेवक ही दिसत नव्हते. पाठोपाठ दोन अश्वस्वार वेगाने नदी पार करून गेले.
वाघाच्या हल्ल्याचे वर्तमान समजताच प्रधान पत्नी आक्रोश करू लागल्या. त्यांची ती दयनीय अवस्था पाहून महाराणी अरूणावती त्यांना म्हणाल्या, “ आपण चिंता करू नये. सेवक व अश्वस्वार गेले आहेत. प्रधानपुत्र कुशल असेल. आपण प्रधान पत्नी आहात. असा शोक करणे बरे नव्हे.”
प्रधान पत्नी श्यामलता, “ परंतु मी एक माता पण आहे.”
व त्या मोठ्याने आक्रोश करत विलाप करू लागल्या. या विलापाणे त्यांना भोवळ आली. ते पाहून महाराणीनी दुश्यलेस पाणी आणायला सांगितले. व ते श्यामलतेच्या मुखावर शिंपडले. त्या शुध्दीवर येत व पुन्हा बेशुद्ध होत. इकडे सैनिक खूप दूरवर तसेच आसपास अरण्यात त्या वाघिणीच्या शोध घेऊ लागले. पण त्यांना खूप शोधल्यावर देखील ती सापडली नाही. चांगले पाच प्रहर शोध चालू होता. पण अरण्य घनदाट असलेने व धोक्याचे असलेने रिक्त हाताने ते सैनिक परत आले. थोड्या वेळाने श्यामलता शुध्दीवर आल्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नंतर सेवकांना बोलावले व मृत दासीवर अंत्य संस्कार करण्यास सांगितले. थोड्या वेळात व्याघ्राच्या मागे
गेलेले सैनिक आले. ते महाराणीपुढे खाल मान घालून उभे होते.
महाराणी, “ अश्वस्वार मिळाले का प्रधानपुत्र.”
अश्वस्वार ,” नाही महाराणी, आम्ही संपूर्ण अरण्यात खूप लांबपर्यंत गेलो. आतील भाग अत्यंत निबीड आहे. तिथे पालापाचोळा असल्याने आम्हाला पाऊलखुणा देखील सापडल्या नाहीत. तसेच रक्ताचे डाग देखील मिळाले नाहीत. तेव्हा आम्हास शोधणे कठीण झाले.”
महाराणी रागाने बोलली, “ दासी बरोबर पहार्यावर असणाऱ्या सैनिकांना बोलवा.”
दासी सोबत त्या वेळी पाहार्यावर असणारे सैनिक थर थर कापत महाराणी समोर आले. ते खाली मान घालून उभे होते.
“ सेवक, आपण आपली पहर्याची व संरक्षणाची जबाबदारी नीट पार पाडली नाहीत.” राणी क्रोधाने बोलली.
सेवक, “ महाराणी आम्ही दासीच्या सांगण्याने शतपवलावर उभा होतो. गर्द झाडी असल्यामुळे व व्याघ्र नदी पलीकडून आल्याने व हा अचानक हल्ला झाल्याने आम्ही तिथे पोहोचोपर्यंत व्याघ्र नदीपार करून गेला होता. प्रधान पुत्र कपड्यात गुंडाळला असल्याने व व्याघ्र माता मोठी असल्याने ती वेगाने नदीपार गेली. आम्ही आटोकाट प्रयत्न केला. पण….”
महाराणी थोड्या नरमाईने
“ झाल ते काही योग्य नव्हे. आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चीन्ह निर्माण होते. आता इथे राहणे धोक्याचे आहे. वेगाने दासीचे दहन करावे. व तिच्या अस्थी भरून आणाव्यात. त्यासाठी दोन अश्वस्वार इथे थांबून हे कार्य करा. व बाकी सर्वांनी प्रस्थानाच्या तयारीस लागा.”
महाराणीनी प्रधानपत्नीस जवळ जाऊन त्यांचे सांत्वन केले.
महाराणी अरूणावती, “ झाले ते वाईटच, पण शोक करून प्रधानपुत्र परत येणार नाहीत. व आता पाच प्रहर आपण त्यांचा शोध घेतला. त्यांच्या आता मिळण्याची शक्यता कमी आहे. तर आपण आपल्या सुरक्षेसाठी पुढील यात्रेस प्रस्थान केले पाहिजे. इथे राहणे धोक्याचे आहे.”
दासी दुश्यला देखील समजावून सांगतले. शेवटी सर्वांच्या अनुरोधाने जड अंतःकरणाने त्या पुढील प्रवासास तयार झाल्या. महाराणी व प्रधनपत्नी बंदिस्त रथात बसल्या. थोड्याच वेळात त्यांनी प्रस्थान केले. काही सैन्य मागे राहिले.दासीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी….
क्रमशः पुढे……

