Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १३. Show all posts
Showing posts with label अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १३. Show all posts

Thursday, February 2, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १३

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १३



क्रमशः पुढे चालू....

हळूहळू सकाळ होऊ लागली. वातावरणातील द्व झाडाच्या पानातून पाझरू लागले. पूर्वेस प्रभा फाकू लागली. महारुद्राने आपल्या पित्याच्या अंगावरील सर्व डहाळ्या काढल्या. आजू बाजूस पानांवर पडलेले दवबिंदू त्याने एका पलाश पानांच्या द्रोणात एकत्र केले. व आपल्या पित्याच्या मुखावर शिंपडले. थोडे त्याच्या मुखात घातले. व तो त्यांना हलवून उठवू लागला. महतप्रयासाने भिल्लमास जाग आली. तो दचकून उठला. त्याच्या समोर महारुद्र बसलेला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले अनेक रान कुत्री आजू बाजूला पडलेली दिसली. त्याने सर्व समजायचे ते समजला. त्याने महारुद्रला मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातुन अश्रू ओघळू लागले. इतक्यात महारुद्र भिल्लमास म्हणाला, “ बाबा आपणं इथून निघायला हवे. नाहीतर ही बेशुद्ध अवस्थेत असलेली रानकुत्री सावध होतील. कारण थोड्याच वेळात त्यांच्यावरील औषधाची गुंगी उतरेल.”

भिल्लम उठला. व चल असे म्हणून त्याने आपल्या लहान महारुद्राचा हातास धरले. तो रान वाटेने चालू लागला. झाडीतून रान वाटेने ते खालील भागाकडे सरकले. थोड्या अवधीने ते तेथील एका तटीनी किनारी आले. उष्ण ऋतू असल्याने व चैत्र मधुमासात तेथील तटीनीचे पाणी कमी झाल्याने ते नदीपात्रातील वाळूतून चालू लागले. थोड्याशा वळणावर त्या तटीनीपात्रातील एका डोहाजवळ ते पोहोचले. तेथील पाणी त्यांनी प्राशन केले. व तृषा शांती केली. त्याने त्यास बरे वाटले. तदनंतर स्नान ही केले. अंगावरील जखमा त्यांनी धुतल्या. व आपली वस्त्रे अंग सुकवून त्यावर चढवली नंतर भिल्लम महारुद्रास घेऊन पुढे रानातून चालला. रानातून जाताना वाटेतील वनौषधी तोडून ती एका दगडावर त्याने वाटली. व आपल्या व महारुद्रच्या शरीरावरील जखमेवर त्याने लावली. थोडे बरे वाटले. नंतर रानातील बहरलेल्या वृक्षांची काही फळे तसेच झुडपातील रानमेवा तोडला. व ती दोघे तेथील एका विशाल वृक्षाखाली विसावली. त्या प्रसंगाने त्यांचे अंग शिणले होते. ते तिथे विश्रांती घेऊ लागले. महारुद्रास निद्रा आली. तो तिथे जमिनीवर विसावला. भिल्लम त्याच्या चेहऱ्याकडे निरागस प्रेमभावाने पाहू लागला. आजवर केलेल्या कष्टाचे चीज झाले होते. काही वेळाने तिथून एक पारधी त्या अरण्यात शिकरीस आलेला दिसला. त्याना पाहून तो त्यांच्याजवळ आला. व त्यांची चौकशी करू लागला.

भिल्लमाने त्याला सर्व हकीकत सांगितली.

पारधी, “ अरे, भिल्लमा आपण परचक्रात भरडून येथे आलेली माणसे राजा जयवर्धने यांच्या कृपेने आपणास छत्र लाभले.”

भिल्लम, “ पण मी फक्त माझ्या मुलास विद्यार्जन करण्यासाठी त्यांकडे ठेवले होते. त्या आचार्यांनी विद्या ज्ञान सोडा शस्त्र ज्ञान ही दिले नाही. माझा उद्देश हाच होता की माझा पुत्र सर्व शास्त्रात प्रवीण असावा.”

पारधी, “ ते सर्व ठीक आहे. पण राजा जयवर्धने जरी चांगले असेल तरी राज्य म्हंटले की देव विचारी व दानव विचारी लोक हे आलेच. आपण आदिम लोक आपण शस्त्र व शस्त्र प्रवीण झालो तर श्रेष्ठ नाही का होणार, मग ते त्या आचार्यांना नको आहे. गुरू द्रोणाचार्यापासून तर हेच चालत आले. आहे. त्यांनी एकलव्यावर अन्याय केला. व या आचार्यांनी तुझ्या मुलावर. ही तर गतकालीन प्रवृत्तीच आहे. पण निसर्ग हाच आपला गुरु असतो. तोच आपणास घडवतो व तोच सर्वांना तारक व मारक असतो

भिल्लम, “ त्या आचार्यांनी माझ्या गाई ही परत केल्या ननाहीत उलट जीव घेण्याचा हा प्रयत्न.”

पारधी, “ हे पहा तू ही घटना एक कटु सत्य समजून विसरून जा. व सदर आचार्य हे इथल्या नगर नायकाचे नातलग असलेने तुझ्या तक्रारीवर कोणी न्यायाने पाहणार नाहीत. उलट आणखी मोठे अरिष्ट तुझ्या कुटुंबावर व वस्तीवर येईल. व तुझ्या सांगण्यावरून वाटते की तुझा मुलगा खूप हुशार आहे. त्याने जर एवढ्या लहान वयात त्या रान कुत्र्यांचे संधान केले. तर तो शूर आहे. निसर्ग हा गुरु मानून निरीक्षण करून शिकावे. व आपली विद्या स्वतः तयार करावी. निसर्गातील शाकाहारी प्राणी कसे शत्रू कडून वाचावे. व मासभक्षी कशी शिकार साधावी हे शिकवतात. त्यातून आपण आपल्या मतीचा योग्य वापर करून ज्ञान प्राप्त करावे. व झालेली घटना तू विसर व आपल्या जीवन प्रवाहात रहा.”

महारुद्राच्या कानावर त्यांचे बोलणे पडत होते.

पारध्याचे सांगणे भिल्लमास पटले. त्याने झालेल्या घटनेवर पडदा टाकण्याचे ठरवले. पारध्याने शिकार करून आणलेल्या सशांपैकी एक त्यास दिला. व त्यांचा निरोप घेऊन तो पुढे त्या अरण्यात शिकारीस निघून गेला.

भिल्लम तो ससा घेऊन आपल्या वस्तीच्या दिशेने निघाला. जाताना त्याने महारुद्रास ताकीद दिली. सदर घटना कोणाला सांगायची नाही. आज्ञा धारक मुलाप्रमाणे त्याने ती मान्य केली. वस्तीवर आल्यावर सर्व त्यांना विचारू लागले. भिल्लमाने आपण जंगली श्वापदांच फेऱ्यात अडकलो होतो हे सांगितले. सिंगणेने महारुद्रला जवळ घेतले. त्याच्या गालाचे मुके घेतले. व त्या हिंस्र श्वापदांना ती दूषणे देऊ लागली. व ती म्हणाली, “ आता आपणास विद्या नको काही नको ही वस्ती सोडून कुठेही जावयाचे नाही.”

असे बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. भिल्लमाने तो एक भयानक प्रसंग समजून विसरून जायचे ठरवले. मात्र महारुद्राचे मनावर खोलवर जखम त्या प्रसंगाने केली होती. त्याने या घटनेचा बदला घ्यायचे ठरवले. व तो रोज शस्त्र विद्येचा सराव करू लागला. निसर्गातील विविध घटनांचा अर्थ लावून ज्ञान प्राप्त करू लागला. तसेच शर संधानात देखील त्याने प्रगती केली.

दिवस सरू लागले.

….. ……. …….. ……. ……. ……

क्रमशः पुढे……



अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...