Thursday, April 13, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३९

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३९



क्रमशः पुढे चालू.....

तो जखमी पायाने त्यांच्यापुढे आला. त्याने पाहिले अंबाला त्याच्या समोर शांतपणे अश्रूपूर्ण नजरेने उभा होती. तिची ती आत्मीयता पाहून तो त्याच्या पायातील वेदना विसरला. त्याच्या मनात तिचे स्थान दृढ झाले. त्याचा तो लंगडत्याला पाय पाहून आंबलेचे हृदय जागृत झाले. त्या ह्रुदयात एक प्रेमभाव निर्माण झाला. महारुद्र त्याच्या मित्रांबरोबर महादेव मंदिरात गेला. तेथे त्याने शिवपूजा केली. खूप दिवसांनी तेथे पूजा झाली होती. कारण ते मंदिर गावापासून खूप लांब होते. अंबाला त्रिशलेस म्हणाली की तिने निश्चय केला आहे. की ती महारुद्रासवे लग्न करणार आहे. कारण तिच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारा फक्त तोच असेल. व प्रतिकूल वेळी रक्षण ही तोच करेल. ती मंदिरात आली. तिने महारुद्राच्या पायावर डोके ठेवले. व त्याने तिला जिंकले आहे. हे सांगितले. व त्या दोघांनी लग्नाचा निश्चय केला.

त्रिशलेन ही त्यास सांगितले. की ती त्याचा इंद्रावतीशी विवाह लावून देईल. मात्र सहा महिन्यानंतर. व त्या दोघी तिथून निघून गेल्या. महारुद्र अंबालेस जिंकल्याच्या आनंदाने प्रफुल्लित झाला. तो आता नेहमी तिला भेटायला येऊ लागला. पण अंबाला व त्रिशला त्यास कोणतीही माहीती लागू देत नसत. याबाबत त्रिशला ने वचन घेतले होते. हा बदला यशस्वी झाल्यावर अंबाला लग्न करणार होती. अंबाला त्याकडून राज्यातील हालहवाला जाणून घेत असे. पण तो ही सर्व सांगत असे. तसे पाहता त्या दोघींना राजवाडा व राजधानी नगराची खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्या ही जास्त विचारत नसत. व आपला शेवटचा शत्रू हा महालात आहे व त्याचा आपल्याला बंदोबस्त करून बदला घ्यायचा आहे यासाठी त्या योजना आखू लागल्या. व तयारीला लागल्या.

….. ….. ….. ….. …..

महाराज वेददत्त यांनी आपल्या राज्याची व्यवस्था नीट लावली होती. तरी देखील त्यांनी हेर व्यवस्था नीट केली. व ते हेरांद्वारे बारीक सारीक राज्यातील हालहवाला जाणून घेऊ लागले. ते आपल्या राज्यातील निरनिराळ्या अधिकारी व सैन्यातील अधिकारी यांची ही बित्तंम बातमी ते काढू लागले. त्यांनी महारुद्राची देखील माहिती काढली. त्यामध्ये त्याचेचे प्रेम प्रकरण देखील समजले. एखादा वीर आपल्याला घातक ठरू नये यासाठी ते काळजी घेत. त्याप्रमाणे गुप्त हेरांनी टेहळणी करून सर्व माहिती काढून घेतली. तेव्हा त्यांना महारुद्राच्या पालकांकडून व इतर लोकांकडून समजले की महारुद्र हा भिल्लम व सिंगणेचा पुत्र नसून तो त्याना अरण्यात सापडला होता. तेव्हा महाराज वेददत्त यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. व त्यांनी महारुद्राविषयी जास्त जाणून घ्यायला सुरवात केली.

यासाठी महारुद्राला राज्याच्या उत्तर विभागाची पाहणी करण्यास पाठवले. व महाराज वेददत्त व शामलता स्वतः भेटण्यास भिल्लम व सिंघणा यांच्याकडे गेलीत. तेव्हा त्यांनी महारुद्रास नेमलेल्या नगराची व्यवस्था पाहिली. तेव्हा त्यांना तेथील वैशिष्ट्यपूर्ण नगराची केलेली रचना तसेच तेथील साफसफाई. नगर तट्टावरील कडक पहारा. इतकेच नाही तर नगर सैन्य सराव स्थळं. व इतर व्यवस्था त्यांना अत्यंत आवडली. तेथील कारभार पाहून प्रसन्न मुद्रेने ती दोघे महारुद्राच्या निवास स्थानी गेली. भिल्लम व सिंगणाने यथोचित पाहुणचार केला. तसेच त्यांनी आस्थेने त्यांची चौकशी केली. व हळुवारपणे महारुद्राची माहिती काढली. तेव्हा शेवटी भिल्लम व सिंघणेने सर्व माहिती सांगीतली.

व त्याच्या अंगावरील त्यावेळीची वस्त्रे व ती सोन्याची चैन दाखवली. ती पाहताच महाराणी श्यामलता आनंदित झाली. कारण त्याकडून हरवलेला लहानपणीचा त्यांचा पुत्र रत्नाकर हाच महारुद्र होता. त्यानी खूपवेळ वार्तालाप केला. व शेवटी त्यांनी सिंघणा व भिल्लम यास वचन दिले. की महारुद्र हा त्यांचाच पुत्र राहील. त्यांचेच नाव धारण करेल. व ज्या भिल्ल समाजाने त्यास आपले केले. त्यांचा उद्धार करेल. व आमच्या माघारी या राज्याचा राजा बनेल. असे वचन देवून महाराज व महाराणी राजधानीत आल्या. तिथे आल्यावर त्यांनी दुत पाठवून महारुद्र व त्याच्या सैन्य तुकडीस राजधानीत बोलावून घेतले. राजधानीत आल्यावर फुलांची उधळण व कस्तुरी शिंपून त्याचे स्वागत केले. राजमहालात आल्यावर त्यास उंच आसनावर बसवले. व त्यास सर्व इतिहास सांगितला. व तो आपला वारस असल्याचे सांगितले. त्याचे पिता भिल्लम व माता सिंघणा ही तिथे होती. तो मात्र आपण भिल्लम व सिंघणेचा पुत्र आहोत हेच मानत होता. त्यांच्यापासून दूर रहाणार नाही. शेवटी सर्वांनी त्याची समजूत घातली. तसेच भिल्लम व सिंघणा ही त्यासोबत कायम राहणार असे वचन घेतल्यावर तो शेवटी राजमहालात राहण्यास तयार झाला.

क्रमशः पुढे....

Monday, April 10, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३८




क्रमशः पुढे चालू.........

महारुद्र, “ मी इतरांचा विचार करत नाही. तुला प्रथम पहिल्यापासून माझ्या अंतर हृदयातून एक अनामिक ओढ निर्माण होते. तुला पहात रहावेसे वाटते. तू जरी कृष्णवर्णी असलीस तरी इतर सुंदर ललना मला तुजसमोर तूच्छ वाटतात. मी तुला कधीही अंतर देणार नाही. वाटत असेल तर तू परीक्षा घे.”

अंबाला, “ मी व आपली परीक्षा , मला वाटते की आपणासारखे पुरुष स्त्रियांना दासिसारखे समजतात. सुरवातीला प्रेम पाशात गुरफटतात. व नंतर मन उबगले की एखादे जीर्ण वस्त्र फेकावे तसे फेकून देतात.”

महारुद्रास ते बोलणे सहन होईना तिचा एकेक शब्द त्याची परीक्षा घेऊ इच्छित होता. कोणतीही परीक्षा असो, मी ती पार करून तुला जिंकेन. पण मी ती परीक्षा जिंकल्यावर तुला मात्र माझ्याशी विवाह करावा लागेल.”

अंबाला, “ ठीक आहे. मी तुझ्यापुढे पाच प्रण ठेवते. ते जिंक व माझ्याशी विवाह करून घेऊन जा. तुला कोणीही अडवणार नाहीत.”

महारुद्र, “ तसे मला अडवणे कोणालाही शक्य नाही. तुझ्या या वस्तीतील नायकासमवेत सारे माझ्या आज्ञेत आहेत.”

अंबाला, “ ते दास असतील, पण माझे माझ्या शरीरावर राज्य आहे. ते मी क्षणात भस्म करून टाकीन.”

तिचे ते बोलणे ऐकून तो परीक्षा देण्यास तयार झाला. पण त्यानेही आपल्या व्यवहारास पुरावा हवा आहे, असे सांगितले

तेव्हा त्रिशलेचे नाव घेतले. की ती याची साक्षीदार असेल.असे सांगितले. तेव्हा त्याने त्याचबरोबर माझेही दोन साथीदार असतील. तेव्हा त्या दोघांनी ठरवले, “ठीक आहे. उद्यापासून या परीक्षेत तू उतर व मला जींक व घेऊन जा. व ती तेथून पाण्याने भरलेली कळशी घेऊन गेली.

….. …..

दुसऱ्या दिवशी ती त्रिशला व सिपनेस घेऊन नदीतीरावर आली. महारुद्र आपल्या दोन साथीदारांना घेऊन तिथे आला. पण तत्पूर्वी तो महादेवाचे दर्शन घेऊन आला. त्या दिवशी अंबाला त्यास घेऊन केळीच्या रानात गेली. कुंतल प्रदेशात असणाऱ्या या रानकेळी या दिवसात कमी पाणीपुरवठा झाल्याने मरत असतात. या दिवसात चैत्र मास असल्याने सुर्य आग ओकत असतो. त्या बनात ती त्याला घेऊन आली. व आपल्या हातातील धारदार शस्त्र देत ती म्हणाली, “या बनात असणाऱ्या पाच रान केळी तू अशा वेधायच्या की त्याचा कापलेला भाग तसाच स्थिर राहिला पाहिजे. व त्या केळीही सुकणार नाहीत.”

महारुद्र, “ विचार करत तो त्या बनातील केळी न्याहाळू लागला. तेव्हा त्यास आठवले की लहानपणी आपण सवंगड्यांशी खेळताना बांबू बेटाचा मधील भाग तसाच ठेवत असत. ज्याने तो बांबू सुकत नसे.थोड्या तंतूवर जिवंत राहत असे. त्याचप्रमाणे त्याने तिच्यासमोर केळींचा छेद धारदार शस्त्राने घेतला. व तिच्या डोळ्यादेखत पाच केळी तिला न कळता छेदल्या. त्याची ही अप्रतिम कला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. परंतु अंबाला म्हणाली, “चार दिवसांनी कळेल. कोण जिंकले.”

ती सर्व तेथून निघाली चौथ्या दिवशी महारुद्र पहाटे तिथे गेला व त्याने मधले तंतू कापून काढले. ते ही बुंधा न हलता.तोपर्यंत त्या केळी सुकलेल्या नव्हत्या.

नंतर अंबालेसवे त्या बागेचे निरीक्षण केले असता. पूर्ण छेद व केळी हिरव्यागार होत्या. अशा पद्धतीने त्याने प्रथम पण जिंकला.

दुसऱ्या दिवशी तिने दुसरा प्रण त्यापुढे ठेवला. त्यानुसार तिने त्याच्या हाती एक मडके दिले व अरण्यात मध्यभागी असणाऱ्या एका वृक्षावरील पोळ्यातील मध काढायला सांगितला. त्याप्रमाणे त्याने योजना तयार केली. व संध्याकाळी तो त्या वृक्षाजवळ आला. अन् त्याने अरण्यातील पालापाचोळा गोळा केला. व तो पेटवला त्यामधे काही ओला पाला घालून त्याने धूर तयार केला. व एक विशिष्ट प्रकारचे तेल अंगास लावल्याने त्यास त्या पोळ्यातील मध काढणे सोपे झाले. त्याने ते सहज काम केले. कारण तो आपल्या पित्याकडून म्हणजेच भिल्लमाकडून ते शिकला होता. त्याने दुसरा प्रण ही पूर्ण केला. त्यानंतर तिने त्याला एका आम्रवृक्षावरील एक अतिशय उंचावर असणारा कैऱ्यांचा घोस एका बाणात वेधण्यासाठी सांगितला. त्यानंतर त्याला तिने नऊ दुर्मिळ धान्याची नावे सांगितली. ज्याचे बियाणे मिळणे मुश्किल होते. ते आणावयास सांगितले. ते त्याने एका आठवड्याची मुदत घेऊन गोळा केले. व तिच्यासमोर सादर केले. आता शेवटचा पण होता. अंबाला त्याच्या प्रेमात पडलीय. हे त्रिशलेस जाणवले. व ती एकदम सोपे प्रण घालत आहे हे तिला जाणवले. व तिने स्वतः शेवटचा प्रण घालायचे ठरवले. तो प्रत्येक प्रण सोडवत होता. तिच्या प्रत्येक परीक्षेत तो उत्तीर्ण होत होता. त्याच्या या वीरश्रीमुळे अंबाला त्याकडे आकर्षित होत होती व त्याच्या प्रेमात पडली होती. पण यात धोका आहे हे त्रिशला जाणत होती.

अंबा प्रेमाचे नाटक करायचे सोडून त्यात गुंतेल व आपल्या मातेप्रमाने धोका खाईल असे तीस वाटत होते. म्हणून तिने तिसरा प्रण स्वतः सांगायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी महारुद्र नदी किनारी आला. अंबाला व त्रिशला देखील तिथे आल्या होत्या. अंबाला बोलण्या आधी त्रिशला म्हणाली, “ तू आतापर्यंत अनेक प्रण जिंकलेस. या पारधी वस्तीच्या पलीकडे एक दुसरी नदी आहे. तिच्या डोहाच्या पलीकडे एक बेलाच झाड आहे. त्याचे बेलपत्रे तू नदीतून पार जाऊनन आणण्याचे व व पारधी वस्ती सीमेवर असणाऱ्या महादेव मंदिरातील पिंडीस वहायचे. व शिवपूजा करायची.”

तिचे हे वाक्य ऐकताच महारुद्राचा सहकारी मित्र त्यास म्हणाला, “ हे काय करतोस मित्रा, एका कृष्णकुमारीसाठी अनमोल जीव धोक्यात घालतोयस. ती नदी सुसरीनी भरलेली आहे. तिथे जाणे म्हणजे मृत्यूच. तुला हीच्यापेक्षा सुंदर मुली मिळतील. अनेक वेड्यापिशा असताना तू कशाला धोका पत्करतोस.”

तेव्हा त्याने अंबालेकडे पाहत हसतच, “तयार आहे.” असे सांगितले. अंबेस काही सुचेनासे झाले. ती म्हणाली, “ नको तो प्रण.बास ती परीक्षा, जो जीव धोक्यात घालेल.”

लगेच त्रिशलेन अंबास खेचले. व व गप्प बसणेस सांगितले.

महारुद्र मात्र त्रिशलेस म्हणाला, “ जर मी हा प्रण जिंकला तर तू याच घडीला माझे व इंद्रावतीचे लग्न लावून देशील.”

त्रिशला, “ मी तुझे व इंद्रावतीचे लग्न लावून देईन, पण सध्या नाही. सध्या तिचा दुर्धर काळ चालू आहे. आज पासून सहा मास झाल्यावर वृंदा एकादशी नंतर तुझ्या गळ्यात इंद्रावती वरमाला घालेल. ही काळ्या दगडावरील रेघ समज”

असे वचन मिळताच तो दुग्ध पाणी असणाऱ्या नदीकाठी त्यांसमवेत आला. त्या सर्वांना सुरक्षित स्थळी उभा करून एक धारदार शस्त्र घेऊन तो नदीत उतरला. व वेगाने पलीकडे गेला. दुपारचा प्रहर असल्याने नदीपात्रातील सुसरी सुस्तावलेल्या होत्या. त्याने पलीकडे जाऊन बिल्वपत्रे तोडली. व एका पिशवीत घेऊन ती कमरेला बांधली. व त्याने पुन्हा अंदाज घेत पाण्यात उडी मारली. आवाजाने मगरी व सुसरी सावध झाल्या. व त्याकडे झेपावल्या. तो वेगाने पलीकडे निघाला. मगरींनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सिताफिने निसटला. व पोहत जाऊन त्याने झेपावून पलीकडील वृक्षाची डहाळी पकडली. मगरीने त्याचा पाय धरला. त्याने एका हाताने डहाळी व दुसऱ्या हाताने त्या शस्त्राने मगरीवर वार केला. मगर जखमी झाली व तिने पाय सोडताच तो वेगाने वृक्षावर चढला. व सुरक्षित अलीकडे उतरला. व त्यांच्या जवळ आला.

क्रमशः पुढे....

Saturday, April 8, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३७

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३७



क्रमशः पुढे चालू.....

अंबाला, “ इथून पुढील लढा माझा मी एकटीने लढायचा ठरवल आहे. माझ्या या लढ्यात तू विनाकारण भरडली जात आहेस.”

त्रिशला, “ नाही मी यात भरडली जात नाहीये. अन् हा लढा फक्त तुझा नाहीये माझा पण आहे. माझी माता देखील या हल्यात मारली गेली आहे. व जीवनाच्या या दुर्धर काळात मी तुला सोडून जाणार नाही.आपले नाते फक्त मैत्रीचे नाही. तर ते अतूट स्नेहबंधनाने बांधले गेलं आहे.”

अंबाला, “ पण इथून पुढील संकटात तुझा जीव ही जाईल.”

त्रिशला, “ त्याची पर्वा नाही संघर्ष करायचा तर दोघींनी व यश मिळवायचं तर ते ही दोघींनी.”

अंबाला, “ पण यापुढे आपली योजना काय असेल. ती कशी अखायची याचा विचार करतेय.”

त्रिशला, “ त्यासाठी परमेश्वराने आपल्याकडे अमोघ अशी देणगी दिली आहे.”

अंबाला, “ ती कोणती?”

त्रिशला, “ आपले लावण्य, तुला कृष्णवर्णी केली असली तरी तुझे सौंदर्य त्यातूनही उमलते व त्यावर भाळून महारुद्रासारखा भिल्ल कुमार तुझ्या प्रेमात पडू पाहतोय,”

अंबाला, (आश्चर्याने)“पण तो साधा माझ्याजवळ जरी फिरकला तरी तुझी आग होताना मी पाहिलीय.”

त्रिशला, “ होय , ते खर आहे. पण आज तो नगरनायक आहे. व त्यामुळे तो आपल्या शेवटच्या चरणाची पायरी होऊ शकतो.”

अंबाला, “ पण त्याचा असा वापर करणे मला तरी योग्य वाटत नाही. व तसे पाहता तो मला आता जवळपास देखील फिरकू देणार नाही. कारण मी ऐकलंय त्याला अनेक युवतींनी मागणी घातली आहे. व त्या सुंदर ललना सोडून तो कशाला या कृष्णवर्णीय मुलीमागे लागेल. छे छे.”

 त्रिशला, “तू पुरुषांना ओळखत नाहीस. त्याने इतके वेळा तुझ्याभोवती एखाद्या फुलपाखरासारख्या घिरट्या घातल्या आहेत. पण जराही तुला धक्का लावला नाही. तसेच जर त्याच्या मनात आले असते. तर तो तुला उचलून घेऊन जाऊ शकला असता. त्याला तुझ्या ह्रद्यावरी स्वामित्व मिळवायचे आहे. यालाच प्रेम म्हणतात.”

अंबाला, “ पण मी माझ्या स्वार्थासाठी त्याचा वापर करणे पाप आहे. व त्यास जर मी कोण आहे हे कळले तर त्यास धक्काच बसेल. व एखादा पर पुरुष माझ्या जीवनात मी परीक्षा घेऊनच घेईन.”

त्रिशला, “ पण आपणास बदला घ्यायचा आहे. आपला शेवटचा शत्रू महालात आहे समजलं काय? तू त्याची परीक्षा घे. पण जास्त तानू नकोस. कारण जास्त ताणले की तुटते.”

अंबालाने तिच्या म्हणन्याकडे दुर्लक्ष केले. व ती आपल्या कामात राहिली.

 एकदा ती नेहमीप्रमाणे नदीला पाणी भरण्यासाठी निघाली असता तिला समोरून एक घोडेस्वार येताना दिसला. त्याने अंगावर उंची वस्त्रे घातलेली होती. तिने दुरूनच पाहून उगाच संकट नको म्हणून खाल मान घालून ती निघाली. थोड्याच वेळात तो घोडेस्वार तिच्याजवळ आला. घोड्यावरील स्वार खाली उतरला व त्याने तिच्याजवळ जात हटकले. तेव्हा तिने वर तोंड करून पाहिले. व न पहिल्यासारखे करून ती पुढे जाणार इतक्यात त्याने तिची वाट अडवली. व तिचा हात धरला.

तसे तिने त्याकडे पाहिले. तिने ओळखले की तो महारुद्र आहे ते. त्याने आपल्या बरोबर आणलेली सुवर्णमाला तिच्यासमोर धरली. ती त्याकडे पाहून हसली. व तेथून नदीकडे धावत गेली. ती हसल्याचे पाहून तो खुश झाला. व तिच्यामागे गेला. ते नदीच्या काठी गेले. नदीचे पाणी खळाळत वाहत होते. अनेक झाडांच्या निसर्गरम्य अशा सानिध्यात नदीच्या वाहत्या पाण्यात प्रतिबिंब न्याहाळत उभा असणारी विशाल झाडे. व थोड्याच अंतरावर असणारे वेताचे बेट ज्याचे प्रतिबिंब नदीच्या संत वाहत्या पाण्यात पडले होते. अंबालाने त्या पाण्यात आपले हातपाय धुतले व नदीच्या शीतल जलाने आपली मातीची कळशी धुवून स्वच्छ पाण्याने भरली. अनेक पाखरे तिच्या जवळील पाण्यात तृष्णा भागवून शेजारील वेताच्या बेटात उडून गेली. अंबाने भरलेली घागर काठी ठेवली. व ती पाण्याबाहेर आली. आतापर्यंत शांत निरीक्षण करणारा महारुद्र तिला म्हणाला, “ मला तहान लागली आहे. पाणी मिळेल का?”

अंबाला, “ जवळच इतकी सुरेख नदी वाहत आहे. आपण तिजकडे मागावे.”

महारूद्र, “ पण आपल्या हातच्या पाण्यात एक मधुर चव आहे असे आम्ही ऐकलयं. तेव्हा…”

अंबाला, “ मी काही मधमाशी नाही, जी मकरंदाचे मधात रूपांतर करणारी. जिच्या हातात चव असायला. एक साधारण पारधीकन्या आहे.”

असे बोलत तिने त्याकडे पाहिले त्याचा पेहराव पाहून तो एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. त्याला पाहताच कोणीही त्याच्या प्रेमात पडावे. पण हा या कृष्णवर्णीय कन्येत काय पाहतोय. याची परीक्षा घेतलीच पाहिजे. असे तिने मनात योजले.

ती त्यास चेष्टेने म्हणाली, “ नमस्कार महोदय, आपण आता राजाश्रय धारीत एक अधिकारी आहात. व मी अतिसामान्य पारधी कन्या, आपण असे अलंकार विभूषित आहात. व आपणास दिलेले हे ऐश्वर्य, सौंदर्य पाहता आपणास अनेक सुंदर मुली चालून येत असतील. तेव्हा आपण त्याना वरायचे सोडून माझ्या सारख्या कृष्णवर्णीय रुपी ललनेत असे काय पाहता, मी आपल्या राजपदास शोभेल आशी नाहीये. की आपली दासी ही सुंदर असेल. तेव्हा मजसोबत कोणी पाहिले तर आपणास कोणतरी हसेल. आपण माझ्यात एवढे काय पाहिले? याविषयी आपले प्रयोजन काय ते सांगावे.”

महारुद्रास तिचे बोलणे झोंबले. तो तिच्याकडे पाहत.

क्रमशः पुढे........


Friday, April 7, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३६

 अंबाला एका राजकुमारीची

 प्रेमकथा भाग ३६

क्रमशः पुढे चालू......




नगरनायक मृत पावल्याने तेथील प्रदेशात अराजकता निर्माण झाली. या घटनेचा फायदा उचलण्याचे महाराज वेददत्त यांनी ठरवले. व त्यांनी महारुद्रच्या अखत्यारीत सैन्यदल देऊन त्यास राजधानी व दक्षिण प्रांती असणारी शत्रू सैन्याच्या ताब्यातील नगरे जिंकण्यास पाठवले. महारुद्राने एकामागून एक नगरे जिंकण्यास सुरवात केली. नियोजनबद्धरित्या त्यांनी दक्षिण प्रांतातील उठाव मोडून काढण्यास सुरुवात केली. दक्षिण भागातील एक एक नगर जिंकत त्याने अपरान्त राजाचे सैन्य मागे पिटाळले. त्या सैन्यानी शेवटी राजधानी नगराचा ताबा घेतला. व ते प्रतिकार करू लागले. तेव्हा नगराची संपूर्ण नाकेबंदी महारुद्राने केली. त्यामुळे ते सैन्य नगरात कोंडले गेले. पण नगरतट्टाची शिबंदी फोडता येईना. तेव्हा त्याने व्युव्हरचना तयार केली. चांगले चांगले तिरंदाज घेऊन त्याने दक्षिन बाजूने नगरावर हल्ला चढवला. त्यासाठी त्याने सराईत पारधी नवयुवकांची योजना केली. पारधी लोक नेमबाजीत पटाईत होते. त्यात काही भिल्लकुमार ही होते. त्यांनी दक्षिण दरवाजा उघडणेसाठी तेथील बाह्य पहारा मोडून दरवाजावर रानातून गोळा करून आणलेली लाख ओतली. व त्यावर अग्निबाणांचा वर्षाव केला. लाख कडाडून पेटली. व त्या दरवाजास आग लागली. पण आचार्य वृषभ यांच्या शिष्यांनी ती विझवली. व दरवाजाची शिबंदी फोडू दिली नाही. शेवटी महारुद्राने अरण्यातील विशाल वृक्षाचा बुंधा आणून दरवाजा धडकी देवून मोडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा कठीण होता. शेवटी कमी पहारा बाजूने एक तुकडी घेऊन महारुद्राने चाल केली.

तिरंदाजांची मदत घेत त्यांनी पुढे एका बाजूने तटावर चढून प्रवेश केला. व दरवाजा उघडला. बाकीचे सैन्य आत घुसले. जोरदारपणे रणकंदन झाले. व महारुद्राने राजधानी जिंकून घेतली.

महाराज वेददत्त व महाराणी शामलता तिथे नंतर आल्या. व राजधानी ताब्यात घेतल्यामुळे त्याना खूप आनंद झाला. वेददत्त व शामलता या महालात आल्या. महारुद्राची दक्षिण प्रांतनायक पदी नेमणूक केली. व ते राज्यपाट सांभाळ करू लागले. पण वेददत्त यांना दुसऱ्या काळजीने ग्रासले. कारण एक मुलगा मरण पावला. तर दुसरा मतिमंद व राजकुमारी अंबालाचे देखील काय झाले हे ठावूक नाही. अशा अवस्थेत या राज्याचे पुढे काय होणार ही काळजी त्यांना लागली.

...... ....... ........

महारुद्राच्या पराक्रमाने त्यास दक्षिण नगर प्रदेशाचा कारभार मिळाला होता. त्यामुळे सर्व भिल्लांची ताकद त्या प्रदेशात वाढली होती. त्याने भिल्ल व पारधी वस्त्या सुधारणेस सुरुवात केली होती. तो आता आपल्या मातापित्याबरोबर दक्षिण भागातील नगरात असणाऱ्या भव्य प्रासादात राहू लागला. व आपल्या प्रामाणिक सहकाऱ्यांना आपल्या विभागातील ग्रामांचा प्रमुख नेमले. तो नगरात जरी राहत आसला तरी त्याचे मन अस्वस्थ होते. कारण त्यास त्या कृष्ण कुमारीचे वेड लागले होते. त्यास अनेक सुंदर युवतींनी लग्नाची मागणी घातली होती. तो दिसायला देखणा असल्याने त्याच्या मागे अनेक तरुण युवती लागल्या होत्या. पण त्यांमध्ये त्यास सौंदर्य दिसत नव्हते. त्याच्या नजरेसमोर फक्त ती पारधी युवती तरळत होती. त्याने तिला मागणी घालण्याचे ठरवले.

इकडे अंबाला व त्रिशला नेहमीप्रमाणे रानात कंदमुळे गोळा करत होती. खूप कष्ट केल्यावर थकून त्या दोघी एका उंच शिळेवर बसल्या होत्या. महारुद्र नगरनायक झाल्याची वार्ता त्यांना समजली होती. त्या दोघी थोडा वेळ त्या जंगलातील शिळेवर विसावल्या होत्या. त्यात त्रिशला आंबालेस म्हणाली, “ अंबा महालात राजवैभवात लोळणारी तू व तुझ्यासमोर तेथील मऊशार मखमली अशा पसरलेल्या पायघड्या निघून जाऊन, आपल्या नशिबाशी देवाने असा खेळ केला, की आपली सर्व सुख हिरावून घेतली. किती काळ हा आपला वनवास. ज्या मुलिसमोर नतमस्तक होणारे शिपाई कुठे? व ह्या पारधी वस्तीतल्या व इतर हिंस्र नजरा कुठे? त्यांच्याशी सामना करता आपल्याला सुळावरील पोळी घेण्यासारखा अनुभव येत आहे.”

अंबाला, “ होय, पण या निसर्ग रम्य अशा महालात जगण्याची सवय झाली आहे. फक्त काही कष्ट उपसावे लागत आहेत, पण मी आता ठरवल आहे.”

त्रिशला, “ काय ठरवल आहेस?.”

क्रमशः पुढे....


अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३५

 अंबाला एका राजकुमारीची    प्रेमकथा भाग ३५

क्रमशः पुढे चालू......



पार केल्यावर त्या लपत छपत नगराधिकाऱ्याच्या प्रासादाकडे सरकल्या. सर्व प्रासादातील व्यवहार आटोपले होते. नगरनायक झोपी गेले होते. पहारा कमी होता. काही ठिकाणी दिवट्या फक्त तेवत होत्या. अंधारातून त्या दोघी मागील बाजूपासून नगरनायक झोपलेल्या ठिकाणी त्या आल्या. तिथे पहारा देत असलेल्या सैनिकास त्यांनी सावध होऊ न देता ठार केले. त्याचे मुंडके कापून त्यांनी नाल्यात फेकले.

तेथील वृक्षाच्या साहाय्याने गच्चीत त्या उतरल्या. मागील बाजूच्या स्नानगृहातून त्या प्रासादात घुसल्या. व वाटेत येणाऱ्या सर्व खोल्या न्याहाळत चालल्या. प्रत्येक वाटेतील शिपाई सावध न होऊ देता मारत त्या पुढे नगरनायकाच्या मुलाच्या खोलीत गेल्या.तो सावध होऊन प्रतिकार करणार इतक्यात त्यास बेशुद्ध त्यांनी केले. शेवटी त्या दोघी नगरनायकाच्या कक्षात आल्या. त्यांच्या पत्नीस जी पलंगावर झोपली होती तिला बेशुद्ध केले. व नगरनायकास सावध करून त्यांनी उठवले. ती त्यास मारणार इतक्यात तो ओरडला, “ नको नको, मला मारू नका. तुम्हाला हवे तेवढे मी धन देतो. पण मला मारू नका.”

तेवढ्यात अंबालाने त्याच्या पुढे आपली तलवार धरली. ती राजेशाही तलवार पाहताच तो म्हणाला, “महाराज मला माफ करा . मी तुमचा गुन्हेगार आहे. पण मी तर हे तुमच्या पत्राच्या सांगण्याने केले. तेव्हा चुकीस क्षमा असावी. व मज जीवनदान द्यावे.”

त्याचे बरळने ऐकूण अंबालाने त्याच्या कंठावर तलवार ठेवून त्यास विचारले. की त्याने महाराज जयवर्धन यांचा विश्वासघात का केला.

तेव्हा नगरनायक थरथरत, “ पण आपण कोण आहात?”

अंबाला, “ मी महाराज जयवर्धन यांची विश्वासू सहकारी आहे. तू जर सत्य सांगितले तर आपल्यावर कृपा घडेल.”

तो बोलू लागला. त्याच्या बोलण्यातून गुप्त रहस्य उलगडत होते. त्याने एक मोहोर उमटवलेल एक राजपत्र दाखवले. ते तिने ताब्यात घेतले. व नगरनायकाचा तत्काळ शिरच्छेद केला. व त्या दालनातून त्या बाहेर पडल्या. तोपर्यंत प्रसादात कल्लोळ माजला होता. सैन्य सावध झाले होते. त्या दोघी वाटेत येणाऱ्या प्रत्येकास यमसदनी धाडत गच्चीत पोहोचल्या. तेथील वृक्षावरून खाली उतरल्या. व नाल्याकडे सरकल्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नाल्यात घुसल्या. व पोहत पोहत नाल्याच्या खालील बाजूस गेल्या. तेथील आडव्या वृक्षाच्या खोडास पकडुन बाहेर पडल्या. व अंधाऱ्या रात्री नगराबाहेर पडून घनदाट अरण्यात शिरल्या. आता त्यांचे नाल्यातून पोहल्याने सर्व अंग भिजले होते. तेथून त्या आपल्या वस्तीच्या दिशेने अरण्यवाटेने त्या निघाल्या. अंधार्या रात्री काजवी पिशवीच्या प्रकाशात त्या वेगाने निघाल्या. अरण्य मार्ग आता त्यांना बरेच माहीत झाले होते. अरण्य भरपूर चालून त्या पुढे आल्या होत्या. पहाट होऊ लागली होती. या सर्व मोहिमेत अंगाला चांगलेच ओरखडे पडले होते. त्या अरण्य वाटेने नदीतीरी आल्या. व त्यांनी पाहिले नदीस चांगलाच पूर आला होता. त्यांनी पूर्वी प्रमाणे नदी पार केली. व अरण्यात पुन्हा जाऊन आपली वस्त्रे बदलून त्या आपली शिरस्त्राने घेऊन आपल्या वस्तीवर परत आल्या.

…. …… …… ….. ……….

इकडे नगरनायकाचे मुंडके एका बाजूस पडले होते. त्याच्या प्रेतावर त्याची पत्नी शोक करत होती. सैनिक हत्यारांचा शोध घेत होते. पण त्या दिवशी सर्वत्र मुसळधार पाऊस व सर्वत्र आलेले नदी नाल्यांना पाणी व चिखलयुक्त परिसर, तसेच पावसाळी वातावरण व भयंकर अंधारी रात्र हत्यारांना पकडण्यास अडचण निर्माण करत होती. सगळीकडे अफवा पसरत होत्या. काही म्हणत होते महाराज वेद्दत्तांचे हे काम आहे. तर काही आचार्य वृषभ यांच्या शिष्यांचे हे काम असणार. राज्यपदावरील हक्कावरून हत्या झाली असावी. असे बोलत होते. कारण हल्लेखोरांनी कोणतेही धागेदोरे मागे ठेवले नव्हते. त्यांच्याशी लढताना जायबंदी झालेल्या शिपायांना त्यांच्या घोषाधारी पोषाखामुळे त्यांचे चेहरे पाहता आले नाहीत. नगरच्या बाजूला असणाऱ्या लांब लांब वस्त्या व गर्द झाडी यामुळे चौकशी कशी करायची. त्यात नगरातील विरुद्ध असणाऱ्या सर्वांना आधीच तुरुंगात घातले होते. तरी त्यांवर संशय खाणार कसे. शेवटी शांत बसून मार्ग पाहणे चालू झाले.

इकडे अंबाला व त्रिशलाने आपल्या गुप्त ठिकाणी येऊन त्यांनी आपली वस्त्रे बदलून त्या पुन्हा वस्तीवर नजर चुकवून घरात शिरल्या. महदव्वा अजून उठली नव्हती. सिपना सोबत असलेने ती लवकर उठून आपल्या घरी जेवण तयार करणेसाठी गेली होती. महदव्वा गाढ झोपली होती. तिची गुंगी उतरली नव्हती. त्या आपापल्या कामाला लागल्या. त्रिशलेन चूल पेटवली व तिच्यावर घरातील एका रांजनात ठेवलेले सडलेले तांदूळ शिजत टाकले व थंडावलेले अंग त्या शेकत बसल्या. भिजल्याने खूप थंड वाजत होती. तसेच रानातून जाताना अनेक काटेकुटे लागले होते. ते काढत शेकत त्या बसल्या. महदव्वेस जाग आली होती. ती त्यांच्या जवळ आली. तिने अंबालेच्या शरीरावर हात फिरवला व ओरखडे कशाने पडले हे विचारले.

तेव्हा अंबाला म्हणाली, “ काल मासे पकडताना एक वेतकाठी लागून पडले. इतक्यात तिथे सिपना आली. ऐव्हाना तिला त्याविषयी बरीच माहिती झाली होती. पण ती कोणाशी काही सांगत नव्हती. ती महदव्वेस काही जेवण घेऊन आली होती. त्या दोघींना पाहून केव्हा अआलात हे बोलणार इतक्यात त्रिशलाने तीस इशारा केला. तेव्हा तिने आपले बोलणे बदलले.

सीपना, आंबालेकडे पाहत, “काही म्हणेनास वर्षाऋतू मध्ये तुझा काळा रंग उतरतो. व तुझी कांती उजळू लागते बघ.”

तिने असे म्हणताच महदव्वा म्हणाली, “ गप्प सिपने तुझी दृष्ट लागेल तिला.”

तेव्हा अंबेकडे त्रिशलेच लक्ष गेलं. व तिच्या लक्षात आले की अंबालेची काजळी उतरत आहे. तेव्हा तिने लगेच रात्री एकांतात तिला पुन्हा काजळी लावली. व ती पुन्हा कृष्ण वर्णी दिसू लागली.

…. ….. ……. ….. …… …..

क्रमशः पुढे......

Wednesday, April 5, 2023

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ३४



क्रमशः पुढे चालू.....

घरी आल्यावर त्रिशलेन पाहिलं की अंबेच्या हाती जखम आहे. तिने त्याविषयी विचारणा केली. तेव्हा शेजारील सिपना ही तिच्यासोबत होती. तिने सर्व हकीकत सांगितली.

अंबेशी ती बोलू लागली. थोड्या वेळाने सीपना निघून गेली. महदव्वा पण झोपली होती. आंबेस शांत पाहून त्रिशलेन विचारलं तेव्हा ती बोलू लागली.

त्रिशला, “ अशी मुखस्तंभ का आहेस.”

अंबाला, “ मी त्या तरुणास पाहिले. आज अगदी जवळून,”

त्रिशला, “ त्यात काय विशेष.”

अंबाला, “ आपणास वाटतो तितका तो शांत नाही. त्याच्या अंगावर मी काही व्रण पाहिले. जे तलवारी व भाल्याच्या वारांचे होते.”

त्रिशला, “ त्यात काय एवढं, असेल एखाद्या मोहिमेवर तो.”

अंबाला, “ आज काल जर एखादा संघर्ष झाला असेल. तो फक्त आचार्य वृषभ यांच्या आश्रमातील. मला वाटते. तो त्या मोहिमेत सामील असेल.”

त्रिशला, “ त्याने आपल्याला पाहिले नाही ना. मग सोड.”

अंबाला, “ पण माझी साखळी हरवली त्याचे काय?”

त्रिशला, “ हे बघ ते विसर कारण शिव ही कोणाचीही देवता आहे. मग कोण ओळखेल. व इथे कोणी इतका श्रीमंत नाही. जो सुवर्ण साखळी घालेल. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. इथे चौकशी होणार नाही. व हा विचार करण्यापेक्षा आपण पुढील योजना तडीस नेली पाहिजे. कारण आपणास पुढे नगर नायकाचा बदला घ्यायचा आहे.”

 नगर नायकाचा काटा काढण्यासाठी त्या योजना आखणी करू लागल्या. त्यासाठी नगरनायकाचा वाडा व तेथील पहारा पाहाणीसाठी व काही खरेदीसाठी त्यांनी नगरात जायचे ठरवले . घरातील पाणी पिण्यासाठी एक मोठाला माठ हवा होता. तसेच काही जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी त्या पेठेत गेल्या.

पेठेत आल्यावर त्या प्रत्येक देवडी न्याहाळत निघाल्या. तेथून पुढे काही अंतरावरच नगर नायकाचा वाडा होता. तांबड्या मातीने सारवलेल्या घरांच्या रांगेतून त्या पुढे निघाल्या. खरेदी विक्रीचा वार असल्याने पेठेत गर्दी होती. जागोजागी पहारा होता. कारण सदर पेठ ही नगर नायकाच्या ताब्यात होती. व राजधानी सुध्दा. व आचार्य वृषभ यांच्या हत्येमुळे नगरनायक सावध झाला होता. व त्याने पहारा वाढवला होता. नगर नायकाने अपरांत राज्यातून एक सैन्य तुकडी ही मागवली होती. व त्यामुळे एका लष्करी छावणीचे रुप तिजवर आले होते. नगर मोठे होते. पण झाडीमुळे तिथे अलिप्तता तिथे होती. पुढील कडक पहाऱ्यामुळे तिथे जाणे अवघड होते. मात्र मागील बाजूस झाडी होती. त्यातील एक वृक्ष हा त्या महालाच्या गच्चीस लागून होता. तेथे मागील बाजूस एक नाला होता. व त्या परिसरात विषारी सर्पांचा वावर होता. त्यामुळे कोणीही तिकडील बाजूस जात नसे. वाड्याची पाहणी करून त्या पुन्हा पेठेत घुसल्या. व तेथे त्यांनी अफू व काही चामडे एका व्यापाऱ्याला कडून खरेदी केले. तसेच शिवनावळीचे साहित्य ही त्यांनी एका ठिकाणाहून घेतले. व कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी केला. त्यात सर्व आवश्यक साहित्य खरेदी करुन भरले. व त्या परतल्या.

वस्तीवर येण्यापूर्वी त्यांनी ते चामडे व शिवणावळीचे साहित्य बाहेर अरण्यात लपवले. व माठ अन् जीवनावश्यक साहित्य घेऊन त्या वस्तीवर परतल्या. व काही ना काही कारणास्तव त्या तिथे जात. व त्या चामड्यापासून त्यांनी सुंदर असे गुडघ्यापर्यंत पाय सुरक्षित ठेवणारी व हस्त सुरक्षा आवरणे बनवली.

जी अत्यंत जाड होती. त्या रोज रानात जात पण महदव्वा मात्र त्यांना काही बोलत नसे. कारण त्याच तिला सांभाळत होत्या. ती त्यांच्या धाडसाचे कौतुक करीत असे.

त्या दोघी नगरनायकाचा काटा काढण्यासाठी योजना आखनिस लागल्या. योग्य संधीची वाट पाहू लागल्या.

कुंतल प्रदेशात वर्षाराणीचे आगमन दरवर्षी होत असते. तिच्या मध्यावधी काळात पुनर्वसु नक्षत्रात तर जास्तच जोर येत असे. शेतकी कामात अनेक लोक गुंतत असत व रप रप बडवणाऱ्या पर्जण्याच्या दिवसात राज्य नगरातील पहारा कमी होत असे. याच संधीचा फायदा करून घेण्याचे अंबालाने ठरवले. व ती त्रिशलेसवे तयारीला लागली. नगरात जाणारी एक वाट ही नदीच्या मार्गे जात होती. उगम प्रदेशात नदीच्या ती असल्याने ती लांघणे तसे अवघड नव्हते. मात्र तिथे पाण्याचा वेग अती तीव्र असे. दक्षिण कुंतल हे पर्जन्याचे आगर होते. या प्रदेशात वेत बेटे पुष्कळ होती. ती नदी तीरावर अशी वाढली होती की एकप्रकारे वक्र कमानीचे प्रवेशद्वारच बनवत. या दिवसात तांदूळ व नागली यासारखी पिके इथे जास्त घेत असल्याने त्यांची लागन लवकर होई. व लोक घरात राहणेच पसंत करत असत. याच वेळेचा फायदा घ्यायचे अंबाला व त्रिशलेन ठरवले. योजने नुसार त्यांनी एक दिवस निवडला. त्या दिवशी पावसाने अधिकच जोर धरला होता. नदीतील मच्छीचे कालवण त्रिशलेने बनवले. महदव्वेस जेवण वाढले. त्या ही जेवल्या. नंतर त्यांनी एक तांबूल महादव्वेला खायला दिला. त्यामध्ये त्रिशलेन अफू घातली होती. तिच्या गुंगिने ती वृद्धा निद्रिस्त झाली. तिला घराच्या आतील भागात झोपवून शेजारील सीपनेस लक्ष देण्यास सांगून त्या दोघी बाहेर निघाल्या. बाहेर पाऊस पडत असल्याने जाणे अशक्यच एखादा मुसळ आयनात कोसळावा तशा वेगाने कोसळत होता. त्या दोघींनी वेताच्या बारीक कांबट्यांपासून बनवलेले शिरस्त्राण धारण केले होते. त्यांनी ते आपल्या डोक्यावर परिधान केले होते.

त्या वस्तीवरुन निघाल्या. वर्षा ऋतू त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. त्या जवळील अरण्यात गेल्या. तिथे त्यांनी गुप्तरित्या लपवलेली शस्त्रे व आपली चामडी वस्त्रे त्यांनी जिथे ठेवली होती ती घेतली. तेथील एका कपारीत असणाऱ्या गुहेत त्यांनी पेहराव बदलला. व वरती आपला गुप्त पोशाख घातला. थोड भिजल्याने चामड्यास उग्र वास येत होता. पण आता त्या चांगल्याच सरावलेल्या होत्या. पेहराव केल्यानंतर त्या अरण्य वाटेने नगराकडे चालू लागल्या. पुढे नदीकाठी आल्या. नदीला भरपूर पाणी आले होते. नदितिराने त्या उगम बाजूस असणाऱ्या वेत वनात आल्या. तिथेही भरपूर पाणी होते. त्या नदी तुंबात शिरून वेत बेटाजवळ आल्या. आपली शिरस्त्राने बाजूला ठेवली. व डोक्याला दुसरे वस्त्र बांधले. व आपली शस्त्र नीट बांधून त्या बेटावर चढून त्या शेंड्याकडे सरकल्या. नदीच्या पलीकडे असणारी बेटे सुध्दा वाकल्याने त्यांची गुंफण झाली होती. अलीकडील बेटातून वर चढून पलीकडील बेटावर जाऊन त्या नदीपार गेल्या. नदीपार गेल्यावर त्या नगराकडे सरकल्या. तिथे पोहोचेपर्यंत त्याना संध्याकाळ झाली. तिथे गेल्यावर त्यांनी एका जागी आडोसा शोधून आपल्या कडील बंद पिशवीतील सुखामेवा खाल्ला. व पुढे नगराकडे गेल्या. नगर वेशीवर पहारा सौम्य होता. त्यांनी दुसरीकडून नगरात प्रवेश केला. आता रात्र चांगलीच झाली होती. नगर नायकाच्या महाला मागे नाल्यास लागून असलेल्या किर्र झाडीत त्या गेल्या. झाडीच्या गच्च पणामुळे पावसाचा शिडकावा जाणवत नव्हता. तेथे अल्प फलोपहार घेऊन त्या अंधार वाटेने नाल्यात उतरल्या. नाल्यास पाणी आल्याने तेथील सर्प दुसरीकडे गेले होते. व सुरक्षित पेहराव केल्याने त्यांना घाबरण्याची गरज नव्हती. नाला पार करण्यासाठी सुरक्षित जागा त्यांनी हेरली. एका वृक्षाच्या साहाय्याने त्यांनी तो पार केला. 

क्रमशः पुढे.....

अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५

  अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४५ क्रमशः पुढे चालू.... सदर घटने नंतर महारुद्राने राजमहालात जाऊन आपले सर्व कुटुंब त्याने प्रधानाच्या...