Monday, March 13, 2023

अंबाला भाग २६

 अंबाला भाग २६


क्रमशः पुढे चालू.....

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे नदीवर पाणी आणण्यासाठी अंबाला निघाली. तिच्या सोबत आज त्रिशला होती. त्रिशलाने एक जाळीदार वस्त्र घेतले होते. काल अरण्यात जाता आले नाही म्हणून आजच्या जेवणासाठी मासे पकडुन उदरनिर्वाह करण्याचे तसेच वाटेतील वृक्षावरील फळे काढून आणण्याचे त्यांनी ठरवले त्यांनी धनु व बाण ही घेतले. वाटेतील झाडांची बरीच फळे त्यांनी पाडलीत व त्या नदीवर आल्या. त्रिशलासोबत असताना आंबालेस जास्त कष्ट उपसावे लागत नसतं. कारण त्रिशला सर्व काम करत असे. पण अंबा मदतीसाठी धजावत असे.

आज नदीपात्रात असणाऱ्या काळ्या पाषाणावर बसावयास सांगून त्रिशला सिपनेसवे मासे धरू लागली. बरेच मासे पकडले होते. ते त्या अंबालेच्या हाती असणाऱ्या मडक्यात ती टाकत होती. आंबा फक्त मडके घेऊन बसली होती.

इतक्यात नदीच्या पैलतीरावरुन एक शर सरसर करत आंबलेच्या पायात येऊन पडला. व वाळूत रुतला. त्याच्या मागे एक रानफुलांच्या वेणीची गुंफण होती. अचानक आलेल्या त्या शराने ती दचकली. व इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा तिला तो कालचा युवक पैलतिरी एका वृक्षाखाली उभा असलेला दिसला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सिपणा व त्रिशलाचे लक्ष ही त्या शराकडे गेले. त्या कोण आहे ते पाहू लागल्या.

तेव्हा सिपना त्रिशलेस म्हणाली, “तो पहा कालचा तो युवक ज्याचे प्राण मी व आंबेने वाचवले होते. त्यानेच ही वेणी पाठवली आहे.”

तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून त्रिशलाने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सिपनेने ती वेणी घेतली व आपल्या केसात माळली.

इकडे महारुद्र अस्वस्थ झाला. कारण त्याने ती वेणी आंबेस पाठवली होती. त्याने पुन्हा इकडे तिकडे पाहिले व तिथे जवळ असणाऱ्या मोगर फुलांची वेणी त्याने बनवली. व पुन्हा एका शरावर चढवून त्याने पुन्हा अंबेच्या पायात तो शर सोडला. तो खडका शेजारी वाळूत रुतला. पण अंबेने त्याकडे दुर्लक्ष केले. व ती नदीच्या पाण्यात पाय डूंबवत खेळत मडके वाजवत त्या खडकावर बसली. तिने ती वेणी घ्यावी म्हणून तो नदीपार तळमळत होता. त्रिशला व सिपना मासे पकडण्यात दंग झाल्या होत्या. त्या मासे पकडून अंबेच्या हातातील मडक्यात टाकत व ती त्यावर वस्त्र बांधून वाजवत बसली होती. भरपूर मासे मिळाल्यावर ती आंबेस म्हणाली की चला आता घरी जाऊया. आज मस्त पाणीभात व मच्छीचे कालवण करूया. असे बोलून ते माशांचे मडके तिने अंबेच्या डोक्यावर दिले. फळे व धनु सिपनेकडे दिला. व स्वतः दुसरे पाण्याचं मडके डोक्यावर घेऊन त्या वाटेला लागल्या. तेव्हा त्या निघालेल्या पाहून महारुद्राने पुन्हा एक शर अंबेच्या पायात सोडला. तो शर पाहताच त्रिशला चिडली. तिला ते रुचले नाही. उपकार कर्त्यास अशा अहंभावपणे आपले शस्त्र प्रदर्शन करणे योग्य नव्हे. हे जाणून तिने आपल्या डोक्यावरील मातीचे मडके खाली उतरले. व सिपनेकडील धनु व बाण घेतला. व एक बाण सोडला. तो वेगाने महारुद्र उभा असलेल्या वृक्षास जाऊन लागला.

महारुद्राने प्रथमच असा अचूक निशाणा तो ही एका स्त्रिचा पाहिला होता. तिच्या बाणाचे निरीक्षण करत तो आश्चर्याने विचार करू लागला. त्याने असे संधान पाहिले नव्हते. तो बाण त्याने बारकाईने पाहिला एखाद्या सराईत योध्याच्या बाणासारखा तो वाटला. त्याची ठेवणं मागे लावलेली पिसे पाहता त्याने आपला बाण व तो बारकाईने न्याहाळला. व नदीपार नजर टाकली. तेव्हा त्या तिथे नव्हत्या. त्याने आता शिकार करावयाचे ठरवले. व पुढे जंगलाकडे गेला. तेथें काही रान कोंबडे त्याने मारले. व तो घरी निघाला. जाताना तो त्रिशलेने मारलेला बाण न्याहाळत निघाला. त्याने पाहिले की अशा प्रकारचा बाण कधीही या भागातील पारध्यांकडे बघितला नव्हता. व या दोघींना देखील कधीही पाहिले नव्हते. त्या दोघींना त्याने प्रथम महादेव उत्सवात पाहिले होते. परंतु त्यांना कधीही दक्षिण कृष्णावृतात पाहिले नव्हते. त्याविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा त्याच्यात जागृत झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो घराबाहेर पडला. व नदीच्या वाटेला थेट लागला. नदीवर आल्यावर त्याने नदीकाठावरील मोठ्या पाषाणावर आपली वस्त्रे उतरून ठेवली. स्नान केले. तदनंतर त्याने आपला पेहराव चढवला. व कमी पाण्यातून त्याने नदीपार केली. तिथे अनेक पारधी स्त्रिया आलेल्या होत्या. त्यामधे त्या कृष्णवर्णीय मुलीस तो शोधू लागला पण त्यास ती दिसली नाही. तो शोधत राहिला. शेवटी त्याने तिचा शोध घ्यायचे ठरवले. त्या दिवशी निराश होऊन तो घरी परतला. त्याला शिकार करण्यात ही तेव्हा आवड राहिली नाही. त्याने काही फळे रानातून गोळा केली व तो थेट वस्तीवर आला. व घरी येऊन जेवण केले. व वाकी पलंगावर पहुडला. त्याच कृष्णवर्णीय कन्येचा विचार करू लागला. ती आज का नदीवर आली नसावी. याचा विचार करत राहिला.

व त्याने पारधी वस्तीवर तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी जायचे ठरवले.

….. …… …… ….. …… …

त्या दिवशी त्रिशलेने आंबालेस नदीवर जाण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे अंबा शांतपणे घरीच राहिली. आंबलेस मुक्त फिरण्यास आवडत असल्याने ती थोडी हिरमुसली.

क्रमशः पुढे......  


Saturday, March 11, 2023

अंबाला भाग २५

 अंबाला भाग २५



महारुद्राची माता सिंघणेने शिवव्रत ठेवले होते. महारुद्राची उन्नती व्हावी तसेच शिवकृपा व्हावी म्हणून ती महादेवाची पिंड करून त्याची पूजा करत असे त्यासाठी लागणारे बेलाचे झाड जवळच होते. परंतु त्यास म्हणावी तशी पाने नव्हती. तसेच पूजेस अन्य लोक ही त्या झाडाची पाने नेत असलेने ते वटले होते. बाकी बिल्व पत्राची बहुसंख्य झाडे नदीपलिकडे पारधी वस्ती शेजारी होती. तिने महारुद्राला नदी पलीकडून बिल्व पत्रे आणायला सांगितले. तो नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसह युद्धाभ्यास सराव करण्यासाठी जाणार होता. पण मातेचा आदेश असलेने त्याने प्रथम बेलपत्र आणून द्यायचे ठरवले. नंतर त्याने युद्धाभ्यास सराव करायला जायचं मनात पक्के केले. त्याने आपली वस्त्रे घातली. व कमरेस तलवार एका हातात धनुष्य दुसऱ्या हातात पिशवी पाठीवर भाता असा पेहराव करून तो नदीच्या वाटेस लागला. सकाळचा प्रहर होता. तो नदीतिरी आला. नदीच्या पाण्यात अंदाज घेत शिरला. व त्याने ती नदी पार केली. पोहत तो पैलतीरावर आला. त्याचवेळी घरात पाणी नसलेने ते आणावयास अंबाला घरातील मातीची घागर घेऊन शेजारील सिपणे समवेत पाणी आणावयास निघाली. रोज ती व त्रिशलेबरोबर पाणी आणायला जात असे. मात्र त्या दिवशी घरा शेजारील पारधी कुटुंबातील वस्तलेस प्रसव वेदना सुरू झाल्याने त्रिशला तिथे मदतीसाठी गेली होती. त्यामूळे घरातील सर्व कामाचा भार अंबालेवर पडला होता. तेथे तिचा वावर इंद्रावती नावाने होता. ती आपले नाव इंद्रावती सांगत असे. शेजारील सिपणा व अंबाला पाणी आणावयास नदीकडे निघाल्या. नदी मार्गावर दोन्ही बाजूस अनेक बांबू व वेताची बेटे होती. नदी मार्गावर वाकून ती एकमेकात गुंतली होती ज्याने वक्राकार अर्ध कमान झाली होती. ज्यातून जाताना एक सुखद गारवा मिळत होता. त्या गर्द दाटिने एक निराळे सौंदर्य खुलत होते. प्रभाती वाहणाऱ्या झुळझुळ वाऱ्याने वेळूंचे सुमधुर बासरी वादन चालले होते. त्या वेळी त्या मार्गावरून त्या दोघी पाण्यासाठी लगबगीने निघाल्या होत्या.

अचानक वाटेत कुठून तरी आवाज ऐकू आला. तिने आवाजाच्या दिशेने पहिले तेव्हा त्यांना वाटेकडेला असणाऱ्या बिल्वपत्र वृक्षाच रानात काहीतरी पडल्याचे जाणवले. त्या दोघींनी आपले घडे सावरत उंच टेकावर उभे राहून पाहिले.  तेव्हा त्यांना तिथे रानात एक तरुण बेलवृक्षाखाली  तळमळताना दिसला. तिने तिथे जाऊन पाहिले. एक सुंदर युवक तिथे पडला आहे. व एक सर्प त्या शेजारून जात आहे. तिने सफाईदारपणे त्या सर्पास शेपटी कडून धरले व गरगर फिरवत लांब फेकून दिले. ती त्या युवका शेजारी आली.  तिने सर्पदंश झालेली जागा हेरली. त्या जागेच्या वरील बाजूस तिने आपले उपरणे फाडून बांधले. व त्या दंश केलेल्या जागेवर आपल्या कमरेच्या शस्त्राने घाव केला. रक्त ओघळू लागले.

लगेच सिपनेस ती म्हणाली की लवकर धावत जा व वृध्द बाईसाकडून सर्प दंशावार औषध घेऊन ये.

अंबाचे बोल ऐकून सीपना वेगाने धावत वस्तीवर गेली. व वस्ती बाहेर असणाऱ्या वृध्द बाईसाकडून तिने औषधी घेतली. व परत आली. ती येईपर्यंत त्या तरुणास शुद्ध आली होती. आंबेने केलेल्या वाराने त्याचे विषयुक्त रक्त वाहिले होते.

तो शुध्दीवर येण्यापूर्वी आंबेचे लक्ष त्याकडे गेले.  त्याचे गौर कांती असणारे पिळदार सौंदर्य  सुर्य किरणात तेजस्वी दिसत होते. वाटे कोणी राजपुत्रच असावा. तो खूप देखणा होता. तिच्या मनात त्यास कुठेतरी पाहिले आहे असे वाटले. तिला लगेच आठवले की तिने महादेव उत्सवावेळी यक्षिणी नृत्यावेळी तिने पाहिलं होतं. त्याचे शरीर कठीण वज्रासारखे होते. व त्याच्या हातात बिल्वपत्र असल्याने तो महादेव उपासक असावा याचा तिने अंदाज बांधला. आज महादेवाचा वार असल्याने तो पूजेसाठी बेलपत्र न्यायला आला असावा.

थोड्याच कालावधीत सिपना इंद्रावती इंद्रावती म्हणत आंबले जवळ आली. व आपल्या जवळील औषधी जी पळस पानात बांधली होती . ती तिने अंबेकडे दिली. ती तिने त्याच्या तोंडत टाकली. ती त्याने बंद डोळ्याने घेतली. महारुद्रास आता शुद्धा आली होती. त्यास शुद्धा आल्याचे पाहताच अंबाला त्याच्यापासून थोडी दूर झाली. त्याला आता आपल्या समोर एक कृष्णवर्णी तरुणी व एक लहान मुलगी दिसत होती. त्याने तिच्याकडे पाहिले. त्यास शुद्ध आल्याचे पाहताच सिपना म्हणाली, “ तुझे आयुष्य मोठे व त्या महादेवाची कृपा म्हणून तू वाचलास. नाहीतर आता यमदेवाच्या दरबारात उभा असतास.”

अंबाला, “ शुभ बोल सिपने , चल आता पाण्याला खूप कामे आहेत. आता तो शुध्दीवर आलाय.”

असे बोलून त्या निघून गेल्या. पारध्यांच्यात राहून अंबाला पक्की पारधी झाली होती. शुध्दीवर आल्यावर तिच्या पाठमोऱ्या देहाकडे तो पाहतच राहिला. ती पाणी भरायला गेली. त्याच्या मनात विचार घोळू लागले. या युवतीस आपण कुठेतरी पाहिलेय पायात वेदना जाणवत होती. उपरण्याच्या तुकड्यांनी बांधलेला पाय त्याने सावरला. व बेलपत्र घेऊन तो वस्तीकडे निघाला. त्या दोघी नदीवर गेल्या त्यांनी झुळझुळ वाहणारे नदीचे पाणी भरून घेतले. व त्या घरी निघून गेल्या.

बिल्वपत्रे घेऊन महारुद्र पुन्हा नदीपार करून घरी गेला. त्याने आपल्या मातेस बिल्वपत्रे दिली. तिचे लक्ष महारुद्राच्या पायाकडे गेले. व त्यास जखमेचे कारण विचारले. तेव्हा त्याने सर्प दंशाचा वृत्तान्त कथन केला. तेव्हा सिंघणेने महादेवाचे आभार मानले. व आपल्या पुत्रावरील अरिष्ट टळले म्हणून दृष्ट काढली. व ‘महादेवाची कृपा झाली व ती मुलगी ऐनवेळी संकटात धावून आली. तिला देव सुखात ठेवू देत.’ असे बोलून तिने महारुद्राला वेताच्या वाकी पलंगावर बसवले. व घरातील विषबाधेवरील औषधी खायला दिली. व ती महादेव पूजेस लागली. पूजाविधी आटोपून तिने महारुद्रास जेवण दिले. व भिल्लम काही कामानिमित्त बाहेर गेला असल्याने वाट पहात बसली.

 महारुद्राने जेवण आटोपले व तो बाहेरील पडवीत असणाऱ्या वाकाच्या पलंगावर पहुडला. त्याच्या नजरे समोर ती मुलगी तरळत होती. तिचे सौंदर्य कृष्ण वर्णात देखील उठून दिसत होते. तो दिवसभर विचार करत राहिला. त्याचे मित्र सराव करण्यास बोलवण्यास आले. तेव्हा त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. त्याच्या मनात तिचे प्रतिबिंब उमटले होते. मनात वाटत होते की आपण तिला कुठेतरी पाहिले आहे. रात्री जेवणं करुन अंथरूणावर पहुडल्यावर त्यास अचानक आठवले. की त्यानें तिला महादेव उत्सवावेळी पाहिले होते. ती कृष्णवर्णीय मुलगी ती हीच आहे. व त्याच्या गालावर स्मितहास्य उमटले. व तो स्वप्नरंजनात रमून गेला.

क्रमशः पुढे.......



अंबाला भाग २४

 अंबाला भाग २४



तिच्या प्रकाशात त्या वानर सेनेचा सामना करत होत्या. काही माकडे उड्या मारत आंबलेच्या समोर असणाऱ्या फांदीवर आली. ती तिच्याकडे रागीट नजरेने पाहत वाकुल्या दाखवत पाहू लागली. अंबालेने वरील फांदीच्या पारंबीच्या साहाय्याने तिने पुढे येत त्यानं फांदीच्या टोकापर्यंत दामटले. त्यामुळे त्यांच्या वजनाने फांदीचा शेंडा वाकला. आंबेने पायाच्या साहाय्याने फांदी हलवण्यास सुरवात केली. तशी ती माकडे घाबरली. व एकमेकास बिलगली. व त्यांनी फांदी घट्ट पकडली. तेव्हा आंबलेने फांदी हलवायचे थांबवले. थोडावेळ फांदी हलत्याली थांबल्यावर त्या माकडांच्या हाताची पक्कड सैल केली. व ती एकमेकांना धरून बसलीत. याचा फायदा अंबालेन घेतला. व अचानक फांदी हलवली. एखाद्या डहाळीची लगडलेली फळे वाऱ्याने खाली पडवीत तशी ती माकडे टपटप पडली. त्या दोघी जवळजवळ चार पाच घटिका त्या दोघी माकडाशी लढत होत्या. शेवटी माकडांनी माघार घेणे योग्य समजले. कारण या दोघींनी त्यांना चांगलाच प्रसाद प्रत्येकाला दिला होता. त्या दोघी ही जखमी झाल्या होत्या दोघीही खूप जखमी झाल्या होत्या. माकडे माघारी गेल्यावर त्या दोघींनी विचार केला की उघड्या बुंध्यावर विसावा घेणे धोक्याचे आहे. व त्या दोघी सुरक्षित जागा शोधू लागल्या. तेव्हा त्यांना तिथे जवळच एक विशाल ढोली दिसली त्यांनी पेटते कोलीत घेऊन त्यांनी तिथे एक सुरक्षित जागा शोधली. व तिथे विसावा घ्यायचे ठरविले. त्या तिथे विसावल्या. त्यांना झोप कधी लागली हे देखील कळले नाही. पूर्वेस प्रभा दिसू लागली. सुर्य नारायण आकाशी चढू लागला. त्याचे कवडसे झाडीच्या पानाच्या मधून पडू लागले. त्याचा एक कवडसा अंबेच्या चेहेऱ्यावर पडला. तिला जाग आली. तिने त्रिशलेस उठवले. दोघी ढोलीतून बाहेर आल्या. पिशवीतले थोडे पानी पिऊन त्यांनी तृषा भागवली. त्यांनी तिथे पडलेल्या त्या मृत माकडास तेथील धगधगणाऱ्या अग्नीत टाकले. त्याचे काही मिनिटात अंत्यसंस्कार झाले. तदनंतर त्यांनी तो अग्नी शांत केला. व त्या दोघी आपले साहित्य व शस्त्रे घेऊन पुढे दक्षिण कुंतल प्रदेशाकडे निघाल्या. उंच पर्वत श्रृंखला पार करत त्या दक्षिण कुंतल प्रदेशात असणाऱ्या नदी खोऱ्यात उतरल्या. व नदीतिराने चालू लागल्या. पुढे सुरक्षित पठारी मैदानात आल्यावर त्या दोघींनी जवळील पिशवीत काय मिळते का ते पाहिले.

त्यातील शिल्लक असणारे खाद्य पदार्थ खाऊन पाण्याच्या पिशवीतले पाणी पिऊ लागल्या. ते संपले होते. तेव्हा त्या पाणी पिण्यासाठी त्या नदीकाठी गेल्या. तेथे त्या पाणी पिऊन स्नान कर्मे आटोपली. आपली वस्त्रे धुवून नदीतील उघड्या खडकावर त्यांनी सुखावली. नंतर त्या पुढे निघाल्या. उंच टेकावर चढून त्यांनी सर्वत्र पाहिले. त्यांना आकाशात धूर दिसत होता. तिकडे न्याहाळत बांबू बेटाच्या सहवासात त्यांना वस्ती दिसू लागली. दासी दुश्यलेने सांगितलेल्या खाणाखुणांनुसार त्यांनी अंदाज घेतला. व त्या नदीतिराने निघाल्या. पुढे अरण्य संपण्या आधी एका ठिकाणी झाडाखाली आपल्या पिशव्या ठेवल्या. तिथे जवळच असणाऱ्या जाळीत त्रिशलाने अंबेस नेले. व आपल्या कापडी पिशवीत असणारी अपरान्त देशात घेतलेली काजळीची डब्बी काढली. व ती अंबालेस लावू लागली.

ते पाहून अंबाला, “ हे काय लावत आहेस.”

त्रिशला, “ ही कजळी आहे. एकदा लावली की एक पक्ष टिकते. तुझा गौर वर्ण मी याने लपवत आहे. तुला कृष्ण वर्णी बनवत आहे. कारण सर्व राजपाट गेला आहे. नाहक जीव गमवयला नको. आज तुला कृष्णवर्णी व्हावेच लागेल. अशा तऱ्हेने त्रिशला तिच्या अंगावर काजळी लावू लागली. अंबाला आपली गौरवर्णी त्वचा शेवटची न्याहाळत होती. तिच्या डोळ्यातून आपल्या माता पित्याच्या आठवणी जाग्या होऊन अश्रू गळत होते. त्रिशलेस ही वाईट वाटत होते. काही क्षणात तिने तिला कृष्णवर्णी करुन टाकले. आपला सर्व व्यवहार आटोपून अरण्यातील काही फळे खाऊन त्या दोघी पुढे मार्गस्थ झाल्या. कुंतल खोऱ्यातील वस्ती जवळून जाताना त्या प्रत्येक ग्रामी चौकशी करत होत्या. त्या शेवटी दुश्यलेचा भाऊ राहत असलेल्या पारधी वस्तीवर आल्या.तिथे आल्यावर त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की गतवर्षी आलेल्या महापुरात दुश्यलेचा भाऊ नदीच्या पाण्यात वाहून गेला. व वस्तीवरील त्याचे घरात आता त्याची वृध्द माताच राहते. तिचे नाव महदव्वा आहे. त्या दोघींनी आपली ओळख पटावी म्हणून ग्रामनायकास दुष्यलेने दिलेली निशाणी दाखवली. व आपण दोघी दुस्यलेच्या मुली आहोत. असे सांगून त्या दोघींनी आपल्यास ते घर दाखवण्याची विनंती केली. पारधी वस्तीवर आलेल्या या नवीन मुलींना आश्रय देण्याचे सर्व पारध्याने ठरविले. कारण सदर भाग हा त्यांना राहावयास महाराज जयवर्धन यांच्या कृपेने मिळाला होता. व त्या मुली असलेने त्यांनी लगेच त्यांना दुष्यलेच्या भावाच्या घरी पोहचवले. तिथे येताच तिथली अस्वच्छता पाहून अंबालेस शिषारी आली. पण आता तिला तेथेच राहावे लागणार होते.

आपल्या म्हातारपणात आपल्या रक्ताचे असे कोण तरी आपल्या सहवासात आले. याचा त्या वृध्द महदव्वेस खूप आनंद झाला होता. व ती सुखावली होती. पण जेव्हा तिला दुश्यला या जगात जिवंत नाही हे कळले. तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. तिने खूप शोक केला. आता आपल्याला या मुलींचा आधार आहे हे तिने जाणले होते. त्या दोघी तिथे राहू लागल्या. त्यांनी हळूहळू त्या घराचा कायापालट केला. अंबाला व त्रिशलेने ती मोहरांची थैली परसात गुप्त जागी लपवली. तसेच ती शस्त्रे ही. त्रिशला अंधाऱ्या रात्री न चुकता आंबेस कृष्णवर्णी बनवत होती.

त्या दोघी आता पारधी मुलीबरोबर रानात जात मद, लाख गोळा करत शेती करत जीवन कंठू लागल्या.

अधून मधून बाहेर गेलेले पारधी वस्तीवर आल्यावर राज्यातील वार्ता सांगत असत. एके दिवशी एक पारधी स्त्री सांगत होती. की महाराज जयवर्धन यांना युद्धात लढता लढता वीरमरण आले. व अश्मक खोरे ते राजधानी पर्यंत असणारा भाग शत्रूने जिंकून घेतला. उरलेला प्रदेश व दक्षिण कुंतल भाग शत्रूला नमवून प्रधान वेद दत्त यांनी जिंकला. व आता ते राजा झाले आहेत. व त्यांनी स्वतः चा राज्याभिषेक करून घेतला आहे. ही बातमी कळताच आंबलेस खूप दुःख झाले. पण तिने शोक आवरता घेतला. त्रिशलेन तिची समजूत काढली. रोज काही ना काही राजकीय घडामोड समजत होती. रानात काम करत त्या वृध्द महदव्वेसोबत त्या जीवन कंठू लागल्या. जे नाजूक हात रेशमी रुमालाने पुसत रोज पंचपक्वानांचे घास पोटात ढकलत. ते आता तेथील रानात कसत होते. त्रिशला तिला धीर द्यायची. अंबाला दिसावयास काळी असलेने तिचे सौंदर्य हे त्यात ही खुलत होते. त्या दोघी तिथे सुरक्षित होत्या.

पारधी लोकांत राहून त्या वेताच्या वस्तू तयार करणेस शिकल्या. एके दिवशी आंबलेने एक सुंदर वेताचा धनु बनवला. व अनेक शर तयार केले. तिला तिच्या गुरूकडून त्या शरावर लावायची औषधी कशी तयार करतात हे तंत्र माहीती झाले होते. ती औषधी तिने तयार केली. ते शर पिसे लावल्यास वेगाने संधान करू शकतात हे ती जानत होती. तिने रानातील पक्षांची पिसे गोळा केली. व त्या शराला लावली. व अशा प्रकारे तिने आपल्यासाठी व त्रिशलेसाठी एक असे दोन धनु बनवले. ते पाहून अनेक वृध्द पारधी तिचे कौतुक करत. त्या दोघींना अनेक पारधी मुले मागणी घालत. पण महदव्वा त्यांचे काही चालू देत नसे. त्या धाडशी असल्याने त्यांची छेड कोणी काढत नसे. कारण एकदा एका पारधी नवयुवकाने त्रिशलेची छेड काढली. त्या दोघींनी त्यास एका वृक्षास उलटे लटकावले. त्या क्षणापासून पारध्यांची मुले त्या दोघींपासून सावध राहत होती.

क्रमशः पुढे.....

Saturday, March 4, 2023

अंबाला भाग २३

 अंबाला भाग २३



क्रमशः पुढे चालू....

त्रिशला आता सावरली होती. तिच्या शरीरावरील वस्त्रे फाटली होती. तिला आधार देत अंबालेन उठवले. तेथील विशाल अशा झाडाला टेकून बसवले. तिची छाती दडपली गेल्याने सुस्कारे देत होती. किशोर अवस्थेतील जीवनातील कठीण प्रसंगाना त्यांना सामोरे जावे लागत होते. थोडावेळ सावरल्यावर अंबालेने त्या मृत युवकाच्या पाठीतील तलवार काढून घेतली. नंतर तिने ती जवळील नदीच्या डोहात स्वच्छ धुतली. नंतर स्नान करून त्रिशलाजवळ आली. आपले अंग त्रिशलेने आणलेल्या वस्त्रातील एका रुमालाने कोरडे केले. तदनंतर तिने आणलेला पेहराव्यातील एक पेहराव तिने परिधान केला. नंतर आपली वस्त्रे धुवून तिने घेतली. तोपर्यंत त्रिशला सावरली होती. ती ही फ्रेश झाली. नंतर त्या दोघींनी पिण्याच्या पाण्याची पिशवी भरून घेतली. व त्या दोघींनी आपले साहित्य उचलून घेतले. व पेठेतून आणलेलं खाद्य खात त्या पुन्हा अरण्य वाटेस लागल्या. अरण्यातील दक्षिण कुंतल प्रदेशाच्या दिशेने त्या निघाल्या. पुढे थोड अंतर चालून सुरक्षित ठिकाणी आल्यावर त्यांनी एके ठिकाणी विश्रांती घेतली. तिथे त्यांनी अल्पोपहार केला. तदनंतर त्या अरण्य वाटेने पुढे चालल्या. पश्चिम क्षितिजावर सूर्य अस्ताला निघाला होता. त्याचा अंदाज घेऊन त्याच्या विरुध्द दिशेने त्या निघाल्या होत्या. अरण्यातून चालून त्यांचे पाय बळकट झाले होते. या प्रवासात त्यांना अजिबात सुखासीन निद्रा भेटली नव्हती. सांज होईपर्यंत त्यांनी अपरांत सीमा पार करून त्या दक्षिण कुंतल प्रदेशात आल्या होत्या. तिथे यायला अंधार पडू लागला होता. ज्या ततलवारीच्या धाकावर त्या आपले रक्षण करत आल्या होत्या. तिचं त्यांची अंगरक्षक होती. आता रात्र झाली. त्यांनी तिथे सुरक्षित ठिकाणी मुक्काम करायचे ठरवले. आतापर्यंत अनेक रात्री त्यांनी अरण्यात काढल्या होत्या. पण ही दक्षिण कुंतल प्रदेशातील अरण्यात असणारी रात्र कंठने अवघड होते. कारण येथील अरण्य निबीड अन् हिंस्र श्वापदांनी भरलेली असल्याने तेथील रात्री अत्यंत भयावह असत. ती रात कंठने अवघड होते. त्या दोघींनी तेथील एका वटवृक्षावर रात्री विश्रांती घ्यायचे ठरवले. व त्या त्या वृक्षावर चढल्या. त्यांनी आपल्या साहित्याच्या पिशव्या त्या वृक्षाच्या ढोलीत सुरक्षित ठेवल्या. व कुठे जळावू समिधा मिळतात का? ते पाहू लागल्या.

त्यांना तिथे जवळच एक वृक्ष उन्मळून पडलेला दिसला. त्याच्या मुळाशी काही पाला गोळाकरून त्यांनी अग्नी प्रज्वलीत केला. त्रिशलेने पेठेतून आणलेल्या शिद्यामध्ये असणारे काही हरभरे व काही जोंधळे तिने आपल्या थैलीत ठेवले होते. ते काढून तिने जाळावर भाजले. व अंबालेस दिले. व थोडे तिने खाल्ले. तसेच रानातून वावरताना मिळालेली काही रानफळे देखील त्यांनी खाल्ली. व पेटपुजा झाल्यावर तिने तो विस्तव त्या मृत उन्मळलेल्या झाडाच्या मुळाशी टाकला. त्याने ते हळूहळू धुमत पेटू लागला. ते पेटल्याचे पाहताच त्या विशाल वटवृक्षावर चढल्या. रात्र आता चांगलीच झाली होती. जवळ असणारी कातडी पिशवी हाच काय तो पिण्याच्या पाण्याचा आधार होता. पण रात्र जशी होऊ लागली तशी हिंस्र श्वापदे तिथे फिरू लागली. पण अग्नीच्या भीतीने ती जवळ फिरकत नव्हती. पण काहीं माकडे या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत आली. वाकुल्या दाखवत कर्ण कर्कश आवाज करत ती या फांदीवरून त्या फांदीवर नाचू लागली. ती वृक्षावर थैमान घालत त्यांजवळ आली. तशी अंबाला अन् त्रिशला अरुंद धारदार तलवारी उपसून संरक्षणासाठी सिद्ध झाल्या. व एकमेकींना खेटून झाडाच्या बुध्यावर असणाऱ्या रुंद फांदीवर उभा राहिला. व आपला तोल जाऊ नये म्हणून त्यांनी फांद्यांचा आसरा घेतला. दिवसभर चालून संपूर्ण देह थकला होता. त्यामुळे त्यांच अंग चांगलच ठणकत होत. परंतु आता ही वेळ निद्रा घेण्याची नव्हती. त्यांच्या पुढे आपल्या दाताच्या वाकुल्या दाखवत भुभूंकार करत माकडे मर्कट चेष्टा करण्यास आली होती. त्यांनी त्यांच्या देहयष्टीवरून ओळखले होते की या दोघी स्त्रिया आहेत. त्या कारणे त्यांना अधिकच उत आला होता. ती वेगाने त्या वडाच्या झाडावर आलीत. त्या किर्र काळोख्या रात्री अंधारात तो वडाचा निसर्ग किल्ला लढवण्यास त्या दोघी सिद्ध झाल्या होत्या. माकडे एकामागून एक त्या वडाच्या पारंब्याना खेळत झाडावर चढली. व त्यांनी एक एक फांदी हेरण्यास सुरवात केली. अचानक एका माकडाने एका पारंबीच्या साहाय्याने त्यांच्या पुढ्यात उडी टाकली. तशी ती त्रिशलेच्या पायात पडली. त्रिशलेने क्षणाचाही विलंब न करता त्यास जोरदार लात मारली. एखादा वाटोळा भोपळा उंचावरून खाली पडावा तस ते पडलं. ते पडल्यावर ओरडले. तशी इतर माकडे त्यांच्याकडे खुणसी नजरेने पाहू लागली. तेवढ्यात एका माकडाने पारंबीच्या सहाय्याने झेप घेतली व अंबालेच्या दंडास वाकोरा काढला. व शेजारील फांदीवर जाऊन ते नाचू लागले. आपली खोडी यशस्वी झाली हे पाहून त्यास आणखी जास्तच चेव चढला. व पुन्हा ते पारंबीच्या साहाय्याने झेपावले. आता मात्र अंबा सावध होती. तीने आपल्या हातातील तलवारीने त्याच्या हातात असणारी पारंबी कापली. पारंबी तूटताच त्या माकडास आपण केव्हा जमिनीवर आदळलो हे लक्षातच आले नाही. एकाने तर थेट आंबेच्या अंगावर उडी मारली. त्याने आंबेचा तोल गेला. खाली पडणार इतक्यात तिने पारंबी धरली. त्या माकडाचा ही तोल जाऊन त्याने तिचे केस धरले. व ते लोंबकळू लागले. तिच्या तोंडातून वेदनेने एक कळ आली. ते त्रिशलेच्या लक्षात येताच चपळाईने तिने त्याची बोटे छाटली. ते रप्प दिशी खाली पडले. माकडांचा हल्ला त्या दोघी शांत डोक्याने एखादा उठाव योजनांबद्धरित्या मोडावा तशा त्या मोडत होत्या. अन् त्यांना या कामी साथ देणार कोण असेल तर ते शेजारी असणाऱ्या मृत वृक्षामध्ये धगधणारी अग्निदेवता.

क्रमशः पुढे........

Friday, March 3, 2023

अंबाला भाग २२

 

अंबाला भाग २२



क्रमशः पुढे चालू.....

आतमध्ये आल्यावर त्रिशलेने आपल्या कमरेला असणाऱ्या रुमालात बांधलेले ते सुवर्ण नाणे त्यापुढे सादर केले.

त्रिशला, “ महाशय ही घ्या पहा.”

ते नाणे न्याहाळून तो सोनार तीस म्हणाला, “ हे जरा खराब झाले आहे. तेव्हा मी तुला करून योग्य तो धातू दर देईन.”

त्रिशला, “ हो चालेल. पाहा करून.”

तिचे म्हणणे ऐकताच त्याने तो सुवर्ण शिक्का घेतला. त्याची तुला केली. व त्याची किंमत त्याने वीस तांब्याचे सिक्के अशी केली. तेव्हा तिने आश्चर्य मुद्रेने त्याकडे पाहिले. व ती म्हणाली, “ महाशय, या नाण्याचे मूल्य अपरांत देशी किमान ऐंशी ताम्र सिक्के आहेत. आपण शुद्ध मला फसवताय. मला माझे नाणे इथे विकावयाचे नाही. तेव्हा आपण ते परत द्या.” ती ते घेऊन बाहेर निघणार तोच तो म्हणाला “सदर नाण्यावर कुंतल देशाची मोहोर आहे. ज्या कारणे ती इथे खपणे अत्यंत अवघड आहे.”

त्रिशला, “ते माझं मी पाहीन.”

ती जातेय ते पाहून त्याने चाळीस ताम्र सिक्के देतो असे सांगितले. तेव्हा त्रिशला त्यास म्हणाली, “सत्तर सिक्क्यांच्या खाली एक छदाम कमी करणार नाही.”

 तेव्हा त्याने ते मान्य केले. व सत्तर ताम्र शिक्याचे बदल्यात तिने ते नाणे त्यास विकले. व मिळालेली रक्कम घेऊन ती त्या सुवर्णकार देवडीतून बाहेर पडली. मनातल्या मनात त्यास तिने अनेक दूषणे दिली.

“ कर्का पेक्षा ही कटू आहेत अपरान्त वासी.”

असे बोलून ती पेठेतून फिरू लागली. पेठेत फिरून तिने काही साधी सुती वस्त्रे खरेदी केली. तसेच तिने थोडा सिधा खरेदी केला. व पेठेतून आपल्याला काय हवे काय नको ते ती पाहू लागली. मनमोकळ्यापणाने खरेदी करत तिने मिठाई पेठेतून काही मिठाई खरेदी केली. आता स्वसंरक्षणासाठी काही शस्त्र हवी होती. ती लोहार पेठेत गेली. तिथून तिने धारदार लहान शस्त्र खरेदी केली. लोहाराने चौकशी करताच ती म्हणाली, माझ्या ग्रामी भुरट्या चोऱ्या होतायेत. तेव्हा संरक्षण करण्यासाठीं त्याची आवश्यकता आहे. व तिने ती खरेदी केली. व पुढे ती तेथून आलेल्या वाटेने बाहेर पडली. व थेट अरण्यात जिथे अंबाला थांबली होती तिथे आली. तिथे आल्यावर तिने पाहिले की अंबाला तिथे नाही आहे. तेव्हा ती काळजीने इकडे तिकडे शोध घेऊ लागली. आपल्याकडील साहित्य तिने एका जाळीत लपवले व ती शोध घेऊ लागली. इतक्यात तिच्या खांद्यावर मागून येत कोणीतरी हात ठेवला. ती थोडी दचकली. तिने मागे वळून पाहिले. तर तिच्या मागे एक काळसर रंगाचा एक युवक उभा होता. त्यास झिडकारून ती थोडी मागे सरली.

त्याच्या देहावरील पेहराव व रंग कांती पाहता तो इथलाच असावा हे तिने जाणले. अचानक तिच्या लक्षात आले. की ती जेव्हा पेठेत वस्त्रे खरेदी करत होती. तेव्हा हा तिथे होता. व आपल्या मागे हा आला आहे हे तिने हेरले. तो पुढे पुढे येत आहे हे पाहताच ती त्यास म्हणाली, “ कोण आहेस तू? व असे माझ्या मागे येण्याचे प्रयोजन काय?”

 तो तरुण हसू लागला. इतक्यात झाडीतून त्याचे आणखी दोन साथीदार आले. व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्रिशलेस पकडले. त्रिशला प्रतिकार करू पाहत होती. पण बेसावध होऊन त्यांनी तिला पकडले होते. व खूप चालल्याने व श्रमहार झाल्याने तिचे शरीर थकले होते. व ते खूप आडदांड होते. त्यांनी तिला घट्ट पकडले होते. तिने अंबा म्हणून हाक मारली. जवळच रानात खूप भुकेने व्याकूळ अंबा रानफळे गोळा करत होती. तिला त्रिशलेची हाक ऐकू आली. तिने आपल्या उपरण्यात घेतलेली फळे टाकून धावतच ती तिकडे आली. तिने पाहिले तिन तरुण त्रिशलेवर जबरदस्ती करत आहेत. तिने चपळाईने हालचाल केली. व त्या युवकांना जराही सावध होऊ न देता आपल्या तलवारीने हल्ला चढवला. पहिल्या घातक वाराने तिने एकास जागीच ठार केले. दुसऱ्याचा एक हात तुटला. तो बाजूस झाला. तिसऱ्यास सावध होऊ न देता तिने त्याचा कंठ छेद केला. एकच रक्ताची चिळकांडी उडाली. त्याचे मुंडके धडा वेगळे झाले. व कदंब थरथरू लागले. ही थरारक झटापट पहाता तो तिसरा युवक घाबरून पळू लागला. पण त्यास सोडणे धोक्याचे होते. अंबालेने वेगाने चपळाई दाखवत त्याचे पाय मारले. व नंतर त्याच्या पाठीत तलवार खुपसून त्यास ठार केले. तो सोडण्यासाठी विनावत होता. पण त्यास सोडणे म्हणजे आपले जीव धोक्यात घालणे होत. म्हणून अंबेने त्यास ठार केले.

क्रमशः पुढे.......

अंबाला भाग २१

 अंबाला भाग २१




क्रमशः पुढे चालू......

अचानक महाराज जयवर्धन यांची ग्रहदशा फिरली. व कुंतल देशावर शत्रू चालून आले. राज्याच्या उत्तर सीमेवर असणाऱ्या गंगेश व राजा नागदुर्ग यांनी संगनमताने कुंतल प्रदेशावर हल्ला केला. त्याचा बीमोड करण्यासाठी महाराज जयवर्धन व प्रधान वेददत्त गुंतलेले असताना याच घडीचा फायदा घेण्याचे अपरान्त देशाच्या राजा वैष्णवदत्त याने ठरविले. त्याने दक्षिण कुंतल प्रदेशातील नगर नायक व त्याचा नातलग आचार्य वृषभ यांच्याद्वारे बंडखोरी करून आणली. व आपले काही सैन्य घुसवून त्याने राजधानी वर आक्रमण केले.

अचानक झालेल्या हल्ल्यास तोंड देण्यासाठी महाराणी अरुणावतीनी नगरवाशी सैन्य व काही लोकांच्या सहकार्याने राजधानीच्या संरक्षणाची तयारी चालवली. त्यांनी जातीन नगर तट्टावर पहारा बसवला. याने जोरदार रणकंदन सुरू झाले. आचार्य वृषभ यांचे शिष्य युद्ध कलात तरबेज असल्याने त्यांनी राजधानी नगराची शिबंदी फोडली. व प्रधानाच्या वाड्यावर हल्ला चढवला. व त्यांनी प्रधान पत्नीस कैद केले. व त्यांनी सरळ राजवाड्यावर हल्ला केला. राजवाड्यात जोरदार रणकंदन सुरू झाले. राजवाड्यावर हल्ला होताच महाराणी दासी दुश्यलेस राजकुमारीला राजवाड्याबाहेर सुरक्षित काढण्यास सांगतात. व स्वतः हाती तलवार घेऊन लढू लागतात. राजकुमारीस घेऊन तसेच त्रिशलेस घेऊन दासी दुष्यला गुप्त मार्गे जाऊ लागली. जाताना ती राजकुमारीच्या गळयात आपल्या गळ्यातील पारधी दैवत असलेली चैन घालते. व काळजी घ्या अस सांगत तिला गुप्त मार्गे नेऊ लागली. जाताना अंबाला तिला म्हणाली, “ आपण मागे फिरू लढू शत्रू संगे.”

दुश्यला, “ ते एवढं सोप नाही. व आपले सैन्य देखील युद्धात गुंतले आहेत. व हे आक्रमण राज्याचा नाश करणारे ठरू शकते. इथली काळजी न करता तुम्ही इथून सुखरूप जाणे गरजेचे आहे. इथून तुम्ही बाहेर पडल्यावर वेशांतर करून दक्षिण कुंतल प्रदेशातील अरण्य आश्रयाने राहावे. व नंतर परचक्र नाही शमले तर वेशांतर करून दक्षिण कुंतल प्रदेशातील पारधी वस्तीत माझा भाऊ राहतो त्याचे नाव सुपर्ण आहे. जो मदिरापन करणार आहे. त्यास तुम्ही माझी कन्या आहात हे सांगा. व आश्रय मिळवा. पण सावधगिरीने राहावे. वेळ पडल्यास गौरवर्णीय कांती काजळी लावून झाकावी. सोबत त्रिशला आहेच. पण शत्रू पासून सावध रहा.”

त्या तिघी गुप्त मार्गे तिकडे जाऊ लागल्या. जातेवेळी अरण्य मार्ग बंद असल्याने दुश्यलेने त्या दोघींना पाण्याच्या मार्गे जाण्यास सांगितले. जो नगरा बाहेरील एका तळ्यामध्ये निघत होता. त्या मार्गे त्याना जाण्यास सांगून ती जाताना एक मोहरांची थैली त्यांकडे देत,

“ परमेश्वर कृपा झाली तर पुन्हा भेटू. त्रिश्रला आता अंबालेची काळजी तुलाच घ्यावी लागेल.” असे बोलून तीने त्यांना पाठवले. व शत्रू दिशाभूल करण्यासाठी अरण्य गुप्त मार्ग तिने उघडला. तोपर्यंत राजमहालात रणकंदन झाले. महाराणी अरूणावतींना लढता लढता वीर मरण आले. व शत्रू गुप्त मार्गात शिरले. त्रिशलेने अंबालेचा हात धरला. व तिला खेचत तिने त्या पाण्याच्या गुप्त मार्गे ती घेऊन गेली. दुश्यला गुप्त मार्ग उघडतं असताना शत्रू सैन्य तिथे आले. ती त्यांशी लढू लागली. तेथे पडलेल्या मृत सैन्याच्या भाल्याने तिने पाहता पाहता चार शत्रू सैन्य ठार केले. व ती गुप्त मार्गे बाहेर पडत असताना शत्रू सैन्याचा शर तिला लागला. त्यांच्याशी लढताना तिला वीरमरण आले.

…… …… ….. ….. …. ….. ….. ….

महालातील गुप्त मार्गे पाण्यातून वाट काढत अंबाला व त्रिशला बाहेर एका तलावात पडल्या. तो तलाव नगरा बाहेर एका अरण्याजवळ निघत होता. त्या दोघी थेट अरण्यात शिरल्या. व त्या कुंतल देशाच्या दक्षिण प्रांती असणाऱ्या निबीड अरण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. अरण्यात असणाऱ्या काट्या कट्यातून जात त्या पुढे चालल्या. शत्रू सैन्यास चकवून त्या पुढे निघाल्या. जवळ असणारी मोहोरांची थ्यैली ही पुढील निर्वाह करण्यास मदत करणार होती. ती सांभाळणे व राजकुमारी चे संरक्षण करणे व ती शत्रू सैन्यास दिसणार नाही ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्रिशलेवर होती.

त्या दोघी त्या हिंस्र श्वापदांनी भरलेल्या निबीड अरण्यातून मार्ग काढत वाटेत मिळणारी फळे व कंदमुळे खात त्या दोघी अरण्यातून निघाल्या. पुढे त्यांना एक नदी लागली. जी अरण्यातून वाहत होती. तिच्या झुळझुळ पाण्यात स्नान करून त्यांनी जळ प्राशन केले. अरण्यातून चालून थकल्याने त्यांनी तिथे एका वृक्षाखाली विसावा घेतला. अचानक तिथे एक सर्प हजर झाला. त्यास पाहून त्रिशला घाबरली. अंबाला ने पाहता पाहता त्याचे तलवारीने तुकडे केले. थोडा वेळ विसावून त्या पुढे निघाल्या. अरण्यातून जाताना येणाऱ्या कडू गोड आठवणींचा अनुभव घेत त्या पुढे निघाल्या. अंधाऱ्या रात्री सुरक्षित अशा ठिकाणी निवारा घेत त्या अरण्यातून त्या दोन किशोर वयीन मुली , ज्या वयात लाजत मुरडत साज शृंगार करत फिरावे त्या वयात जीवन प्रवासात तारुण्याच्या उंबरठयावर अरण्य प्रवासात येणारे अनुभव घेत धीट होत चालल्या होत्या. पुढे त्या सह्यगिरी श्रृंखला पार करून अपरांत हद्दीत गेल्या. तिथे पुढे एक मोठे ग्राम लागले. शत्रूच्या हद्दीत व निबीड अरण्यास लागून ते ग्राम असल्याने शत्रू सैन्याचा तिथे राबता नव्हता. ज्याने त्यांस धोखा नव्हता. व शत्रू त्यांना तिथे शोधणे शक्य नव्हते. तेथील ग्रामाबाहेर असणाऱ्या अरण्यातील एका विशाल वृक्षावर आंबलेस थांबवून त्रिशलेने तिच्याकडील थैलितील तिने एक सुवर्ण मोहोर घेतली. ती एक सिक्का असणारी होती. ती तिने अरण्यातील एका दगडावर ठेवून ठेचली. ज्याने तिच्यावरील खूणा अस्पष्ट होतील. तदनंतर ती पुढे त्या विशाल ग्रामाकडे निघाली. तिथे जाताना कुठे शिपाई वा सैन्य नाही याची खात्री करुन ती पुढे उंच जंगल झाडीकडून त्या ग्रामी शिरली. चौकशी करत ती पुढे निघाली. तेथे असणाऱ्या सोनार पेठेची चौकशी तिने केली. तेव्हा तिला एका व्यक्तीने दक्षिणेकडे बोट करत त्या दिशेला असल्याचे सांगितले.

ती पुढे चालत गेली. पुढे कोपऱ्यावर असणाऱ्या पाणक्याशी लाघवी बोलत तिने दागिने बनवणाऱ्या सोनाराची चौकशी करताना तिला त्याकडून समजले की सोनारपेठेत कोणता सोनार व्यवहारी चांगला व वाईट आहे ते.

व ती पुढे निघाली. सोनारपेठेत असणाऱ्या मध्यभागी एका कंजूस सोनारकडे ती मोहोर घेऊन गेली. बाहेरून सोनार देवडीचे तिने निरीक्षण केले. ज्या सोनाराकडे जाऊ नको असे सांगितले होते. त्याकडेच तिने ती मोहोर विक्री करण्याचे ठरवले. व ती त्या सोनार देवडीच्या आत मध्ये गेली. तिथे गेल्यावर…

त्रिशला, “ कोण आहे का?”

देवडीच्या आत कारागिरी करणारा सुवर्णकार बाहेर तिचा आवाज ऐकून आला.

सोनार, “ काय काम आहे. अलंकार हवेत का?”

त्रिशला, “ मी जवळील ग्रामातील एक रहिवाशी असून माझे पिता कुंतल देशात एक कारागीर आहेत. काही महिन्यांपूर्वी ते इथे आले असता त्यांनी मज उदरनिर्वाह करण्यासाठी काही धन दिलेले होते. त्यातील ही एक मोहोर, ती मज विकावयाची आहे. तिचे योग्य मूल्यमापन करावे. अन् योग्य ती रक्कम द्यावी.”

गिऱ्हाईक आल्याचे पाहून त्या सोनाराने तिला आतमध्ये बोलावून घेतले.

क्रमशः पुढे......


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...