Friday, February 17, 2023

अंबाला भाग १७

 अंबाला भाग १७



क्रमशः पुढे चालू......

महारुद्र आता चांगलाच मोठा झाला होता. तो धनुर्विद्येत निष्णात झाला होता. परंतु त्यास आपल्यात काहीतरी कमीपणा जाणवत होता. त्याला तो भयानक प्रसंग आठवला की त्याच्या अंगावर काटा येई. व डोळ्यात अंगारे फुलत असत. अन् मन बदला घेण्यासाठी पेटून उठत होते. त्यासाठी तो सराव करत असे. आता तो खूप मोठा झाला होता. रानात जाणे, वेगवेगळी औषधे जमवणे, शेत कामात मदत करणे , तसेच नगरात जाणे, अशा प्रकारे तो सर्व व्यवहार करू लागला.

उत्तर कुंतलात राजधानी पासून जवळ असणाऱ्या महादेव मंदिरात दरवेळी एक मोठा उत्सव भरत असे. प्रांता प्रांतातून अनेक शैवपंथी लोक येत असत. अनेक भगवाधारी लोकांची तर जत्राच उतरे. मोठा महाशिवरात्रीचा उत्सव तेथे भरत असे. भिल्लमाने देखील महारुद्रास शिवदर्शनास घेऊन जायचे ठरवले. तो आपल्या वस्तीवरील भिल्ल बांधवांना घेऊन महादेव दर्शनास निघाला. पायी मजल दरमजल करत प्रवासात कुठे निवारा भेटेल तिथे थांबत. तसेच धर्मशाळेत थांबत ती पुढे चालली. पुढे त्यांना कुंतल प्रदेशातील एक विशाल तटिनी किनारी आली. महादेवाचे तीर्थक्षेत्र जवळीच एका नगरात होते. त्या सर्वांनी वाटेत त्या नदीकिनारी आल्यावर स्नान केले. तेथे अनेक प्रांतातून साधूंचे जथ्थे आलेले होते. महादेव नगरकडे त्यांच्या व लोकांच्या अनेक रांगा लागल्या होत्या.

भिल्लम व त्याच्या सहकाऱ्यांनी नदीत स्नान संध्या करून ते नदीपार आले. जंगल वाटेने पुढे मुख्य मार्गावर आले. तो मार्ग महादेव मंदिर असणाऱ्या नगराकडे जात होता. उत्सवामुळे अनेक लोकांची यातायात होती. पुढे ते थोड्या वेळातच नगरात पोहोचले. हिरव्या गर्द झाडीत असलेल्या नगरात पुष्कळ लोकांची गर्दी जमली होती. वाद्ये वाजत होती. अनेक स्त्री पुरुष साजशृंगार करून महादेव दर्शनास आली होती. पेठेमध्ये अनेक दुकाने सजली होती. जवळच मंदिरास लागून असलेल्या सदावर्तेत भोजन व्यवस्था केली होती. महाराजांनी दर्शन घेतल्यानंतर यात्रेस जोर चढत असे. तोपर्यंत इतरांना दर्शनास मज्जाव होता. महाराज प्रभातीच दर्शन घेऊन राजधानीस गेले होते. त्यामूळे इतर लोकांची दर्शनास रांग लागली होती. भिल्लमाने महारुद्र व आपल्या सहकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले. व तो पेठेमध्ये आला. महारुद्र खूप आनंदात होता. कारण त्याने यापूर्वी कुंतल प्रदेशातील दक्षिण भगातील गर्द झाडी शिवाय काही जास्त पाहिले नव्हते. आज त्यास उत्सवामुळे खूप काही पाहायला मिळाले होते. उत्सवात फिरून दिवसभर त्याने उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला व संध्याकाळी तो आपले वडील व वस्तीवरील लोक जिथे थांबले होते तिथे आला. भिल्लमास त्याची काळजी वाटत होती.त्या दिवशी त्यांनी अन्नछत्रात जेवण केलं. व रात्री धर्मशाळेत विश्रांती करायचे ठरवले. पण तेथे खूप गर्दी असल्याने त्यांनी बाहेर पाल मारून राहणे पसंत केले. त्या रात्री मंदिर प्रांगणात चौकावर नृत्य कार्यक्रम असल्याने ती रात्र त्यांची तो पाहण्यात जाणार होती. अनेक लोक तो कार्यक्रम पाहण्यात घालवणार होते. रात्र झाली. सर्वांनी जेवण केले. सर्व जण तेथे आले. तेथे मंचकावर यक्षिणी हजर झाल्या. सैनिकांच्या पहार्यार्त नृत्याचा व गायनाचा कार्यक्रम सुरू झाला. यामधे प्रथम गणेश वंदन, तदनंतर शिवलीला, तद नंतर भिलिनीची कथा नृत्यातून सांगण्यात येत होती. भिल्ल थोड्या अंतरावर बसले होते. महारुद्र बाजूला आपल्या वर्गातील मुलांत बसून नृत्य पहात होता. नृत्याचा आनंद अनुभवत होता.

महाराज जयवर्धन दुसऱ्या दिवशी पूर्व प्रांतातील बंडखोरांना शासन करण्यास जाणार असल्याने ते नृत्य महोत्सवास जाणार नव्हते. यासाठी महाराणी अरुणावती कार्यक्रमास हजर राहणार होत्या. सुरक्षा कारणास्तव महारानींनी तिथे महोत्सवात राजकुमारी अंबालेस नेले जाणार नव्हते. कारण राज्यातील व राज्याबाहेरील अनेक लोक तिथे आलेले होते. त्यात एखाद्या शत्रू राज्यातील हेर ही असू शकतो. या कारणे अंबालेस मज्जाव केला होता. त्यामुळे यक्षिणी नृत्य पाहण्याच्या आंनादावर विरजण पडले होते. राजकुमारी आपल्या महालात तळमळू लागली. तिची ही तळमळ त्रिशलेस दिसत होती. पण तिचा नाईलाज होता. कारण महलाबाहेर व तेथे शिव मंदिर नगरात ही कडक पहारा होता.

राजकुमारी अंबालेने तरीदेखील तिथे जायचे ठरवले. त्यासाठी धाडस करायचे त्रिशलेने ठरवले. .

राजप्रासादातील आपल्या कक्षातील दिवे राजकुमारीने मालवले. व आपल्या दास्यांना तिने कक्षाबाहेर घालवले. व प्रात. सूर्योदयापर्यंत कोणीही कक्षात यायचे नाही व तिने त्याना बाहेर घालवले. थोडा वेळ झोपेचे नाटक केले. नंतर त्या दोघींनी सर्वत्र सामसूम झाल्याचे पाहिले. व त्या स्नानगृहात आल्या. तेथील चुलीवरील भांड्यांची कालिक त्रिशलेने काढली व ती अंबालेच्या हातापायावर लावली. ते पाहून राजकुमारी म्हणाली, “ त्रिशले याची काही आवश्यकता आहे का?”

त्रिशला, “ होय, कारण आज तेथे सक्त पहारा आहे. व तुला पहारेकरी सहज ओळखतील तेव्हा…”

अंबाला, “ पण या कालिकेने माझे सौंदर्य बिघडेल त्याचे काय. मजकडे कोणी पाहणार देखील नाही.”

त्रिशला, “ तुला या रंगात जो कोणी पसंत करेल तोच तुझा राजकुमार समज. नाहीतर गोरी कातडी पाहिल्यावर अनेकजन भाळतात. खर प्रेम तुला या रंगातच भेटेल. यातच कोणतरी पसंत करेल तुला.”

राज कुमारी अंबाला, “ पण आज रात्री अंधारात कोण पाहिलं. व आपण तर यक्षिणी गान पाहणार आहोत.”

त्रिशला, “ राजमहालात अनेक ललना नृत्य करणाऱ्या असताना तुम्हास तिकडे का जावे वाटते.”

अंबाला, “ इथे सर्व नतमस्तक असतात. बाहेर सर्व खुले असते. त्यातील कौतुक काही औरच असते.”

त्रिशला राजकुमारीच्या अंगावर कालिक लावते. व त्या दोघी नेहमीप्रमाणे त्या गुप्त मार्गातून बाहेर पडून त्या नगरात गेल्या. मंदिर प्रांगणात शिपायांची नजर चुकवून त्या एका छोट्या आळीतून तेथे गेल्या. तेथे कोठे जागा भेटते क ते पाहू लागल्या. राजकुमारीच्या कृष्ण कांतीमुळे कोणीही जवळ बसन्यास जागा देईना. शेवटी त्या एका बाजूस जाऊन बसल्या. व नृत्य पाहू लागल्या. नृत्याचा आनंद घेऊ लागल्या. नृत्य करणारी नर्तिका यक्षिणी असलेने तिचे नृत्य कधीही महालात होत नसे. ती देवसेवेशी संबंधित होती. अशा अनेक यक्षिणी राज्यातील तेथील अनेक ग्रामात असत. त्या देवी नृत्य सादर करत. देवसेवा करत. त्यांचे नृत्य हे रजनर्तिकींपेक्षा सरस असे. अंबाला शेजारी अनेक निमवर्गातील स्त्रिया बसल्या होत्या. नृत्य पाहताना एक खांबनी अडवी येत होती. त्या कारणे नृत्य पहाण्यात व्यत्यय येत होता. अंबाला तेथून उठली व मागे गेली. तिथे एका कट्यावर छोटीशी जागा होती. तिथे जाऊन बसली. व नृत्याचा आनंद घेऊ लागली. थोड्या वेळाने तिच्या जवळ त्रिशला आली. व दोघी यक्षिणी गान ऐकू लागल्या. तीन प्रहर होताच घंटा नाद झाला. त्रिशला तिला चलण्यास खुणावू लागली. पण अंबाला ऐकेना. त्या दोघींची खुसर फुसर एकूण तिथे जवळच मुलात बसलेल्या महारुद्रास कार्यक्रम पहाताना त्रास होऊ लागला.

क्रमशः पुढे,....


अंबाला भाग १६

 अंबाला भाग १६



एके दिवशी नगरातून फिरत असताना राजकुमारी अंबालेस एका ठिकाणी दोन गडगंज असे पहिलवानासारखे धिप्पाड देहाची दोन माणसे एका अबला स्त्रीस बडवत वेशा व्यवसाय करणेसाठी घेऊन जात होते. तेव्हा आंबालेने त्यास पाहिले. व जवळून जाणाऱ्या पांथस्थाकडे चौकशी केली असता तो त्यांना म्हणाला, “ सदरहू स्त्री ही एका शेतमजूराची असून त्याने विवाहासाठी काढलेले रीन फेडले नाही. याकारणे रिन देणाऱ्या इसमाने आपले दोन गावगुंड पाठवून दिले. व ते त्याच्या पत्नीस ओढुन घेऊन निघालेत या नगरा बाहेरील गणिका म्हणजे वेश्या वस्तीत त्या स्त्रीस त्यांनी विकले. आहे व त्यासाठी तिला ते घेऊन जात आहेत.

आंबालेस हे समजताच तिला या गोष्टीचा खूप राग आला. व राज्यातील चाललेला गदारोळ व रयतेचे दुःख तिच्या लक्षात आले. सदर स्त्रीस सोडवणे हेच प्रयोजन मनात धरून ती त्यांच्या मागोमाग. निघाली. पेठेतील अनेक लोक तिच्याकडे दयाळू नजरेने पाहत होती. त्या स्त्रीस सोडवणेसाठी ती पाठोपाठ निघाली. तेवढ्यात तिचा हात धरुन त्रिशलेने थांबवले. व ती म्हणाली, “ आपणास त्यांना अडवने शक्य नाही. व आपण इथे जास्त काही हालचाल करू शकत नाही. जर काही आगळीक केली तर असे पितळ उघड होईल. तेव्हा शांतपणे राहणे योग्य.”

अंबाला मात्र त्या स्त्रीस सोडणुकीसाठी धडपडत होती. तिची तीव्र इच्छा झाली होती. तिने त्रिशलाचा हात झटकला व त्या दोन पहिलवाना पाठोपाठ ती जाऊ लागली. ते त्या स्त्रीस मारत झोडत घेऊन चालले होती. त्याने त्या स्त्रीचे अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. तिच्या अंगावरील वस्त्रे जागोजागी फाटलेली होती. पेठेच्या शेवटी गवळीवाडा लागत असे. गवळी वाड्यातून पुढे गेल्यावर वेशावस्ती लागत असे. सदर स्त्रीस ते गवळीवाड्याच्या अरुंद गल्लीतून घेऊन निघाले. अंबाला त्या स्त्रीस सोडवू इच्छित होती. पण तिला काय करावे सुचेना. तेव्हा तिने पाहिले की गवळीवाड्यात एका ठिकाणी एक पोळ एका खूंटिस बांधला होता. जो सारखे आपले दावे सुटावे म्हणून तडफडत होता. अंबालेने धाडसाने नजर चुकवून कमरेची कट्यार घेऊन त्या पोळाचा दोर कापला. दावे कापताच तो पोळ त्या अरुंद वाटेने धावू लागला. गवळी वाड्यात जोराचा गलका झाला. तो पोळ थेट त्या स्त्रीला ओढत नेणाऱ्या त्या दोन पहिलवानांच्या दिशेने निघाला. वाटेत येणारे सर्वजन इकडे तिकडे धावू लागले. पाठीमागे चाललेला कल्लोळ पाहून त्या दोन पहिलवानांनी मागे पाहिले. इतक्यात तो पोळ त्यांजवळ आला. त्याला पाहून त्यांनी त्या स्त्रीस सोडले. व ते धावू लागले. त्या पोळाने त्या दोघांना चांगलेच गवळीवाड्याच्या शेवट पर्यंत पळवले. या परिस्थितीचा फायदा त्या स्त्रीने उचलला. व ती धावू लागली. पुढे पेठेत आल्यावर तिला त्रिशलेने थांबवले. व तिचा हात धरून तिने तीस नदीकडे नेले. वाटेत अंबाला त्यांना येऊन भेटली. त्यांनी तिची विचारपूस केली. व तिचे ऋण विचारले. तिने सांगितलेल्या द्रव्या इतके शिक्के तिला दिले. व तिचे कौशल्या विचारले. ती स्त्री सुंदर बांबूच्या वस्तू बनवत होती. तेव्हा तिच्या व्यवसायासाठी तिने आणखी काही सिक्के दिले. व त्रिशलेस सोबत पाठवून ऋण फेडून तिची व्यवस्था लावणेस सांगितले. व ती पुढे अरण्याकडे गेली. त्रिशला ते काम करून अरण्यात अंबाला जिथे थांबली होती तिथे आली. नंतर त्यांनी इकडील तिकडील अंदाज घेतला. व त्या गुप्त मार्गात शिरल्या. व महालात आल्या. अंबाला व त्रिशला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा नगरात त्या मार्गाने वेशभूषा पालटून जात असत

….. ….. ….. ….. …..

क्रमशः पुढे....


Saturday, February 11, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १५

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १५



असे बोलून त्या पुन्हा मागे फिरल्या व महालाच्या आतमध्ये आल्या. येताना तो गुप्त दरवाजा त्यांनी नीट बंद केला. गवाक्षाची जाळी नीट त्यांनी आत आल्यावर लावली. व दालनात आल्यावर आपापल्या जागी त्या निद्रिस्त झाल्या. आता त्या दोघींना दुसऱ्या मार्गाविषयी उत्सुकता लागली. त्याविषयी जाणण्याची जिज्ञासा जागृत झाली. त्या दोघी योग्य संधीची वाट पाहू लागल्या. व एके दिवशी तो योग चालून आला. त्या दोघींनी एके दिवशी रात्री त्या मार्गाने पुन्हा जाऊन त्या मार्गाचा शोध घेतला. त्यांना तो मार्ग नगराजवळील एका जंगलात निघत असल्याचे आढळले. तो राजधानी पासून जवळ असलेल्या एका नगरा जवळील जंगलात एका जाळीत निघत होता. तेथून थोड्याच अंतरावर राज्यातील एक छोटे नगर होते. ते एक धार्मिक नगर होते. तेथील पेठ लहान जरी असली तरी राजधानी पेक्षा मोठी उलाढाल तेथे होत होती. राजकुमारीला तो गुप्त मार्ग माहीत झाल्याने ती आता सहज राजमहालाबाहेर जाऊ शकत होती. ती आता योग्य संधीची वाट पाहू लागली.

महाराज जयवर्धन यांना राज्यातील राज्यव्यवस्था पाहण्यासाठी राज्यातील प्रत्येक नगराची भ्रमंती करावी लागे. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाची पाहणी करावी लागे. त्यामुळे त्यांना वारंवार नगराबाहेर जावे लागे. तसेच प्रधनांना देखील जावे लागे. तेव्हा नगराचा व येथील राज्यकारभारात महाराणी अरूणावतींना लक्ष द्यावे लागे.

त्यावेळी राजकुमारी व महालातील कामकाजावरून महाराणी अरूणावती यांचे लक्ष लागत नसे. त्या वेळेचा फायदा घ्यायचे अंबाला ने ठरवले.

राज्याच्या उत्तर विभागातील व्यवस्था लावण्यासाठी महाराज जयवर्धन व प्रधान वेददत्त गेल्यामुळे कुंतल प्रदेश व नगर कारभाराची पाहण्याची जबाबदारी महाराणी अरुणावतींवर आली होती. त्यामुळे त्या राज्यव्यवस्था लावण्यात व्यस्त होत्या. या संधीचा फायदा घ्यायचे राजकुमारीनी ठरवले. राजकुमारीने आपल्या कक्षातील सर्व दासिणा आपल्या कक्षात न येण्याचा आदेश दिला. व गरज भासली तर त्रिशला आहे हे तिने स्पष्ट केले. त्यामुळे सर्व दासी तेथून निघून गेल्या. त्या गेल्याचे पाहताच राजकुमारी ने आपल्या शयन जागेवर काही लोड ठेवून झाकून दिले. व त्यावर शाल पांघरली. व त्रिशलेने आणलेली वस्त्रे तिने परीधान केली. व त्रिशलेनेही नवखा पेहराव केला. व त्या दोघी त्या गुप्त मार्गाने बाहेर पडल्या. तेथून बाहेर पडताच राजकुमारीला आपण मुक्त झालो आहोत असे वाटू लागले. राजकुमारी त्या अरण्यात बागडू लागली. तेथून त्या दोघी शेजारील त्या धार्मिक नगरात गेल्या. . कोणी ओळखू नये म्हणून राजकुमारीने आपल्या मुखावर रुमाल बांधून घेतला. त्या नगरात गेल्या. त्या पुढे नगरात प्रवेश करताना तिथे त्यांना एक कुंभार पेठ लागली. तेथून त्या निघाल्या. ग्रीष्म ऋतू असल्याने तेथे अनेक प्रकारची मडकी विक्रीस ठेवली होती. एका दुकानासमोर मडक्यांची मोठी उतरंड होती. तेथे एक काळसर पुरुष ज्याने श्वेत वस्त्र धारण केले होते. त्याच्या अंगावर उपरणे होते. ज्याच्या डोक्यास केसरी पागोटे होते. तो तेथील वृध्द कुंभाराशी हुज्जत घालत होता.

कुंभार,“ आपणास जर का मातीचे भांडे खराब लागले असेल तर बदलून देतो.”

तो इसम, “ देतो म्हणून कुणास सांगतो आहेस. तुने दिलेल्या त्या मडक्यात  माझ्या कारभारणीने ठेवलेले दूध ते वाया गेले त्याचे काय.”

कुंभार, “ महाशय आपण त्यात आधी पाणी ठेवून चाचपणी करावयास हवी होती.”

तो इसम, “ तू मज अक्कल शिकवू नको. तुझे मडके खराब होते. तेव्हा तू मला मडके तर दिलेच पाहिजेत. शिवाय त्यात ठेवून वाया गेलेल्या दुधाचे मूल्य ही दिले पाहिजेस.”

असे बोलून त्या उपरणे धारण केलेल्या इसमाने त्या कुंभाराकडून दोन मडकी तर घेतलीच पण जाताना उतरंड घसरवली. त्यात एक दोन मडकी फुटली. त्याने त्या कुंभाराच नुकसान झाले.  तो कुंभार हताश होऊन पाहत राहिला. तो इसम तेथून जाते वेळी अंबालेने त्याचे निरीक्षण केले, तर त्याच्या अंगावरील जानव्याने व डोक्यावरील शेंडीने तो एक ब्राह्मण आहे हे तिने  ओळखले. त्या दोघी त्या कुंभाराजवळ आल्या. त्रिशलेने कुंभरास विचारले, की त्या माणसाकडे नुकसान भरपाई का मागितली नाही. त्यास असे कसे जाऊ दिले.

कुंभार, “तो उच्च वर्णीय ब्राह्मण असून त्याचे लागे बांधे प्रधानजीच्या घरापर्यंत आहेत. व त्यास दिलेल्या मडक्यांची त्याने एक छदाम ही दिली नाही. उलट कारण सांगून माझी दोन मडकी घेऊन गेला. व जाताना माझं नुकसान करुन गेला. त्या विरुद्ध कोणी तक्रार ही करत नाही त्याची ओळख या पेठेच्या नायकापासून ते राजवाड्यापर्यंत आहे.”

त्रिशला, “ महाराज जयवर्धनांकडे का तक्रार करत नाहीत.”

कुंभार, “ महाराज जयवर्धन जरी न्यायी असले तरी राज्याची व्यवस्था व इतर कामी ते गुंतलेले आहेत. व एका छोट्याशा कारणे त्यांना त्रास देणे योग्य नव्हे. आम्ही सुरक्षित आहोत. दोन वेळ भोजन मिळते त्यात समाधान मानितो.”

अंबालेस मात्र या घटनेचा राग आला होता. तिने त्या ब्राह्मनास धडा शिकवण्याचे ठरवले. व त्रिशलेस इशारा करून ती त्याच्या मागे गेली. तो पेठेतील एका कोपऱ्यात उभा होता. तिथेच थोड्या अंतरावर एक स्त्री स्वच्छतेच काम करत होती. अंबालेन तिथे जाऊन त्या स्त्रीचे हातातील झाडू काढून घेतला . व त्रिशलेस दिला व सूचना केली. तिचा इशारा समजून त्रिशलेने  तिच्या हातातील तो झाडू घेत स्वच्छता करू लागली. तो इसम थोड्या वेळाने  तिच्या जवळून जाताना तिने उगाच धक्का दिला. व स्पर्श केला. त्यामुळे तो चिडला. व त्याने तीस ढकलले. व तो म्हणाला, “ ए तूस दिसत नाही . एक पूजाविधी करणारा ब्राह्मण रस्त्याने जाताना दूर व्हावे . तुझ्या स्पर्शाने माझे उपरणे विटले ना. आता मज पुन्हा स्नान करावे लागेल.”

त्रिशला,  “ क्षमा असावी,  मी कामात मग्न होते. त्या कारणे मला माहीत नव्हते.”

ब्राह्मण, “कारणे कोणास सांगतेस. असे बोलून त्याने तीजवर आपल्या हातातील मडकी बाजूला ठेवत हात उचलला. ते पाहून त्रिशला तेथून पळाली व शेजारील छोट्याशा बोळात निघून गेली. तो ब्राह्मण तेथून पुढे सरळ नदीकिनारी गेला. ग्रीष्म ऋतू असल्याने उन्हाने पाणी कमी झाले होते. त्याने आपली मडकी एका डोहाजवळ ठेवून त्याने आपल्या अंगावरील वस्त्रे त्या नदीतील डोहाच्या काठावर उतरवून तो अंतरवस्त्रावर तो पाण्यात उतरून स्नान करू लागला. अंबाला त्याचा पाठलाग करत तेथे आली होती. तिने तो डूंबतोय हे पाहताच झाडीतून ती लपत छपत आली. व त्याची काठावरील वस्त्रे व मडकी तिने उचलली. व ती शेजारील झाडीत दिसेनाशी झाली. तेथून पुढे ती मार्गावर आली. तिने ती मडकी तेथे फोडली. व वेगाने अरण्यवाटेस लागली. व काही अवधीतच तिथे पोहोचली. गुप्त मार्गाजवळ आल्यावर तिने शहानिशा केली. त्रिशला आधीच तिथे हजर होती. तिच्या बरोबर ती जाळीतील त्या गुप्त मार्गाने शिरली. व पुन्हा महालात हजर झाली. त्या उपरण्यास व धोत्रास तिने गुप्त मार्गात लपवले. व महालातील आपल्या कक्षात ती हजर झाली. तिथे आल्यावर तिने आपला पेहराव बदलला. व ती काहीच न घडल्यासारखे महालात वावरू लागली. यामुळे तिला एक अनमोल असा आनंद प्राप्त झाला होता. तो आठवून त्या दोघी हसू लागल्या.

इकडे तो ब्राह्मण नदीतून अंघोळ करून बाहेर आला. त्याने आपली वस्त्रे पाहिली. पण ती तिथे नव्हती. त्याने इतरत्र शोधा शोध केली. पण त्यास काहीच मिळाले नाही. मडकी पण नव्हती. तेव्हा त्याने समजले की कोणत्यातरी चोराचे हे काम असणार. त्याने चोरास अनेक दूषणे दिली. व तो तेथील वृक्षाची पाने बांधून तो आपल्या वस्तीवर गेला. त्यास सर्व लोक हसू लागले.

राजकुमारी अंबाला आता नेहमी त्या वाटेने नगरात जाऊ लागली.

क्रमशः पुढे.......



Saturday, February 4, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १४



क्रमशः पुढे चालू.......

त्रिशलेकडून रोज नवीन नगरातील गमती ऐकूण अंबालेला देखील आपणही मुक्तपणे नगरात फिरावे असे वाटू लागले होते. तिला राजकुमारी असल्याने सहसा एकटे जायला मुभा नव्हती. त्यासाठी वेशांतर करून जावे असे तिला वाटत होते. त्यासाठी पेहराव हवा होता. यासाठी तिने त्रिशलेस पेहराव आणण्यासाठी तिने दोन मोहोरा दिल्या.

संध्याकाळी त्रिशला आपल्या मातेस भेटण्यासाठी प्रधान महाली निघाली. जाताना ती मोहोरा घेऊन गेली. त्या रात्री तिथे आपल्या मातेसवे तिने घालवला. सकाळी प्रभात समई ती लवकर उठली. व तिने आपले आटोपले. साजशृंगार करून ती मातेचा निरोप घेऊन निघाली. राजवाड्याकडे जाताना एक सेवक तिच्या सोबत लावून देण्यात आला. अर्धा रस्ता पार केल्यावर तिने त्या सेवकास माघारी निघून जाण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, की तो तिला राजवड्यापर्यंत सोडेल. तेव्हा ती म्हणाली, “ मी राजकुमारी अंबलाची सखी आहे. तेव्हा मी माझे रक्षण करू शकते. तेव्हा तुम्ही इथून मागे गेलात तर बरे होईल.”

तेंव्हा तो सेवक दचकला. व म्हणाला, “ मला तुम्हाला महालापर्यंत सोडण्यास सांगितले आहे.”

शेवटी राजवाड्यापाशी आल्यावर तिने त्या शिपायास परत पाठवले. तो मागे वळून थोड अंतर जाताच ती तिथून निसटली. व एका छोट्या गल्लीत घुसली. त्या शिपायाने मागे पाहिले ती दिसली नाही त्यास वाटले ती राजवाड्यात गेली असेल. पण त्रिशला थेट पेठेतील चिंचोळ्या वाटेने पुढे सरकली. ती थेट पुजारी गल्लीत गेली. तेथून पुढे होऊन महादेव मंदिरा जवळून व्यापारी पेठेत गेली. तिथे प्रवेश केल्यावर तेथील प्रत्येक व्यापारी देवडी न्याहाळत ती पुढे निघाली. पेठेत वेगवेगळ्या धान्यांच्या, तसेच कपडे, दागिने, भांडी, मिठाईच्या देवड्या होत्या. तेथून पुढे गेल्यावर मडक्याच्या उतरंडीची कुंभाराची देवडी लागली. तेथून ती थेट पुढे गेली. तिथे अनेक वाणी ओरडुन लोकांना आकर्षित करत होते. तिने पेठेतील एका कोपऱ्यात कपड्याच्या ओसरीची देवडी हेरली. व ती तेथे गेली. त्या ठिकाणी कपडे न्याहाळत तिने त्यातील तीन पुरषी पेहराव शोधून काढले. त्याचे मूल्य तिने त्या विक्रेत्या विचारले. तेव्हा त्याने पंधरा तांब्याचे सिक्के सांगितले. थोडे वर खाली दर विचारणे झाल्यावर तिने ते सहा सिक्याला ठरवले. व मूल्य भागवणेसाठी तिने एक मोहोर त्यापुढे सादर केली. पण त्या मोहरेकडे आश्चर्य मुद्रेने पहात तो म्हणाला, “एवढं सुट्टे मजकडे नाहीत. व अजून आजचा शुभारंभ देखील झाला नाही.”

त्रिशला, “ पाहा दुसरीकडून कोठून मिळते का?”

विक्रेता, “ एवढे सुट्टे कोण देणार या प्रभाती. प्रत्येकास लागतात. व कुठे सापडली ही मोहोर. की चोरी….”

तो बोलायचे थांबला. तसे त्याचे म्हणणे लक्षात येताच ती रागीट नजरेने त्याकडे पहात

“ तुला मी कोणी चोर की भिकारी वाटलो का? मी राजकुमारी अंबालाची स्नेही आहे. त्यामुळे राजवाड्यात वावरताना अशा अनेक मोहरा मी नेहमी इथे तिथे पहाते.”

विक्रेता, “ एवढ्या मोहरा पाहिल्यावर कोणीही लोभी होऊ शकतो.”

त्रिशला, “ अरे वस्त्र वाण्या तू तुझी मर्यादा सोडून बोलतोस. माझ्या मनात आले तर तुझे पेठेतील व्यापारी स्थान मी हिरावून घेऊ शकते.”

तिचे विस्फारलेल्या नेत्र पाहून अन् करडा आवाज ऐकून त्या वाण्याने पटकन ती वस्त्रं एक कापडात बांधली. व तिच्याकडे दिली. तिने मूल्य घे म्हणताच तो म्हणाला , की आपण मला नंतर दीले तरी चालेल. व त्याने ती मोहर न घेता कपडे देवून टाकली.

ती वस्त्र घेऊन ती रजवड्याकडे निघाली. जाताना तिच्याकडे पहारेकरी नी चूकही केली. त्या कापडात काय आहे. तेव्हा ती म्हणाली, की त्यात तिची काही कपडे आहेत. तिचा रोजचा वावर लक्षात घेता पहारेकर्यानी तिला आत सोडले. ती थेट राजकुमारीच्या कक्षात गेली. राजकुमारी अंबाला तिची वाट पाहत आपल्या दालनात बसली होती.त्रिशलेला येताना पाहून राजकुमारीने आपल्या दालनातील दासींना बाहेर जाण्यास सांगितले. त्रिशलेने आल्यावर आपण आणलेली ती वस्त्रे राजकुमारीजवळ सादर केली. ती कपडे पाहून अंबाला खुश झाली.

पण तिच्या मनात अनेक प्रश्न पडले. व ती नाराज झाली. तिचा उदास चेहरा पाहून

त्रिशला, “ काय झालं अशी उदास का? तुला हवी तशी वस्त्रे तर मिळाली आहेत.”

अंबाला, “ वस्त्रे मिळून काय उपयोग. हा कडकं पहारा आहे ना. तो कसा भेदायचा.”

यावर त्या विचार करू लागल्या. पण त्यांचा हा प्रश्न सुटता सुटेना. त्या दिवसभर याच गोष्टीचा विचार करत होत्या. संध्याकाळी प्रधानांच्या महाली जाताना मोहोरा परत देवून त्रिशला काही ताम्र सिक्के घेऊन गेली. व तिने त्या विक्रेत्याची उधारी भागवली. व ती आपल्या मातेस भेटण्यास प्रधान महाली गेली.

खूप दिवस जातात पण त्यांना त्या प्रासादाबाहेर जनेचा एकही मार्ग धड नाही मिळत कारण सर्वत्र कडक पहारा होता. तेथून कसे बाहेर पडावे हे तिला कळत नव्हते. एके दिवशी त्रिशला राजवाड्यातून फिरत असताना ती महाराणी अरूणावतीच्या एका पट्टदासीला एका दालनात जाताना पाहिले. तिने तिकडे जाताना तिला अडवले गेले. व तिकडे जानेस मनाई केली. ती खोली बंद असे. तिथे कडक पहारा असे. तिथे जाण्यासाठी राजकुमारीच्या दालनातून शेजारी असणाऱ्या सभागृहातील शेजारी असणाऱ्या गवाक्षामधून जाता येत असे. त्रिशलेन विचार केला. राज्य खजिना खोली दुसरीकडे असताना येथे कडक पहारा का बरं ठेवला असेल. याचा विचार करत ती राजकुमारीच्या दालनात गेली तिने राजकुमारीला बोलली, की एवढा कडक पहारा तिथे का आहे. तेव्हा राजकुमारी देखील म्हणाली , की तिला ही आजपर्यंत तिथे जाऊ दिले गेले नाही.

राजकुमारीने ठरवले की आपण स्वतः त्या दालनाचे रहस्य शोधायचे. व ती त्या कामास लागली. त्या दिवशी त्रिशला तिथे वस्तीला राहिली. रात्र झाली अकरावा प्रहर झाला. राजकुमारी अंबाला व त्रिशला हळूच उठल्या. त्यांनी झोपायच्या जागेवर लोड ठेवून ते झाकून टाकले. तेथून त्या स्नानगृहात आल्या. तेथील गवाक्षाची जाळी त्यांनी काढण्यास सुरुवात केली. ती हळूहळू धारदार कैचीने त्यांनी कापली. जी राजकुमारीनी शस्त्रागारातून आणली होती. ती जाळीला चिरून त्या गवाक्षातून त्या आतील दालनात आल्या तिथे खूप अंधार होता. त्या संपूर्ण अंधाऱ्या खोलीत आल्यावर राजकुमारीने दिवटी पेटवली. जी तिने आपल्या कक्षातून आणली होती. दिवटीच्या उजेडात त्या निरीक्षण करू लागल्या. ती खोली इतर खोली सारखीच होती. पण तिथे काहीतरी अगम्य आहे असे वाटत होते. त्या दृष्टीने त्या तेथील प्रत्येक वस्तू व भिंत न्याहाळत होत्या. शेवटी सर्व शोधून झाल्यावर व काही विशेष नाही म्हंटल्यावर त्रिश्रला अंबालेला म्हणाली,

“ मला काय इथे काही विशेष वाटत नाही.”

अंबाला इकडे तिकडे पाहत म्हणाली, “ नाही कसे, मला तर हा दरवाजा विशेष वाटतो.”

ती त्या दरवाजाकडे गेली. व आपल्या हातातील दिवटी अंबालेने त्रिशलाकडे दिली. व ती त्या प्रकाशात कपाट न्याहाळू लागली. त्यास ना कडी ना कोयंडा त्यांना आजुबाजूस काहीच निशाणी आढळत नव्हती. त्यांनी खूप प्रयत्न केला. पण ते दार काही उगडेना. शेवटी हताश होऊन त्या मागे फिरताना अचानक त्रिशलेचा हात शेजारील खुंटिस लागला. व ती फिरली. तसे दार सरकले. अंबालेने दाराचा आवाज ऐकून मागे पाहिले. तिला ते किंचित सरकले दिसले.तिने त्रिशलेस खुंटी फिरवण्यात सांगितली. तिने ती फिरवताच दार सरकले. अंबाला पुढे झाली तिने बारकाईने निरीक्षण केले. ते एक कपाट आहे असे वाटत होते. त्याच्या आतील बाजूस दोन मासे एकमेकास शिवत आहेत अशी नक्षी असणारे एक धातूचे शिल्प दिसले. तिने डोळे लावून आतील कपाटाच्या लाकडी दारास पाहिले. व अंदाज घेऊ लागली. तेव्हा तिला हवेच्या झोताची झुळूक जाणवली. तिने ती मासोळी फिरवून पहिली. अन् एकदम ते कपाटाच्या आतील दार सरकले. व तिथे पायऱ्यांची वाट दिसली. त्या दोघी दीवटीच्या उजेडात हळूहळू त्या पायऱ्यांच्या वाटेने पुढे निघाल्या. थोडेसे पुढे गेल्यावर दोन मार्ग लागले. त्यातील एका मार्गाने त्या पुढे निघाल्या. त्यानंतर काही अंतर चालल्यावर तिथे पाणी लागले.

अंबाला, “ त्रिशले येथून पुढे पाण्याचा भाग आहे. त्याकरणे पुढे जाणे धोका निर्माण करणारे आहे. परत कधीतरी पाहू.”

त्रिशला, “ मग आपण त्या दुसऱ्या मार्गाने जाऊया का?”

अंबाला, “ आता नको परत कधीतरी जाऊ, अन्यथा आपल्या या योजनेचा सुगावा लागेल.

क्रमशः पुढे.......


Thursday, February 2, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १३

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १३



क्रमशः पुढे चालू....

हळूहळू सकाळ होऊ लागली. वातावरणातील द्व झाडाच्या पानातून पाझरू लागले. पूर्वेस प्रभा फाकू लागली. महारुद्राने आपल्या पित्याच्या अंगावरील सर्व डहाळ्या काढल्या. आजू बाजूस पानांवर पडलेले दवबिंदू त्याने एका पलाश पानांच्या द्रोणात एकत्र केले. व आपल्या पित्याच्या मुखावर शिंपडले. थोडे त्याच्या मुखात घातले. व तो त्यांना हलवून उठवू लागला. महतप्रयासाने भिल्लमास जाग आली. तो दचकून उठला. त्याच्या समोर महारुद्र बसलेला होता. त्याने इकडे तिकडे पाहिले अनेक रान कुत्री आजू बाजूला पडलेली दिसली. त्याने सर्व समजायचे ते समजला. त्याने महारुद्रला मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातुन अश्रू ओघळू लागले. इतक्यात महारुद्र भिल्लमास म्हणाला, “ बाबा आपणं इथून निघायला हवे. नाहीतर ही बेशुद्ध अवस्थेत असलेली रानकुत्री सावध होतील. कारण थोड्याच वेळात त्यांच्यावरील औषधाची गुंगी उतरेल.”

भिल्लम उठला. व चल असे म्हणून त्याने आपल्या लहान महारुद्राचा हातास धरले. तो रान वाटेने चालू लागला. झाडीतून रान वाटेने ते खालील भागाकडे सरकले. थोड्या अवधीने ते तेथील एका तटीनी किनारी आले. उष्ण ऋतू असल्याने व चैत्र मधुमासात तेथील तटीनीचे पाणी कमी झाल्याने ते नदीपात्रातील वाळूतून चालू लागले. थोड्याशा वळणावर त्या तटीनीपात्रातील एका डोहाजवळ ते पोहोचले. तेथील पाणी त्यांनी प्राशन केले. व तृषा शांती केली. त्याने त्यास बरे वाटले. तदनंतर स्नान ही केले. अंगावरील जखमा त्यांनी धुतल्या. व आपली वस्त्रे अंग सुकवून त्यावर चढवली नंतर भिल्लम महारुद्रास घेऊन पुढे रानातून चालला. रानातून जाताना वाटेतील वनौषधी तोडून ती एका दगडावर त्याने वाटली. व आपल्या व महारुद्रच्या शरीरावरील जखमेवर त्याने लावली. थोडे बरे वाटले. नंतर रानातील बहरलेल्या वृक्षांची काही फळे तसेच झुडपातील रानमेवा तोडला. व ती दोघे तेथील एका विशाल वृक्षाखाली विसावली. त्या प्रसंगाने त्यांचे अंग शिणले होते. ते तिथे विश्रांती घेऊ लागले. महारुद्रास निद्रा आली. तो तिथे जमिनीवर विसावला. भिल्लम त्याच्या चेहऱ्याकडे निरागस प्रेमभावाने पाहू लागला. आजवर केलेल्या कष्टाचे चीज झाले होते. काही वेळाने तिथून एक पारधी त्या अरण्यात शिकरीस आलेला दिसला. त्याना पाहून तो त्यांच्याजवळ आला. व त्यांची चौकशी करू लागला.

भिल्लमाने त्याला सर्व हकीकत सांगितली.

पारधी, “ अरे, भिल्लमा आपण परचक्रात भरडून येथे आलेली माणसे राजा जयवर्धने यांच्या कृपेने आपणास छत्र लाभले.”

भिल्लम, “ पण मी फक्त माझ्या मुलास विद्यार्जन करण्यासाठी त्यांकडे ठेवले होते. त्या आचार्यांनी विद्या ज्ञान सोडा शस्त्र ज्ञान ही दिले नाही. माझा उद्देश हाच होता की माझा पुत्र सर्व शास्त्रात प्रवीण असावा.”

पारधी, “ ते सर्व ठीक आहे. पण राजा जयवर्धने जरी चांगले असेल तरी राज्य म्हंटले की देव विचारी व दानव विचारी लोक हे आलेच. आपण आदिम लोक आपण शस्त्र व शस्त्र प्रवीण झालो तर श्रेष्ठ नाही का होणार, मग ते त्या आचार्यांना नको आहे. गुरू द्रोणाचार्यापासून तर हेच चालत आले. आहे. त्यांनी एकलव्यावर अन्याय केला. व या आचार्यांनी तुझ्या मुलावर. ही तर गतकालीन प्रवृत्तीच आहे. पण निसर्ग हाच आपला गुरु असतो. तोच आपणास घडवतो व तोच सर्वांना तारक व मारक असतो

भिल्लम, “ त्या आचार्यांनी माझ्या गाई ही परत केल्या ननाहीत उलट जीव घेण्याचा हा प्रयत्न.”

पारधी, “ हे पहा तू ही घटना एक कटु सत्य समजून विसरून जा. व सदर आचार्य हे इथल्या नगर नायकाचे नातलग असलेने तुझ्या तक्रारीवर कोणी न्यायाने पाहणार नाहीत. उलट आणखी मोठे अरिष्ट तुझ्या कुटुंबावर व वस्तीवर येईल. व तुझ्या सांगण्यावरून वाटते की तुझा मुलगा खूप हुशार आहे. त्याने जर एवढ्या लहान वयात त्या रान कुत्र्यांचे संधान केले. तर तो शूर आहे. निसर्ग हा गुरु मानून निरीक्षण करून शिकावे. व आपली विद्या स्वतः तयार करावी. निसर्गातील शाकाहारी प्राणी कसे शत्रू कडून वाचावे. व मासभक्षी कशी शिकार साधावी हे शिकवतात. त्यातून आपण आपल्या मतीचा योग्य वापर करून ज्ञान प्राप्त करावे. व झालेली घटना तू विसर व आपल्या जीवन प्रवाहात रहा.”

महारुद्राच्या कानावर त्यांचे बोलणे पडत होते.

पारध्याचे सांगणे भिल्लमास पटले. त्याने झालेल्या घटनेवर पडदा टाकण्याचे ठरवले. पारध्याने शिकार करून आणलेल्या सशांपैकी एक त्यास दिला. व त्यांचा निरोप घेऊन तो पुढे त्या अरण्यात शिकारीस निघून गेला.

भिल्लम तो ससा घेऊन आपल्या वस्तीच्या दिशेने निघाला. जाताना त्याने महारुद्रास ताकीद दिली. सदर घटना कोणाला सांगायची नाही. आज्ञा धारक मुलाप्रमाणे त्याने ती मान्य केली. वस्तीवर आल्यावर सर्व त्यांना विचारू लागले. भिल्लमाने आपण जंगली श्वापदांच फेऱ्यात अडकलो होतो हे सांगितले. सिंगणेने महारुद्रला जवळ घेतले. त्याच्या गालाचे मुके घेतले. व त्या हिंस्र श्वापदांना ती दूषणे देऊ लागली. व ती म्हणाली, “ आता आपणास विद्या नको काही नको ही वस्ती सोडून कुठेही जावयाचे नाही.”

असे बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. भिल्लमाने तो एक भयानक प्रसंग समजून विसरून जायचे ठरवले. मात्र महारुद्राचे मनावर खोलवर जखम त्या प्रसंगाने केली होती. त्याने या घटनेचा बदला घ्यायचे ठरवले. व तो रोज शस्त्र विद्येचा सराव करू लागला. निसर्गातील विविध घटनांचा अर्थ लावून ज्ञान प्राप्त करू लागला. तसेच शर संधानात देखील त्याने प्रगती केली.

दिवस सरू लागले.

….. ……. …….. ……. ……. ……

क्रमशः पुढे……



अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथाभाग १२

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग १२

क्रमशः पुढे चालू....



आपल्या पित्याच्या कमरेला मळलेला तो चार पदरी गोप त्याने कापला. व एक चांगला वेत निवडून त्यापासून सुंदर धनु बनवला. तो गोप बांधून त्याची प्रत्यंचा त्याने केली त्याच बरोबर त्याने त्या वेताचे शर तयार केले. व ते बरेच स्त्री शर होते. जे अचूक वेध घेत. जे त्याने त्याच्या पित्यास तयार करताना पाहिले होते. काही छनातच त्याने ते बनवले. शराच्या मुखात त्याने चिर करून त्या थैलितील हिरवट औषधी घातली. जी एखाद्या प्राण्यास बेशुद्ध करू शकत होती.

त्यानंतर आपल्या अंगावरील अंगरखा काढला. जो फाटला होता. त्याची भात्यासारखी रचना करून पाठीशी बांधली. व त्यात शर ठेवले. आता सूर्य अस्ताला जाऊन चांगलाच अंधार पडला होता. नंतर त्याने आपल्या पित्याचे शरीर जवळ असणाऱ्या विशाल झाडाखाली जाळीजवळ आणले. भिल्लमाचे शरीर खूप भभारीरी असल्याने त्यास ते ओढता ओढेना. तरी त्याने अथक प्रयत्नाने ते ओढत आणले. व झाडाच्या काही डहाळ्या त्याने मोडल्या व त्याने आपल्या पित्यास झाकून टाकले. ते धारदार शस्त्र एका वेलीच्या साहाय्याने आपल्या कमरे भोवती बांधले. व तो झाडावर चढला. आता सुर्य अस्ताला जाऊन बराच वेळ होऊन गेला होता. चांगलाच अंधार पडला होता. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. अधून मधून काजवे झाडीत चमकू लागले होते. अमावस्या संपली असल्याने चंद्रकोरीचा प्रकाश पुरत नव्हता. चंद्र फक्त आकाशात रात्रीचा साथीदार म्हणून अस्तित्वात होता. रात्र चांगलीच गडद झाली होती. व त्या परिसरातील ती झाडी त्यात भर घालत होती. अचानक महारुद्रास काही अंतरावर झाडीत डोळे चमकताना दिसले. त्याने मोठ्याने कुक देवून पाहिले. ते एका जागी स्थिर झाले. गुरगुर असा आवाज करत पुढे येऊ लागले. महारुद्राने पाठीवरील एक शर काढला व त्या चमकणाऱ्या डोळ्यांमध्ये अचूक नेम धरला. व शर सोडला. तो अचूक त्या प्राण्यास लागला. तो प्राणी इकडे तिकडे पळाला व त्यामुळे झाडीत सरसर ऐकू आली. व थोड्या अंतरावर त्याला त्या औषदाची गुंगी चढली. व तो निपचित खाली पडला. त्याच्या आवाजाने तो एखादा व्याघ्र वा चित्ता असावा. असे महारुद्राने जाणले.

बराच काळ झाडावरील फांद्यांमध्ये बसून महारूद्राला अवघडल्या सारखे झाले. त्याने झाडाचा बुंधा तपासला. त्याला एक कोटी जागा मिळाली. तिथे जाऊन तो बसला. खाली झोप लागल्यावर पडू नये म्हणून त्याने वेलिने घट्ट बांधून घेतले. त्या दुःखदायक प्रसंगाने व माराणे त्याचे अंग दुखत होते. त्यास निद्रा येत होती. पण निद्रा घ्यायला त्याच्या मनाचा विरोध होता.

 कारण त्याची बुद्धी त्यास साथ देत नव्हतो. ती सांगत होती. की झाडाखाली असणाऱ्या पित्याचे त्याने रक्षण करणे ते ही अरण्य श्वापदा पासून हे त्याचे कर्तव्य आहे. रात्र सरता सरत नव्हती. शरीर थकल्याने महारुद्रास निद्रा येऊ लागली . थोडा वेळ त्याचा डोळा लागला. अचानक कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. महारुद्राची निद्रा भंग पावली. त्याने पाहिले. त्याला अंधारात डोळे चमकताना दिसले. आवाजावरून त्याने ओळखले की ती रानटी श्वापदांची टोळी होती. त्यास जाणवले की ती हळूहळू वास घेत तो ज्या झाडावर आहे त्या झाडाकडे ती येत आहेत. तो सावध झाला. त्याने कमरेचा वेलिंचा गुंता काढला. व आपल्या धनुष्यावर पाठीवरील भात्यातील शर काढून त्याने संधान साधण्यासाठी नेम धरला. व शर सोडला. तो शर सर सर आवाज करत निघाला त्याने अचूक वेध घेतला. व तो प्राणी निपचित पडला. त्याचा थोडा आवाज झाला. त्यावरून त्याने ते एक रानकुत्रे होते हे जाणले. व ती रान कुत्र्यांची टोळी आहे ते ओळखले. त्याने एकामागून एक संधान करता चार रानकुत्री वेधली. शरावरील औषधाने ती रान कुत्री बेशुद्ध झाली. आता तो निरखून पाहू लागला. त्याला आता चमकणाऱ्या डोळ्यांची संख्या ही सहा दिसू लागली. व ती मान खाली घालून हुंगत चालली होती. त्याने पाठीवरली भात्यात हात घातला. त्यास फक्त एकच शर हाताला लागला. तो महारुद्राने काढला व चापावर चढवला. व नेम धरला. आता ती रान कुत्र्यांची टोळी सावध झाली होती. ती सावधरित्या पुढे येत होती. त्यांचे संधान करता येईना. त्यातील एक त्या वृक्षाखाली आले. महारुद्र प्रयत्न करू लागला. पण झाडाच्या शाखा आडव्या येत असल्याने त्यास अचूक संधान साधता येईना.

शेवटी त्याने त्या शराने दुसऱ्या कुत्र्यास वेधले. तरी देखील ते कुत्रे पुढे येत होते. आता महारुद्र सरसर खाली आला. व त्याने दनकन त्या कुत्र्याच्या पुढ्यात उडी टाकली. तसे ते कुत्रे गुर गुर करत त्यावर धावून आले. महारुद्राने त्याचा वार चुकवला व ते शर लागलेले कुत्रे काही अंतरावर थोड्या अंतरावर जाऊन पडले. त्यास गुंगी चढली.

दुसऱ्या कुत्र्याने त्याच्या अंगावर उडी मारली. व ते ओरबाडू लागले. व लचके तोडण्याचा प्रयत्न करू लागले. महारुद्राने ते धारदार शस्त्र काढले व त्या कुत्र्यावर चालवले. पाहता पाहता ते रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. व ते बाजूस तळमळत पडले व गतप्राण झाले.

आणखीन एका कुत्र्याने हल्ला केल्यावर महारुद्राने त्याला शेजारी पडलेल्या एका डहाळीचा एक दणका दिला. ते बाजूस पडले. व पळून जाऊ लागले. पण महारुद्राने त्याचे मागील पाय धरून ओढले व त्यास उचलून त्याने जमिनिवर आपटले. तरी ते मारेना. बाह्यमन सांगत होते की त्यास सोडावे. पण अंतरमन त्यास विरुद्ध करत होते. कारण ते जर निसटले. तर आपले आणखीन काही साथीदार घेऊन आले असते. शेवटी त्याने शेजारील फांदीच्या गेचक्यात त्यास घालून त्याने ती पिरंगाळली. ती इतक्या वेगाने पिरंगाळली की त्याचे काही क्षणातच संधान झाले. ते मरण पावले. या सर्व घडामोडीत महारुद्राच्या अंगावर भरपूर जखमा झाल्या. होत्या. तरी देखील त्याने स्वतःस सावरले. आपल्या पित्याच्या त्या निश्चल देहास पुन्हा व्यवस्थित झाकले. अन तो आपल्या पित्याचे संरक्षण करण्यास पहारा देवू लागला.

क्रमशः पुढे.....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...