Wednesday, March 29, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३२

 अंबाला एका राजकुमारी ची 

प्रेमकथा भाग ३२



क्रमशः पुढे चालू......

त्या तिथून निघाल्यावर अर्ध्या वाटेवर आल्या. तेव्हा आंबलेच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली दुश्यलेने साखळी होती ती आता आपल्या गळ्यात नाही. तेव्हा त्या पुन्हा माघारी तिथे गेल्या. तेव्हा महारुद्राचे साथीदार तिथे सर्व आश्रमातील साहित्य आपल्या ताब्यात घेत होते. अंबाला लपत छपत आचार्यांशी झटापट झालेल्या ठिकाणी आली. तिथे तिने शोध घेतला. पण ती साखळी तिला सापडली नाही

त्यामुळे कोणाला कळायच्या आत त्यांनी तेथून जायचे ठरवले. व त्या निघाल्या. तेथून थेट त्या आपली वस्त्रे लपवलेल्या ठिकाणी गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी पोशाख बदलला व पुढे जिथे तलवार लपवली होती तिथे परत आल्या. तिथे अंबालेन आपली वस्त्रे व शस्त्रे लपवली. व त्या महदव्वेस पाठवून दिलेल्या गावी गेल्या. तिथे एक दोन वस्ती टाकून त्या पुन्हा आपल्या राहत्या ग्रामी परतल्या.

वाटेत येताना त्यांना एका वाटसरूकडून आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर झालेल्या हल्ल्याची बातमी समजली. पण त्यावर जास्त भाष्य न करता त्या आपल्या पारधी वस्तीवर निघून आल्या.

जिथे तिथे आचार्य वृषभ यांच्या आश्रमावरील हल्याची चर्चा सुरू होती.

जो तो म्हणे की आचार्य वृषभ यांच्या आश्रमावर हल्ला करून महाराज वेददत्त यांनी राजधानी वरील हल्ल्याचा बदला घेतला. त्या तिघी आपल्या पारधी वस्तीतील घरी आल्या. व घरात महदव्वेला सोडून रानात अन्न गोळा करण्यास गेल्या. रानात गेल्यावर त्यांनी महदव्वेस आणायला जाताना जी शस्त्रे व वस्त्रे अरण्यातील ढोलीत ठेवली होती. ती जाऊन घेऊन त्या आल्या. व ती आपल्या वस्ती बाहेरील अरण्यात एक विशाल वृक्ष शोधून त्याच्या ढोलीत ठेवली. त्यातील फक्त धनुष्य त्यांनी घेतला व त्या पुन्हा रानातून निघाल्या. अरण्यातील एक वेत तोडून अंबा व त्रिशलाने पुन्हा त्याचे शर बनवले. व त्यांच्या साहाय्याने अनेक फळे त्यांनी काढली. तसेच इतर रानमेवा देखील गोळा केला. व त्या घरी परतल्या.

…. ….. ….. …… …… …… ……

इकडे आचार्य वृषभांना ठार मारल्यावर महारुद्राने आपल्या साथीदारांना अन्य कोणी जिवंत आहे का ते पाहण्यास सांगितले. व काहीना मारलेले शर पुन्हा काढून घेण्यास सांगितले.

त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या साथीदारांनी ते शर काढून घेतले व महारुद्रच्या पुढ्यात आणले. त्याने त्यातील निराळे शर काढले. ज्यांची घडण निराळी होती. जे त्या कृष्णवस्त्र धारण केलेल्या त्रिशलाने मारले होते. तो आचार्य यांना लागलेला शर त्याने उपसला. तेव्हा त्यास आचार्य वृषभ यांच्या मृत देहाजवळ पडलेली साखळी सापडली. ती त्या वीरांगनेची असल्याची जाणीव त्यास झाली. त्याने ती कोणी पहायच्या आत लपवली. व सर्व पुरावे नष्ट करून तो व त्याचे साथीदार तिथून आपल्या जखमी साथीदारांना घेऊन आपल्या सुरक्षित अरण्यातील युद्ध सराव तळावर आलीत. तेथे त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी जातिनिशी महाराज वेददत्त गुप्तरित्या तिथे आले. त्यांना गुप्त हेरांच्याकरवी आचार्य यांच्या आश्रमावरील हल्ल्याची बातमी समजली होती. त्यांनी त्या ठिकाणी येऊन महारुद्राचे कौतुक केले. व त्यास दक्षिण कुंतल प्रदेशाचा नगर नायक नेमण्याचे ठरवले. त्यासाठी राजधानी शत्रूकडून जिंकून घ्यायची व दक्षिण नगर नायकास हरवून तो प्रदेश जिंकण्याची जबाबदारी महारुद्रावर सोपवली.

…… ……. …… …… …….

क्रमशः पुढे.......

अंबाला भाग ३१

 अंबाला भाग ३१



क्रमशः पुढे चालू.....

ते पंधरा सोळाजन होते. त्यातील चार पाच जण आचार्य वृषभ यांच्या कुटीत शिरले. व त्यांनी आचार्य समजून वार केला. त्यात त्यांची पत्नी जखमी झाली. ती ओरडत उठली. त्यामुळे झोपलेल्या आचार्यांना जाग आली. ते सावध झाले. व त्यांनी तलवार उपसली. व त्या तोंड रुमालाने झाकलेल्या. महारुद्रच्या साथीदारांनी ते दोन हात करू लागले. या सर्व हातघाईत आचार्यांच्या बाजूच्या दालनातील शिष्य जागे झाले. व त्यांना त्यांच्यावरील संकटाची चाहूल लागली. व ते ही शत्र घेऊन बाहेर पडले. तोपर्यंत आचार्यांनी त्यांच्याशी संघर्ष करत त्यांना कुटीबाहेर आणले. कुटी मध्य अंगणात आता चांगलीच हातघाई चालू झाली. त्यातून महारुद्राच्या साथीदारांनी त्यातील काही शिष्य आपल्या बाणांच्या साहाय्याने टिपले. त्यांची हातघाई पाहून त्रिशला आंबेस म्हणाली, “चल माघारी.”

तेव्हा अंबा म्हणाली, “आता चालून आलेली ही संधी पुन्हा मिळनार नाही. शत्रूचा शत्रू आपला मित्र. व मला वाटते इथे आपली जास्त गरज आहे. कारण या सराईत आचार्य शिष्यांशी सामना करणे अवघड आहे. व हे योध्दे जास्त वेळ टिक मारणार नाहीत.

त्या दोघींना तो महारुद्र व त्याचे साथीदार आहेत हे माहीत नव्हते. कारण त्या सर्वांनी तोंडावर रुमाल बांधले होते. ते अत्यंत त्वेषाने लढत होते. महारुद्र तर जीवाचे रान करून त्यांच्याशी मुकाबला करत होता. त्याचे हातघाई केलेले साथीदार जखमी होत होते. थकत होते. एकटा महारुद्र किती वेळ त्यासमोर टिकेल. महारुद्रचे जखमी साथीदार मागे हटत होते. तसेच त्यांची आयुधे ही कमकुवत होती. सराईत युद्ध करणाऱ्या आचार्यांच्या शिष्यांपुढे त्यांचा निभाव लागणे कठीण होते. भाले व वेतकाठीने किती वेळ ते लढणार. तरी देखील ते प्रतिकार करत होते.

 महारुद्राच्या साथीदारांनी मारलेले बाण अचार्यांचे शिष्य चुकवत पुढे सरकत होते.

लढता लढता आचार्य वृषभ महारुद्राला म्हणाले, “ कोण आहेस तू? इथे येण्याचे प्रयोजन सांग.”

महारुद्र, “ मी तुमचा काळ आहे. बदला घेण्यासाठी आलोय.”

आचार्य वृषभ, “ तुला माझी ताकद माहीत आहे का? महाराज जयवर्धनांच्या सैन्याचा जिथे निभाव लागला नाही तिथे तू किती वेळ टिकशील. शरण ये.”

महारुद्र, “ महराज जयवर्धनांचे सैन्य. म्हणजे मी नव्हे. ज्यांचा तू विश्वासघात केलास. तुझ्या बऱ्याच दुष्ट शिष्यांना मी यमसदनी धाडले. आता तुला फक्त त्यांच्याकडे पाठवायचे आहे.”

आचार्य वृषभ, “ तू व तुझे साथीदार माझ्यापुढे जास्तवेळ टिकणार नाहीत.”

महारुद्र हरतर्हेने त्यांच्याशी मुकाबला करत होता. पण थोड्याच वेळात त्याची तलवार तुटली. व आचार्य वृषभ त्यास मारणार इतक्यात अंबलाने इशारा केला. त्रिशलाने एक बाण सोडला. तो आचार्यांच्या हातावर लागला. त्यांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा त्यांना घोषाधारी तोंड बंधिस्त असे कृष्णवर्णी पेहराव केलेले दोन योद्धे दिसले.

इतक्यात बाण सोडत त्रिशलेने आचार्यांचे अनेक शिष्य टिपले. तिचे अचूक शर संधान पाहून आचार्य चिडले. इतक्यात अंबालाने आपली तलवार काढली. व चपळता दाखवून आचार्य वृषभ यांच्या एका शिष्यास ठार करून त्याचे मुंडके छाटले. ते एखाद्या चेंडू सारखे आचार्यांच्या पायात पडले. इतक्यात महारुद्र वेगाने बाजूला झाला. व त्या घोषाधारी वीर योद्ध्यांकडे पाहू लागला.

अचार्य, “ ए नेभळट विरा असे बेसावध विरांना मारताना तुला लाज वाटत नाही. असे मागून वार तरस करतात शूरवीर नाही.”

अंबाला, “ मला नेभळट व तरस म्हणणारे तुम्ही कुठल्या अंगाने सिंह शोभता. ज्यावेळी तुम्ही महाराज जयवर्धन यांच्या माघारी नगरावर हल्ला केला. व राजमाता अरूणावती यांचा घात केला त्यावरून तर तुम्ही लबाड लांडग्या सारे आहात. हे सिद्धच केलाय.”

आचार्य, “ तुझा व त्याचा काय संबंध.”

अंबाला, “ संबंध माझी तलवारच सांगेल.”

आचार्य, “आवाजावरून तर तू एक स्त्री वाटतेस.”

अंबाला, “ माझ्या आवाजावर व शरीरावर जाऊ नका. मी पण पहातेच तुम्ही किती शूर आहात ते. वाचवा स्वतला.”

असे म्हणत ती आचार्य वृषभ यांच्या अंगावर धाऊन गेली. व त्यांच्याशी लढायला लागली. आत्यंतिक विजेच्या वेगाने तिचे अंग हलत होते. आचार्यांचे उरलेले शिष्य टिपत ती लढत होती. त्रिशाला ने एक हुकमी स्त्री शर काढला. जो अत्यंत घातक होता. व तिने अचार्यांवर नेम धरला. अंबाला आचार्यांच्या शिष्यांना यमसदनी धाडून अचार्यांशी दोन हात करू लागली. तिची हालचाल पाहून ती एक वीरांगना आहे हे आचार्यांनी ओळखले. महारुद्र ते दृश्य पाहून स्तंभित झाला. ज्या अचार्यांशी लढताना तो व त्याचे सहकारी यांची दमछाक झाली होती. तिथे त्यांना कृष्णवर्णीय नाजूक देहाची वीरांगना असलेली मूर्ती तलवारबाजित मात देत होती. थोड्या वेळाने त्रिशलाने इशारा केला. तिचा इशारा समजला त्यानुसार अंबाला खाली झुकली. व वेगाने त्रिशलाने सोडलेल्या बाणाने आचार्यांचे हृदय छेदले. आचार्य खाली कोसळले.

इतके अचूक संधान महारुद्राने दुसऱ्यांदा पाहिले होते. एक त्रिशला व आता ही नेमबाज. आचार्यांचे काम फत्ते झाल्यावर त्रिशलेने इशरा केला. तसे चपळाईने अंबाला तिच्याजवळ गेली. व त्या तिथून निघाल्या.

त्यांना जाताना पाहून महारुद्र, “थांबा , आपला परिचय तरी करून द्या.”

घोषाधारी अंबाला, “ तू आमच्या विषयी जास्त जाणून घेऊ नकोस त्यापेक्षा तुझ्या जखमी साथीदारांना वाचव.”

असे बोलून त्या जवळील झाडीत गुप्त झाल्या.

क्रमशः पुढे.......


अंबाला भाग ३०

 अंबाला भाग ३०



क्रमशः पुढे चालू......

वेताच्या काढलेल्या काठ्या बांधताना आंबेच्या हाताचे बोट चुकून टोकास लागले. व तिच्या बोटाला छोटीशी इजा झाली. तिच्या तोंडातून माते असे स्वर निघाले. व तिला राजमातेची आठवण झाली. व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते रक्ताळलेले बोट तिने तोंडात घातले. ते पाहून महारुद्र पुढे झाला. त्याने तिथे जवळपास रान औषधी शोधली व चटकन तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटावर बांधली. ती चटकन बाजूस झाली. व उभा राहिली. त्याने ते वेत वेळूने घट्ट बांधले. अंबालाने चटकन तो डोईवर घेतला. व ती चालू लागली. तो तिच्याकडे पाहत राहिला. पाठमोऱ्या तिच्या देहातील लावण्य भर उन्हात ही लकाकत होते. ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिच्याकडे पहातच राहिला. ती दिसेनाशी झाल्यावर तो मागे वळला. त्याने त्या बेटातील काही काठ्या काढल्या. व तो ही आपल्या वस्तीकडे निघाला. वस्तीवर आल्यावर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक धनुष्य व शर तयार केले. व त्या शरांच्या टोकाला त्यांनी विष लावले. व ते गट्टे गुप्त जागी अरण्यात लपवले.

इकडे अंबाला त्या काठ्या घेऊन येऊन तिने घरात बसून तिने अनेक शर तयार केले. व त्याच्या तोंडाला विषारी औषधी लावली. वृध्द महदव्वेस आपल्या बहिणीला भेटायची इच्छा झाली. त्यामुळे त्रिशला तिला सोडण्यासाठी गेली होती. ती तिला सोडून परत आली.

महदव्वा नसल्याचा फायदा अंबेने घ्यायचे ठरवले. आपल्या मातेस ठार मारून आपल्याला परागंदा करणाऱ्यास शिक्षा करण्याचे तिने ठरवले. तिने जवळील पेठेतून त्रिशलेस काही वस्त्रे आणावयास सांगितले. त्याप्रमाणे त्रिशलेने जवळील पेठेत जाऊन काही कृष्णवर्णीय वस्त्रे विकत आणली. व त्या दोघींनी आचार्य वृषभाच्या आश्रमावर हल्ला करण्याचा निश्चय केला. त्याची योजना त्या आखू लागल्या. व त्यांनी योजना आखली.

काही दिवसांनी महदव्वेस परत बहिणीकडून आणण्याचे कारण ग्रामनायकास सांगून त्या तेथून बाहेर पडल्या.

ग्रामातून बाहेर पडल्यावर त्या गावाबाहेरील अरण्यात गेल्या. जिथे त्यांनी गुप्त जागी उंच वृक्षाच्या ढोलीत आपली शस्त्र लपवून ठेवली होती. तिथे गेल्यावर त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली शस्त्रे तिने काढली. ज्यामध्ये अंबालेची धारदार तलवार होती. जी तिला तिच्या लहानपणी तिच्या मातेने दिली होती. ती न्याहाळताना तिला आठवले की याच तलवारीच्या बळावर तिने अपरांत देशी त्रिशलाची छेड काढणाऱ्या त्या युवकांचे काम तमाम केले होते. तिने तिची धार पाहिली. व त्या अरण्य वाटेने आचार्य वृषभ यांच्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. आता अरण्य म्हणजे त्यांना त्यांचे अंगणच वाटत होते. त्यांनी आपला पेहराव बदलला. व आपली वस्त्रे गुप्त जागी लपवली. व त्या आश्रमाच्या दिशेने निघाल्या. अनेक अरण्यातील ओढे नाले व नदी पार करत त्या परिसरात पोहोचेपर्यंत त्यांना सांज झाली. तिथे जाताना वाटेतील रानफळे व औषधी ज्या त्यांनी जाताना तोडून घेतल्या होत्या. तसेच पन्हाळीचे पाणी जे आपल्या कातडी पिशवीत भरले होते. ते त्यांनी एका उंच वृक्षाखाली बसून निवांत फळे खाल्ली व पाणी पिले. व अंधार होण्याची त्या वाट पाहू लागल्या.

महारुद्र देखील आपल्या सहकाऱ्यांन समवेत आचार्यांवर सुड उगवण्यासाठी निघाला. त्याने आश्रमाच्या उत्तर बाजूने हल्ला करावयाचे ठरवले. त्या बाजूच्या अरण्यात येऊन तो ही रात्र होण्याची वाट पाहत आपल्या साथीदारांसमवेत तिथे दबा धरून बसला. अमावस होऊन गेली होती. थोड्याच वेळात रात्र झाली. त्यामुळे किट्ट काळोख होता. आचार्यांना माहीत होते. की प्रधान वेददत्त आपल्या विरुद्ध कार्यवाही थेट करू शकत नाहीत. व छुपा हल्ला करण्याचे धाडस कोणी करेल. हा त्यांचा भ्रम थोड्याच वेळात दिर होणार होता.

आचार्यांच्या आश्रमात सर्व शिष्य आपला दिनक्रम आटोपून झोपी गेले होते. तसेच मध्यभागी असणाऱ्या आचार्य वृषभ यांच्या कुटिभोवती असणाऱ्या कुटीत राजधानीवर हल्ला करणारे शिष्य धुंद होऊन पडले होते. भोजन झाले होते. व ते विश्रांती घेत झोपी गेले.

रात्रीचा मध्य प्रहर येताच त्या दोघी आश्रमाच्या दक्षिण पूर्व भागाकडून आश्रमाच्या विभागात आल्या. तिथे गोशाळा होती. गाई रवंथ करत होत्या. तेथून त्या लपत छपत तिथून पुढे निघाल्या. त्या बाजूस सहसा कोणी नसे. तिथून शिरकाव करून त्यांनी तिथे असणाऱ्या दोघांना यमसदनी सावध न होऊ देता धाडले. व मागील स्नान गृहाकडून त्या पुढे सरकल्या.

इकडे महारुद्र आपल्या साथीदारांच्या मदतीने पुढील बाजूने आश्रमात आला. आश्रमाच्या प्रवेश दारावरील देवडीत असणाऱ्या दोघांना त्याने संपवले. व आश्रमातील असणारी एक एक कुटी गाठत तेथील दुष्ट शिष्यांना यमसदनी धाडत त्या पुढे निघाल्या. त्रिशला व अंबाला मागील बाजूने शिष्य विश्रांती घेत असलेल्या दालनात आल्या. तिथे आचार्य यांचे शिष्य एका ओळीने झोपले होते. त्यातील बरेचसे चेहरे तेथील छोट्याशा दिव्यांच्या प्रकाशात दिसत होते. जे आंबेने ओळखले. अंबेच्या डोळ्यात निखारे उमटले. डोळ्यासमोर नगरावरील हल्ल्याचा प्रसंग उभा राहिला. नगर तट्टावर शर सोडणारे बरेचजण त्यात होते. जे आंबेने आपल्या मातेच्या निगराणीत पाहिले होते. तिने त्रिशलेस इशारा केला. तिने एक छोटे शस्त्र काढले. ज्यात अनेक सुया सारखी अस्त्रे होती. व तिने अंदाज घेत एका एका स अचूक नेम धरून मारले. ज्याने ते जागीच गतप्राण झाले. तेथून त्या बाहेर पडल्या पुढे एकामागून एक आश्रमाच्या कुटी दालनातील शिष्य टिपत त्या एका ठिकाणी आल्या. त्या दालनातील शिष्यांची शिकार करून बाहेर पडणार इतक्यात त्याना बाहेर हालचाल जाणवली. . त्यांनी कुटी दालनातील गवाक्षातून पाहिले की काही गुप्त पेहराव केलेल्या व्यक्ती शस्त्रे घेऊन आचार्य वृषभ यांच्या कुटिकडे जात आहेत. ते त्रिशलेने पाहिले. तिने अंबालेस संकेत दिला. तिने पाहिले. आता आपली योजना फसते की काय असे वाटले.

क्रमशः पुढे.....


Friday, March 24, 2023

अंबाला भाग २९

 अंबाला भाग २९



क्रमशः पुढे चालू....


महाराज जयवर्धन हे प्रचंड सैन्यानिशी गंगेश व राजा नागदूर्ग वर चालून गेले. तेथे अश्मक खोऱ्यात त्यांचे शत्रू सैन्याशी प्रचंड असे युद्ध झाले. त्यामध्ये नागदूर्गचा पराभव होत असताना नगरावरील हल्ल्याची व महाराणीच्या मृत्यूची बातमी समजली. त्यामुळे महाराजांचे मनोधैर्य खचले. याचा फायदा शत्रू नागदुर्गने घेतला. व बेसावध असताना रात्री तळावर हल्ला केला. यामध्ये महाराज जयवर्धन मारले गेले. त्यामुळे सैन्यात खळबळ माजली. व सैन्याने पलायन केले. याच दरम्यान प्रधान वेददत्त यांनी अश्मक खोऱ्यात गंगेश राजाशी युद्ध करून त्याचा पराभव केला. व ते पुढे महाराजांना मदत करण्यास गेले असता. त्यांना महाराज व महाराणी यांच्या हत्येची बातमी समजली. तेव्हा न डगमगत त्यांनी तेथेच आपल्याला राजा घोषित केले. व आपल्या सैन्याना घेऊन नागदुर्ग वर चालून गेले. तिथे त्यांनी अचानक हल्ला करून नागदुर्गचा पराभव केला. व त्यास ठार मारले. व त्याचे मुंडके कापून उत्तर प्रांतातून मिरवले. व शत्रूवर जरब बसवली. त्यामुळे उत्तर कुंतल प्रदेशाची हद्द सुरक्षित झाली. तरी देखील मध्य कुंतल प्रदेशातील मध्य भागातील राजधानी नगरावर शत्रूच्या सैन्याचा ताबा होता. तेव्हा त्यांनी तो घेण्यापूर्वी अश्मक खोरे व उत्तर कुंतल प्रदेशात नवीन युवक अधिकारी नेमला. व युद्धात सापडलेला शत्रूचा खजिना त्यांनी त्या प्रांताची व्यवस्था लावण्यासाठी खर्च केला. व तेथील नगर तात्पुरती राजधानी नेमून तिथे नवीन मंत्री मंडळ नेमले. व सैन्यानं घेऊन राजधानी व दक्षिण कुंतल प्रदेशाचा भाग जो घनदाट अरण्य असलेला होता. तो अपरांत राज्याचे सैन्य व आचार्य वृषभ यांच्या शिष्यांच्या ताब्यात होता. त्यांनी राजधानी व परिसरातील महाराजांशी एकनिष्ठ रयतेस त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच तेथील नगर नायक ही त्यांचा नातलग असल्याने तेथील सैन्य त्यांना मदत करत होते. व तो भाग निबीड असल्याने सैन्य हालचाल करणे सुलभ नव्हते . व आचार्य वृषभ यांचे शिष्य अत्यंत घातकी सेनानी होते. त्यांच्याशी संघर्ष करणे अवघड होते. 

आचार्य वृषभ यांचे शिष्य हे चांगलेच हुशार होते. व वेगवेगळ्या कलात चांगलेच निपून होते. व आपल्या सैन्याची तिथे ते डाळ शिजू देणार नाहीत. व तिथे कार्यवाही करणे अवघड असल्याने इथे शक्तीपेक्षा युकतीचा वापर करायचे ठरवले. यासाठी काटक अशा लोकांची अवश्यकता होती. वेददत्त यांनी मंत्री व गुप्तहेरांशी सल्लामसलत केली. तेव्हा हेर खात्यातील प्रमुख सिद्ध नागार्जुन याने याकामी भिल्ल व पारध्यांची मदत घ्यायचे सुचवले. कारण सदर जातीचे लोक हे काटक व तिरंदाजीसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांची मदत घेऊन आचार्य वृषभ यांचा आश्रम नष्ट करावा. व अपरांत प्रांतातून येणारी रसद तोडावी. व मग राजधानीची नाकेबंदी करावी. व हल्ला करून जिंकावे असे सुचवले. तेव्हा महाराजांनी सल्लामसलत करून हेरांना आदेश दिला. हेर कामाला लागले. हेरांच्या प्रमुखाने जातीनिशी भिल्ल व पारधी वस्तीवर जाऊन त्याने गुप्त गाठीभेटी घेतल्या. त्यांना महाराज जयवर्धन यांनी केलेल्या उपकाराची व दिलेल्या आश्रयाची जाणीव करून दिली. अनेक भिल्ल व पारधी यासाठी तयार झाले. पण आचार्य वृषभ व त्यांच्या शिष्यांशी लढणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी योग्य नियोजन हवे होते. यासाठी एक सभा घेतली गेली. अनेक भिल्ल व पारधी सभेला हजर होते तेव्हा महारुद्राने जबाबदारी घ्यायचे ठरवले. त्याने अनेक भिल्ल व पारधी तरुणांना एकत्र जमवले. व त्यांचे संघ तयार करून त्यांना दूर अरण्यात नेऊन त्याकडून युद्ध सराव करून घेतला. तसेच शस्त्रज्ञान ही दिले. व अनेक शूरवीर असे सैनिक त्याने तयार केले. व तो आचार्य वृषभ यांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी योजना आखू लागला. त्यांचे हे कौशल्य हेरांनी हेरले. व तो किती हुशार व वीर आहे हे महाराज वेद्दत्त यांना सांगितले. व त्यास सैन्य दलात घ्यावे हे सुचवले. तेव्हा महाराज वेददत्त यांनी त्याने जर ही आखलेली मोहीम यशस्वी केली. तर त्यास सैन्य दलात दाखल करण्यात येईल असे सांगितले. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची इच्छा आता पूर्ण होणार या विचाराने महारुद्र हा वेगवेगळ्या योजना योजू लागला. त्याने गुप्तहेराद्वारे आश्रमाची सर्व खडानखडा माहिती काढली.तो देखील तिथे राहिल्या मुळे त्यास ही थोडीफार माहिती त्या आश्रमाची होती. आश्रम ताब्यात घेऊन तेथील शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी महारुद्रने तयारी केली. त्यासाठी योजना आखली. काही निवडक तिरंदाज व हातघाईचे लढवय्ये त्याने घेतले. ते लढाईत तरबेज व सरावलेले होते.

त्याने यासाठी काही पारध्यांना विषारी सर्प गोळा करून त्यापासून विष काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही पारर्ध्यांनी विष काढून कुणालाही कळू न देता आणले. नेमबाजा जवळील धनुष्य व शर जुने झाले होते. त्यांना नवीन धनु व शर बनवण्यासाठी वेत हवे होते. महारुद्र राहत असलेल्या वस्तीशेजारी असणाऱ्या नदीकिनारी उत्कृष्ट वेताची बेटे होती. तेथून वेत आणून त्यापासून धनुष्य बनवायचे ठरले. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो नदीपार गेला. तेथून त्याने काही बांबू तोडले व आपल्या सहकाऱ्यांना ते बांधून दिले ते घेऊन ते निघाले. त्यांच्या डोक्यावर ओझी देताना महारुद्राला नदीच्या वरील भागातून कोणतरी वेत तोडत असलेला आवाज आला. तो आपल्या सहकाऱ्यांना पुढे पाठवून आवाजाच्या दिशेने निघाला. नदीपात्रातील पाषाण खळगे व पाण्याच्या डोहातून तो पुढे सरकला. थोडे अंतर चालून गेल्यावर त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा त्याला तिथे अंबाला दिसली. ती त्या वेताच्या बेटा मधील काही वेत तोडत होती. तिला अशा भरदुपारी वेताच्या काठ्या काढताना पाहून तो अचंबित झाला. तो हळुवार तिच्या मागे जाऊन उभा राहिला. व ती तेव्हा काठ्या तोडण्यात गुंग होती. तिच्या लक्षात देखील आले नाही की आपल्या मागे महारुद्र उभा आहे ते. तिला ऐकू जाईल अशा प्रकारे तोंडातून आवाज काढला. त्याच्या तोंडातून निघणाऱ्या त्या आवाजाने आंबेचे मन विचलित झाले. ती सावध झाली. आवाजाचा अंदाज घेत तिने कमरेच्या शस्त्रास हात घालून वार करण्यासाठी ती मागे फिरली. व त्यावर वार करणार इतक्यात तो मागे सरला. व तिच्याही लक्षात आले. व ती थांबली.

ती त्याच्याकडे पाहू लागली. तो अत्यंत देखणा होता. त्याचे देखणे पिळदार शरीर अत्यंत प्रेरक होते. तो ही तिच्याकडे पाहू लागला. त्या कृष्णकांती देहातील चाफेकळी नाकाचा व माश्यासारख्या डोळ्यांचा व एका वीरांगनेस शोभेल असा तिचा बांधा अत्यंत लालित्याने भरलेला होता. क्षणभर तो तिच्याकडे पहातच राहिला. तिला पाहून त्याचे हृदय धडधडू लागले. एक प्रणय वेदना जागृत झाली. त्याने स्मितहास्य केले. व तो म्हणाला, “ माझे प्राण घेणार आहेस का? तुझी ती इच्छा असेल तर घे. नाहीतर तूच हे दिले आहेस.”

अंबाला आपले शस्त्र कमरेला लावत, दुसऱ्या हातातील वेत तोडण्याचे शस्त्र खाली करत त्यास म्हणाली, “ या वेळी तू इथे काय करत आहेस. व असे अचानक पाठीमागून येण्याचे प्रयोजन काय?”

अंबाला ही प्रथमच त्याच्या समोर बोलत होती. तिचे बोलणे अत्यंत शुद्ध होते. तिचा आवाज सुमधुर वाटला. तो तिला म्हणाला, “ तू ज्या हेतूने इथे आली आहेस त्याच कामासाठी मी इथे आलो आहे. मलाही काही वेत हवेत.”

अंबाला, “ मला तुझे वागणे संशयास्पद वाटते.”

महारुद्र, “ मी काही आपला पाठलाग करत इथे आलो नाही. तसेच तुला कोणताही त्रास देण्याच्या हेतूने इथे आलो नाही. आज तुला मी प्रथम बोलताना पाहिलेय तू खूप लाघवी आहेस. आपली मैत्री होऊ शकते का?”

त्याचे बोलणे ऐकून ती त्यास म्हणाली, “ या पूर्वी तुम्हाला याचे उत्तर मिळाले आहे. माझ्या सखिने दिलेय ते.”

महारुद्र, “ ते आपले उत्तर नव्हते. त्या दुसऱ्या कुमरिकेने दिले होते. आपल्या डोळ्यात तर वेगळेच दिसत आहे. तसेच त्या आपल्या अंगरक्षक दिसत नाहीत.”

अंबाला, “ मला अंगरक्षकाची गरज नाही. मी स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते.”

असे बोलून तिने जवळील एक वेल तोडला व त्याच्या साहाय्याने ती तोडलेले वेत बांधू लागली.

महारुद्र, “ मी आपणास मदत करू का?”

अंबाला, “ त्याची काही आवश्यकता नाही.”

क्रमशः पुढे......


Saturday, March 18, 2023

अंबाला भाग २८

 अंबाला भाग २८


क्रमशः पुढे चालू...

तिचे अचूक शर संधान पाहून तो चकित झाला. व लगेच तिच्याजवळ येऊन म्हणाला, “मी आपला आभारी आहे. आपण माझे प्राण वाचवले.”

त्रिशला आपले साहित्य सावरत म्हणाली, “ म्हणूनच आम्हाला नदितीरी तुझे कौशल्य दाखवत होतास ना?”

महारुद्र, “ नाही मी आपले आभार मानत होतो.”

त्रिशला, “ झाले मानून , आपण जाऊ शकता.”

महारुद्र, “ आपली मैत्री होऊ शकते का?”

त्रिशला, “ अनोळखी लोकांशी मैत्री होत नाही.”

महारुद्र, अंबालाकडे पाहत “ तरीपण आपले नाव समजले तर बरे होईल.”

त्रिशला, “ आपणास कशाला हवे. आपण आपल्या कामात रहा. भील्लानी पारध्यात मिसळणेचा प्रयत्न करू नये.”

असे बोलून ती चल असे आंबालेस म्हणाली. ती तिच्यामागे चालू लागली. त्या निघाल्या. महारुद्रला कोणतरी आपल्या हृदयावर कट्यार चालवत आहे. असे वाटत होते. त्या निघून गेल्या. तो तिथून नाराज होऊन दुसऱ्या मार्गे नदीवर आला. नंतर तो नदीपार करून आपल्या ग्रामाच्या हद्दीत आला. त्याला त्रिशलेचे वागणे खटकत होते. मात्र त्यास तिच्यापेक्षा त्या कृष्णकुमारीमध्ये रस होता. त्या कन्येचे आकर्षण वाटत होते. त्याने तिला ऐकटी असताना गाठून आपल्या मैत्रीचा प्रस्ताव ठेवायचे ठरवले.

….. ….. ….. ….. …. …..

क्रमशः पुढे....

Friday, March 17, 2023

अंबाला भाग २७

 अंबाला भाग २७



क्रमशः पुढे चालू.....


तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून,

त्रिशला, “ तू कोण आहेस हे विसरू नकोस.त्या युवकाने फुले वाहिली तेव्हाच मी ओळखले त्याच्या मनात काय भाव आहे ते.”

अंबाला, “ त्यात काही विशेष वाटत नाही मला. त्याचे प्राण मी वाचवले म्हणून त्याने ती वेणी पाठवली.”

त्रिशला, “ हे बघ तुला चार भींती बाहेर असणार जग माहीत नाही अजून. हे तरुण असेच असतात. अशाप्रकारे जवळीक साधतात अन् नंतर सोडून देतात.”

अंबाला, “ पण तू तर म्हणाली होतीस की या वर्णात जो कोणी तुला पसंत करेल तो तुझा राजकुमार.”

त्रिशला, “ हे बघ त्याच्या गोऱ्या कातडीस भाळू नकोस. तू कोण आहेस? तो कोण आहे? याचे जरा भान ठेव.”

अंबाला, “ मी कोण आहे. ज्या स्त्रीस स्वतःचे घर नाही. जिचे सर्व काही परमेश्वराने हिरावून घेतलेय

अशी अगतिक अबला आहे मी.”

त्रिशला, “ मी असता तू काळजी कशाला करतेस.”

अंबाला, “ तू, तुला तर मी कित्येक वेळा संकटातून वाचवले आहे. तू एक स्त्री आहेस. तुला ही काही मर्यादा आहेत. काही दिवसांनी तुला ही विवाह करावा लागेल. त्या नंतर मी काय करावे?”

त्रिशला, “ म्हणून काय त्या भिल्लांच्या म्हणण्याने नाचणार आहेस का तू. हे पहा जे माझ्या मातेने केले तसे तू ही करू नकोस.”

अंबाला, “ काय केले तुझ्या मातेने ते तू मला सांगितले नाहीस आजवर.”

त्रिशला, “ अशाच प्रकारे परचक्रात सापडल्यावर भिल्ल सहवासाने माझी माता एका भिल्ल कुमाराच्या प्रेमात पडली. व त्याने मी पोटात असताना माझ्या मातेस सोडून दिले. माझ्या मातेस खूप हाल् वनवास भोगावाव लागला. दासी म्हणून तिला प्रधानाच्या घरी राहावे लागले. तू जर का नसतीस तर माझे काय झाले असते हे मलाच माहीत नाही. तू मला एक दासिपुत्री न समजता एक सखी समजून जे शस्त्र व शास्त्र ज्ञान दिलेस. त्यामुळे मी आज एक वीरांगना म्हणून तुझ्यापुढे उभा आहे. मला संपूर्ण जन्मात हे धाडस जमले नसते. तेव्हा उपकार कर्त्यास विसरणे हे मला रुचत नाही. व तू ही एक राजकुमारी असताना या गोष्टीचा विचार कर की तो दिसावयास देखणा असताना, एक राजकुमार शोभेल असा राजबिंडा असताना, त्याच्या प्रेमात अनेक युवती पडू शकतात. तरी देखील तो तुझ वर भाळला मला तरी यात काही गौड बंगाल वाटते. तेव्हा तू सावध रहा. आजही तो नदीतिरावर फिरत होता. आपण इथे आश्रित आहोत. तेव्हा आपण सावध राहिले पाहिजे.”

इतक्यात बाहेरून वृध्द महदव्वा येताना पाहून त्रिशलेने व अंबालेने हा विषय बंद केला. त्या दोघी आपल्या कामास लागल्या. त्रिशलेने महारुद्राचा ससेमिरा चुकवण्यासाठी काही दिवस गावाबाहेर असणाऱ्या छोट्या झऱ्याचे पाणी भरावयाचे ठरविले. व त्या तेथून पाणी भरु लागल्या. तेव्हा चैत मास असल्याने पाणवठ्याचे पाणी एका छोट्या पन्हाळीत रूपांतरित झाले होते. तरी देखील त्या तिथूनच पाणी भरत. त्यामुळे नदीवर त्यांचे जाणे बंद झाले. महारुद्र नदीवर येत असे. पण ती न दिसल्याने तो निराश होत असे. त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागेना झाले होते. वारंवार तिची आठवण यायची. आपला व तिचा काहीतरी जवळचा संबंध आहे असे त्यास वाटे. एखाद्या वाघास अथवा कोणाही मल्लास तो एका मुठीत लोळवेल. अशी त्याची ताकद होती. पण त्या युवतीस पहिल्यापासून त्याचे हृदय एक अनोळखी वेदना त्यास देत होते.

आता त्याचा पाय व्यवस्थित झाला होता. महारुद्रने नदीपार जाऊन तिचा शोध घ्यायचे ठरविले. आपल्या मित्रांना एक डाव शिकवून त्याने सराव करायला सांगितले. व तो काही काम आहे हे सांगून तिथून निसटला. व थेट त्याने नदी गाठली. त्याने नदी पार केली. तिथे असणाऱ्या वेताच्या बेटा जवळून तो पुढे निघाला. व थेट पारधी वस्तीच्या वाटेला लागला. त्याच्याकडे धनुष्य बाण व भाला होता. तसेच एक छोटी पिशवी ही होती. त्यात त्याने काही झाडाची फळे घेतली. व तो निघाला.

पारधी वस्ती वाटेवरील हिरव्यागार बांबूच्या वाटेने तो निघाला. त्याला पुढून सिपना येताना दिसली. त्याने तिला थांबवले. व तो त्या कृष्णवर्णी मुली विषयी विचारू लागला. तेव्हा त्याला सीपना म्हणाली,

“ ती इंद्रावती आहे. आमच्या वस्तीवर मध्यभागी असणाऱ्या महदव्वा आजीची ती नात आहे.”

महारुद्र, “ ती आता कुठे भेटेल.”

त्याचा हा प्रश्न ऐकूण सिपना गप्प झाली. व ती मुक उभा राहिलो. तेव्हा महारुद्राने तिला आपल्या पिशवीत असणारी रानफळे देवू केली. तेव्हा ती पाहताच सिपनेच्या तोंडास पाणी सुटले. पण एका अनोळखी युवकास असे आपल्या सखीची माहिती देणे योग्य नव्हे हे तिने जाणले. व ती म्हणाली, “मला माहित नाही. व असे तू विचारू नको. तूला टाळण्यासाठीच त्या नदीवर येत नसाव्यात.”

ती नकार देवून नदीस आपल्या दुसऱ्या सखिसवे गेली. तिच्या मैत्रिणी त्याकडून फळे घे असे सुचवत होत्या. मात्र तिने ते टाळले.

सिपनेने माहिती दिली नाही. तरी तो निराश झाला नाही. व पारधी वस्तीवर तो गेला. त्याने बारकाईने निरिक्षिले तेव्हा त्यास पारधी वस्तीवर मध्यभागी सुरेख अशी बांधणी असणारे महदव्वेचे घर दिसले. तो थेट तिथे गेला. घराच्या अंगणात पोहोचला. ते सुंदर नक्षीने सजवले होते. त्याने दारात उभे राहून पाणी मागितले.

दारात याचक आलेला पाहून महदव्वा आतून पाणी घेऊन आली. पाणी देत तिने त्या युवकास न्याहाळले. व विचारले.

“ तू भिल्ल कुमार आहेस ना?”

महारुद्र, “ हो इकडे शिकारी साठी आलो होतो. पाहतो इकडे अरण्यात काही मिळते का?”

महादव्वा, “ पण नदीपार ही अरण्य आहे ना?”

महारुद्र, “ हो आहे की, पण तिकडे भरपूर वेळा शिकार केली. आता इकडे पाहतो. काही मिळते का ते?”

त्याने पाणी पिऊन तृष्णा भागवली. व तो अरण्य वाटेस गेला. तिथे त्याला त्या युवतीचे काही दर्शन झाले नाही. तो पुढे अरण्यात गेला. तिथे त्याने काही रानमेवा गोळा केला. तसेच एकदोन रानकोंबडे मारले. व पुढे शोधत असताना त्यास जाळीतून काहीतरी खुसुर फूसर आवाज ऐकू येवू लागला. तयाने पाहिले एक ससा त्यास पळताना दिसला. त्याने एक बाण चापावर चढवला व सोडला. पण तोपर्यंत एक दुसरा शर त्या सश्यास येऊन लागला. व तो ससा तिथे आडवा झाला होता. तो तिथे गेला. तोपर्यंत त्याच्या पुढ्यात त्रिशला आली. व तिने तो ससा उचलला व त्याकडे पहात ती म्हणाली, “ हा ससा आम्ही संधान केला असून तो आमच्या मालकीचा आहे.”

तो काहीही न बोलता स्तब्ध उभा राहिला. व त्याने इकडे तिकडे पाहिले. तर त्याला दूर अंतरावर अंबाला हातात धनु घेऊन उभा असलेली दिसली.

क्रमशः पुढे......


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...