Friday, March 24, 2023

अंबाला भाग २९

 अंबाला भाग २९



क्रमशः पुढे चालू....


महाराज जयवर्धन हे प्रचंड सैन्यानिशी गंगेश व राजा नागदूर्ग वर चालून गेले. तेथे अश्मक खोऱ्यात त्यांचे शत्रू सैन्याशी प्रचंड असे युद्ध झाले. त्यामध्ये नागदूर्गचा पराभव होत असताना नगरावरील हल्ल्याची व महाराणीच्या मृत्यूची बातमी समजली. त्यामुळे महाराजांचे मनोधैर्य खचले. याचा फायदा शत्रू नागदुर्गने घेतला. व बेसावध असताना रात्री तळावर हल्ला केला. यामध्ये महाराज जयवर्धन मारले गेले. त्यामुळे सैन्यात खळबळ माजली. व सैन्याने पलायन केले. याच दरम्यान प्रधान वेददत्त यांनी अश्मक खोऱ्यात गंगेश राजाशी युद्ध करून त्याचा पराभव केला. व ते पुढे महाराजांना मदत करण्यास गेले असता. त्यांना महाराज व महाराणी यांच्या हत्येची बातमी समजली. तेव्हा न डगमगत त्यांनी तेथेच आपल्याला राजा घोषित केले. व आपल्या सैन्याना घेऊन नागदुर्ग वर चालून गेले. तिथे त्यांनी अचानक हल्ला करून नागदुर्गचा पराभव केला. व त्यास ठार मारले. व त्याचे मुंडके कापून उत्तर प्रांतातून मिरवले. व शत्रूवर जरब बसवली. त्यामुळे उत्तर कुंतल प्रदेशाची हद्द सुरक्षित झाली. तरी देखील मध्य कुंतल प्रदेशातील मध्य भागातील राजधानी नगरावर शत्रूच्या सैन्याचा ताबा होता. तेव्हा त्यांनी तो घेण्यापूर्वी अश्मक खोरे व उत्तर कुंतल प्रदेशात नवीन युवक अधिकारी नेमला. व युद्धात सापडलेला शत्रूचा खजिना त्यांनी त्या प्रांताची व्यवस्था लावण्यासाठी खर्च केला. व तेथील नगर तात्पुरती राजधानी नेमून तिथे नवीन मंत्री मंडळ नेमले. व सैन्यानं घेऊन राजधानी व दक्षिण कुंतल प्रदेशाचा भाग जो घनदाट अरण्य असलेला होता. तो अपरांत राज्याचे सैन्य व आचार्य वृषभ यांच्या शिष्यांच्या ताब्यात होता. त्यांनी राजधानी व परिसरातील महाराजांशी एकनिष्ठ रयतेस त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच तेथील नगर नायक ही त्यांचा नातलग असल्याने तेथील सैन्य त्यांना मदत करत होते. व तो भाग निबीड असल्याने सैन्य हालचाल करणे सुलभ नव्हते . व आचार्य वृषभ यांचे शिष्य अत्यंत घातकी सेनानी होते. त्यांच्याशी संघर्ष करणे अवघड होते. 

आचार्य वृषभ यांचे शिष्य हे चांगलेच हुशार होते. व वेगवेगळ्या कलात चांगलेच निपून होते. व आपल्या सैन्याची तिथे ते डाळ शिजू देणार नाहीत. व तिथे कार्यवाही करणे अवघड असल्याने इथे शक्तीपेक्षा युकतीचा वापर करायचे ठरवले. यासाठी काटक अशा लोकांची अवश्यकता होती. वेददत्त यांनी मंत्री व गुप्तहेरांशी सल्लामसलत केली. तेव्हा हेर खात्यातील प्रमुख सिद्ध नागार्जुन याने याकामी भिल्ल व पारध्यांची मदत घ्यायचे सुचवले. कारण सदर जातीचे लोक हे काटक व तिरंदाजीसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांची मदत घेऊन आचार्य वृषभ यांचा आश्रम नष्ट करावा. व अपरांत प्रांतातून येणारी रसद तोडावी. व मग राजधानीची नाकेबंदी करावी. व हल्ला करून जिंकावे असे सुचवले. तेव्हा महाराजांनी सल्लामसलत करून हेरांना आदेश दिला. हेर कामाला लागले. हेरांच्या प्रमुखाने जातीनिशी भिल्ल व पारधी वस्तीवर जाऊन त्याने गुप्त गाठीभेटी घेतल्या. त्यांना महाराज जयवर्धन यांनी केलेल्या उपकाराची व दिलेल्या आश्रयाची जाणीव करून दिली. अनेक भिल्ल व पारधी यासाठी तयार झाले. पण आचार्य वृषभ व त्यांच्या शिष्यांशी लढणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी योग्य नियोजन हवे होते. यासाठी एक सभा घेतली गेली. अनेक भिल्ल व पारधी सभेला हजर होते तेव्हा महारुद्राने जबाबदारी घ्यायचे ठरवले. त्याने अनेक भिल्ल व पारधी तरुणांना एकत्र जमवले. व त्यांचे संघ तयार करून त्यांना दूर अरण्यात नेऊन त्याकडून युद्ध सराव करून घेतला. तसेच शस्त्रज्ञान ही दिले. व अनेक शूरवीर असे सैनिक त्याने तयार केले. व तो आचार्य वृषभ यांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी योजना आखू लागला. त्यांचे हे कौशल्य हेरांनी हेरले. व तो किती हुशार व वीर आहे हे महाराज वेद्दत्त यांना सांगितले. व त्यास सैन्य दलात घ्यावे हे सुचवले. तेव्हा महाराज वेददत्त यांनी त्याने जर ही आखलेली मोहीम यशस्वी केली. तर त्यास सैन्य दलात दाखल करण्यात येईल असे सांगितले. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची इच्छा आता पूर्ण होणार या विचाराने महारुद्र हा वेगवेगळ्या योजना योजू लागला. त्याने गुप्तहेराद्वारे आश्रमाची सर्व खडानखडा माहिती काढली.तो देखील तिथे राहिल्या मुळे त्यास ही थोडीफार माहिती त्या आश्रमाची होती. आश्रम ताब्यात घेऊन तेथील शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी महारुद्रने तयारी केली. त्यासाठी योजना आखली. काही निवडक तिरंदाज व हातघाईचे लढवय्ये त्याने घेतले. ते लढाईत तरबेज व सरावलेले होते.

त्याने यासाठी काही पारध्यांना विषारी सर्प गोळा करून त्यापासून विष काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही पारर्ध्यांनी विष काढून कुणालाही कळू न देता आणले. नेमबाजा जवळील धनुष्य व शर जुने झाले होते. त्यांना नवीन धनु व शर बनवण्यासाठी वेत हवे होते. महारुद्र राहत असलेल्या वस्तीशेजारी असणाऱ्या नदीकिनारी उत्कृष्ट वेताची बेटे होती. तेथून वेत आणून त्यापासून धनुष्य बनवायचे ठरले. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो नदीपार गेला. तेथून त्याने काही बांबू तोडले व आपल्या सहकाऱ्यांना ते बांधून दिले ते घेऊन ते निघाले. त्यांच्या डोक्यावर ओझी देताना महारुद्राला नदीच्या वरील भागातून कोणतरी वेत तोडत असलेला आवाज आला. तो आपल्या सहकाऱ्यांना पुढे पाठवून आवाजाच्या दिशेने निघाला. नदीपात्रातील पाषाण खळगे व पाण्याच्या डोहातून तो पुढे सरकला. थोडे अंतर चालून गेल्यावर त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा त्याला तिथे अंबाला दिसली. ती त्या वेताच्या बेटा मधील काही वेत तोडत होती. तिला अशा भरदुपारी वेताच्या काठ्या काढताना पाहून तो अचंबित झाला. तो हळुवार तिच्या मागे जाऊन उभा राहिला. व ती तेव्हा काठ्या तोडण्यात गुंग होती. तिच्या लक्षात देखील आले नाही की आपल्या मागे महारुद्र उभा आहे ते. तिला ऐकू जाईल अशा प्रकारे तोंडातून आवाज काढला. त्याच्या तोंडातून निघणाऱ्या त्या आवाजाने आंबेचे मन विचलित झाले. ती सावध झाली. आवाजाचा अंदाज घेत तिने कमरेच्या शस्त्रास हात घालून वार करण्यासाठी ती मागे फिरली. व त्यावर वार करणार इतक्यात तो मागे सरला. व तिच्याही लक्षात आले. व ती थांबली.

ती त्याच्याकडे पाहू लागली. तो अत्यंत देखणा होता. त्याचे देखणे पिळदार शरीर अत्यंत प्रेरक होते. तो ही तिच्याकडे पाहू लागला. त्या कृष्णकांती देहातील चाफेकळी नाकाचा व माश्यासारख्या डोळ्यांचा व एका वीरांगनेस शोभेल असा तिचा बांधा अत्यंत लालित्याने भरलेला होता. क्षणभर तो तिच्याकडे पहातच राहिला. तिला पाहून त्याचे हृदय धडधडू लागले. एक प्रणय वेदना जागृत झाली. त्याने स्मितहास्य केले. व तो म्हणाला, “ माझे प्राण घेणार आहेस का? तुझी ती इच्छा असेल तर घे. नाहीतर तूच हे दिले आहेस.”

अंबाला आपले शस्त्र कमरेला लावत, दुसऱ्या हातातील वेत तोडण्याचे शस्त्र खाली करत त्यास म्हणाली, “ या वेळी तू इथे काय करत आहेस. व असे अचानक पाठीमागून येण्याचे प्रयोजन काय?”

अंबाला ही प्रथमच त्याच्या समोर बोलत होती. तिचे बोलणे अत्यंत शुद्ध होते. तिचा आवाज सुमधुर वाटला. तो तिला म्हणाला, “ तू ज्या हेतूने इथे आली आहेस त्याच कामासाठी मी इथे आलो आहे. मलाही काही वेत हवेत.”

अंबाला, “ मला तुझे वागणे संशयास्पद वाटते.”

महारुद्र, “ मी काही आपला पाठलाग करत इथे आलो नाही. तसेच तुला कोणताही त्रास देण्याच्या हेतूने इथे आलो नाही. आज तुला मी प्रथम बोलताना पाहिलेय तू खूप लाघवी आहेस. आपली मैत्री होऊ शकते का?”

त्याचे बोलणे ऐकून ती त्यास म्हणाली, “ या पूर्वी तुम्हाला याचे उत्तर मिळाले आहे. माझ्या सखिने दिलेय ते.”

महारुद्र, “ ते आपले उत्तर नव्हते. त्या दुसऱ्या कुमरिकेने दिले होते. आपल्या डोळ्यात तर वेगळेच दिसत आहे. तसेच त्या आपल्या अंगरक्षक दिसत नाहीत.”

अंबाला, “ मला अंगरक्षकाची गरज नाही. मी स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते.”

असे बोलून तिने जवळील एक वेल तोडला व त्याच्या साहाय्याने ती तोडलेले वेत बांधू लागली.

महारुद्र, “ मी आपणास मदत करू का?”

अंबाला, “ त्याची काही आवश्यकता नाही.”

क्रमशः पुढे......


Saturday, March 18, 2023

अंबाला भाग २८

 अंबाला भाग २८


क्रमशः पुढे चालू...

तिचे अचूक शर संधान पाहून तो चकित झाला. व लगेच तिच्याजवळ येऊन म्हणाला, “मी आपला आभारी आहे. आपण माझे प्राण वाचवले.”

त्रिशला आपले साहित्य सावरत म्हणाली, “ म्हणूनच आम्हाला नदितीरी तुझे कौशल्य दाखवत होतास ना?”

महारुद्र, “ नाही मी आपले आभार मानत होतो.”

त्रिशला, “ झाले मानून , आपण जाऊ शकता.”

महारुद्र, “ आपली मैत्री होऊ शकते का?”

त्रिशला, “ अनोळखी लोकांशी मैत्री होत नाही.”

महारुद्र, अंबालाकडे पाहत “ तरीपण आपले नाव समजले तर बरे होईल.”

त्रिशला, “ आपणास कशाला हवे. आपण आपल्या कामात रहा. भील्लानी पारध्यात मिसळणेचा प्रयत्न करू नये.”

असे बोलून ती चल असे आंबालेस म्हणाली. ती तिच्यामागे चालू लागली. त्या निघाल्या. महारुद्रला कोणतरी आपल्या हृदयावर कट्यार चालवत आहे. असे वाटत होते. त्या निघून गेल्या. तो तिथून नाराज होऊन दुसऱ्या मार्गे नदीवर आला. नंतर तो नदीपार करून आपल्या ग्रामाच्या हद्दीत आला. त्याला त्रिशलेचे वागणे खटकत होते. मात्र त्यास तिच्यापेक्षा त्या कृष्णकुमारीमध्ये रस होता. त्या कन्येचे आकर्षण वाटत होते. त्याने तिला ऐकटी असताना गाठून आपल्या मैत्रीचा प्रस्ताव ठेवायचे ठरवले.

….. ….. ….. ….. …. …..

क्रमशः पुढे....

Friday, March 17, 2023

अंबाला भाग २७

 अंबाला भाग २७



क्रमशः पुढे चालू.....


तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून,

त्रिशला, “ तू कोण आहेस हे विसरू नकोस.त्या युवकाने फुले वाहिली तेव्हाच मी ओळखले त्याच्या मनात काय भाव आहे ते.”

अंबाला, “ त्यात काही विशेष वाटत नाही मला. त्याचे प्राण मी वाचवले म्हणून त्याने ती वेणी पाठवली.”

त्रिशला, “ हे बघ तुला चार भींती बाहेर असणार जग माहीत नाही अजून. हे तरुण असेच असतात. अशाप्रकारे जवळीक साधतात अन् नंतर सोडून देतात.”

अंबाला, “ पण तू तर म्हणाली होतीस की या वर्णात जो कोणी तुला पसंत करेल तो तुझा राजकुमार.”

त्रिशला, “ हे बघ त्याच्या गोऱ्या कातडीस भाळू नकोस. तू कोण आहेस? तो कोण आहे? याचे जरा भान ठेव.”

अंबाला, “ मी कोण आहे. ज्या स्त्रीस स्वतःचे घर नाही. जिचे सर्व काही परमेश्वराने हिरावून घेतलेय

अशी अगतिक अबला आहे मी.”

त्रिशला, “ मी असता तू काळजी कशाला करतेस.”

अंबाला, “ तू, तुला तर मी कित्येक वेळा संकटातून वाचवले आहे. तू एक स्त्री आहेस. तुला ही काही मर्यादा आहेत. काही दिवसांनी तुला ही विवाह करावा लागेल. त्या नंतर मी काय करावे?”

त्रिशला, “ म्हणून काय त्या भिल्लांच्या म्हणण्याने नाचणार आहेस का तू. हे पहा जे माझ्या मातेने केले तसे तू ही करू नकोस.”

अंबाला, “ काय केले तुझ्या मातेने ते तू मला सांगितले नाहीस आजवर.”

त्रिशला, “ अशाच प्रकारे परचक्रात सापडल्यावर भिल्ल सहवासाने माझी माता एका भिल्ल कुमाराच्या प्रेमात पडली. व त्याने मी पोटात असताना माझ्या मातेस सोडून दिले. माझ्या मातेस खूप हाल् वनवास भोगावाव लागला. दासी म्हणून तिला प्रधानाच्या घरी राहावे लागले. तू जर का नसतीस तर माझे काय झाले असते हे मलाच माहीत नाही. तू मला एक दासिपुत्री न समजता एक सखी समजून जे शस्त्र व शास्त्र ज्ञान दिलेस. त्यामुळे मी आज एक वीरांगना म्हणून तुझ्यापुढे उभा आहे. मला संपूर्ण जन्मात हे धाडस जमले नसते. तेव्हा उपकार कर्त्यास विसरणे हे मला रुचत नाही. व तू ही एक राजकुमारी असताना या गोष्टीचा विचार कर की तो दिसावयास देखणा असताना, एक राजकुमार शोभेल असा राजबिंडा असताना, त्याच्या प्रेमात अनेक युवती पडू शकतात. तरी देखील तो तुझ वर भाळला मला तरी यात काही गौड बंगाल वाटते. तेव्हा तू सावध रहा. आजही तो नदीतिरावर फिरत होता. आपण इथे आश्रित आहोत. तेव्हा आपण सावध राहिले पाहिजे.”

इतक्यात बाहेरून वृध्द महदव्वा येताना पाहून त्रिशलेने व अंबालेने हा विषय बंद केला. त्या दोघी आपल्या कामास लागल्या. त्रिशलेने महारुद्राचा ससेमिरा चुकवण्यासाठी काही दिवस गावाबाहेर असणाऱ्या छोट्या झऱ्याचे पाणी भरावयाचे ठरविले. व त्या तेथून पाणी भरु लागल्या. तेव्हा चैत मास असल्याने पाणवठ्याचे पाणी एका छोट्या पन्हाळीत रूपांतरित झाले होते. तरी देखील त्या तिथूनच पाणी भरत. त्यामुळे नदीवर त्यांचे जाणे बंद झाले. महारुद्र नदीवर येत असे. पण ती न दिसल्याने तो निराश होत असे. त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागेना झाले होते. वारंवार तिची आठवण यायची. आपला व तिचा काहीतरी जवळचा संबंध आहे असे त्यास वाटे. एखाद्या वाघास अथवा कोणाही मल्लास तो एका मुठीत लोळवेल. अशी त्याची ताकद होती. पण त्या युवतीस पहिल्यापासून त्याचे हृदय एक अनोळखी वेदना त्यास देत होते.

आता त्याचा पाय व्यवस्थित झाला होता. महारुद्रने नदीपार जाऊन तिचा शोध घ्यायचे ठरविले. आपल्या मित्रांना एक डाव शिकवून त्याने सराव करायला सांगितले. व तो काही काम आहे हे सांगून तिथून निसटला. व थेट त्याने नदी गाठली. त्याने नदी पार केली. तिथे असणाऱ्या वेताच्या बेटा जवळून तो पुढे निघाला. व थेट पारधी वस्तीच्या वाटेला लागला. त्याच्याकडे धनुष्य बाण व भाला होता. तसेच एक छोटी पिशवी ही होती. त्यात त्याने काही झाडाची फळे घेतली. व तो निघाला.

पारधी वस्ती वाटेवरील हिरव्यागार बांबूच्या वाटेने तो निघाला. त्याला पुढून सिपना येताना दिसली. त्याने तिला थांबवले. व तो त्या कृष्णवर्णी मुली विषयी विचारू लागला. तेव्हा त्याला सीपना म्हणाली,

“ ती इंद्रावती आहे. आमच्या वस्तीवर मध्यभागी असणाऱ्या महदव्वा आजीची ती नात आहे.”

महारुद्र, “ ती आता कुठे भेटेल.”

त्याचा हा प्रश्न ऐकूण सिपना गप्प झाली. व ती मुक उभा राहिलो. तेव्हा महारुद्राने तिला आपल्या पिशवीत असणारी रानफळे देवू केली. तेव्हा ती पाहताच सिपनेच्या तोंडास पाणी सुटले. पण एका अनोळखी युवकास असे आपल्या सखीची माहिती देणे योग्य नव्हे हे तिने जाणले. व ती म्हणाली, “मला माहित नाही. व असे तू विचारू नको. तूला टाळण्यासाठीच त्या नदीवर येत नसाव्यात.”

ती नकार देवून नदीस आपल्या दुसऱ्या सखिसवे गेली. तिच्या मैत्रिणी त्याकडून फळे घे असे सुचवत होत्या. मात्र तिने ते टाळले.

सिपनेने माहिती दिली नाही. तरी तो निराश झाला नाही. व पारधी वस्तीवर तो गेला. त्याने बारकाईने निरिक्षिले तेव्हा त्यास पारधी वस्तीवर मध्यभागी सुरेख अशी बांधणी असणारे महदव्वेचे घर दिसले. तो थेट तिथे गेला. घराच्या अंगणात पोहोचला. ते सुंदर नक्षीने सजवले होते. त्याने दारात उभे राहून पाणी मागितले.

दारात याचक आलेला पाहून महदव्वा आतून पाणी घेऊन आली. पाणी देत तिने त्या युवकास न्याहाळले. व विचारले.

“ तू भिल्ल कुमार आहेस ना?”

महारुद्र, “ हो इकडे शिकारी साठी आलो होतो. पाहतो इकडे अरण्यात काही मिळते का?”

महादव्वा, “ पण नदीपार ही अरण्य आहे ना?”

महारुद्र, “ हो आहे की, पण तिकडे भरपूर वेळा शिकार केली. आता इकडे पाहतो. काही मिळते का ते?”

त्याने पाणी पिऊन तृष्णा भागवली. व तो अरण्य वाटेस गेला. तिथे त्याला त्या युवतीचे काही दर्शन झाले नाही. तो पुढे अरण्यात गेला. तिथे त्याने काही रानमेवा गोळा केला. तसेच एकदोन रानकोंबडे मारले. व पुढे शोधत असताना त्यास जाळीतून काहीतरी खुसुर फूसर आवाज ऐकू येवू लागला. तयाने पाहिले एक ससा त्यास पळताना दिसला. त्याने एक बाण चापावर चढवला व सोडला. पण तोपर्यंत एक दुसरा शर त्या सश्यास येऊन लागला. व तो ससा तिथे आडवा झाला होता. तो तिथे गेला. तोपर्यंत त्याच्या पुढ्यात त्रिशला आली. व तिने तो ससा उचलला व त्याकडे पहात ती म्हणाली, “ हा ससा आम्ही संधान केला असून तो आमच्या मालकीचा आहे.”

तो काहीही न बोलता स्तब्ध उभा राहिला. व त्याने इकडे तिकडे पाहिले. तर त्याला दूर अंतरावर अंबाला हातात धनु घेऊन उभा असलेली दिसली.

क्रमशः पुढे......


Monday, March 13, 2023

अंबाला भाग २६

 अंबाला भाग २६


क्रमशः पुढे चालू.....

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे नदीवर पाणी आणण्यासाठी अंबाला निघाली. तिच्या सोबत आज त्रिशला होती. त्रिशलाने एक जाळीदार वस्त्र घेतले होते. काल अरण्यात जाता आले नाही म्हणून आजच्या जेवणासाठी मासे पकडुन उदरनिर्वाह करण्याचे तसेच वाटेतील वृक्षावरील फळे काढून आणण्याचे त्यांनी ठरवले त्यांनी धनु व बाण ही घेतले. वाटेतील झाडांची बरीच फळे त्यांनी पाडलीत व त्या नदीवर आल्या. त्रिशलासोबत असताना आंबालेस जास्त कष्ट उपसावे लागत नसतं. कारण त्रिशला सर्व काम करत असे. पण अंबा मदतीसाठी धजावत असे.

आज नदीपात्रात असणाऱ्या काळ्या पाषाणावर बसावयास सांगून त्रिशला सिपनेसवे मासे धरू लागली. बरेच मासे पकडले होते. ते त्या अंबालेच्या हाती असणाऱ्या मडक्यात ती टाकत होती. आंबा फक्त मडके घेऊन बसली होती.

इतक्यात नदीच्या पैलतीरावरुन एक शर सरसर करत आंबलेच्या पायात येऊन पडला. व वाळूत रुतला. त्याच्या मागे एक रानफुलांच्या वेणीची गुंफण होती. अचानक आलेल्या त्या शराने ती दचकली. व इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा तिला तो कालचा युवक पैलतिरी एका वृक्षाखाली उभा असलेला दिसला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सिपणा व त्रिशलाचे लक्ष ही त्या शराकडे गेले. त्या कोण आहे ते पाहू लागल्या.

तेव्हा सिपना त्रिशलेस म्हणाली, “तो पहा कालचा तो युवक ज्याचे प्राण मी व आंबेने वाचवले होते. त्यानेच ही वेणी पाठवली आहे.”

तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून त्रिशलाने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सिपनेने ती वेणी घेतली व आपल्या केसात माळली.

इकडे महारुद्र अस्वस्थ झाला. कारण त्याने ती वेणी आंबेस पाठवली होती. त्याने पुन्हा इकडे तिकडे पाहिले व तिथे जवळ असणाऱ्या मोगर फुलांची वेणी त्याने बनवली. व पुन्हा एका शरावर चढवून त्याने पुन्हा अंबेच्या पायात तो शर सोडला. तो खडका शेजारी वाळूत रुतला. पण अंबेने त्याकडे दुर्लक्ष केले. व ती नदीच्या पाण्यात पाय डूंबवत खेळत मडके वाजवत त्या खडकावर बसली. तिने ती वेणी घ्यावी म्हणून तो नदीपार तळमळत होता. त्रिशला व सिपना मासे पकडण्यात दंग झाल्या होत्या. त्या मासे पकडून अंबेच्या हातातील मडक्यात टाकत व ती त्यावर वस्त्र बांधून वाजवत बसली होती. भरपूर मासे मिळाल्यावर ती आंबेस म्हणाली की चला आता घरी जाऊया. आज मस्त पाणीभात व मच्छीचे कालवण करूया. असे बोलून ते माशांचे मडके तिने अंबेच्या डोक्यावर दिले. फळे व धनु सिपनेकडे दिला. व स्वतः दुसरे पाण्याचं मडके डोक्यावर घेऊन त्या वाटेला लागल्या. तेव्हा त्या निघालेल्या पाहून महारुद्राने पुन्हा एक शर अंबेच्या पायात सोडला. तो शर पाहताच त्रिशला चिडली. तिला ते रुचले नाही. उपकार कर्त्यास अशा अहंभावपणे आपले शस्त्र प्रदर्शन करणे योग्य नव्हे. हे जाणून तिने आपल्या डोक्यावरील मातीचे मडके खाली उतरले. व सिपनेकडील धनु व बाण घेतला. व एक बाण सोडला. तो वेगाने महारुद्र उभा असलेल्या वृक्षास जाऊन लागला.

महारुद्राने प्रथमच असा अचूक निशाणा तो ही एका स्त्रिचा पाहिला होता. तिच्या बाणाचे निरीक्षण करत तो आश्चर्याने विचार करू लागला. त्याने असे संधान पाहिले नव्हते. तो बाण त्याने बारकाईने पाहिला एखाद्या सराईत योध्याच्या बाणासारखा तो वाटला. त्याची ठेवणं मागे लावलेली पिसे पाहता त्याने आपला बाण व तो बारकाईने न्याहाळला. व नदीपार नजर टाकली. तेव्हा त्या तिथे नव्हत्या. त्याने आता शिकार करावयाचे ठरवले. व पुढे जंगलाकडे गेला. तेथें काही रान कोंबडे त्याने मारले. व तो घरी निघाला. जाताना तो त्रिशलेने मारलेला बाण न्याहाळत निघाला. त्याने पाहिले की अशा प्रकारचा बाण कधीही या भागातील पारध्यांकडे बघितला नव्हता. व या दोघींना देखील कधीही पाहिले नव्हते. त्या दोघींना त्याने प्रथम महादेव उत्सवात पाहिले होते. परंतु त्यांना कधीही दक्षिण कृष्णावृतात पाहिले नव्हते. त्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा त्याच्यात जागृत झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो घराबाहेर पडला. व नदीच्या वाटेला थेट लागला. नदीवर आल्यावर त्याने नदीकाठावरील मोठ्या पाषाणावर आपली वस्त्रे उतरून ठेवली. स्नान केले. तदनंतर त्याने आपला पेहराव चढवला. व कमी पाण्यातून त्याने नदीपार केली. तिथे अनेक पारधी स्त्रिया आलेल्या होत्या. त्यामधे त्या कृष्णवर्णीय मुलीस तो शोधू लागला पण त्यास ती दिसली नाही. तो शोधत राहिला. शेवटी त्याने तिचा शोध घ्यायचे ठरवले. त्या दिवशी निराश होऊन तो घरी परतला. त्याला शिकार करण्यात ही तेव्हा आवड राहिली नाही. त्याने काही फळे रानातून गोळा केली व तो थेट वस्तीवर आला. व घरी येऊन जेवण केले. व वाकी पलंगावर पहुडला. त्याच कृष्णवर्णीय कन्येचा विचार करू लागला. ती आज का नदीवर आली नसावी. याचा विचार करत राहिला.

व त्याने पारधी वस्तीवर तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी जायचे ठरवले.

….. …… …… ….. …… …

त्या दिवशी त्रिशलेने आंबालेस नदीवर जाण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे अंबा शांतपणे घरीच राहिली. आंबलेस मुक्त फिरण्यास आवडत असल्याने ती थोडी हिरमुसली.

क्रमशः पुढे......  


Saturday, March 11, 2023

अंबाला भाग २५

 अंबाला भाग २५



महारुद्राची माता सिंघणेने शिवव्रत ठेवले होते. महारुद्राची उन्नती व्हावी तसेच शिवकृपा व्हावी म्हणून ती महादेवाची पिंड करून त्याची पूजा करत असे त्यासाठी लागणारे बेलाचे झाड जवळच होते. परंतु त्यास म्हणावी तशी पाने नव्हती. तसेच पूजेस अन्य लोक ही त्या झाडाची पाने नेत असलेने ते वटले होते. बाकी बिल्व पत्राची बहुसंख्य झाडे नदीपलिकडे पारधी वस्ती शेजारी होती. तिने महारुद्राला नदी पलीकडून बिल्व पत्रे आणायला सांगितले. तो नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसह युद्धाभ्यास सराव करण्यासाठी जाणार होता. पण मातेचा आदेश असलेने त्याने प्रथम बेलपत्र आणून द्यायचे ठरवले. नंतर त्याने युद्धाभ्यास सराव करायला जायचं मनात पक्के केले. त्याने आपली वस्त्रे घातली. व कमरेस तलवार एका हातात धनुष्य दुसऱ्या हातात पिशवी पाठीवर भाता असा पेहराव करून तो नदीच्या वाटेस लागला. सकाळचा प्रहर होता. तो नदीतिरी आला. नदीच्या पाण्यात अंदाज घेत शिरला. व त्याने ती नदी पार केली. पोहत तो पैलतीरावर आला. त्याचवेळी घरात पाणी नसलेने ते आणावयास अंबाला घरातील मातीची घागर घेऊन शेजारील सिपणे समवेत पाणी आणावयास निघाली. रोज ती व त्रिशलेबरोबर पाणी आणायला जात असे. मात्र त्या दिवशी घरा शेजारील पारधी कुटुंबातील वस्तलेस प्रसव वेदना सुरू झाल्याने त्रिशला तिथे मदतीसाठी गेली होती. त्यामूळे घरातील सर्व कामाचा भार अंबालेवर पडला होता. तेथे तिचा वावर इंद्रावती नावाने होता. ती आपले नाव इंद्रावती सांगत असे. शेजारील सिपणा व अंबाला पाणी आणावयास नदीकडे निघाल्या. नदी मार्गावर दोन्ही बाजूस अनेक बांबू व वेताची बेटे होती. नदी मार्गावर वाकून ती एकमेकात गुंतली होती ज्याने वक्राकार अर्ध कमान झाली होती. ज्यातून जाताना एक सुखद गारवा मिळत होता. त्या गर्द दाटिने एक निराळे सौंदर्य खुलत होते. प्रभाती वाहणाऱ्या झुळझुळ वाऱ्याने वेळूंचे सुमधुर बासरी वादन चालले होते. त्या वेळी त्या मार्गावरून त्या दोघी पाण्यासाठी लगबगीने निघाल्या होत्या.

अचानक वाटेत कुठून तरी आवाज ऐकू आला. तिने आवाजाच्या दिशेने पहिले तेव्हा त्यांना वाटेकडेला असणाऱ्या बिल्वपत्र वृक्षाच रानात काहीतरी पडल्याचे जाणवले. त्या दोघींनी आपले घडे सावरत उंच टेकावर उभे राहून पाहिले.  तेव्हा त्यांना तिथे रानात एक तरुण बेलवृक्षाखाली  तळमळताना दिसला. तिने तिथे जाऊन पाहिले. एक सुंदर युवक तिथे पडला आहे. व एक सर्प त्या शेजारून जात आहे. तिने सफाईदारपणे त्या सर्पास शेपटी कडून धरले व गरगर फिरवत लांब फेकून दिले. ती त्या युवका शेजारी आली.  तिने सर्पदंश झालेली जागा हेरली. त्या जागेच्या वरील बाजूस तिने आपले उपरणे फाडून बांधले. व त्या दंश केलेल्या जागेवर आपल्या कमरेच्या शस्त्राने घाव केला. रक्त ओघळू लागले.

लगेच सिपनेस ती म्हणाली की लवकर धावत जा व वृध्द बाईसाकडून सर्प दंशावार औषध घेऊन ये.

अंबाचे बोल ऐकून सीपना वेगाने धावत वस्तीवर गेली. व वस्ती बाहेर असणाऱ्या वृध्द बाईसाकडून तिने औषधी घेतली. व परत आली. ती येईपर्यंत त्या तरुणास शुद्ध आली होती. आंबेने केलेल्या वाराने त्याचे विषयुक्त रक्त वाहिले होते.

तो शुध्दीवर येण्यापूर्वी आंबेचे लक्ष त्याकडे गेले.  त्याचे गौर कांती असणारे पिळदार सौंदर्य  सुर्य किरणात तेजस्वी दिसत होते. वाटे कोणी राजपुत्रच असावा. तो खूप देखणा होता. तिच्या मनात त्यास कुठेतरी पाहिले आहे असे वाटले. तिला लगेच आठवले की तिने महादेव उत्सवावेळी यक्षिणी नृत्यावेळी तिने पाहिलं होतं. त्याचे शरीर कठीण वज्रासारखे होते. व त्याच्या हातात बिल्वपत्र असल्याने तो महादेव उपासक असावा याचा तिने अंदाज बांधला. आज महादेवाचा वार असल्याने तो पूजेसाठी बेलपत्र न्यायला आला असावा.

थोड्याच कालावधीत सिपना इंद्रावती इंद्रावती म्हणत आंबले जवळ आली. व आपल्या जवळील औषधी जी पळस पानात बांधली होती . ती तिने अंबेकडे दिली. ती तिने त्याच्या तोंडत टाकली. ती त्याने बंद डोळ्याने घेतली. महारुद्रास आता शुद्धा आली होती. त्यास शुद्धा आल्याचे पाहताच अंबाला त्याच्यापासून थोडी दूर झाली. त्याला आता आपल्या समोर एक कृष्णवर्णी तरुणी व एक लहान मुलगी दिसत होती. त्याने तिच्याकडे पाहिले. त्यास शुद्ध आल्याचे पाहताच सिपना म्हणाली, “ तुझे आयुष्य मोठे व त्या महादेवाची कृपा म्हणून तू वाचलास. नाहीतर आता यमदेवाच्या दरबारात उभा असतास.”

अंबाला, “ शुभ बोल सिपने , चल आता पाण्याला खूप कामे आहेत. आता तो शुध्दीवर आलाय.”

असे बोलून त्या निघून गेल्या. पारध्यांच्यात राहून अंबाला पक्की पारधी झाली होती. शुध्दीवर आल्यावर तिच्या पाठमोऱ्या देहाकडे तो पाहतच राहिला. ती पाणी भरायला गेली. त्याच्या मनात विचार घोळू लागले. या युवतीस आपण कुठेतरी पाहिलेय पायात वेदना जाणवत होती. उपरण्याच्या तुकड्यांनी बांधलेला पाय त्याने सावरला. व बेलपत्र घेऊन तो वस्तीकडे निघाला. त्या दोघी नदीवर गेल्या त्यांनी झुळझुळ वाहणारे नदीचे पाणी भरून घेतले. व त्या घरी निघून गेल्या.

बिल्वपत्रे घेऊन महारुद्र पुन्हा नदीपार करून घरी गेला. त्याने आपल्या मातेस बिल्वपत्रे दिली. तिचे लक्ष महारुद्राच्या पायाकडे गेले. व त्यास जखमेचे कारण विचारले. तेव्हा त्याने सर्प दंशाचा वृत्तान्त कथन केला. तेव्हा सिंघणेने महादेवाचे आभार मानले. व आपल्या पुत्रावरील अरिष्ट टळले म्हणून दृष्ट काढली. व ‘महादेवाची कृपा झाली व ती मुलगी ऐनवेळी संकटात धावून आली. तिला देव सुखात ठेवू देत.’ असे बोलून तिने महारुद्राला वेताच्या वाकी पलंगावर बसवले. व घरातील विषबाधेवरील औषधी खायला दिली. व ती महादेव पूजेस लागली. पूजाविधी आटोपून तिने महारुद्रास जेवण दिले. व भिल्लम काही कामानिमित्त बाहेर गेला असल्याने वाट पहात बसली.

 महारुद्राने जेवण आटोपले व तो बाहेरील पडवीत असणाऱ्या वाकाच्या पलंगावर पहुडला. त्याच्या नजरे समोर ती मुलगी तरळत होती. तिचे सौंदर्य कृष्ण वर्णात देखील उठून दिसत होते. तो दिवसभर विचार करत राहिला. त्याचे मित्र सराव करण्यास बोलवण्यास आले. तेव्हा त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. त्याच्या मनात तिचे प्रतिबिंब उमटले होते. मनात वाटत होते की आपण तिला कुठेतरी पाहिले आहे. रात्री जेवणं करुन अंथरूणावर पहुडल्यावर त्यास अचानक आठवले. की त्यानें तिला महादेव उत्सवावेळी पाहिले होते. ती कृष्णवर्णीय मुलगी ती हीच आहे. व त्याच्या गालावर स्मितहास्य उमटले. व तो स्वप्नरंजनात रमून गेला.

क्रमशः पुढे.......



अंबाला भाग २४

 अंबाला भाग २४



तिच्या प्रकाशात त्या वानर सेनेचा सामना करत होत्या. काही माकडे उड्या मारत आंबलेच्या समोर असणाऱ्या फांदीवर आली. ती तिच्याकडे रागीट नजरेने पाहत वाकुल्या दाखवत पाहू लागली. अंबालेने वरील फांदीच्या पारंबीच्या साहाय्याने तिने पुढे येत त्यानं फांदीच्या टोकापर्यंत दामटले. त्यामुळे त्यांच्या वजनाने फांदीचा शेंडा वाकला. आंबेने पायाच्या साहाय्याने फांदी हलवण्यास सुरवात केली. तशी ती माकडे घाबरली. व एकमेकास बिलगली. व त्यांनी फांदी घट्ट पकडली. तेव्हा आंबलेने फांदी हलवायचे थांबवले. थोडावेळ फांदी हलत्याली थांबल्यावर त्या माकडांच्या हाताची पक्कड सैल केली. व ती एकमेकांना धरून बसलीत. याचा फायदा अंबालेन घेतला. व अचानक फांदी हलवली. एखाद्या डहाळीची लगडलेली फळे वाऱ्याने खाली पडवीत तशी ती माकडे टपटप पडली. त्या दोघी जवळजवळ चार पाच घटिका त्या दोघी माकडाशी लढत होत्या. शेवटी माकडांनी माघार घेणे योग्य समजले. कारण या दोघींनी त्यांना चांगलाच प्रसाद प्रत्येकाला दिला होता. त्या दोघी ही जखमी झाल्या होत्या दोघीही खूप जखमी झाल्या होत्या. माकडे माघारी गेल्यावर त्या दोघींनी विचार केला की उघड्या बुंध्यावर विसावा घेणे धोक्याचे आहे. व त्या दोघी सुरक्षित जागा शोधू लागल्या. तेव्हा त्यांना तिथे जवळच एक विशाल ढोली दिसली त्यांनी पेटते कोलीत घेऊन त्यांनी तिथे एक सुरक्षित जागा शोधली. व तिथे विसावा घ्यायचे ठरविले. त्या तिथे विसावल्या. त्यांना झोप कधी लागली हे देखील कळले नाही. पूर्वेस प्रभा दिसू लागली. सुर्य नारायण आकाशी चढू लागला. त्याचे कवडसे झाडीच्या पानाच्या मधून पडू लागले. त्याचा एक कवडसा अंबेच्या चेहेऱ्यावर पडला. तिला जाग आली. तिने त्रिशलेस उठवले. दोघी ढोलीतून बाहेर आल्या. पिशवीतले थोडे पानी पिऊन त्यांनी तृषा भागवली. त्यांनी तिथे पडलेल्या त्या मृत माकडास तेथील धगधगणाऱ्या अग्नीत टाकले. त्याचे काही मिनिटात अंत्यसंस्कार झाले. तदनंतर त्यांनी तो अग्नी शांत केला. व त्या दोघी आपले साहित्य व शस्त्रे घेऊन पुढे दक्षिण कुंतल प्रदेशाकडे निघाल्या. उंच पर्वत श्रृंखला पार करत त्या दक्षिण कुंतल प्रदेशात असणाऱ्या नदी खोऱ्यात उतरल्या. व नदीतिराने चालू लागल्या. पुढे सुरक्षित पठारी मैदानात आल्यावर त्या दोघींनी जवळील पिशवीत काय मिळते का ते पाहिले.

त्यातील शिल्लक असणारे खाद्य पदार्थ खाऊन पाण्याच्या पिशवीतले पाणी पिऊ लागल्या. ते संपले होते. तेव्हा त्या पाणी पिण्यासाठी त्या नदीकाठी गेल्या. तेथे त्या पाणी पिऊन स्नान कर्मे आटोपली. आपली वस्त्रे धुवून नदीतील उघड्या खडकावर त्यांनी सुखावली. नंतर त्या पुढे निघाल्या. उंच टेकावर चढून त्यांनी सर्वत्र पाहिले. त्यांना आकाशात धूर दिसत होता. तिकडे न्याहाळत बांबू बेटाच्या सहवासात त्यांना वस्ती दिसू लागली. दासी दुश्यलेने सांगितलेल्या खाणाखुणांनुसार त्यांनी अंदाज घेतला. व त्या नदीतिराने निघाल्या. पुढे अरण्य संपण्या आधी एका ठिकाणी झाडाखाली आपल्या पिशव्या ठेवल्या. तिथे जवळच असणाऱ्या जाळीत त्रिशलाने अंबेस नेले. व आपल्या कापडी पिशवीत असणारी अपरान्त देशात घेतलेली काजळीची डब्बी काढली. व ती अंबालेस लावू लागली.

ते पाहून अंबाला, “ हे काय लावत आहेस.”

त्रिशला, “ ही कजळी आहे. एकदा लावली की एक पक्ष टिकते. तुझा गौर वर्ण मी याने लपवत आहे. तुला कृष्ण वर्णी बनवत आहे. कारण सर्व राजपाट गेला आहे. नाहक जीव गमवयला नको. आज तुला कृष्णवर्णी व्हावेच लागेल. अशा तऱ्हेने त्रिशला तिच्या अंगावर काजळी लावू लागली. अंबाला आपली गौरवर्णी त्वचा शेवटची न्याहाळत होती. तिच्या डोळ्यातून आपल्या माता पित्याच्या आठवणी जाग्या होऊन अश्रू गळत होते. त्रिशलेस ही वाईट वाटत होते. काही क्षणात तिने तिला कृष्णवर्णी करुन टाकले. आपला सर्व व्यवहार आटोपून अरण्यातील काही फळे खाऊन त्या दोघी पुढे मार्गस्थ झाल्या. कुंतल खोऱ्यातील वस्ती जवळून जाताना त्या प्रत्येक ग्रामी चौकशी करत होत्या. त्या शेवटी दुश्यलेचा भाऊ राहत असलेल्या पारधी वस्तीवर आल्या.तिथे आल्यावर त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की गतवर्षी आलेल्या महापुरात दुश्यलेचा भाऊ नदीच्या पाण्यात वाहून गेला. व वस्तीवरील त्याचे घरात आता त्याची वृध्द माताच राहते. तिचे नाव महदव्वा आहे. त्या दोघींनी आपली ओळख पटावी म्हणून ग्रामनायकास दुष्यलेने दिलेली निशाणी दाखवली. व आपण दोघी दुस्यलेच्या मुली आहोत. असे सांगून त्या दोघींनी आपल्यास ते घर दाखवण्याची विनंती केली. पारधी वस्तीवर आलेल्या या नवीन मुलींना आश्रय देण्याचे सर्व पारध्याने ठरविले. कारण सदर भाग हा त्यांना राहावयास महाराज जयवर्धन यांच्या कृपेने मिळाला होता. व त्या मुली असलेने त्यांनी लगेच त्यांना दुष्यलेच्या भावाच्या घरी पोहचवले. तिथे येताच तिथली अस्वच्छता पाहून अंबालेस शिषारी आली. पण आता तिला तेथेच राहावे लागणार होते.

आपल्या म्हातारपणात आपल्या रक्ताचे असे कोण तरी आपल्या सहवासात आले. याचा त्या वृध्द महदव्वेस खूप आनंद झाला होता. व ती सुखावली होती. पण जेव्हा तिला दुश्यला या जगात जिवंत नाही हे कळले. तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. तिने खूप शोक केला. आता आपल्याला या मुलींचा आधार आहे हे तिने जाणले होते. त्या दोघी तिथे राहू लागल्या. त्यांनी हळूहळू त्या घराचा कायापालट केला. अंबाला व त्रिशलेने ती मोहरांची थैली परसात गुप्त जागी लपवली. तसेच ती शस्त्रे ही. त्रिशला अंधाऱ्या रात्री न चुकता आंबेस कृष्णवर्णी बनवत होती.

त्या दोघी आता पारधी मुलीबरोबर रानात जात मद, लाख गोळा करत शेती करत जीवन कंठू लागल्या.

अधून मधून बाहेर गेलेले पारधी वस्तीवर आल्यावर राज्यातील वार्ता सांगत असत. एके दिवशी एक पारधी स्त्री सांगत होती. की महाराज जयवर्धन यांना युद्धात लढता लढता वीरमरण आले. व अश्मक खोरे ते राजधानी पर्यंत असणारा भाग शत्रूने जिंकून घेतला. उरलेला प्रदेश व दक्षिण कुंतल भाग शत्रूला नमवून प्रधान वेद दत्त यांनी जिंकला. व आता ते राजा झाले आहेत. व त्यांनी स्वतः चा राज्याभिषेक करून घेतला आहे. ही बातमी कळताच आंबलेस खूप दुःख झाले. पण तिने शोक आवरता घेतला. त्रिशलेन तिची समजूत काढली. रोज काही ना काही राजकीय घडामोड समजत होती. रानात काम करत त्या वृध्द महदव्वेसोबत त्या जीवन कंठू लागल्या. जे नाजूक हात रेशमी रुमालाने पुसत रोज पंचपक्वानांचे घास पोटात ढकलत. ते आता तेथील रानात कसत होते. त्रिशला तिला धीर द्यायची. अंबाला दिसावयास काळी असलेने तिचे सौंदर्य हे त्यात ही खुलत होते. त्या दोघी तिथे सुरक्षित होत्या.

पारधी लोकांत राहून त्या वेताच्या वस्तू तयार करणेस शिकल्या. एके दिवशी आंबलेने एक सुंदर वेताचा धनु बनवला. व अनेक शर तयार केले. तिला तिच्या गुरूकडून त्या शरावर लावायची औषधी कशी तयार करतात हे तंत्र माहीती झाले होते. ती औषधी तिने तयार केली. ते शर पिसे लावल्यास वेगाने संधान करू शकतात हे ती जानत होती. तिने रानातील पक्षांची पिसे गोळा केली. व त्या शराला लावली. व अशा प्रकारे तिने आपल्यासाठी व त्रिशलेसाठी एक असे दोन धनु बनवले. ते पाहून अनेक वृध्द पारधी तिचे कौतुक करत. त्या दोघींना अनेक पारधी मुले मागणी घालत. पण महदव्वा त्यांचे काही चालू देत नसे. त्या धाडशी असल्याने त्यांची छेड कोणी काढत नसे. कारण एकदा एका पारधी नवयुवकाने त्रिशलेची छेड काढली. त्या दोघींनी त्यास एका वृक्षास उलटे लटकावले. त्या क्षणापासून पारध्यांची मुले त्या दोघींपासून सावध राहत होती.

क्रमशः पुढे.....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...